Friday, December 31, 2021

नागरिकांनी नियमांचे पालन करावे - जिल्हाधिकारी पवनीत कौर




 ‘ओमायक्रॉन’ प्रतिबंधासाठी सुधारित निर्बंध जारी

नागरिकांनी नियमांचे पालन करावे

-        जिल्हाधिकारी पवनीत कौर

            अमरावती, दि. ३१ : मायक्रॉन प्रकाराच्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपत्‍ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाकडून सुधारित मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. या सूचना संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागासाठी आजपासून पुढील आदेशापर्यंत लागू करण्यात आल्या आहेत. तसे आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी निर्गमित केले आहेत.

 

त्यानुसार     लग्‍नसोहळा व लग्‍नसमारंभाच्‍या बाबतीत , बंदिस्त जागा, हॉल, मेजवानी/मॅरेज हॉल इ. तसेच  खुल्‍या जागेकरिता  उपस्थितांची मर्यादा ५० पेक्षा जास्‍त ठेवता येणार नाही.  इतर सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कार्ये आणि मेळाव्याच्या बाबतीत, जेथे उपस्थितांची उपस्थिती बंद जागेसाठी आणि खुल्या जागेसाठी ५०  पेक्षा जास्‍त ठेवता येणार नाही. अंत्यविधीसाठी उपस्थितांची मर्यादा २० व्‍यक्‍ती एवढी मर्यादित आहे.

     

जिल्ह्याच्‍या कोणत्याही भागात जी पर्यटन स्थळे आहेत किंवा गर्दी होणा-या सार्वजनिक स्‍थळी अतिरिक्त निर्बंध लागू करण्यासाठी सक्षम अधिकारी आवश्यकतेनुसार कलम १४४ लागू करतील. मास्क, स्वच्छता व  सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्ती त्यांचेमध्ये कमीत कमी सहा फुटाचे  सुरक्षित अंतर राहील याची दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.     

नववर्षाचे स्वागत दक्षता पाळून करा - जिल्हाधिकारी पवनीत कौर

 


नववर्षाचे स्वागत दक्षता पाळून करा

- जिल्हाधिकारी पवनीत कौर

 

अमरावती, दि. 31: ओमायक्रॉन  व्हेरिएंट व कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर, नववर्षाचे स्वागत करताना दक्षतेचेही पालन व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

 

शासनाने याबाबत मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. नागरिकांनी नववर्षाचे स्वागत घरीच साजरे करावे. रात्री 9 ते सकाळी 6 दरम्यान संचारबंदी लागू आहे. त्याचे काटेकोर पालन व्हावे.

 

नववर्ष स्वागत विशेष कार्यक्रमासाठी बंदिस्त सभागृहात क्षमतेच्या 50 टक्के व खुल्या जागेत 25 टक्के मर्यादेत उपस्थित राहण्यास परवानगी आहे. ज्येष्ठ व बालकांनी घराबाहेर पडणे टाळावे. आतषबाजी टाळावी. मास्क, सोशल डिस्टन्स व स्वच्छता आदी नियम काटेकोरपणे पाळावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी केले आहे.

 

00000

Thursday, December 30, 2021

जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटातील दीड लाख मुलांचे होणार लसीकरण नोंदणी शनिवारपासून, लसीकरण 3 जानेवारीपासून - जिल्हाधिकारी पवनीत कौर


 

जिल्हाधिका-यांनी घेतला लसीकरणाचा आढावा

जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटातील दीड लाख मुलांचे होणार लसीकरण

नोंदणी शनिवारपासून, लसीकरण 3 जानेवारीपासून

 

-          जिल्हाधिकारी पवनीत कौर

अमरावती, दि. 30 : शासनाच्या निर्देशानुसार 15 ते 18 वयोगटातील मुलांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण, तसेच हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर, 60 वर्षे व त्यावरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना प्रिकॉशन डोस देण्यात येणार आहे. त्यानुसार कुमारवयीन वयोगटातील अमरावती जिल्ह्यात 1 लाख 49 हजार 956 आणि 60 वर्षांवरील व सहव्याधी असलेल्या 71 हजार 963 व्यक्तींचे लसीकरण दि. 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे. कुमार वयोगटासाठीची कोविन ॲपद्वारे नोंदणी 1 जानेवारीपासून सुरू होणार आहे. याबाबत जिल्ह्यातील ग्रामीण भागात व महापालिका क्षेत्रात परिपूर्ण नियोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले.

 

            जिल्हाधिका-यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात लसीकरणाचा आढावा घेतला, तसेच नव्याने करावयाच्या लसीकरणाचे परिपूर्ण नियोजन करण्याचे निर्देश दिले. आरोग्य विभागासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

15 ते 18 वयोगटातील मुलांचे कोविड- 19 लसीकरण, तसेच हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर आणि 60 वर्षे व त्यावरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना प्रिकॉशन डोस देण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार नोंदणी व लसीकरण सुरु करण्यात येत आहे. कुमार वयोगटातील मुलांना कोव्हॅक्सिन लसच देण्याचा आदेश असल्याने ती लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न होत आहेत. 15 ते 18 वयोगटाच्या लसीकरणासाठी स्वतंत्र लसीकरण केंद्रे निश्चित करण्यात येत आहेत. त्यादृष्टीने नियोजन होत असल्याचे डॉ. रणमले यांनी सांगितले.

                                फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण 10 जानेवारीपासून

हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर यांनी दोन्ही मात्रा घेतल्या असतील तर त्यांना 10 जानेवारीपासून प्रिकॉशन डोस देण्यात येणार आहे. अशा व्यक्तीने दुसरी मात्रा घेतल्यानंतर नऊ महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे.

ज्येष्ठ व्यक्तींना प्रमाणपत्राची गरज नाही

60 वर्षे किंवा त्यावरील सहव्याधी असलेल्या व्यक्तींना प्रिकॉशन डोस घेताना लसीकरण केंद्रावर प्रमाणपत्र दाखविण्याची गरज नाही. मात्र, त्यांनी तिस-या मात्रेचा निर्णय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेण्याचे आवाहन आहे.

खासगी लसीकरण पूर्वीच्याच दरात

शासकीय लसीकरण केंद्रांवर ही लस विनामूल्य असेल. ज्यांना खासगी लसीकरण केंद्रावर लस घ्यायची आहे, त्यांना केंद्र शासनाने पूर्वी घोषित केलेल्या किमतीतच लसीकरण करता येईल. त्यात कुठलाही बदल नाही.

कोविन ॲपमध्ये नोंदणीच्या सुविधा आहेत

·         हेल्थ केअर वर्कर, फ्रंट लाईन वर्कर व 60 वर्षे वा त्यावरील सहव्याधी असलेले नागरिक

हेल्थ केअर वर्कर, फ्रंट लाईन वर्कर व 60 वर्षे वा त्यावरील सहव्याधी असलेले नागरिक यांना त्यांच्या सध्याच्या कोविन अकाऊंटवरून प्रिकॉशन डोससाठी नोंदणी करता येईल. दुस-या डोसनंतर 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण होणे आवश्यक आहे. यातील व्यक्तींनी कार्यालयाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यांचे लसीकरण केवळ शासकीय केंद्रांवर होईल.

 

·         15 ते 18 वयोगटातील नवीन लाभार्थींची नोंदणी 1 जानेवारीपासून

सन 2007 किंवा त्यापूर्वी जन्मलेले लाभार्थी पात्र राहतील. लाभार्थ्यांना कोविन प्रणालीवर स्वत:च्या मोबाईल क्रमांकाद्वारे नोंदणी करता येईल. ही सुविधा 1 जानेवारीपासून सुरू होईल. नोंदणी लसीकरण केंद्रांवरही करता येईल. या वयोगटातील लाभार्थ्यांना स्वतंत्र लसीकरण केंद्रे असतील किंवा जिथे स्वतंत्र केंद्रे सुरु करणे शक्य नसेल तिथे स्वतंत्र रांगांची सोय असेल.  

०००


कोविड प्रतिबंधक लसीकरण उद्दिष्टपूर्तीमध्ये तिवसा तालुका अव्वल जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

 





 कोविड प्रतिबंधक लसीकरण उद्दिष्टपूर्तीमध्ये तिवसा तालुका अव्वल

 जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

 भातकुलीचा दुसरा तर धामणगाव रेल्वेचा तिसरा क्रमांक

अमरावती, दि. 30 : कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी 11 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत सर्वाधिक लसीकरण केलेल्या तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांचा जिल्हाधिकारी पवनीत कौर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सत्कार करण्यात आला.

कोरोना लसीकरणाच्या पहिल्या मात्रेची 94.90 टक्के लसीकरण केल्यामुळे जिल्ह्यामध्ये तिवसा तालुक्याचा प्रथम क्रमांक आला आहे. तर भातकुली येथे 87.73 टक्के लसीकरण केल्यामुळे दुसरा क्रमांक आला असून धामणगाव रेल्वे येथे 87.1 टक्के लसीकरण पूर्ण केल्यामुळे तृतीय क्रमांक आला आहे. येथील तालुका आरोग्य अधिकारी तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना यावेळी प्रशस्तीपत्र तसेच धनादेश देऊन गौरविण्यात आले.

कोरोना लसीकरणाच्या पहिल्या डोसची उद्दिष्टपूर्ती केल्यामुळे तिवस्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जोत्स्ना पोटपिटे-देशमुख यांना 20 हजाराचा धनादेश व प्रशस्तीपत्र, भातकुलीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अक्षय निकोसे यांना यांना 15 हजाराचा धनादेश व प्रशस्तीपत्र तर धामणगाव रेल्वेचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल क्षीरसागर यांना 10 हजाराचा धनादेश व प्रशस्तीपत्र देऊन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र मार्डी व बेनोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात 100 टक्के आणि कुऱ्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात 98.5 टक्के कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. उदिष्टपूर्तीच्या अग्रक्रमानुसार, मार्डी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. सुमित गजभिये यांना 30 हजाराचा धनादेश व प्रशस्तीपत्र, बेनोडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. अमित देशमुख यांना 25 हजाराचा धनादेश व प्रशस्तीपत्र, कुऱ्हा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. सतीश गारोडे यांना 20 हजाराचा धनादेश व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

कोरोना संसर्गजन्य रोगाचे संकट टाळण्यासाठी प्रशासन तसेच आरोग्य विभागामार्फत लसीकरण व्यापक प्रमाणावर व्हावे यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.  याचीच परिणती म्हणून या तालुक्यांमध्ये लसीकरणाचे उद्दिष्ट मोठ्या प्रमाणावर साध्य झाले आहे. याबाबत श्रीमती पवनीत कौर यांनी समाधान व्यक्त केले. इतर तालुक्यांमध्येही याच धर्तीवर व्यापक प्रमाणावर लसीकरण मोहिम राबविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

31 डिसेंबर 2021 ते 15 जानेवारी 2022 या कालावधीत कोरोना लसीकरणाचा दुसरा डोस राहिलेल्या 1 लाख 17 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी व्यापक मोहिम राबविण्यात येणार आहे. या कालावधीत लसीकरण करुन घेणाऱ्या नागरिकांमधून 10 लकी ड्रॉ काढून त्यांना ‘किचन मिक्सर’ बक्षीस म्हणून देणार असल्याचे श्रीमती पवनीत कौर यांनी यावेळी जाहीर केले.

3 जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वर्षे वयोगटासाठी कोरोना लसीकरण मोहिम सुरु करण्यात येणार आहे. यासाठी 15 ते 18 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांसाठी 1 जानेवारी 2022 पासून ऑनलाईन नोंदणी सुविधा उपलब्ध होईल. लाभार्थ्यांनी यावर ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रेवती साबळे, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बीजवल, वरुडचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमोल देशमुख, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. पवन धाकडे आदी यावेळी उपस्थित होते.

00000

 

Wednesday, December 29, 2021

जिल्हाधिका-यांकडून चिखलद-यात लसीकरणाचा आढावा

 


जिल्हाधिका-यांकडून चिखलद-यात लसीकरणाचा आढावा

मेळघाटात संपूर्ण लसीकरणासाठी काटेकोर नियोजन करावे

- जिल्हाधिकारी पवनीत कौर

 

अमरावती, दि. २९ : मेळघाटात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रभावी जनजागृती व नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज चिखलदरा येथे दिले. 

मेळघाटातील लसीकरणाचा आढावा घेताना त्या बोलत होत्या. उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार माया माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले आदी उपस्थित होते. 100 शेततळे योजनेचा शुभारंभही यावेळी जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत झाला.

महान ट्रस्टतर्फे लसीकरणाबाबत जनजागृती केली जात आहे. त्याची व लसीकरण केंद्रांची पाहणी जिल्हाधिका-यांनी केली. तहसील कार्यालय व नगरपरिषद कार्यालयालाही भेट देऊन त्यांनी कामाची माहिती घेतली.

लसीकरणाबाबत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी श्रीमती कौर म्हणाल्या की, लसीकरणाचे काम अधिक काटेकोर व निर्दोष नियोजनातून पूर्ण झाले आहे. लसीकरण पथकांनी गावात सकाळी लवकर पोहोचणे आवश्यक आहे. नंतर शेतकरी बांधव शेतांकडे निघून जातात. टेंभूरसोडा येथे पथक उशिरा पोहोचल्याचे आढळले. त्यामुळे गावात अधिकाधिक लोक उपलब्ध असण्याची वेळ लक्षात घेऊन लसीकरणाची वेळ निश्चित करावी. ती एकतर सकाळी नऊ ते दुपारी दोन असावी किंवा सायंकाळी चार ते आठ असावी. अनेक पाड्यांमध्ये अजूनही जनजागृती आवश्यक आहे. पथकांनी स्थानिकांचे स्थलांतर आदी बाबी लक्षात घेऊन त्याबरहूकुम नियोजन केले पाहिजे व अधिकाधिक लसीकरणासाठी प्रयत्न केले पाहिजेत. 

दुस-या मात्रेच्या लाभार्थ्यांच्या याद्या ‘एमओंकडे असाव्यात

 

दुस-या डोसबाबतही गांभीर्याने कार्यवाही व्हावी. दुस-या डोसला पात्र व्यक्तींच्या याद्या संबंधित वैद्यकीय अधिका-यांकडे असल्या पाहिजेत. त्या पाहून संबंधितांना डोसबाबत सूचित केले पाहिजे. पहिल्या व दुस-या मात्रेतील अंतराबाबत जो कालावधी निश्चित करून दिला आहे, त्याचे पालन झाले पाहिजे, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

 

                                             ०००

 

 

Tuesday, December 28, 2021

जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसान; तत्काळ पंचनामे करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश



जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसान; तत्काळ पंचनामे करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

एकही बाधित मदतीपासून वंचित राहता कामा नये

- पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. २८ : जिल्ह्यात अवकाळी पावसाने व काही ठिकाणी गारपिटीने विवीध भागात नुकसान झाले आहे. प्रशासनाने नुकसानग्रस्त भागात तत्काळ व सविस्तर पंचनामे करावेत. एकही बाधित व्यक्ती मदतीपासून वंचित राहता कामा नये, असे स्पष्ट निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.

 

जिल्ह्यात आज ठिकठिकाणी पाऊस पडून नुकसान झाले. चांदुर रेल्वे तालुक्यातील मौजे तळेगाव दशासर येथील गजानन बापुराव मेंढे (वय ४०) यांचा आज सायंकाळी वीज पडून मृत्यू झाला. त्यांच्या कुटूंबियांना सर्वतोपरी मदत मिळवून देण्यात येईल. शासन आपद्ग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिली.

 

नुकसानाची सविस्तर माहिती घ्या

 

मोर्शी, चांदुर बाजार या तालुका परिसरात काही ठिकाणी गारपीट झाली आहे. याबाबत व इतरही ठिकाणी पावसाने झालेल्या  नुकसानाचे सविस्तर पंचनामे प्रशासनाने तत्काळ सुरू करावेत. प्रत्येक नुकसानीची तपशीलवार नोंद घ्यावी. शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे जाणून घ्यावे. एकही बाधित व्यक्ती भरपाईपासून वंचित राहता कामा नये, असे सुस्पष्ट निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.

 अवकाळी पाऊस व गारपीटमुळे नुकसानीचे अहवाल तत्काळ सादर करण्याचे निर्देश सर्व उपविभागीय व तहसील कार्यालयांना देण्यात आले आहेत. 

 

नुकसानीचे पंचनामे करून तातडीने नुकसानीचे अहवाल देऊन मदतनिधी बाबतचा प्रस्ताव शासनास सादर करावा,असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले आहेत.

 

०००

 


'तपोवन'चा अमृतमहोत्सव : पद्मश्री शिवाजीराव पटवर्धन यांची १३० वी जयंती










'तपोवन'चा अमृतमहोत्सव : पद्मश्री शिवाजीराव पटवर्धन यांची १३० वी जयंती

दाजीसाहेबांचे मानवसेवेचे व्रत समर्थपणे व एकजुटीने पुढे नेऊया

-         न्यायमूर्ती भूषण गवई

 

            अमरावती, दि. १२ : मानवसेवा हाच धर्म मानून पद्मश्री शिवाजीराव उपाख्य दाजीसाहेब पटवर्धन यांनी कार्य केले. त्यांचा वारसा तपोवन येथील संस्था समर्थपणे सांभाळत आहे. आपण सर्व अमरावतीकर मिळून मानवसेवेचे हे व्रत एकजुटीने नेऊया, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज येथे केले.   

विदर्भ महारोगी सेवा मंडळातर्फे तपोवन येथे संस्थेचे संस्थापक पद्मश्री डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांची १३० वी जयंती व संस्थेचा अमृत महोत्सवी सोहळा तेथील शिवउद्यान परिसरात झाला. त्याला प्रमुख अतिथी म्हणून न्यायमूर्ती श्री. गवई उपस्थित होते. तपोवन संस्थेचे अध्यक्ष डॉ. अतुल आळशी अध्यक्षस्थानी होते. माजी लेडी गव्हर्नर डॉ. कमलताई गवई, जोग चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश सावदेकर, श्री अंबादेवी संस्थानच्या अध्यक्ष श्रीमती विद्याताई देशपांडे, डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वर्षाताई देशमुख, तपोवन संस्थेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. सुभाष गवई,  ज्येष्ठ पत्रकार विलास मराठे, प्रभारी सचिव सहदेव गोळे, सदस्य भगवंतसिह दलावरी, झुबीन दोटीवाल, डॉ. प्रतिक राठी, विवेक अरूण मराठे, समाजसेवक डॉ. गोविंद कासट, विद्याताई देसाई आदी उपस्थित होते. 

 
          न्यायमूर्ती श्री. गवई म्हणाले की, दाजीसाहेबांनी आपल्या कार्यातून प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे मानवसेवेचे हे व्रत पुढे नेण्यासाठी समाजाने, युवकांनी योगदान दिले पाहिजे. ज्यांना समाजाने नाकारले त्या कुष्ठबांधवांच्या सक्षमीकरणासाठी तपोवनची स्थापना करून थिट्या हातांना स्वावलंबी होण्याचा मूलमंत्र दाजीसाहेबांनी दिला. माजी राज्यपाल दादासाहेब गवई यांच्याशी दाजीसाहेब यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. दाजीसाहेबांची प्रतिमा अजूनही मनात ताजी आहे. कुष्ठबांधवांचा प्रश्न सोडविण्यासाठी कायदा निर्माण व्हावा, असा त्यांचा प्रयत्न होता. त्यानुसार शासनाने गवई समिती स्थापन केली. दाजीसाहेबांच्या मानवसेवेच्या
 कार्याचे मोल जाणून दादासाहेबांनी सतत सहकार्य केले. या समितीच्या अहवालाधारे कुष्ठबांधवांना न्याय मिळाला.

तपोवनातील लसीकरण पूर्ण

कोविडकाळात तपोवनात केलेल्या उपाययोजनांची माहिती श्री. आळशी यांनी दिली. ते म्हणाले की, कोविडकाळात दक्षता व उपाययोजनांमुळे तपोवनात कुठलीही हानी झाली नाही. येथील लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. संस्थेतर्फे दिव्यांग विद्यापीठ व इतर उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली.

प्रारंभी न्यायमुर्ती श्री. गवई यांनी दाजीसाहेब यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला हारार्पण करत अभिवादन केले. तपोवन संस्थेचे सदस्य विवेक मराठे यांनी सादर केलेल्या संस्थेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन न्यायमूर्तींच्या हस्ते झाले. तपोवन संस्थेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांनी प्रास्ताविक केले. सेवानिवृत्त मुख्याध्याक अब्दुल रशीद यांनी ओघवत्या भाषेत सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने संस्थेचे पदाधिकारी, माजी विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

00000

  

उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती तालुका स्तरावर स्थापन करा - निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बीजवल

 





उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती तालुका स्तरावर स्थापन करा

                                                                    -निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बीजवल

 

अमरावती,दि 28: जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची सभा निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बीजवल यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. पोलीस अधिक्षक (ग्रामीण) अविनाश बारगड, सहा.पोलीस आयुक्त  गजानन खिल्लारे तसेच समाज कल्याण सहायक आयुक्त माया केदार आदी यावेळी  उपस्थित होते.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 अंतर्गत अत्याचारग्रस्त व्यक्तींना देण्यात आलेल्या आर्थिक सहाय्य आणि मदत  प्रकरणांचा यावेळी आढावा घेण्यात आला.

माहे 1 जानेवारी   ते 30 नोव्हेंबर 2021 अखेर दाखल प्रकरणे व अर्थसहाय्याची माहिती पोलीस विभागाची कारवाई सभेत सादर करण्यात आली.  जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले. त्यावर पोलीस तपासावरील प्रकरणे निकाली काढण्यास मा.उच्च न्यायालय यांना विनंती करुन या स्तरावरून याबाबत पाठपुरावा करावा, असे आदेश यावेळी देण्यात आले.

ज्या प्रकरणामध्ये जातीचे प्रमाणपत्र प्राप्त झाले नाही व त्याकारणाने दोषारोप न्यायालयात सादर करण्यास विलंब होत आहे, अशा 14 प्रकरणात जातीचे प्रमाणपत्र तात्काळ निर्गमित करण्याचे आदेश सर्व उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.

वरील कायदयाअंतर्गंत उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती अद्याप तालुका स्तरावर स्थापन करण्यात आली नाही. यावर त्वरित कार्यवाही करून उपविभागीय समिती स्थापन करण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना आदेशित करण्यात आले आहे. 

0000


Sunday, December 26, 2021

तिर्थक्षेत्रांच्या कामांचे प्रस्ताव द्या; आवश्यक निधी मिळवून देऊ - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 




तीर्थक्षेत्र विकास आढावा बैठक
तिर्थक्षेत्रांच्या कामांचे प्रस्ताव द्या
; आवश्यक निधी मिळवून देऊ

- पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. २६ : तीर्थक्षेत्र व महत्वाच्या स्थळांचे स्वतंत्र विकास आराखडे तयार करून विविध सुविधांच्या उभारणीतून पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यानुसार जिल्ह्यातील महत्वाच्या तीर्थस्थळी आवश्यक कामांचे परिपूर्ण प्रस्ताव शासनाला सादर करावेत. या कामांसाठी आवश्यक निधी मिळवून देऊ, अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड.यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिली.

जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र विकासाबाबत आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झूम प्रणालीद्वारे झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार देवेन्द्र भुयार, जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्यासह महसूल, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील श्री क्षेत्र रिध्दपूर, श्रीक्षेत्र कपिलेश्वर देवस्थान उर्फ महादेव संस्थान, गव्हाणकुंड, श्रीक्षेत्र मुदगलेश्वर भारती महाराज संस्थान, अंबाडा,  श्रीक्षेत्र यशवंत महाराज संस्थान, मुसळखेड ता.वरुड, जहागीरपुर ता.तिवसा या तीर्थक्षेत्र स्थळी आवश्यक कामांचे प्रस्ताव शासनास सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. त्या म्हणाल्या की, आवश्यक कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. मोझरी व कौंडण्यपूर विकास आराखड्यात अनेक महत्वपूर्ण कामे व सुविधांचे नियोजन करण्यात येऊन, अनेक कामांची पूर्तताही झाली आहे. त्याचप्रमाणे, इतर तीर्थक्षेत्र स्थळांवरही विविध सुविधांची उभारणी करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार आवश्यक प्रस्ताव द्यावेत.

विहित मुदतीत ही कामे पूर्णत्वास जाणे आवश्यक आहे. त्यानुसार गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

०००

Friday, December 24, 2021

गुरूदेवनगर येथील शिबिरात दिव्यांग बांधवांची तपासणी; त्यांना विनामूल्य उपकरणे मिळणार आतापर्यंतच्या शिबिराचा दोन हजारहून अधिक दिव्यांग बांधवांना लाभ -पालकमंत्री यशोमती ठाकूर

 










‘सेवा माह’ उपक्रमातून गरजूंना आवश्यक सेवा- सुविधा
गुरूदेवनगर येथील शिबिरात
 दिव्यांग बांधवांची तपासणी; त्यांना विनामूल्य उपकरणे मिळणार

आतापर्यंतच्या शिबिराचा दोन हजारहून अधिक दिव्यांग बांधवांना लाभ

-पालकमंत्री यशोमती ठाकूर

अमरावती, दि. 23 : केंद्रिय दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग व मोझरी येथील श्री रामचंद्र युवक कल्याण संस्थेतर्फे विविध तालुक्यांतील दिव्यांग बांधवांची तपासणी शिबिरे ठिकठिकाणी घेण्यात येत आहेत. त्याअंतर्गत आज गुरुदेवनगर मोझरी येथील मल्टिपर्पज हॉलमध्ये झालेल्या शिबिरात 537 दिव्यांग बांधवांची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत विविध ठिकाणी झालेल्या शिबिरांमध्ये दोन हजारहून अधिक दिव्यांग बांधवांनी लाभ घेतला आहे.

            दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग व श्री रामचंद्र युवक कल्याण संस्थेतर्फे लोकनेते स्व. भैय्यासाहेब ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त 28 जानेवारीपर्यंत संपूर्ण महिना ‘सेवा माह’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार ‘एडिप’ योजनेत दिव्यांग बंधूभगिनींना पहिल्या टप्प्यात तपासणी व दुस-या टप्प्यात उपकरण व आवश्यक साहित्याचे विनामूल्य वाटप करण्यात येणार असून, अनुदानाव्यतिरिक्त लाभार्थ्याने भरावयाचा हिस्सा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून भरला जाणार आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांना कुठलाही खर्च लागणार नाही.  दिल्ली येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे.

           

 मोर्शी तालुक्यात पहिले शिबिर लेहगाव, भातकुली तालुक्यात सिकची रिसॉर्ट येथे, तर अमरावती तालुक्यासाठी क्षितिज मंगल कार्यालयात शिबिर झाले आहे. सुमारे दोन हजार दिव्यांग बांधवांनी याचा लाभ घेतला. शिबिरांत नोंदणीकृत, तसेच नोंदणी नसलेल्या दिव्यांगजनांनाही लाभ मिळवून देण्यात येत आहे. दिव्यांग बांधवांच्या तपासणीनंतर त्यांच्या गरजेनुसार मोजमाप घेऊन आवश्यक ट्रायसिकल, कॅलिपर्स, फूट, श्रवणयंत्र, स्टिक आदी साहित्य विनामूल्य देण्यात येणार आहे.  

                        000 

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...