ध्वजदिन 2021 निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा निधी संकलनाचे उद्दिष्ट प्रजासत्ताक दिनापूर्वी पूर्ण व्हावे - जिल्हाधिकारी पवनीत कौर



















 ध्वजदिन 2021 निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा

निधी संकलनाचे उद्दिष्ट प्रजासत्ताक दिनापूर्वी पूर्ण व्हावे
- जिल्हाधिकारी पवनीत कौर
देशाच्या संरक्षणासाठी प्राणांची आहुती देणा-या सैनिकांप्रती कृतज्ञता म्हणून प्रत्येक नागरिकाने सशस्त्र सेना ध्वजदिन निधीसाठी योगदान देणे आवश्यक आहे. यंदा निधी संकलनाचे उद्दिष्ट ९९ लक्ष ६० हजार रूपये आहे. या राष्ट्रीय कार्यात अमरावती जिल्ह्याने यापूर्वीही उत्स्फूर्तपणे योगदान दिले आहे. आताही हे उद्दिष्ट 26 जानेवारीपूर्वी पूर्ण करण्याचा निश्चय करूया, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी जिल्ह्यातील ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ करताना आज सांगितले.
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयातर्फे नियोजनभवनात हा कार्यक्रम झाला. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा हे अध्यक्षस्थानी होते. अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव शेषराव खाडे, अधिक्षक दिनेश बागल, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी फ्लाईट लेफ्टनंट रत्नाकर चरडे, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार आदी उपस्थित होते. शहिद जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, शौर्यपदकधारक यांचा सत्कार, तसेच दिवंगत सैनिकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वाटपही यावेळी झाले.
जिल्हाधिकारी श्रीमती कौर म्हणाल्या की, भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेशानंतर प्रशिक्षण घेताना आम्हाला ‘आर्मी अटॅचमेंट’ उपक्रमात अरूणाचल प्रदेशात सेनादलाचे कार्य प्रत्यक्ष जाणून घेता आले. देशाच्या संरक्षणासाठी अत्यंत खडतर परिस्थितीत प्राणांची बाजी लावून सैनिक कार्य करत असतात. सेवानिवृत्तीनंतरही सैनिक गावांमध्ये विविध उपक्रमांत पुढाकार घेऊन योगदान देतात. त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून ध्वजदिन निधीत प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे. अमरावती जिल्ह्यात निर्धारित उद्दिष्ट निश्चित पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्राच्या सार्वभौमत्व, अखंडतेचे संरक्षण करतानाच आपत्तीच्या काळातही सशस्त्र सेनादले मोलाचे योगदान देतात. त्यांच्या कार्याची जाणीव ठेवून प्रत्येकाने ध्वजदिन निधीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पंडा यांनी केले.
ध्वजनिधीसाठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे श्री. खाडे व श्री. बागल यांच्या हस्ते 33 लक्ष रुपयांचा धनादेश जिल्हाधिका-यांना सुपूर्द करण्यात आला. संस्थेने आतापर्यंत सुमारे 2 कोटी रूपयांचे योगदान दिल्याचे श्री. खाडे यांनी यावेळी सांगितले.
देशाच्या संरक्षणासाठी प्राणार्पण करणा-या जवानांच्या कुटुंबियांच्या जीवनातील अडीअडचणी दूर करून त्यांचे दैनंदिन जीवन सुसह्य व्हावे यासाठी, तसेच युध्दात अपंगत्व प्राप्त झालेल्या जवानांच्या आणि सशस्त्र दलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनासाठी ध्वजनिधीचा उपयोग होतो. अमरावती जिल्ह्यात गतवर्षी 99 लक्ष 60 हजार उद्दिष्टाच्या तुलनेत 1 कोटी 3 लक्ष 76 हजार रूपये निधी संकलित झाला. त्याची टक्केवारी 104.18 इतकी आहे, असे लेफ्टनंट चरडे यांनी प्रास्ताविकात सांगितले. वैभव निमकर व डॉ. किरण दंदी यांनी सूत्रसंचालन केले.
000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती