Thursday, July 18, 2024

ग्रामस्थांच्या दारी जाऊन ऐकल्या समस्या कोहना या गावाला जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन केला शुभारंभ!

 












ग्रामस्थांच्या दारी जाऊन ऐकल्या समस्या

कोहना या गावाला जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन केला शुभारंभ!

 

         अमरावती, दि. 18 (जिमाका): ‘एक दिवस मेळघाटासाठी’ या अंतर्गत विविध विभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी यांनी प्रत्यक्ष ग्रामस्थांच्या दारी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यामुळे ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला दिसून आले. यावेळी चिखलदरा तालुक्यातील कोहनाया गावात जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

       ‘एक दिवस मेळघाटासाठी’ या अंतर्गत विविध विभागाचे शंभर अधिकारी आणि त्यांच्यासोबतचे कर्मचारी यांची पथके मेळघाटातील 100 गावांमध्ये रवाना झाली होती. यावेळी मेळघाटमध्ये जी पथके रवाना झाली त्यांचे अंगणवाडी सेविकांमार्फत ओवाळणी करून आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले .यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कैलास घोडके,  जिल्हा आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी गावातील विविध कामाची पाहणी करतांना जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी अंगणवाडी केंद्रांना भेटी देऊन तेथील आहाराविषयी चौकशी केली व  आरोग्य तपासणीविषयी माहिती घेतली. तसेच त्यांनी रेशन दुकानांना भेटी देऊन त्यांची विचारणा केली.

       कोहना या गावातील नागरिक यावेळी  उपस्थित होते. त्यांनी जिल्हाधिकारी यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या आणि समस्या सोडवण्यासाठी विनंती केली. त्याचबरोबर मेळघाटातील शंभर गावात गेलेली पथके आज येथील गावात पोहोचली.  विविध ठिकाणी पथकांनी त्यांना दिलेल्या नमुन्यानुसार भेटी देण्यास सुरुवात केली. पथके गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. यामुळे त्यांच्याकडून प्राप्त अहवालानंतर विभागनिहाय आवश्यक योजना तयार करणे सोयीचे होईल, असे जिल्हाधिकारी  श्री. कटियार यांनी  सांगितले.

             ‘एक दिवस मेळघाटासाठी’ या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी श्री . कटियार यांनी धारणी तालुक्यातील अनेक गावांना भेटी दिल्या . तर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद संजीता मोहपात्रा यांनी चिखलदरा तालुक्यातील गावांना भेटी दिल्या.

     ‘एक दिवस मेळघाटासाठी’ हा एक वेगळा आणि स्तुत्य असा उपक्रम असून यामधून निश्चितच चांगल्या बाबी पुढे येतील आणि त्या बाबीच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला मेळघाटामधील समस्या सोडवण्यासाठी उपाय योजना करतांना मोठ्या प्रमाणात मदत होईल, असा विश्वास श्री. कटियार यांनी यावेळी व्यक्त केला. 

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...