Friday, February 28, 2025

DIO NEWS AMRAVATI 28-02-2025


 









अमरावती ग्रंथोत्सवाला आजपासून सुरुवात

*ग्रंथ प्रदर्शन, विक्री व साहित्यिक मेळावा

अमरावती, दि. 28 (जिमाका) : अमरावती ग्रंथोत्सव 2024चे उद्घाटन आमदार प्रतापदादा अडसड यांच्या हस्ते विभागीय शासकीय ग्रंथालय येथे आज पार पडले.

पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य सुधीरकुमार महाजन, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी, सहायक ग्रंथालय संचालक डॉ. राजेश पाटील, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष चंद्रकांत चांगदे, राम देशपांडे, नंदकिशोर बजाज, प्रवीण खांडेकर, ग्रंथालय निरीक्षक गजानन कुरवाडे आदी उपस्थित होते.

आमदार श्री. अडसड यांनी, बुद्धीचा विकास करण्यासाठी वाचनाची सवय आवश्यक आहे. नवयुवकांनी विविध विषयांवरील वाचनावर भर द्यावा. माणसामध्ये प्रगल्भता विकसित होणे, तसेच अनुभव, शब्दसंग्रह वाढून अनुभवविश्व समृद्ध करण्यासाठी वाचनाला पर्याय नाही. ग्रंथालयाच्या विकासासाठी प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा करण्यात येणार आहे. मुलांनी आभासी जगतातून पुस्तकांकडे वळणे आवश्यक आहे. नवकल्पना मिळण्यासाठी, नवसंकल्पना रुजविण्यासाठी ग्रंथवाचन आवश्यक आहे. ग्रंथाच्या माध्यमातून व्यवहार कुशलता येत असल्याचे सांगितले.

उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि अमरावती जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यामाने अमरावती ग्रंथोत्सव-2024चे आयोजन संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनाजवळील विभागीय शासकीय ग्रंथालयात करण्यात आले आहे. ग्रंथोत्सव शनिवार, दि. 1 मार्चपर्यंत ग्रंथविक्री सुरू राहणार आहे.

ॲड. प्रिती रेवणे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. राजेश पाटील यांनी आभार मानले.

00000

गोल्डन कार्डने कुटुंबाला 5 लाखापर्यंत उपचार

        अमरावती, दि. 28 (जिमाका) : आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी गोल्डन कार्ड देण्यात येत आहे. या कार्डद्वारे प्रत्येक कुटुंबाला 5 लाखापर्यंत मोफत उपचार मिळणार आहे.

आपत्कालीन परिस्थितीमध्ये तात्काळ चांगल्या रूग्णालयामध्ये उपचाराची गरज असते. यामुळे गोल्डन कार्ड काढणे महत्त्वाचे झाले आहे. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत 5 लाखापर्यंत उपचार, तसेच मान्यताप्राप्त रूग्णालयात मोफत उपचार करण्यात येते. त्यासाठी आरोग्य विभागाकडून नागरिकांना गोल्डन कार्ड देण्यात येत आहे.

            सध्या हे कार्ड देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. ज्यांनी हे कार्ड काढलेले नाही त्यांनी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामपंचायत, नगरपरिषद, आरोग्य कर्मचारी, आशा, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक यांच्याशी संपर्क करावा. व लिस्ट चे करून कार्ड काढून घ्यावे.

            लाभ घेण्यासाठी पात्रता: आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी शासन निर्णयानुसार सव अंत्योदय, पिवळे, केशरी, पांढरे रेशन कार्ड धारक असावा.

            जिल्ह्यात विशेष मोहिम: मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्या सूचनेनुसार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले  व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण पारिसे यांच्या मार्गदर्शखाली आरोग्य विभाग तसेच इतर विभागाच्या समन्वयाने अमरावती जिल्ह्यात गोल्डन कार्ड काढयाची विशेष मोहिम राबविली जात आहे.

गोल्डन कार्डसाठी ऑनलाईन 12 अंकी रेशनकार्ड, आधारकार्ड आणि त्यांच्याशी संलग्नित मोबाईल, स्वत: लाभार्थी, मूळ रेशनकार्ड, आयुष्मान भारत ई-कार्ड, मूळ आधारकार्ड ही कागदपत्रे आवश्यक आहेत. आयुष्मान गोल्डन कार्ड हे आशासेविका, कॉमन सर्विस सेंटर, आपले सरकार केंद्र, रूग्णालयातील मित्राकडे कार्ड काढू शकतो. लाभार्थीं स्वत: मोबाईलवर पीएमजे ॲप डाऊनलोड करून कार्ड काढू शकतो. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने कार्ड काढू शकतो.

सदर योजनेशी अंगीकृत असलेल्या 34 स्पेशालिटी रूग्णालयात या योजनेचा लाभ मिळणार आहे. योजनेतून 1 हजार 356 गंभीर आजारांवर प्रती कुंटुब 5 लाखापर्यंत मोफत उपचार मिळणार आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी गोल्डन कार्ड काढावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले यांनी केले आहे.

000000

Thursday, February 27, 2025

DIO NEWS AMRAVATI 27-02-2025

 

सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन

            अमरावती, दि. 27 (जिमाका) : जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दि. 3 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात येणार आहे. यावेळी संबंधितांनी व्यक्तिश: उपस्थित राहावे, असे आवाहन अधिक्षक निलेश खटके यांनी केले आहे.

00000

कौशल्य विकास केंद्राचा आज ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’

               अमरावती, दि. 26 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’चे आयोजन करण्यात येते. त्यानुसार शुक्रवार, दि. 28 फेब्रुवारी 2025 रोजी ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’चे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील युवक-युवतींना नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे मदत करण्यात येते. यात आता प्रत्येक महिन्यात ‘जागेवरच निवड’ मोहीम आयोजित करण्यात येत आहे. त्यात विविध उद्योजकांना आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या पात्रतेच्या पदांसाठी कंपन्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील. मुलाखतीनंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना त्याच ठिकाणी नोकरीची संधी मिळणार आहे.

मेळाव्यात सहभागी होण्यासाठी mahaswayam.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. एम्प्लायमेंटवर क्लिक करावे. जॉब सिकर पर्याय निवडून आपला नोंदणी, आधार कार्ड क्रमांक व पासवर्ड साईन-इन करावे. आपल्या होम पेजवरील जॉब फेअर हा पर्याय निवडावे. अमरावती जिल्हा निवडून फिल्टर बटनवर क्लिक करावे. त्यानंतर दिनांकित मेळावा निदर्शनास येईल. त्यासमोर असलेल्या ॲप्‍शन बटनाच्या खाली व्ह्यू व अप्लाय बटन दिसेल. त्यानंतर मेळाव्यास उपस्थित राहणारे उद्योजक व त्यांच्याकडील पदाबाबत माहिती दिसेल. आपल्या पात्रतेनुसार पदाची निवड करून अप्लाय बटनवर क्लिक करा. आय ॲग्री हा पर्याय निवडा. शेवटी सक्सेसफुली अप्लाईड फॉर द जॉब असा मॅसेज दिसेल. यारितीने ऑनलाईन सहभाग नोंदवावा. रजिट्रेशन स्लिप पीडीएफची प्रिंट काढुन मेळाव्याच्या दिनांकास उपस्थित राहावे.

याबाबत काही अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 0721-2566066 किंवा ई-मेल amravatirojgar@gmail.com वर संपर्क करावा. तसेच 28 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, अमरावती येथे स्वखर्चाने बायोडाटा, पासपोर्ट फोटो व आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

00000

घरकुल बांधकामात अडवणूक झाल्यास तक्रार नोंदविण्याचे आवाहन

अमरावती, दि. 27 (जिमाका) : घरकुलांचे बांधकाम, मनरेगा किंवा अन्य कामे करताना ग्रामपंचायत किंवा तालुकास्तरावर लाभार्थींची अडवणूक झाल्यास किंवा लाचेची मागणी झाल्यास संबंधित गटविकास अधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण आणि राज्यपुरस्कृत आवास योजनेतील घरकुले मंजूर झाली आहे. सर्व लाभार्थींना मंजूरपत्राचे वाटप करण्यात आले आहे. घरकूल बांधकामासाठी लाभार्थींना पहिल्या हप्ताचे वितरण झाले आहे. लाभार्थींकडून विहित कालावधीत घरकुले बांधून पूर्ण करण्याची जबाबदारी तालुकास्तरीय यंत्रणेवर आहे. ग्रामविकास मंत्री यांनी आवास योजना, मनरेगा कामांची गुणवत्ता राखण्याची जबाबदारी संबंधित अधिकारी यांच्यावर सोपविली आहे. त्यामुळे घरकुल बांधकामात अडवणूक झाल्यास संपर्क क्रंमांक 7978504317वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000








आरोग्य कर्मचाऱ्यांचे टेनिसबॉल क्रिकेट संपन्न

अमरावती, दि. 27 (जिमाका) : विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातर्फे टेनिसबॉल क्रिकेट सामने घेण्यात आले. यात सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सेच ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहभागी नोंदविला.

छत्री तलाव येथील मैदानावर दि. 8 ते 23 फेब्रुवारी दरम्यान झालेल्या स्पर्धेत 8 संघांनी सहभाग घेतला. अंतिम सामना सुपर स्पेशालिटी आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्यात झाला. स्पर्धेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अमरावती यांनी विजेतेपद पटकालिले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाने उपविजेतेपद पटकाविले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांच्या हस्ते विजयी संघाचा कर्णधार रोशन बनारसे यांना विजयी चषक प्रदान करण्यात आला. नेत्र शल्य चिकित्सक डॉ. नम्रता सोनवणे यांच्या हस्ते उपविजयी संघाचा कर्णधार कैलाश जूनघरे यांना गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आर. एल. फसाटे यांच्याकडून चषक देण्यात आले. यात बेस्ट बॅट्समन - विशाल पवार, बेस्ट बॉलर - डॉ. शशांक, बेस्ट फिल्डर - नितीन पाटेकर, मॅन ऑफ सिरीज - डॉ. आशिष वाघमारे, मॅन ऑफ द मॅच फायनल - विशाल पवार यांना गौरविण्यात आले.

डॉ. दिलीप सोंदळे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी मैदानी खेळ खेळावे. खेळामुळे तणावमुक्त होण्यास मदत होते. डॉ. राठोड यांनी आभार मानले.

00000












सुधारित वृत्त

अन्नातील भेसळ ओळखण्यासाठी 28 मोबाईल लॅब

- मंत्री नरहरी झिरवाळ

अन्न व औषध प्रशासन आणि विशेष सहाय्य विभागाचा विभागीय आढावा

 

      अमरावती, दि. 27 (जिमाका) : अन्नपदार्थातील भेसळ ओळखण्यासाठी राज्यात 28 मोबाईल लॅब देण्यात येणार आहे. यामुळे अन्नाचे नमुने, विश्लेषण अहवाल तातडीने मिळण्यास मदत होणार आहे. तसेच प्रयोगशाळेत प्रलंबित असलेल्या अन्न चाचणी विहित मर्यादेत करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन आणि विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज येथे दिले.

 

      श्री. झिरवाळ यांनी आज अन्न व औषध प्रशासन आणि विशेष सहाय्य विभागांचा आढावा घेतला, यावेळी जिल्हाधिकारी  सौरभ कटियार, अपर आयुक्त रामदास सिद्धभट्टी, प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, सहआयुक्त सचिन केदारे, मिलिंद काळेश्वरकर, सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण, प्रमोद पाटील, देवानंद वीर, गजानन हिरके, तहसीलदार वैशाली पाथरे, प्रज्ञा काकडे उपस्थित होते.

 

      श्री. झिरवाळ म्हणाले, अन्नातील भेसळ ओळखण्यासाठी लवकरच मोबाईल लॅब देण्यात येणार आहे. यामुळे अन्नाची तपासणी करण्यास गती येईल. अन्न प्रशासन विभागाने अन्न परवाना आणि नोंदणीची तपासणी करावी. औषध प्रशासनाने शासकीय रुग्णालयातील औषध पुरवठा वेळोवेळी तपासावा. त्यासोबतच दुधातील भेसळ रोखण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना तातडीने कराव्यात. दुधाच्या गुणवत्तेचे निकष ठरविण्यासाठी पशुपालकांकडील दुधाचे नमुने तपासण्यात यावे. पशुपालक ते दुधाची विक्री या साखळीमध्ये भेसळ होत असल्यास त्यावर त्वरीत कार्यवाही करावी. जनावरांच्या चाऱ्यातील विविधता  तपासावी. चाऱ्यामुळे दुधातील स्निग्धतेच्या प्रमाणात फरक पडत असल्यास उत्कृष्ट चाऱ्याच्या लागवडीवर भर देण्यात यावा. दुग्धजन्य पदार्थ, मिठाईची निर्मिती आणि विक्रीची कसून तपासणी करावी. अन्न सुरक्षेसाठी अंगणवाडी सेविका, तसेच शाळेत स्वयंपाक करणाऱ्या महिलांना फोस्टॅक या अन्न सुरक्षा प्रशिक्षण आणि प्रमाणपत्राचे प्रशिक्षण देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

 

            समाज कल्याण व आदिवासी विभागाच्या वसतिगृहांना 'हायजिन रेटिंग' प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावे. जिल्हा शासकीय रुग्णालय व पीडीएमसी, तसेच सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल परिसरांमध्ये ‘इट राईट कॅम्पस’ दर्जा मिळवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात याव्यात.             सौंदर्य प्रसाधनात वापरण्यात येणाऱ्या घटकांच्या दर्जा तपासणीवर भर द्यावा. दैनंदिन वापरात असणाऱ्या महिलांच्या टिकल्या व धार्मिक कार्यात वापरण्यात येणारे कुंकू यांची गुणवत्ता योग्य राखली जाईल याची दक्षता घ्यावी. यासंदर्भातील उपायोजनांबाबत त्वरीत प्रस्ताव सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

 

       समाज कल्याण विभागाने लाभार्थ्यांना थेट लाभ पोहोचवताना येणाऱ्या अडचणींवर त्वरीत कार्यवाही करावी. लाभार्थ्यांच्या मोबाईल आधारकार्डशी लिंक झाले नाहीत, यातील अडचणी तपासून लाभ मिळवून द्यावा. तसेच पारधी समाजातील लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी 'पारधी कॅम्प' आयोजित करावा. विविध संस्थांच्या मदतीने पारधी वस्तीमध्ये जनजागृती करावी असे निर्देश दिले.

 

       मंत्री श्री. झिरवाळ यांनी बडनेरा येथील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

 

00000


Wednesday, February 26, 2025

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या "अनादी मी अनंत मी... " गीताला पहिला "छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत" पुरस्कार


 

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या "अनादी मी अनंत मी... " गीताला

पहिला "छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत" पुरस्कार

फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरातून सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा

 

मुंबईदि. २५ : कवी मनाचे महान योध्दे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने यावर्षीपासून दिला जाणार पहिला "राज्य प्रेरणा गीत पुरस्कार" स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या "अनादी मी अनंत मी.. " या गीताला देण्यात येत असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी फ्रान्सच्या मार्सेलिस समुद्र किनाऱ्यावरुन केली.

ज्या पध्दतीने महाराष्ट्रभूषण आणि अन्य सन्मानाचे पुरस्कार महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येतात त्याच पद्धतीने दरवर्षी एका प्रेरणा गीताला महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे "छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत" पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. 2 लाख रुपये रोख रक्कम व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असेल.

छत्रपती संभाजी महाराज हे एक उत्तम साहित्यिक आणि संस्कृतचे उत्तम जाणकार होते. त्यांनी संस्कृत भाषेत 'बुधभुषणहा ग्रंथ लिहिला होता. तर 'नायिकाभेद', 'नखशीखआणि 'सातसतकहे ब्रज भाषेत ग्रंथ लिहिले होते. त्यामुळेच त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्र शासन यावर्षी पासून एका प्रेरणा गीताचा सन्मान करणार आहे.

जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास एक मोठा संघर्ष असतो. या संघर्षात संकटसमयी मनाला उभारी देण्याचे काम काव्य पंक्ती करतातजगण्याला प्रेरणा देतात. म्हणून अशा प्रेरणा गीतांचा सन्मान व्हावा तोही आपल्या स्वराज्यासाठी अफाट संघर्ष करणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावे व्हावा अशी यामागची कल्पना असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.

सावरकर पॅरिसहून लंडनला रेल्वेने आल्यावर ब्रिटिश सरकारने अटक करून त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप करून खटला भरला. त्यांच्यावरचा खटला इंग्लंडमध्ये न चालवता हिंदुस्थानात चालवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सावरकरांना लंडनहून मोरिया बोटीने हिंदुस्थानात नेण्यात आले. ती बोट मार्सेलिसच्या बंदरात आल्यावर सावरकरांनी ८ जुलै १९१० या दिवशी ब्रिटिशांच्या ताब्यातून सुटका करून घेऊन आपल्या देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्याचा आपला लढा चालूच ठेवण्यासाठी त्यांनी समुद्रात उडी मारली. सावरकर ६० यार्ड एवढे अंतर पोहून गेले आणि त्यांनी मार्सेलिसचा किनारा गाठला. पण दुर्दैवाने ते पकडले गेले. त्यानंतर आपल्याला इंग्रजाकडून आपला अमानुष छळ होणार हे त्यांच्या लक्षात आलेच होते. त्यावेळी देशासाठी संघर्ष करण्याचे आत्मबळ पुन्हा वाढवण्यासाठी ज्या काव्य पंक्ती त्यांना स्फुरल्या त्या म्हणजे "अनादी मी ... अनंत मी.. हे गीत होय."

 हे गीत म्हणजे सावरकरांचे अत्यंत भेदकप्रेरणाउर्जा देणारे हे शब्द व ओतप्रोत देशप्रेम याला वंदन करीत हा पुरस्कार जाहीर करीत असल्याचे ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले. लवकरच समारंभपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात येईलअसे सांगितले.

पुरस्कारासाठी समिती

            या पुरस्कारासाठी सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून सांस्कृतिक कार्य विभागाच्या अपर मुख्य सचिवांसह सांस्कृतिक संचनालयाचे संचालकगोरेगाव चित्रनगरी व्यवस्थापकीय संचालकउपसचिव सांस्कृतिक कार्यपु. ल देशपांडे कला अकादमी संचालकदर्शनिका विभाग संपादक या समितीचे सदस्य आहेत. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार हे फ्रान्स दौऱ्यावर असूनयाबाबतची ऑनलाईन बैठक घेऊन यावर्षीचे प्रेरणा गीत म्हणून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या गीताची निवड एकमताने करण्यात आली असल्याचे सांगितले. या बैठकीला अपर मुख्य सचिव विकास खारगेसांस्कृतिक संचालक विभिषण चवरेचित्रनगरीच्या संचालक स्वाती म्हसे पाटीलपु. ल. देशपांडे कला अकादमीच्या संचालक मिनल जोगळेकर आणि डॉ. बलसेकर आदी सदस्य उपस्थित होते. हा पुरस्कार कवींना देण्यात येणार असून कवी जर हयात नसतील तर त्यांच्या नातेवाईक अथवा त्यांचा वारसा सांगणाऱ्या संस्थांना प्रदान करण्यात येणार आहे.

0000

संजय ओरके/विसंअ/

Tuesday, February 25, 2025

DIO NEWS AMRAVATI 25-02-2025

 

अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांचा  दौरा

 

अमरावती, दि. 25 (जिमाका) : अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ हे गुरूवार, दि. 27 फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

दौऱ्यानुसार, श्री. झिरवाळ यांचे गुरूवारी सकाळी 10 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे आगमन होईल. त्यानंतर सकाळी 10 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात अन्न व औषध प्रशासन विभाग आणि सकाळी 11 वाजता विशेष सहाय्य विभागाची बैठक घेतील. सकाळी 11.30 वाजता पत्रकारांसोबत अनौपचारिक चर्चा करतील. दुपारी 12 ते 1.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथे राखीव राहिल. दुपारी 1.45 वाजता बडनेरा येथील शासकीय आश्रमशाळेस भेट देतील. त्यानंतर सांयकाळी 5 वाजता अमरावतीहून नागपूरकडे रवाना होतील.

00000

 






पाच अनाथ मुलींच्या पालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 25 (जिमाका) : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाने पाच मुलींच्या माहितीसाठी निवेदन प्रसिद्ध केले आहे. या मुली अनाथ असून त्यांना त्यांच्या आई-वडिलांचा शोध घेण्यासाठी, तसेच पालकांनी बाल कल्याण समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

 

लक्ष्मी जनकरामसिंग धुर्वे (वय 16 वर्षे) ही वरुड बसस्थानकावर बेवारस स्थितीत आढळली आहे. सिता प्यारासिंग पवार (वय 14 वर्षे) ही रेल्वेमध्ये भीक मागताना पोलिसांना आढळली आहे. सीमा हिरालाल मावसकर (वय 14 वर्षे) ही वडाळा रेल्वे स्टेशनवर तिच्या सावत्र वडिलांच्या सक्तीमुळे भीक मागताना आढळली आहे. दीक्षा योगेश इंगळे (वय 14 वर्षे) ही कुटुंबातील शारीरिक छळामुळे पोलिसात तक्रार दाखल केली आहे. राणी बुधिया पवार (वय 11 वर्षे ही जालना येथे जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल झाली. त्यानंतर तिला बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले आहे.

 

या पाच मुली सध्या अमरावतीमधील वेगवेगळ्या बालगृहांमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांच्या आई-वडिलांविषयी किंवा नातेवाईकांविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाही. या मुलींविषयी माहिती असल्यास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, अमरावती येथे संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, राणी दुर्गावती चौक, कॅम्प रोड, अमरावती, दूरध्वनी क्रमांक 0721-2990412, ईमेल: dcpu.amravati@gmail.com यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

00000

Sunday, February 23, 2025

DIO NEWS AMRAVATI 23.2.2025






 राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे विमानतळावर स्वागत

 

      अमरावती, दि. २३ :  महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे आज सकाळी अमरावती येथील बेलोरा विमानतळावर आगमन झाले. प्रशासनाच्यावतीने विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

 

        यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे संचालक डॉ. अजय लाड आदींनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

 

     यावेळी राज्यपाल समवेत राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, ए.डी.सी. अभयसिंह देशमुख यांचेही आगमन झाले.

 

       यावेळी राज्यपाल महोदयांना पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.

00000
















विद्यार्थ्यांनी पारंगत होऊन समाजाच्या विकासासाठी कार्यरत रहावे

- राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

* दीक्षांत समारंभ उत्साहात साजरा

* मुलींच्या वसतीगृहाचे भूमिपूजन

 

        अमरावती, दि. २३ : पदवी पूर्ण होणे ही विद्यार्थ्याच्या आयुष्याची सुरुवात आहे. पुढील आयुष्यात विद्यार्थ्यांनी जगभरातील ज्ञानशाखांमध्ये पारंगत होऊन संपादन करावे. ज्ञानाचा उपयोग समाजाच्या हितासाठी करावा, तसेच राष्ट्र निर्माणासाठी अविरत कार्यरत रहावे, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

 

      संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 41वा दीक्षांत समारंभ विद्यापीठ परिसरात पार पडला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते आदी उपस्थित होते.

 

      राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी, विद्यापीठ स्थापनेपासून विद्यार्थ्यांना परवडणारे उच्च शिक्षण देत आहे. दर्जेदार शिक्षण देऊन विद्यापीठाने नागरिकांचे जीवनमान बदलण्यात आणि संपूर्ण प्रदेशाची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आता विद्यापीठाने पारंपारिक अभ्यासक्रमांसोबत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग, डेटा सायन्स, सायबर सुरक्षा आणि रोबोटिक्स या प्रगत क्षेत्राचे शिक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा. विद्यार्थ्यांनी शिक्षणातील गुणवत्तेसोबतच खेळामध्येही प्राविण्य मिळवावे. आजच्या घडीला खेळाडू सर्वांधिक मानधन घेत आहेत. त्यामुळे खेळाडूंना पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षणासाठी पाठिंबा देऊन उत्कृष्ट खेळाडू घडवावेत.

 

     केंद्र शासनाने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत जनाबाई, संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मराठी भाषेतून विपूल लेखन आणि उपदेश केले आहे. मातृभाषा ही प्रत्येकाच्या हृदयस्थानी असते. त्यामुळे भाषेला अभिजात दर्जा मिळणे गौरवास्पद आहे. विद्यार्थ्यांनीही जगातील विविध भाषा शिकून प्रगती करावी. भाषेसोबतच विविध बोलींचा अभ्यास आणि  तिचे जतन करावे. त्यासोबतच इतर भाषांमधील ज्ञान मराठीत भाषांतरित केल्यास त्याचा सामान्यांना फायदा होईल. भाषेसोबतच विद्यापीठाने उद्योगांच्या गरजा पूर्ण करतील असे अभ्यासक्रम तयार करावेत. स्टार्टअप इकोसिस्टम आणि इनक्युबेशन केंद्रांमुळे स्थानिक उद्योगांना पुरक वातावरण तयार होईल. उद्योगांची गरज पूर्ण करण्‍यासाठी विद्यापीठाने संशोधन आणि विकासासाठी सहकार्य करावे. रोजगारक्षम मनुष्यबळ तयार करताना काम आणि जीवनाप्रती सकारात्मक दृष्टीकोनही येणे गरजेचे आहे. या सर्व प्रयत्नांतून प्रधानमंत्र्यांचे 2047मधील विकसित राष्ट्राचे स्वप्न साकार होईल.

 

    न्यायमुर्ती श्री. गवई म्हणाले, जिल्ह्याला संतांची महान परंपरा लाभली आहे. त्यांनी समाजाचे प्रबोधन करून मत परिवर्तन केले. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता आणि शिक्षणाचे महत्व पटवून सांगितले. आजच्या काळात शिक्षण हे सर्वात मोठे शस्त्र आहे. विद्यार्थ्यांनी इच्छाशक्ती बाळगून शिक्षणातून प्रगती करावी, तसेच शिक्षणाचा उपयोग समाजहितासाठी करावा. आत्मसात केलेल्या शिक्षणाच्या माध्यमातून नवा भारत घडविण्याची क्षमता नव्या पिढीवर आहे. सक्षम विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी विद्यापिठाने ओळखून कार्य करावे. सर्वदूर आणि सर्वस्तरातील घटकांना शिक्षण मिळावे, यासाठी विद्यापीठाने कार्य करावे. प्रामुख्याने ग्रामीण विकास मोहिम राबवून ग्रामीण जनतेचे जीवनमान उंचावण्यास मदत करावी. विद्यार्थ्यांनीही समाजाच्या विकासासाठी अविरत संघर्ष करून अभावग्रस्तांना मदत करावी, असे आवाहन केले.

 

     यावेळी राज्यपाल यांच्या हस्ते मुलींच्या वसतीगृह आणि विस्तारीत इमारतीचे आभासी पद्धतीने भूमिपूजन करण्यात आले. कुलगुरू डॉ. बारहाते यांनी स्वागतपर भाषण केले. तसेच अहवालाचे वाचन केले. सुरवातीला राज्यपाल यांना राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने मानवंदना देण्यात आली. दीक्षांत समारंभात शितल पांडव, निकिता देवचे, अनिकेत पांडे, राधा चमेडिया, हर्षाली हटवार, उत्कर्षा वानरे, धनश्री सरकळे, लक्ष्मी चौधरी, प्राची बोरगावकर, शेख इक्रा अदीबा मोहमंद मुश्ताक यांचा सत्कार करण्यात आला.

000000

























राज्यपालांची वझ्झर अनाथ आश्रमास भेट


अमरावती, दि. 23 (जिमाका) : राज्यपाल  सी. पी. राधाकृष्णन यांनी आज वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद मूकबधिर बेवारस बालगृहाला भेट दिली. यावेळी राज्यपाल यांनी अनाथ आश्रमाला भेटवस्तू दिल्या. तसेच बुरघाट येथील निवासी शाळेला भेट दिली.

वझ्झर बालगृहात राहून मोठ्या झालेल्या आणि आता लग्न झालेल्या मतिमंद, मूकबधिरांना राज्यपालांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री शंकरबाबा पापळकर, आमदार केवलराम काळे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अतिरिक्त आदिवासी आयुक्त रवींद्र ठाकरे, राजभवनचे नियंत्रक जितेंद्र वाघ, उपविभागीय अधिकारी बळवंत अरखराव, तहसीलदार संजय गरकल, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर, अनिल गडेकर आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी बालगृहातील मुलांची भेट घेवून विचारपूस केली. लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केलेल्या माला पापळकर यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 श्री. पापळकर यांनी बेवारस मतिमंद मुलांच्या कायम पुनर्वसनाची मागणी केली. तसेच अनाथश्रमातील 12 मुलामुली शासकीय नोकरी करीत आहे. तसेच आश्रमात १२३ विकलांग मुले आहेत. त्यांच्या वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर बालगृहात राहता येत नाही. तथापि, हा नियम या मुलांसाठी जाचक असल्याने त्यात सुधारणा आवश्यक असल्याचे सांगितले.

राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी, प्रत्येक मागणीबाबत सकारात्मक मदत करण्यात येईल.      बेवारस, मतिमंद व मुकबधिर मुलांचे प्रश्न जाणून घेवून पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांनी पालकत्व स्वीकारले आहे. श्री. पापळकर यांच्या मागणी आणि मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी जातीने लक्ष दिले जाईल. बेवारस, मतिमंद मुलांच्या पुनर्वसनासाठी शंकरबाबा पापळकरांनी केलेले कार्य गौरवास्पद आहे. या क्षेत्रातील त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. पद्मश्री पुरस्काराचा सन्मान हा सर्व मुलीमुलींचा आणि त्यांचा सांभाळ करणाऱ्यांचा असल्याचे सांगितले.

 यावेळी पद्मावती व दिलीप ढगे, बेबी व बल्लम पापळकर, वैशाली आणि अनिल पापळकर, शोभा आणि अमित पापळकर, सुशीला आणि अशोक देशमुख, शैलजा आणि राजेंद्र फुले यांना भेटवस्तू आणि 'गीता' ग्रंथ भेट देण्यात आला. तसेच सलमा आणि सईद खान यांना भेटवस्तू आणि 'कुराण' ग्रंथ भेट देण्यात आला. आश्रमातील गांधारी हिने स्वागतगीत सादर केले.

त्‍यानंतर राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी या अनाथाश्रमातील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची निवासी शाळा, बुरडघाट येथे भेट दिली. यावेळी त्यांनी मुलींशी संवाद साधला.

000000





संत गाडगेबाबा यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 

      अमरावती, दि. २३: संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

     यावेळी मोर्शीचे उपविभागीय अधिकारी प्रदीप पवार, तहसीलदार विजय लोखंडे आदी उपस्थित होते. उपस्थितांनीही संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

 

00000

--

 

00000

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...