Monday, February 10, 2025

DIO NEWS AMRAVATI 10.2.2025

 





कृषि प्रदर्शनीमध्ये नागरिकांनी सहभाग नोंदवावा

-     जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 

पाच दिवसात कृषिज्ञान, सांस्कृतिक कार्यक्रमांची राहणार रेलचेल

मिर्झा एक्सप्रेस, सुर नवा ध्यास नवा, हास्याचे तिखे बोल आकर्षण

 

अमरावती, दि. 10 : आत्माच्या वतीने पाच दिवसांची कृषि प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे. यात कृषि विषयक आधुनिक तंत्रज्ञानाची माहितीही मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कृषि प्रदर्शनीमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.

 

आज जिल्हाधिकारी कार्यालयात कृषि प्रदर्शनीच्या आयोजनाबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, आत्माच्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने आदी उपस्थित होते.

 

कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेमार्फत दि. 14 ते 18 फेब्रुवारी दरम्यान सायन्सस्कोर मैदानावर कृषि विकास परिषद व प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे. सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत कृषि विषयक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनीत धान्य, खाद्य, सेंद्रिय शेतमाल, शासकीय योजनांची माहितीसाठी स्टॉल राहणार आहे. तसेच आधुनिक शेती तंत्रज्ञानासाठी कृषिला लागणाऱ्या मशिनरी आणि औजारांचे प्रदर्शन राहणार आहे.

 

प्रदर्शनी दरम्यान दि. 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता मिर्झा एक्सप्रेस फेम डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचा विनोदी कार्यक्रम, दि. 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता कलर्स मराठी टीव्ही फेम साहिल पांढरे यांचा सुर नवा ध्यास नवा, चला हवा येऊ द्या फेम प्रविण तिखे यांचा हास्याचे तिखे बोल हे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. प्रदर्शनीत 200 स्टॉल राहणार आहे. यात 40 शासकीय विभागांचे स्टॉल राहणार आहे. यातून नागरिकांना शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रदर्शनीच्या ठिकाणी सुरक्षा, आरोग्य पथक तैनात राहणार आहे.

 

कृषि प्रदर्शनीचे आयोजन मोठ्या स्वरूपात करण्यात आले आहे. यासाठी कृषि विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी मेहनत घ्यावी. प्रदर्शनीच्या ठिकाणी सुरक्षा, अग्निशमन, पिण्याच्या पाण्याची सोय, फिरते शौचालय, वैद्यकीय सुविधा देण्यात यावा. विद्यार्थ्यांमध्ये जागृती होण्यासाठी याठिकाणी शाळांच्या सहली आयोजित करण्यात याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी दिले.

 

00000





विभागीय क्रीडा स्पर्धेत अमरावती जिल्हा सलग तिसऱ्यांदा विजेता

 

अमरावती, दि. 10 : अमरावती जिल्ह्याने विभागीय क्रीडा स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. अकोला येथे 7 ते 9 फेब्रुवारी 2025 दरम्यान झालेल्या स्पर्धेत विभागातील पाचही जिल्ह्यांनी सहभाग घेतला.

 

जिल्ह्याच्या कामगिरीत जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. जिल्हाधिकारी सौरभ कटियार, अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, अधीक्षक निलेश खटके आणि तहसीलदार विजय लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.

 

स्पर्धेसाठी मुन्ना उर्फ महेंद्रसिंग ठाकूर, रामानंद सरस्वती, सुजित सरोदे, सागर बनसोडे, विवेक आकोलकर, दिनेश गवई, दीपक शिरसाट, वर्षा राठोड, सुनिता तिरमारे, रुपाली आंबेकर, माधुरी सगणे यांनी पुढाकार घेतला.

 

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...