Sunday, February 28, 2021

भानखेडा परिसरातील 33 हजार कोंबड्या नष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण

 










बर्ड फ्लू प्रतिबंधक कारवाई

भानखेडा परिसरातील 33 हजार कोंबड्या नष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण

 

*नुकसानग्रस्तांना मिळणार सानुग्रह अनुदान

अमरावती, दि. 28 : भानखेडा परिसरातील एका पोल्ट्री फार्मवरील कोंबड्यांत बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळल्याने परिसरातील विविध फार्मवरील सुमारे 33 हजार 500 कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची प्रक्रिया आज पूर्ण करण्यात आली.  नुकसानग्रस्त पोल्ट्रीधारकांना भरपाईपोटी प्रतिपक्षी 90 रुपये प्रतिपक्षी सानुग्रह मदत पोल्ट्री मालकांना देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.

अमरावती तालुक्यातील भानखेडा परिसरातील धीमान पोल्ट्री फार्मवरील  कुक्कुटवर्गीय पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचा अहवाल भोपाळच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेने दिला. त्यामुळे उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत यांच्याकडून तपासणी होऊन या परिसरातील एक कि. मी. त्रिज्येच्या परीघातील क्षेत्र संक्रमित क्षेत्र व 10 किमी त्रिज्येच्या परिघातील क्षेत्र सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. संसर्गजन्य आजार प्रतिबंध कायद्यान्वये भानखेड परिसरातील श्री. गोळे व श्री.मेश्राम यांच्या फार्मवरील एकूण 33 हजार 500 कोंबड्या आज खोल खड्डा करून नष्ट करण्यात आल्या.

जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज त्याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन शीघ्र कृती दलांना सूचना दिल्या. बर्ड फ्लूचा संसर्ग इतर पक्ष्यांना तसेच इतरत्र फैलावू नये यासाठी ही कार्यवाही आवश्यक होती. पोल्ट्रीधारकांना आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी प्रस्तावाचा पाठपुरावा करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

  उपविभागीय अधिकारी श्री. राजपूत, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मोहन गोहोत्रे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय रहाटे, सहायक आयुक्त डॉ. कावरे, डॉ. अवघड, डॉ. पेठे यांच्या देखरेखीत कुक्कुटपक्ष्यांना दयामरण देण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली. या कामासाठी सुमारे दीडशे पशुसंवर्धन अधिकारी व कर्मचा-यांचा समावेश असलेली 32 पथके तैनात करण्यात आली होती.

संक्रमित क्षेत्रातील सर्व देशी कुक्कुट पक्षी, पोल्ट्री फार्ममधील पक्षी, इतर प्रजातीचे पाळीव पक्षी पशुसंवर्धन विभागाच्या स्थापित शीघ्र कृती दलांकडून शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात आल्या. वाहीत सतिश गोळे यांच्या पोल्ट्री फार्ममधील 29 हजार कोंबड्या व श्री. मेश्राम यांच्या 4 हजार 500 कोंबड्या नष्ट करण्यात आल्या, असे डॉ. गोहोत्रे यांनी सांगितले.

पोल्ट्री फार्ममधील एका ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने भला मोठा खड्डा तयार करण्यात आला असून त्यात चुना व इतर डिग्रेडेशन सामुग्री टाकून पक्ष्यांना नष्ट करण्यात येऊन सदर खड्डा बुजविण्यात आला. एक किलोमिटरच्या परिघातील परिसर व सदर पोल्ट्री फार्म हा 90 दिवसासाठी सीलबंद राहील. नष्ट करण्यात आलेल्या कोंबड्यांचे 70 रुपये प्रती पक्षी व खाद्यघटक 20 रुपये प्रती पक्षी असे 90 रुपये प्रती पक्षी असे सानुग्रह संबंधित पोल्ट्री मालकांना नुकसान भरपाई शासनाकडून देण्यात येणार आहे, असेही डॉ. गोहोत्रे यांनी सांगितले.

मृत पक्ष्यांची, तसेच पक्षीखाद्य, खाद्यघटक, अंडी, अंड्यांचे पेपर ट्रे, बास्केट, खुराडी, पक्षी खत, विष्ठा आदीही नष्ट करून त्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावावी.  संक्रमित क्षेत्रातील पक्षी नष्ट करणे, स्वच्छता, निर्जंतुकीकरण आदी मोहिम पूर्ण  करण्यात  आली. सर्वेक्षण क्षेत्रात बाहेरून येणारे किंवा तिथून बाहेर पाठविण्यात येणारे चिकन प्रक्रिया उत्पादने, कुक्कुटपक्षी खाद्य व अंडी यांची हालचाल, विपणन व विक्रीवर तीन महिने बंदी लागू राहील, असे अमरावती एसडीओंच्या आदेशान्वये सूचित करण्यात आले आहे.

00000

 

 

Saturday, February 27, 2021

लॉकडाऊन व संचारबंदी एक आठवड्याने वाढवली

 



कोरोना प्रतिबंधक उपाययोजना

लॉकडाऊन व संचारबंदी एक आठवड्याने वाढवली

 

अमरावती, दि. 27 : कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांत यापूर्वीच अमरावती महापालिका क्षेत्र व अचलपूर नगरपालिका क्षेत्र व लगतचा काही परिसर कंटेनमेंट झोन घोषित करून संचारबंदी लागू करण्यात आली. हे निर्बंध पुढील आठवड्यापर्यंत (8 मार्च) कायम ठेवण्यात आले आहेत. अंजनगाव सुर्जी नगरपालिकेचे क्षेत्रही तेथील बाधितांची संख्या पाहता कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. या तिन्ही शहरांत दि. 1 मार्चच्या सकाळी 6 वाजतापासून दि. 8 मार्चच्या सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे.

            जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ही माहिती दिली.  साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील काही काळ निर्बंध आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर पुढील स्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी दिली.

            वैद्यकीय सेवा, जीवनावश्यक सेवा यांना या निर्णयातून यापूर्वी दिलेली सवलत व त्यासाठी निश्चित केलेल्या वेळा कायम आहेत. त्यानुसार अमरावती, अचलपूर व अंजनगाव सुर्जी या शहरात सकाळी आठ ते 3 या वेळेत जीवनावश्यक सेवा, दुकाने सुरू राहतील. बिगर जीवनावश्यक दुकाने बंद राहतील. नोंदणीकृत व यापूर्वी परवानगीप्राप्त उद्योग सुरू राहतील. तिन्ही शहरांतील आठवडी बाजार बंद राहतील. उपाहारगृहे व हॉटेलला केवळ पार्सल सेवा पुरवता येईल. शासकीय कार्यालयांत 15 टक्के किंवा किमान 15 व्यक्ती उपस्थित असाव्यात. मालवाहतूक व वाहतुकीला निर्बंध नाहीत.

ठोक भाजीमंडई पहाटे दोन ते पहाटे सहा या वेळेत सुरु राहील व त्यात केवळ किरकोळ विक्रेत्यांना प्रवेश असेल. तिन्ही शहरांतील शाळा, महाविद्यालये, शिकवण्या, क्लासेस बंद राहतील. शासकीय, निमशासकीय परीक्षांना परवानगी आहे. व्यायामशाळा, चित्रगृहे व बहुविध चित्रगृहे बंद असतील.

अमरावतीलगतच्या कठोरा बु., रामगांव, नांदगाव पेठ, वलगांव, रेवसा व बोरगांव धर्माळे गावातील बिजिलॅण्ड, सिटीलॅण्ड, ड्रिमलॅण्ड मार्केटचा परिसर (सर्व अमरावती तालुका), तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी, अचलपूर तालुक्यातील कांडली, देवमाळी  तसेच भातकुली तालुक्यातील भातकुली नगरपंचायत, तसेच अंजनगाव सुर्जी शहरातलगतचा परिसर कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले असून, तिथेही ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

            यानुसार घोषित करण्यात आलेले कंटेनमेंट झोन वगळता जिल्ह‌यातील इतर क्षेत्रांमध्ये यापूर्वी लागू निर्बंध व सवलती कायम आहेत. त्यानुसार तिथे दुकाने, आस्थापना सकाळी 9 ते 5 या वेळेत सुरू राहतील.

            000

चाचणी कीट व औषधांचा पुरेसा साठा ठेवा - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

 









जिल्हाधिका-यांकडून जिल्हा रूग्णालयाची पाहणी

चाचणी कीट व औषधांचा पुरेसा साठा ठेवा

-         जिल्हाधिकारी शैलेश नवाल

 

अमरावती, दि. 27:  कोरोना साथीच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाव्दारे विविध उपाययोजना होत असताना बाधितांवर तत्काळ उपचार होण्यासाठी आरटीपीसीआर कीट, रॅपीड ॲन्टीजेन कीट व ऑक्सीजन या घटकांचा पुरेसा साठा उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. याअनुषंगाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन औषधीसाठा व इतर सुविधांबाबत तपासणी केली.

रुग्णांवर तत्काळ उपचार होण्याच्या दृष्टीने औषधांचा पुरेसा साठा ठेवावा, असे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, अति. जिल्हा शल्य चिकित्सक सतिश हुमणे यांच्यासह आरोग्य अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता जिल्ह्यात उपलब्ध खाटा, आवश्यक नियोजन व इतर सुविधा आदींबाबत आरोग्य यंत्रणेने सजग राहून कामे करावीत. आयटीआय परिसरात चाचणी केंद्र पुरेशा क्षमतेने कार्यान्वित व्हावे, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्या प्लाझ्मादानासाठी पुढे येण्याचे आवाहनही जिल्हाधिका-यांनी यावेळी केले. जिल्ह्यात प्लाझ्मादानाबाबत यंत्रणा यापूर्वीच कार्यान्वित करण्यात आलेली आहे. बरे झालेल्या रूग्णांनी प्लाझ्मादान करावे. आपल्या या कृतीमुळे एखाद्या रूग्णाचा जीव वाचू शकतो. त्यामुळे बरे झालेल्या रूग्णांनी पुढे येण्याचे त्यांनी केले.

एखादा पूर्णपणे बरा झालेला रुग्ण  www.plasmayoddha.in याठिकाणी आपली नोंद करून प्लाझ्मा देण्याची इच्छा व्यक्त करून एखाद्या रुग्णाचा जीव वाचवू शकतो, असेही ते म्हणाले.

00000

 

Friday, February 26, 2021

विभागीय आयुक्तांकडून कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा

 






विभागीय आयुक्तांकडून कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा

तिवसा, मोर्शी, दर्यापूर येथील उपचार केंद्रे सुरू होणार

शहरातही खाटांची संख्या वाढवावी

-          विभागीय आयुक्त पीयुष सिंह

 

अमरावती, दि. 26 : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांत तिवसा येथील ट्रॉमा केअर सेंटरसह मोर्शी व दर्यापूर येथेही उपचार केंद्रे सुरु होणार आहेत. शहरातही उपचारांसाठी आवश्यक रुग्णालये खासगी रुग्णालये आदी ठिकाणी खाटांची संख्या वाढवावी , असे निर्देश विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी आज येथे दिले.

कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह, पोलीस अधिक्षक हरी बालाजी, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अनिल रोहणकार, डॉ. काळे, डॉ. जयश्री नांदुरकर आदी उपस्थित होते.  

जिल्ह्यात चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अधिकाधिक करावे. सध्या स्थानिक दोन्ही प्रयोगशाळांतून अहवाल प्राप्त होत आहेत. पुढे आवश्यकता भासल्यास अकोल्याहूनही अहवाल प्राप्त करून घेता येतील. ग्रामीण भागातही पुरेशा आरोग्य सुविधा उभाराव्यात व जनजागृती करावी, असे निर्देश श्री. सिंह यांनी दिले.

  तिवसा येथे 50, तसेच मोर्शी व दर्यापूर येथे प्रत्येकी 25 याप्रमाणे एकूण 100 खाटा वाढतील. खासगी रुग्णालयात खाटांची संख्या वाढविण्यात येईल. तिथेही साधारणत: 100 खाटा अतिरिक्त उपलब्ध होतील. सारीचे पेशंट वाढत असल्याचे दिसते. त्यामुळे यंत्रणा सुसज्ज करण्यात येत असल्याचे श्री. नवाल यांनी सांगितले.

नियमभंग करणा-यांवर पोलीस, महापालिका व इतर यंत्रणांकडून वेळोवेळी कार्यवाही होत आहे. आशासेविकांकडून सर्वेक्षणाचे कामही होत आहे.  यंत्रणेवरचा ताण वाढला असून, कर्मचा-यांतही बाधितांचे प्रमाण वाढत आहे. यादृष्टीने निर्बंध कडक व्हावेत किंवा कसे, याबाबतही सर्व परिस्थिती पुन्हा तपासून निर्णय घेतला जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले.

00000

 

 

 

Thursday, February 25, 2021

जिल्हा वार्षिक योजनेत महिला व बालकल्याणासाठी 3 टक्के निधी राखीव ठेवण्यात येणार



जिल्हा वार्षिक योजनेत महिला व बालकल्याणासाठी

3 टक्के निधी राखीव ठेवण्यात येणार

 

            मुंबई, दि. 25 : आगामी आर्थिक वर्षापासून जिल्हा वार्षिक योजनेत महिला व बालकल्याणाकरिता 3 टक्के निधी राखीव ठेवण्यात येणार आहे. महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी याबाबत आग्रह धरला होता.

 

          महिला व बाल कल्याणाकरीता जिल्हा स्तरावर सध्या कार्यान्वीत असलेल्या योजना अल्प प्रमाणात आहेत. त्यामुळे त्यामध्ये भरीव वाढ होणे आवश्यक आहे. जिल्हा वार्षिक योजना 2021-22 चे वार्षिक आराखडे तयार करताना विविध घटकांसाठीच्या योजनांसाठी निधीचे प्रमाण किती असावे याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये महिला व बाल कल्याणाकरिता चिन्हांकित निधीबाबतही (इव्हॅल्युएटेड फन्ड्स फॉर वुमन ॲण्ड चाईल्ड वेल्फेअर) सुचनांचा समावेश आहे.

 

          महिला व बाल कल्याणाकरीता जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2021-22 पासून महिला व बाल कल्याणाकरीता काही अतिरिक्त जिल्हास्तरीय योजना राबविण्यात येणार आहेत. त्याकरीता जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2021-22 मध्ये महिला व बाल कल्याणाकरीता 3 टक्के निधी राखीव म्हणून उपलब्ध करावयाचा आहे.

 

 

  

एचआरसीटी चाचणीचे दर निश्चित

 




कोरोना प्रतिबंधक उपाययोजना

एचआरसीटी चाचणीचे दर निश्चित

जादा दर आकारणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाहीसह फौजदारी गुन्हा

 

अमरावती, दि. 25 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविड तसेच नॉन कोविड रुग्णांवर खासगी रुग्णालयांमध्ये करण्यात येणाऱ्या विविध उपचारांचे व चाचण्यांचे दर  सार्वजनिक आरोग्य विभागाव्दारे निर्धारित करण्यात आले आहेत. त्यानुसार रुग्णालयांनी तसेच तपासणी केंद्रानी शासनाने निश्चित केलेल्या दराप्रमाणेच रुग्णांकडून उपचाराकरीता व चाचण्यांकरीता आकारणी करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत.

 

या उपचार, चाचण्या व तपासण्यांसाठी जादा दर घेणाऱ्या रुग्णालयांवर आता दंडात्मक कार्यवाहीसह फौजदारी गुन्हा दाखल करुन रुग्णालय किंवा तपासणी केंद्र सील बंद करण्याची कार्यवाही केल्या जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.   कोरोनाबाधित रूग्णाला विविध प्रकारच्या तपासण्याव्यतिरिक्त सी. टी. स्कॅनसारख्या तपासण्यांची आवश्यकता भासत असल्याने कोविड व नॉनकोविड रूग्णांसाठी एचआरसीटी चाचणीचे दर निश्चित करण्यात आले आहेत. मशिनच्या क्षमता वैशिष्ट्यानुसार ही दर आकारणी निश्चित करण्यात आली आहे. एचआरसीटी-चेस्ट तपासणीसाठी 16 स्लाईसच्या मशिनसाठी दोन हजार रूपये, मल्टि डिटेक्टर सीटी (एम डी सीटी) 16 ते 64 स्लाईसच्या मशिनसाठी अडीच हजार रूपये, 64 स्लाईसहून अधिकच्या मशिनसाठी तीन हजार रूपये दर निश्चित केले आहेत. या रकमेत सीटी स्कॅन तपासणी, तपासणी अहवाल सिटी फिल्म, पीपीई कीट, डिसइन्फेक्टेड,  सॅनिटायझेशन चार्जेस व जीएसटी यांचा समावेश आहे. एचआरसीटी चेस्ट नियमित व तातडीच्या तपासणीसाठी हे समान दर लागू राहतील. या आदेशापूर्वी जर एखाद्या तपासणी केंद्राचे दर कमी असतील, तर ते कमी दर लागू राहतील.

 

उपरोक्तप्रमाणे चाचण्यांच्या कमाल रकमेत सी. टी. स्कॅन तपासणी, तपासणी अहवाल, सी.टी. फिल्म, पीपीई किट, डिसइन्फेक्टंट, सॅनिटायझेशन चार्जेस व जी. एस.टी. या सर्वांचा समावेश राहील. एचआरसीटी चेस्ट नियमित व तातडीच्या तपासणीसाठी उपरोक्त समान दर लागू राहतील.एचआरसीटी- चेस्ट तपासणी केल्यानंतर अहवालावर कोणत्या सिटी मशिनद्वारे तपासणी केली ते नमूद करणे बंधनकारक आहे. कोणत्याही डॉक्टरच्या प्रिस्किप्शनशिवाय ही तपासणी करू नये. तपासणी करणा-या रेडिओलॉजिस्टने संपूर्ण तपासणी अहवाल देणे बंधनकारक आहे. ज्या रूग्णाकडे आरोग्य विमा योजना आहे किंवा एखाद्या रूग्णालयाने किंवा खासगी आस्थापनेने तपासणी केंद्राशी सामंजस्य करार केलेला असेल तर हे दर लागू राहणार नाहीत.

रूग्णालये किंवा तपासणी केंद्रांनी एचआरसीटी- चेस्ट तपासणीसाठी निश्चित केलेले दर दर्शनी भागात लावणे, तसेच निश्चित दरानुसार दर आकारणी करण्याबाबत हॉस्पिटल व्यवस्थापनाला सूचना देणे बंधनकारक राहील.

00000

 

सालबर्डी यात्रा न भरविण्याबाबत बैतुल जिल्हाधिका-यांना पत्र

 



सालबर्डी यात्रा न भरविण्याबाबत बैतुल जिल्हाधिका-यांना पत्र

अमरावती, दि. 25 : अमरावती जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने प्रतिबंधक उपाययोजना होत आहेत. त्यामुळे सालबर्डी यात्रा भरवू नये, असे पत्र जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बैतुल जिल्हाधिका-यांना पाठविले आहे.

मध्यप्रदेशातील प्रभातपट्टनच्या जनपद पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांनी सालबर्डी यात्रेबाबत प्रसिद्धीपत्रक वितरीत केल्याचे निदर्शनास आले आहे. वास्तविक महाराष्ट्राच्या हद्दीत यात्रा न भरविण्याबाबत यापूर्वीच सूचित करण्यात आले आहे. यात्रेसाठी यात्रेकरूंची वर्दळ व वाहतूक महाराष्ट्रातूनच होणार असल्याने कोविड 19 साथीची लागण मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यात्रा न भरविण्याबाबत कार्यवाही करण्याचे जिल्हाधिका-यांनी पत्रात नमूद केले आहे.

00000

Wednesday, February 24, 2021

विनामास्क व बेशिस्त बुलेटस्वाराचा वाहन परवाना रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

 


विनामास्क व बेशिस्त बुलेटस्वाराचा वाहन परवाना रद्द करण्याचे आदेश

जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

वाहन ताब्यात घेण्यासह २ हजारांचा दंड

 

अमरावती, दि. २४ : मास्क न घातलेल्या व यंत्रणेकडून थांबण्याची सूचना करूनही बेपर्वाईने वाहन चालवत भरधाव वेगात पळून जाणाऱ्या एका बेशिस्त व बेजबाबदार युवकाचे वाहन ताब्यात घेण्यासह दोन हजार दंड व वाहन परवाना रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत.

सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी काल मंगळवारी सायंकाळनंतर शहरातील बसस्थानक, रेल्वेस्थानक आदी विविध ठिकाणांची पाहणी केली. या पाहणीदरम्यान

गाडगेनगराजवळ एक मास्क न घातलेला बुलेटस्वार आपल्या साथीदारासह वेगात जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यावरून जिल्हाधिकारी पथकातील कर्मचाऱ्याने संबंधित बुलेटस्वाराला थांबण्याची सूचना केली. मात्र, सदर बुलेटस्वाराने वेगात वाहन चालवत उड्डाण पुलावरून इर्विन चौकमार्गे खापर्डे बगिच्याकडे पोबारा केला. दरम्यान, पथकाने त्याचा पाठलाग करत त्याच्या वाहनाचा नंबर नोंदवून घेतला व त्याबाबत कारवाईसाठी शहर वाहतूक पोलीस व आरटीओ कार्यालयाला सूचित केले.

वाहन क्रमांक एमएच २७- बीपी०१०० असा बुलेटचा नंबर आहे. त्यावरून वाहनचालकाचा तपास करण्यात आला. मोहम्मद उरुज मोहम्मद आसिफ असे त्याचे नाव असून, वय १९ वर्षे आहे. तो लालखडी रस्त्यावरील गौसनगर परिसरातील रहिवाशी आहे. मास्क न घालणे, आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग करणे, बेपर्वाईने वाहन चालविल्याबद्दल या बुलेटस्वाराला

वाहतूक शाखेकडून दोन हजार रुपये दंड करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, वाहन ताब्यात घेण्यात येऊन त्याचा वाहन चालविण्याचा परवाना रद्द करण्याचे निर्देश आरटीओ कार्यालयाला देण्यात आले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांसमवेत रवी दंडे, अमोल नेवारे आदींचा पथकात समावेश होता.

तीनशे अतिरिक्त खाटांचे नियोजन जिल्हाधिकारी शैलेश नवाल



कोरोना प्रतिबंधक उपाययोजना

तीनशे अतिरिक्त खाटांचे नियोजन

जिल्हाधिकारी शैलेश नवाल

 

अमरावती, दि. 24 : कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता रुग्णालयांची यंत्रणा सुसज्ज करण्यात येत आहे. उपचारांसाठी अतिरिक्त 300 खाटांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार इतरही सोयी- सुविधा आवश्यकता लक्षात घेऊन तजवीज करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले.

जिल्हाधिका-यांनी आज कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत आरोग्य यंत्रणा व संबंधित विभागाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. विशाल काळे, डॉ. जयश्री नांदुरकर आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. नवाल म्हणाले की, संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न सर्वांनी समन्वयाने करावे. सध्या 1600 खाटांव्यतिरिक्त 300 अतिरिक्त खाटा वाढविण्यात येतील. चाचण्यांचे  प्रमाण वाढवावे. ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा ठेवावा.  दरम्यान लसीकरणाचेही काम गतीने  पूर्ण होणे आवश्यक आहे.  कोरोना विषाणूचे संक्रमण रोखायचे असेल तर दक्षता त्रिसूत्रीचा जीवनशैलीत समावेश व्हावा. सामाजिक वर्तनात बदल होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व कार्यालये, आस्थापना, मेडिकल दुकाने, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, संस्था, संघटना आदींनी ‘नो मास्क, नो एन्ट्री’ सारखे उपक्रम राबवावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

          आरोग्य विम्याचा लाभ मिळावा म्हणून चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळांकडून कोरोना निगेटिव्ह रुग्ण पॉझिटिव्‍ह दाखविण्यात येत असल्याची तक्रार होत आहे. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासन व आरोग्य विभागाला सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीतून सत्य समोर येईलच. मात्र, त्यामुळे ‘कोरोना नाहीच’ असे म्हणणे वस्तुस्थिती नाकारण्यासारखे होईल. कोरोना चाचणीचा संपूर्ण डेटा हा ऑनलाईन नोंदविला जातो. कोणालाही या संदर्भात खातरजमा करावयाची झाल्यास त्यांना आरोग्य विभागाकडून संपूर्ण सहाय्य करण्यात येईल. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढत आहे. मोठ्या संख्येने रुग्ण रुग्णालयात भरती होत आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींना देखील संसर्ग झाल्याने उपचार घ्यावे लागत आहेत. त्यामुळे साथीवर नियंत्रणासाठी अधिक कडक पावले उचलण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले.

            जिल्ह्यात खासगीरित्या होणाऱ्या ॲन्टीजेन टेस्ट पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात कोरोना संशयीत किंवा लक्षणे दिसणाऱ्या सर्वांच्याच आरटीपीसीआर चाचणी केली जात असून, त्याच्या संपूर्ण नोंदी आरोग्य विभागाच्या पोर्टलवर सुरक्षित राहतात. त्यामुळे त्यात कोणी छेडछाड करू शकत नाही. कोरोना चाचण्यांचे दर शासनाने निर्धारित करुन दिले आहे. सर्व रुग्णालयांनी त्यानुसार रुग्णांकडून शुल्क आकारणी करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

00000

  

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...