Monday, March 10, 2025

DIO NEWS AMRAVATI 10-03-2025

 

योजना वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्याचे आयोगाचे निर्देश

*एससी, एसटी आयोगाच्या उपाध्यक्षांकडून योजनांचा आढावा

अमरावती, दि. 10(जिमाका) : नाविन्यपूर्ण योजनांमधून 2019-20 मध्ये वसतिगृहामध्ये सोलार संच बसविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला. मात्र वेळेत कामे पूर्ण झाली नसल्याने शासनावर याचा भार आला आहे. त्यामुळे सामाजिक न्याय विभागाने योजना वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा, असे निर्देश अनूसुचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिले.

ॲड. मेश्राम यांनी सहायक आयुक्त सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयात विविध बाबींचा आढावा घेतला. यावेळी सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांच्यासह कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

ॲड. मेश्राम यांनी आज सामाजिक न्याय‍ विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती घेतली. प्रामुख्याने स्वाधार योजनेतील लाभापासून अद्यापही वंचित असलेल्या 7 हजार विद्यार्थ्यांच्या बाबीत तातडीने कार्यवाही करावी. त्यांना लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या जमिनी तातडीने वाटप करावेत. रमाई घरकुल योजनेमध्ये विविध कारणांनी दोन हजार घरे नामंजूर करण्यात आली आहेत. तसेच घरकुलांचे काम संथ गतीने सुरू असल्याबाबत ती तातडीने पूर्ण करण्यात यावे.

वसतिगृहात राहणाऱ्या मुलांना स्पर्धा परिक्षांची पुस्तके देण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आलेला नाही. त्यामुळे तो तातडीने पाठविण्यात यावा. तसेच मागासवर्गीय औद्योगिक संस्थांना भाग भांडवल वाटप करताना पहिल्या टप्प्याची यशस्वी अमंलबजावणी केली असल्याबाबत खातरजमा करण्यात यावी. त्यानंतरच दुसऱ्या टप्प्याचे भागभांडवल वाटप करण्यात यावे. यासोबतच सामाजिक न्याय विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजना जलद गतीने राबविण्यात याव्यात. यामुळे योजनांवरील येणारा भार कमी होण्यास मदत मिळणार असल्याचे सांगितले.

00000








मेहनत केली तरच यश मिळते

*जिल्हाधिकाऱ्यांचा विद्यार्थ्यांना कानमंत्र

अमरावती, दि. 10(जिमाका) : कोणत्याही क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अभ्यास करावा लागतो, मेहनत करावी लागते. अभ्यास आणि मेहनत करण्याची तयारी असल्यास कोणत्याही क्षेत्रात हमखास यश मिळते, असा कानमंत्र जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी जिल्हाभरातून आलेल्या विद्यार्थ्यांना दिला.

दिव्य सेवा सोशल सेंटरच्या वतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमांत जिल्हाधिकारी आणि विद्यार्थ्यांची भेट घालून देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात विद्यार्थ्यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला. जिल्हाधिकारी श्री. कटियार यांना अहवाल सुपूर्द करण्यात आल्यानंतर तनिष्का भोयर हिने केंद्राच्या वतीने विद्यार्थ्यांच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध कार्याची माहिती दिली.

विद्यार्थ्यांनीही जिल्हाधिकारी कार्यालयात प्रथमच येत असल्याचे सांगितले. जिल्ह्याच्या प्रशासकीय प्रमुखावर कामाचा प्रचंड व्याप असतो. त्यांच्या समोर आपण बोलू शकणार काय, त्यांच्या समोर आपल्या भावना मांडता येतील काय, असा प्रश्नही मनात आला असल्याचे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी दिलखुलास उत्तरे दिली.

जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील ध्येयाबद्दल विचारणा केली. यावर विद्यार्थ्यांनीही अधिकारी, पायलट अशी उत्तरे दिली. विद्यार्थ्यांनीही जिल्हाधिकारी यांना अधिकारी होण्याचे ध्येय केव्हा निश्चित केल्याचे विचारले. यावर त्यांनी महाविद्यालयीन जीवनात भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचा विचार केल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनीही आधीपासूनच ध्येय निश्चित करावे. त्यासाठी आवश्यक असणारा अभ्यास आणि मेहनत करावी, मेहनतीमुळे कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होता येत असल्याचे सांगितले.

दिव्य सेवा सोशल सेंटर विद्यार्थ्यांच्या विकासासाठी चांगले उपक्रम राबवित आहे. यामुळे बालकांच्या व्यक्तीमत्वाला निश्चितच मदत होईल. कार्यालयांना प्रत्यक्ष भेटीमुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात भर पडणार असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वासामुळे त्यांच्यात पुढे जाण्याची भावना निर्माण होणार असल्याचे सांगितले.

000000

विमानसेवेमुळे अमरावतीकरांची स्वप्नपूर्ती होईल

-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती, दि. 10(जिमाका) : बेलोरा येथील विमानतळाचे काम पूर्ण झाले आहे. या विमानतळावरून 31 मार्चपासून प्रवासी विमानसेवा सुरू होणार आहे. त्यामुळे अमरावतीकरांची स्वप्नपूर्ती होईल. अर्थसंकल्पात विमान प्रवासाची सेवा सुरू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी केली आहे. याबद्दल पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आभार मानले आहे.

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी राज्याचा आश्वासक अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासाची तरतूद करताना जिल्ह्यासाठीही विशेष तरतुदी केल्या आहेत. दर्यापूर येथे नवीन न्यायालय उभारण्यासोबतच खारपाणपट्टा असलेल्या दर्यापूर भागात विशेष प्रकल्प राबविण्यात येणार आहे. जमीन खारपणामुक्त होऊन सुपीक होणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतील. नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानासोबत नवीन पिकांसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाईल. ज्यातून या भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिद्धपूर येथे मराठी भाषेचे विद्यापीठ सुरू केले. या अर्थसंकल्पात मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर येथे मराठी भाषेचे संशोधन व अध्ययनासाठी उच्च दर्जाचे संकलन केंद्र आणि अनुवाद अकादमीची स्थापना करण्यासाठी तरतूद करण्यात आली. महानुभाव पंथाचे महत्वाचे असलेल्या रिद्धपूर येथील विविध मंदिरांच्या विकासासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पातील भरीव तरतुदीमुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणर आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने संपूर्ण नागरिकांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या लोकाभिमुख अर्थसंकल्पासाठी आभार व्यक्त करीत असल्याचे पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी सांगितले.

00000

आज विभागस्तरीय गुंतवणूक शिखर परिषद

अमरावती, दि. 10 (जिमाका): उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी गुंतवणूकदार व व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी विभागस्तरीय गुंतवणूक शिखर परिषदेचे आयोजन मंगळवार, दि. 11 मार्च  रोजी सकाळी 10 वाजता हॉटेल ग्रँड महफिल येथे करण्यात आले आहे.

विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय गुंतवणूक शिखर परिषदेत जिल्ह्यातील प्रमुख उद्योग क्षेत्राबाबत चर्चासत्र, गुंतवणूकीच्या संधी, इतर क्षमता असलेल्या क्षेत्रांमधील गुंतवणूक व व्यवसाय संधीबाबत चर्चा, सामंजस्य करार स्वाक्षरीबाबत कार्यक्रम, इत्यादी बाबींचा समावेश आहे.

            तसेच जिल्हास्तरावर गुंतवणूक आकर्षित करणे, जिल्हास्तरीय गुंतवणूक आणि व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देणे, जिल्ह्यांना विकासाचा केंद्रबिंदू मानून जिल्ह्यांच्या व राज्याच्या विकासाला चालना देणे हा या परिषदेचा उद्देश आहे. ही परिषद उद्योजक व निमंत्रकांसाठी नि:शुल्क आहे. उद्योजकांनी या परिषदेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय कार्यालयाचे उद्योग सहसंचालक निलेश निकम यांनी केले आहे.

000

 

कौशल्य विकास केंद्रामार्फत 12 मार्चला रोजगार मेळावा

               अमरावती, दि. 10 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’चे आयोजन करण्यात येते. त्यानुसार बुधवार, दि. 12 मार्चला 2025 रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

     जिल्ह्यातील युवक-युवतींना नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे मदत करण्यात येते. त्यात विविध उद्योजकांना आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या पात्रतेच्या पदांसाठी कंपन्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील. मुलाखतीनंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना त्याच ठिकाणी नोकरीची संधी मिळणार आहे.

मेळाव्यात सहभागी होण्यासाठी mahaswayam.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. एम्प्लायमेंटवर क्लिक करावे. जॉब सिकर पर्याय निवडून आपला नोंदणी, आधार कार्ड क्रमांक व पासवर्ड साईन-इन करावे. आपल्या होम पेजवरील जॉब फेअर हा पर्याय निवडावे. अमरावती जिल्हा निवडून फिल्टर बटनवर क्लिक करावे. त्यानंतर दिनांकित मेळावा निदर्शनास येईल. त्यासमोर असलेल्या ॲप्शन बटनाच्या खाली व्ह्यू व अप्लाय बटन दिसेल. त्यानंतर मेळाव्यास उपस्थित राहणारे उद्योजक व त्यांच्याकडील पदाबाबत माहिती दिसेल. आपल्या पात्रतेनुसार पदाची निवड करून अप्लाय बटनवर क्लिक करा. आय ॲग्री हा पर्याय निवडा. शेवटी सक्सेसफुली अप्लाईड फॉर द जॉब असा मॅसेज दिसेल. यारितीने ऑनलाईन सहभाग नोंदवावा. रजिट्रेशन स्लिप पीडीएफची प्रिंट काढुन मेळाव्याच्या दिनांकास उपस्थित राहावे.

       याबाबत काही अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 0721-2566066 किंवा ई-मेल amravatirojgar@gmail.com वर संपर्क करावा. तसेच 12 मार्च 2025 रोजी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, अमरावती येथे स्वखर्चाने बायोडाटा, पासपोर्ट फोटो व आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

00000

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...