जिल्हास्तरीय कृषि प्रदर्शनीचा समारोप शेतकऱ्यांचे उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचले - खासदार बळवंत वानखेडे
अमरावती, दि. 18 : जिल्हास्तरीय कृषि प्रदर्शनीच्या माध्यमातून इतर ठिकाणची पिके, नवतंत्रज्ञान यासोबतच शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचल्या आहेत. यामुळे प्रदर्शनीचा उद्देश सफल झाला असून प्रदर्शन फलदायी ठरले आहे, असे मत खासदार बळवंत वानखेडे यांनी व्यक्त केले.
जिल्हास्तरीय कृषि प्रदर्शनीचा समारोप मंगळवार, दि. 18 फेब्रुवारी रोजी करण्यात आला. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक प्रमोद लहाळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राहुल सातपुते, आत्माच्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने, जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुनील सोसे, प्राचार्य अनिल ठाकरे, हरिभाऊ मोहोड, राजीव ठाकूर, विनय बोथरा आदी उपस्थित होते.
खासदार श्री. वानखेडे यांनी, प्रदर्शनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना इतर ठिकाणी पिके पहावयास मिळाली. तसेच उत्पादनावर प्रक्रिया करून स्वत: माल विकण्याची संधी प्रदर्शनीच्या माध्यमातून मिळाली. याठिकाणी शेतीमध्ये बदलत असलेल्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असे हे प्रदर्शन झाले असल्याचे सांगितले.
श्री. लहाळे यांनी, प्रदर्शनीला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर भेटी दिल्या. त्यामुळे वितरकही समाधानी झाले. शेतकऱ्यांनी त्यांच्या उत्पादनाचे स्वत: मार्केटींग करून यशस्वी व्हावे, असे आवाहन केले. श्रीमती निस्ताने यांनी 288 स्टॉलच्या माध्यमातून 381 शेतकऱ्यांनी प्रदर्शनीत सहभाग नोंदविला. 50 हजार नागरिकांनी भेटी दिल्या, तर 70 लाखांची उलाढाल झाली असल्याचे सांगितले.
सुरवतीला पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. ड्रोन पायलट निमिका सुरेश दोडी, पाकसाड काटपिडीया, अमित जयसिंगपूरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आर. आर. पठाण यांच्या शेतीमातीच्या कथा पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रदर्शनीमध्ये सहभागींना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. निलेश राठोड यांनी सूत्रसंचालन केले.
00000
आज ‘जय शिवाजी, जय भारत पदयात्रा’चे आयोजन
अमरावती, दि. 18 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमितत बुध्वार, दि. 19 फेबुवारी रोजी ‘जय शिवाजी - जय भारत पदयात्रा’चे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 7.30 वाजता सायन्सस्कोर मैदान येथून पदयात्रेला सुरवात होणार आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सकाळी 7.30 वाजता देशाला संबोधीत करतील. त्यानंतर सकाळी 8 वाजता पदयात्रेला सुरवात होणार आहे. पदयात्रा सायन्सस्कोर मैदान, शिव टेकडी, जिजाऊ पुतळा, बियाणी चौक, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पंचवटी चौकमार्गे निघून विभागीय क्रिडा संकुल येथे समारोप होणार आहे.
पदयात्रेला सुरवात झाल्यानंतर शिवटेकडीवरील छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर माँ जिजाऊ यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, जिल्हा क्रिडा कार्यालय, नेहरु युवा केंद्र, एनसीसी, एनएसएस यांच्यावतीने, तसेच विविध सामाजिक संघटनांच्या सहकार्याने जय शिवाजी जय भारत पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. पदयात्रेत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
000000
दिल्लीतील साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर अभिजात मराठीचा ‘ऑनलाईन जागर’!
व्हिडिओ पाठवून सहभागी होण्याचे आवाहन
अमरावती, दि. 18: दि. 21 ते 23 फेब्रुवारीदरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने अभिजात मराठीचा ‘ऑनलाइन जागर’ हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात आपल्या कलागुणांचा व्हिडिओ शेअर करून देश विदेशातील मराठी माणसांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे.
या उपक्रमात कसे सहभागी व्हाल?
आपण स्वतः कवी, लेखक, कलाकार, गायक असाल तर आपल्या स्वरचित कवितेचा अथवा आपल्या कलाकृतीचा एक सुंदर व्हिडिओ तयार करून आम्हाला पाठवा. केवळ आपल्याच कविता नाही तर इतर मान्यवर कवींच्या कवितांचे सादरीकरणही ( वाचन )आपण करू शकता. याबरोबरच गझल वाचन, गायन, लोककला सादरीकरण अशा अनेक स्वरूपात आपण या उपक्रमात सहभागी होऊ शकता. अभिजात मराठीच्या या ऑनलाईन जागरामध्ये आपण अभंग, पोवाडे, नाट्यछटा, लघुकथा, गायन, भारुड आधी कलांच्या माध्यमातून सहभागी होऊ शकता. अभिजात मराठीच्या या उत्सवात आपला सहभाग हा आपल्या भाषेचा गौरव वाढविणारा ठरेल. तर चला मग करा रेकॉर्ड आपला व्हिडिओ आणि पाठवा आम्हाला.
`आपले व्हिडिओ हे माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘महासंवाद’ या पोर्टल वर आणि महासंचालनालयाच्या राज्यभरातील कार्यालयांच्या अधिकृत समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यात येतील.
आपले व्हिडिओ इथे पाठवा ईमेल: dgiprdlo@gmail.com या ईमेलवर अथवा या व्हॉट्सअँप क्रमांकावर. ९८९२६६०९३३ आणि ७५०४६९६७८६.
महाराष्ट्राला साहित्याची समृद्ध परंपरा लाभली आहे. ९८ वे अखील भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी भाषेच्या श्रीमंतीचा उत्सव साजरा करण्याची संधी आहे. आपल्या शब्दांनी आणि कलाकृतींनी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अधिक संस्मरणीय बनवावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात येत आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या खालील समाजमाध्यमांवर उत्कृष्ट व्हिडिओ व कलाकृतीला प्रसिद्धी देण्यात येईल.
00000
निंभारी डेपोतील वाळूचा सोमवारी लिलाव
अमरावती, दि. 18 : निंभारी, ता. अचलपूर येथील वाळूडेपोची मुदत संपुष्टात आली आहे. डेपोतून वाळू विक्रीनंतर शिल्लक असलेला वाळूसाठा 1 हजार 66 ब्रास जप्त करण्यात आला आहे. या वाळूचा सोमवार, दि. 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता लिलाव करण्यात येणार आहे.
सदर वाळूसाठ्याचा लिलाव करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे निर्देश आहेत. त्यानुसार उपविभागीय अधिकारी, अचलपूर यांनी जाहीरनामा काढण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार उपविभागीय अधिकारी, अचलपूर यांच्या दालनात लिलाव करण्यात येणार आहे. या जाहीर लिलावात इच्छुक व्यक्ती, संस्था आणि शासकीय विभागांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
ध्वनीमर्यादा राखून 15 दिवसांसाठी ध्वनीक्षेपक वापरास सवलत
*जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिसूचना जारी
अमरावती, दि. 16 (जिमाका) : बंद जागा वगळता इतर ठिकाणी वर्षातून 15 सण, उत्सव आणि महत्वाच्या दिवशी ध्वनीमर्यादा राखून ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासाठी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी अधिसूचना जारी केली आहे.
श्रोतगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी ध्वनीवर्धक आणि ध्वनीक्षेपक वापरण्यासाठी ध्वनीमर्यादा राखून 15 महत्वाच्या दिवशी सकाळी 6 ते रात्री 12 या वेळेत सवलत देण्यात आली आहे.
यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती - 19 फेब्रुवारी, श्रीराम नवमी – 6 एप्रिल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती - 14 एप्रिल, बौध्द पौर्णिमा - 12 मे, श्रीकृष्ण जयंती - 15 ऑगस्ट), गणेश चतुर्थी, गणपती स्थापना - 27 ऑगस्ट, अनंत चतुर्दशी - 6 सप्टेंबर, नवरात्र पंचमी - 26 सप्टेंबर, नवरात्र अष्टमी – 30 सप्टेंबर), नवरात्र नवमी - 1 ऑक्टोबर, दसरा - 2 ऑक्टोबर), दिवाळी सण धनत्रयोदशी - 18 ऑक्टोबर, दिवाळी सण लक्ष्मीपूजन - 21 ऑक्टोबर, ख्रिसमस - 25 डिसेंबर, नूतन वर्ष - 31 डिसेंबर या 15 दिवशी सशर्त ध्वनीक्षेपक वापरास सवलत जाहीर करण्यात आली आहे.
या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था व ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकरणावर सोपविण्यात आली आहे. ध्वनी प्रदूषण नियम २००० अंतर्गत स्थापित ध्वनी प्राधिकरणाने त्यांच्याकडे प्राप्त तक्रारींवर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करावी, तसेच प्राधिकरणाने निदर्शनास आणून दिलेल्या बाबींवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
00000
No comments:
Post a Comment