विभागस्तरीय गुंतवणूक शिखर परिषद संपन्न
अमरावती, दि. 11 (जिमाका): उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी गुंतवणूकदार व व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी विभागस्तरीय गुंतवणूक शिखर परिषद हॉटेल ग्रँड महफिल येथे आज संपन्न झाली.
विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्र सिंह खुशवाह, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर, विभागीय कार्यालयाचे उद्योग सहसंचालक निलेश निकम यावेळी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त श्रीमती सिंघल तसेच जिल्हाधिकारी श्री. कटियार यांच्या हस्ते यावेळी उद्योजकांसमवेत 32 सामंजस्य करार करण्यात आले. गुंतवणूक शिखर परिषदेत जिल्ह्यातील प्रमुख उद्योग क्षेत्राबाबत नवउद्योजकांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
आपल्या जिल्ह्याची बलस्थाने ओळखून गुंतवणूकीच्या नवनवीन संधी शोधा. उद्योग क्षेत्राच्या भरभराटीसाठी अमरावती जिल्ह्याचे वातावरण, येथील भौगोलिक परिस्थिती, दळणवळणाची साधने पूरक आहेत. या बाबींचा लाभ घ्या.अन्य क्षमता असलेल्या क्षेत्रांमधील गुंतवणूक व व्यवसाय संधीबाबत माहिती घ्या व उद्योगधंदे स्थापन करण्यासाठी पुढाकार घ्या. उद्योजकांना जेथे निकड आहे, तेथे प्रशासन मदतीसाठी तत्पर असल्याचे श्रीमती सिंघल म्हणाल्या.
अमरावती जिल्हा हा 'ट्रेडिंग हब' म्हणून उदयास यावा यासाठी प्रशासन विविध उपक्रम राबवित आहेत. येथील टेक्सटाइल पार्क ही जिल्ह्याची ओळख आहे. सर्व गुंतवणूकदारांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यासाठी प्रशासन कटिबध्द आहे. जिल्ह्यांना विकासाचा केंद्रबिंदू मानून जिल्ह्यांच्या व राज्याच्या विकासाला चालना देण्याचा परिषदेचा उद्देश आहे. नवोद्योजकांनी याचे महत्त्व जाणून गुंतवणुकीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री कटियार यांनी केले.
00000
नितेश मेश्राम मृत्यू प्रकरणी एसआयटी चौकशीची शिफारस
उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांची माहिती
अमरावती, दि. 11 : चांदूर रेल्वे येथील नितेश मेश्राम याच्या मृत्यूप्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करण्यात यावे, अशी शिफारस करण्यात येणार असल्याची माहिती अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिली.
यावेळी सहायक आयुक्त समाज कल्याण राजेंद्र जाधवर यांच्यासह पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
ॲड. मेश्राम यांनी नितेश मेश्राम यांच्या मृत्यूबाबत पोलिस विभागाशी चर्चा केली. आयोगाकडे तक्रार आल्यानंतर याप्रकरणी चौकशी करण्यात आली. तसेच डॉक्टर, सुरक्षा रक्षक, बाह्यरूग्ण विभागातील कर्मचारी बयाण घेण्यात आले आहे. यात प्रामुख्याने 10 जून रोजी अटक करण्यात आल्यानंतर 13 जून रोजी रूग्णालयात मृत्यू झाला आहे. याबाबत 13 जानेवारी रोजी तक्रार आल्यानंतर 27 जानेवारी आणि 17 फेब्रुवारी रोजी नागपूर येथे बैठक घेण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपासात निष्काळजीपणा केल्याने गुन्हे दाखल करावे, तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
पिडीताच्या कुटुंबियांना मदत व्हावी यासाठी शासकीय योजनेतून नियमानुसार शेतजमीन देण्यात यावी. तसेच कुटुंबियातील एकाला शासकीय नोकरीत सामावून घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेली कार्यवाही आणि बयानातील तफावत आढळून आली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून भारतीय पोलिस सेवेतील अधिकाऱ्याकडून याप्रकरणी निष्पक्ष चौकशी करण्यात येणार आहे, असे ॲड. मेश्राम यांनी सांगितले.
00000
No comments:
Post a Comment