Tuesday, October 4, 2016

जिंकलेल्यांचे अभिनंदन व पराजितांनी जास्त परिश्रम घेवून यश मिळवा
पोलिस अधिक्षक लखमी गौतम
* राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न
          अमरावती, दि.27 (जिमाका): स्पर्धेमध्ये जय आणि पराजय हे सुरुच असते. विजयी संघांचे अभिनंदन तसचे स्पर्धेत अयशस्वी ठरलेल्या संघांनी खचुन न जात येणाऱ्या स्पर्धांमध्ये अधिक परिश्रम घेवून यश संपादन करावे असे प्रतिपादन पोलिस अधिक्षक लखमी गौतम यांनी केले.

          येथील विभागीय क्रीडा संकुल येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेच्या पुरस्कार वितरण समारोह प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा क्रीडा व युवक संचालनालयाच्या उपसंचालक प्रतिभा देशमुख, महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष जयंत देशमुख, पंजबाराव देशमुख बँकचे अध्यक्ष संजय वानखडे, युबीए बास्केटबॉलचे संचालक विवेक मेहता, बास्केटबॉल संघटनेचे सहसचिव ललित नहाट, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, निवड समितीच्या विजया खोत आदी उपस्थित होते.

          लखमी गौतम म्हणाले की, खेळ हा जीवणातील सर्वात मोठा शिक्षक आहे. हा शिक्षक यश आणि अपयश पचविण्याचे शक्ती निर्माण करतो त्यामुळे जे यशस्वी झाले त्यांनी अयशस्वी संघाला कमी लेखू नये. अयशस्वी संघांनी अधिक परिश्रम करुन यश कसे संपादन करता येईल या कडे लक्ष देण्याची गरज आहे.

       प्रतिभा देशमुख म्हणाल्या की, खेळामध्ये शक्ती सोबत युक्ती वापरणे सुद्धा महत्वाचे असते. प्रत्येक खेळाडू समय सुचकतेने खेळात चपळता दाखवितो त्यानुसार संघ हा यशस्वी होणार की अयशस्वी होणार हे ठरते. या स्पर्धेत सहभागी झालेले प्रत्येक खेळाडूमध्ये ही समयसुचकता असल्याने तो उत्कृष्ट खेळाडू आहे.

उत्कृष्ट खेळाडू
       राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेत 14 वर्षाखालील वयोगटात उत्कृष्ट खेळाडू म्हणून कोल्हापूरच्या यश पवार तसेच मुलींमध्ये पुण्याची सानिका ची निवड करण्यात आली. 17 वर्षाखालील वयोगटात मुलांमध्ये पुण्याचा कोकाटे, मुलींमध्ये मुंबई ची राणी, 19 वर्षाखालील वयोगटामध्ये मुंबईचा जस्टीन तर मुलींमध्ये मुंबईच्या साक्षीला उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.


विजयी संघ
       या स्पर्धेत राज्यातील विविध संघांनी सहभाग घेतला होता. या तीन दिवसीय स्पर्धेत विविध गटातून यशस्वी झालेल्या संघांना उपस्थित मान्यवरांच्याहस्ते ट्रॉफी देवून गौरविण्यात आले. यामध्ये 14 वर्षाखालील वयागटातील मुलींच्या स्पर्धेत प्रथम पुणे संघ, द्वितीय मुंबई, तृतीय नागपूर तसेच मुलांमध्ये प्रथम कोल्हापूर, द्वितीय पुणे व तृतीय औरंगाबाद संघांने स्थान प्राप्त केले.

          17 वर्षाखालील वयोगटातील मुलींच्या स्पर्धेत प्रथम मुंबई, द्वितीय पुणे, तृतीय नाशिक तसेच मुलांच्या संघामध्ये प्रथम पुणे, द्वितीय नागपूर व तृतीय औरंगाबाद, 19 वर्षाखालील वयोगटामध्ये मुलींच्या स्पर्धेत प्रथम मुंबई, द्वितीय पुणे, तृतीय कोल्हापूर तसेच मुलांमध्ये प्रथम मुंबई आणि द्वितीय नाशिक या संघांनी यश प्राप्त केले.

          कार्यक्रमाचे संचालन सचिन देवळे तर आभार प्रदर्शन गणेश जाधव यांनी मानले.

00000









राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील दि.26 व 27 सप्टेंबर रोजी 
अमरावती जिल्हा दौऱ्यावर
          अमरावती, दि.26 (जिमाका): गृह (शहरे), नगरविकास, सामान्य प्रशासन, नगरविकास, बंदरे, विधी व न्याय, संसदिय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील दि.26 व 27 सप्टेंबर, 16 रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत असुन दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
          दि.26 सप्टेंबर, 16 रोजी सोयीनुसार बुलडाणा येथून मोटारीने अमरावती कडे प्रयाण. अमरावती येथे आगमन व शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे मुक्काम. दि. 27 सप्टेंबर 16 रोजी दिवसभर अमरावती येथील विविध स्थानिक कार्यक्रमांस उपस्थिती. सायं 7.05 वा. अमरावती येथून अमरावती एक्सप्रेसने मुंबई कडे प्रयाण.
00000
वृत्त क्र.988                                                                         दिनांक 26-09-2016
राज्यमंत्री दादाजी भुसे दि.28 सप्टेंबर रोजी 
अमरावती जिल्हा दौऱ्यावर
          अमरावती, दि.26 (जिमाका): ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे दि.28 सप्टेंबर, 16 रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत असुन दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
          दि.28 सप्टेंबर, 16 रोजी दुपारी 12.30 वाजता नागपुर येथून अमरावतीकडे प्रयाण. दुपारी 2 वा. शासकीय विश्रामगृह अमरावती येथे आगमन, दुपारी 3 वा. ते सायं. 5 वाजेपर्यत विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती येथे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान पुर्वतयारी बैठकीस उपस्थिती. सायं. 5.30वा. संत गाडगे बाबा समाधीस्थळ, अमरावती येथे भेट. सायं. 6.30 वा. नागरवाडी, ता. चांदुरबाजार, जिल्हा अमरावतीकडे, प्रयाण. रात्री 7.30 वा. नागरवाडी येथे आगमन. रात्री 8.30वा. बडनेरा कडे प्रयाण.

00000
43 शासकीय ग्रंथालयांना ई-सेवेत रुपांतर करणार
ग्रंथालय संचालक किरण धांडोरे

            अमरावती, दि.26 (जिमाका): ग्रंथालय संचालक, म.रा. मुंबई यांच्या वतीने येणाऱ्या काळात 18 कोटी निधी खर्च करुन 43 शासकीय ग्रंथालयांना ई-सेवा मध्ये रुपांतरीत करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात अ वर्ग तसेच ब वर्ग वाचनालय ई-सेवेशी जोडले जातील. हा उपक्रम पुढील 6 वर्षात पुर्ण केला जाईल,असे प्रतिपादन म.रा. मुंबई चे ग्रंथालय संचालक किरण धांडोरे यांनी केले.
राजा राम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान व ग्रंथालय संचालनालय (म.रा.), जिल्हा ग्रंथालय अधिकारी, अमरावती कार्यालयाच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमांचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले. अध्यक्ष स्थानी ग्रंथालय संचालक किरण धांडोरे, विशेष अतिथी म्हणुन मनपा आयुक्त हेमंतकुमार पवार, अप्पर कोषागार अधिकारी ग. म. चौधरी, सहायक क्षेत्रीय अधिकारी दिपांजन चॅटर्जी, डॉ. महेंद्र मेटे, ग्रंथालयाचे कार्यवाह राम देशपांडे, सहायक ग्रंथालय संचालिका मिनाक्षी कांबळे, शासकीय विभागीय ग्रंथपाल राजेश पाटील तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी अ. वा. सुर्यवंशी यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी मंचावर उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणातुन मनोगत व्यक्त करतांना किरण धांडोरे म्हणाले कि, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानुसार ज्या प्रमाणे मंदीरामध्ये भक्तांच्या रांगा लागतात. त्याचप्रमाणे ग्रंथालयातही वाचकांच्या, अभ्यासकांच्या संशोधकांच्या रांगा लागल्या पाहिजेत. त्यासाठी सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.  
या कार्यक्रमास उद्घाटन प्रसंगी भाषणात देशातील विविध सांस्कृतीचा ठेवा आजही ग्रंथालयाच्या माध्यमातुन जतन करुन ठेवण्यात आला आहे, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी अ. वा. सुर्यवंशी यांनी प्रस्ताविकामध्ये सार्वजनिक ग्रंथालय ही जनतेचे विद्यापीठ असुन नागरीकांना सुसज्ज व समृद्ध समाज घडविण्याचे कार्य करत आहे. तसेच राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता यांच्या कडुन राबविण्यात येणाऱ्या समान व असमन अर्थसहाय्याच्या विविध योजनांचा लाभ सार्वजनिक ग्रंथालयानी घ्यावा, असे प्रतिपादन त्यांनी केले.
राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाताकडुन राबविण्यात येणाऱ्या समान व असमान अर्थसहाय्याच्या विविध योजनांची माहिती, सार्वजनिक ग्रंथालयासाठी आवश्यक ग्रंथ, फर्निचर, दृक-श्राव्य माध्यमे, इमारतीचे नुतनीकरण, दुरुस्ती, संगणक, झेरॉक्स, प्रिंटर, बालविभाग कॉनर्र, दिव्यांगासाठी विशेष कक्ष, महिला, ज्येष्ठ नागरिक विभाग, ग्रंथ प्रदर्शने, व्याख्यान, कार्यशाळा या सारख्या अनेक बाबींसाठी प्रतिष्ठानतर्फे समान व असमान निधी योजनेतंर्गत अर्थसहाय्य उपलब्ध करुन दिले जाते या सर्व अर्थसहाय्याच्या योजनांची माहिती दिपांजन चॅटर्जी, सहायक क्षेत्रीय अधिकारी यांनी दिली.
सहायक ग्रंथालय संचालिका मिनाक्षी कांबळे व विभागीय ग्रंथपाल राजेश पाटील यांनी सार्वजनिक ग्रंथालयाच्या समस्या व उपाय यावर माहिती दिली. सुत्र संचालन मयुर चौधरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वानखडे निरीक्षक, ढाकणे, सं. रा. कंडारकर क. लि. यांनी मोलाचे सहकार्य केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अ. वा. सुर्यवंशी यांनी केले.

00000
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गत कर्जासाठी
संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

          अमरावती, दि.26 (जिमाका): पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेंतर्गत सन 2016-17 या आर्थिक वर्षाकरीता अनुसुचित जाती/जमाती प्रवर्गातील ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जासाठी कार्यबल समितीची बैठक दि. 30 सप्टेंबर 2016 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. सदर योजनेतंर्गत उद्योग करीता रु. 25 लाख व सेवा उद्योगाकरीता रु. 10 लाखापर्यत पात्र व सक्षम प्रकल्पांना बँकामार्फत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत असुन शासनाकडुन प्रवर्ग निहाय 35 टक्के पर्यत अनुदान देण्यात येते.
          सदर योजनेतंर्गत अर्ज करण्यास इच्छुक सुशिक्षीत बेरोजगार युवक/युवतींनी www.kviconline.gov.in या संकेत स्थळावर लॉगऑन करुन PMEGP ePortal वर Online अर्ज सादर करावे, असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, यांनी केले आहे.
00000
वृत्त क्र.985                                                                            दिनांक 26-09-2016
धामणगांव रेल्वे येथे दि.22 ते 29 सप्टेंबर पर्यत
सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यत जड वाहनास प्रवेश बंदी
          अमरावती, दि.26 (जिमाका): धामणगाव रेल्वे शहरात जड वाहतुकीची रहदारी समस्या मोठ्या प्रमाणात आहे. ही समस्या पाहता जिल्हा दंडाधिकारी किरण गित्ते यांच्या आदेशान्वये दि. 22 ते 29 सप्टेंबर पर्यत धामणगांव रेल्वे शहरात सकाळी 7 वा. ते रात्री 8 वाजेपर्यत जड वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.
धामणगाव रेल्वे येथील शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच गावातील लोक वाहनांचा वापर करतात. याशिवाय रेल्वे यार्ड मधुन दिवसभर 70 ते 80 ट्रक विविध मार्गाने शहराबाहेर पडतात. अशा वेळेस जड वाहतुकीने किंवा इतर वाहतुकीने किरकोळ /गंभीर अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. तसेच नगर परिषद, धामणगांव रेल्वे यांनी 4 ऑगस्ट 2015 रोजी विशेष ठराव क्र. 4 नुसार जड वाहनास प्रवेश बंदी असावी, असे मत व्यक्त केले होते. त्यानुसार जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार मुंबई पोलीस कायदा 1951 चे कलम 33(1) (ब) तसेच मोटर वाहन कायदा 1988 चे कलम 115 अन्वये जड वाहनास प्रवेश बंदी घालण्यात आली आहे.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे जिल्हा दंडाधिकारी किरण गित्ते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.  

00000
राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल क्रीडास्पर्धेचे
पालकमंत्री पोटे यांच्याहस्ते उद्घाटन

          अमरावती, दि.25 (जिमाका): अमरावती येथील विभागीय क्रीडा संकुल येथे 28 सप्टेंबर 2016 पर्यंत घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल क्रीडास्पर्धा-2016-17 चे थाटात उद्घाटन पालकमंत्री प्रविण पोटे यांच्या हस्ते झाले. यावेळी ना.पोटे यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
          क्रीडा व युवकसेवा, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी, राज्य बास्केटबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धेस  आ.डॉ.सुनिल देशमुख, आ.डॉ.अनिल बोंडे, जिल्हाधिकारी किरण गिते, शिवछत्रपती पुरस्कार विजेते मुकुंद धस, शत्रुघ्न भोसले, चांदुरकर आदि उपस्थित होते.
          या स्पर्धा 28 सप्टेंबर, 16 चालणार असून राज्यातील नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, मुंबई, नाशिक, कोल्हापूर व पुणे या 8 विभागातील 14,17,19 वर्षे वयोगटातील मुलामुलींचे 48 संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येक संघात 12 खेळाडू असून सुमारे 1 हजार बास्केट बॉलपटू उपस्थित होते. अशी माहिती क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख यांनी प्रास्ताविकात दिली.
          विभागीय क्रीडा संकुल व शिवाजी महाविदयालयात या स्पर्धा होणार आहेत. प्रत्येक गटासाठी निवड समितीचे 3 सदस्य राहणार आहेत. या स्पर्धेतील यशस्वी संघातून राष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धेसाठी 14-17-19 या 3 गटासाठी मुलामुलींचा संघ निवडण्यात येईल. प्रत्येक संघातून प्रथम, द्वितीय, तृतीय अशी निवड करण्यात येईल. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बास्केट बॉल मार्गदर्शक कोच जयंत देशमुख यांच्यासह इतर मार्गदर्शक परिश्रम घेत आहेत अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी यावेळी दिली.
          यावेळी जिल्हाधिकारी किरण गिते यांनीही खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते मुकुंद धस, शत्रुघ्न भोसले, चांदुरकर, नितिन चव्हाण यांचा यावेळी ना. पोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
          प्रारंभी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केल्या नंतर शिवाजी शिक्षण संस्थेच्या दर्यापूर येथील मुलींनी आकर्षक जिमनॅस्टीक खेळाचे प्रात्यक्षिके सादर केली. त्यानंतर उपस्थित खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी नृत्य सादर केले.

00000









पालकमंत्री प्रविण पोटे यांच्या हस्ते
रस्ते भूमिपूजन कामाचा शुभारंभ   

          अमरावती, दि.25 (जिमाका): येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने 373.51 लक्ष रुपये अंदाजित खर्चाच्या अमरावती-कठोरा-नांदुरा-शिराळा-चांदुरबाजार या 27 किलोमीटर रस्त्यांचे रुंदीकरणासह सुधारणा बांधकामाचे कठोरा, नांदुरा गावाजवळ पालकमंत्री प्रविण पोटे यांनी फलकाचे अनावरण करुन भूमिपूजन केले.

          आ.यशोमती ठाकूर, कार्यकारी अभियंता जाधव कठोरा व नांदुराचे ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

00000


पालकमंत्री प्रविण पोटे यांची छायाचित्र प्रदर्शनीस भेट
सुप्त गुणांना वाव देण्यासाठी स्पर्धा आवश्यक 

          अमरावती, दि.25 (जिमाका): येथील  अंबानगरी फोटा-व्हिडीओग्राफर्स असोशिएशन, अमरावती प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने महापालिकेच्या श्रीसंत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मधील आर्ट गॅलरी येथे दिनांक 26 सप्टेंबर 2016 पर्यंत आयोजित राज्यस्तरीय भव्य छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनीस पालकमंत्री प्रविण पोटे यांनी भेट देऊन छायाचित्रांची पाहणी केली.

          यावेळी सर्वश्री राजेश वाडेकर, राहुल आंबेकर, रुपेश फासाटे, निलेश चौधरी, मनिष जगताप आदि सदस्य उपस्थित होते.

          या प्रदर्शनात राज्यभरातील निसर्गवेड्या छायाचित्रकारांनी अप्रतिम छायाचित्र काढून यात सहभागी झाले होते. या छायाचित्र प्रदर्शनीतून राज्यातील तसेच मेळघाटातील पक्षी व निसर्गसंपदा पहावयास मिळते. पक्षीवैभव हे समृद्ध वनसंपदेचे लक्षण असून अमरावती जिल्ह्यातील विविध प्रकारच्या दुर्मिळ पक्ष्यांची छायाचित्रे छायाचित्रकारांनी टिपले असून ती सर्वांना उद्यापर्यंत पहावयास मिळणार आहे. या प्रदर्शनास आतापर्यंत 30 हजार लोकांनी भेटी देऊन आनंद घेतल्याची माहिती रुपेश फासाटे यांनी यावेळी दिली.

          ना. पोटे यांनी सर्व छायाचित्रांचे कौतुक करुन सुप्त गुणांना वाव देण्यासाठी अशा स्पर्धा नियमित घ्याव्यात अशी सूचना करुन मेळघाटातील निसर्गसंपदा जगापुढे आणण्यासाठी आर्ट गॅलरीसाठी आपण जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु असे सांगितले.

00000





माहेश्वरी महिला मंडळांचा स्तुत्य उपक्रम
शहिद पंजाब उईके यांना श्रद्धांजली म्हणून रक्तदान महायज्ञ
पालकमंत्री-प्रविण पोटे

          अमरावती, दि.25 (जिमाका): जम्मू कश्मीर भागातील उरी येथे अतिरेक्यांकडून झालेल्या हल्ल्यात शहिद झालेला  अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील भूमीपूत्र पंजाब उर्फ विकास जानराव उईके यांना श्रद्धांजली म्हणून येथील माहेश्वरी महिला मंडळाने रक्तदान महायज्ञ हा स्तुत्य उपक्रम सुरु करुन राज्यभरात चांगला पायंडा पाडला आहे असे प्रतिपादन पालकमंत्री प्रविण पोटे यांनी केले.
येथील माहेश्वरी भवन मध्ये आयोजित रक्तदान महायज्ञ शिबीराचे उद्घाटन ना. पोटे यांच्याहस्ते झाले यावेळी ते बोलत होते. आमदार श्रीकांत देशपांडे, शहिद पंजाब उईके यांच्या मातोश्री बेबीताई, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, माहेश्वरी पंचायतचे अध्यक्ष सुभाष राठी, रक्तदान महायज्ञ समितीचे प्रमुख महेंद्र भुतडा, सुरेश साबु, पुष्पलता, प्रभा झंवर व माहेश्वरी समाजातील मान्यवर उपस्थित होते.
ना.पोटे यांनी यावेळी शहिद पंजाब यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली. ते म्हणाले की, माहेशवरी महिला मंडळाने शहिद पंजाब यांना श्रद्धांजली बरोबरच रक्तदान महायज्ञ हा स्तुत्य उपक्रम घेतला त्याबद्दल माहेश्वरी महिला मंडळाचे कौतुक केले. उईके कुटुंबाची देशावर अपार श्रद्धा आहे. त्यांच्या मुलाने देशासाठी बलिदान दिले आहे. माहेश्वरी समाजाने शहिदांच्या कुटुंबांना तसेच पाल्यांना मदत म्हणून दररोज 5 रुपये याप्रमाणे वर्षासाठी 1,800 रुपये जमा करावेत. आपण पंजाबचे लहाने भाऊ यांना नोकरी मिळवून देण्यासाठी अवश्य प्रयत्न करु.
आ.श्रीकांत देशपांडे यांचेही यावेळी समयोचित भाषण झाले. त्यांनी यावेळी माहेश्वरी महिला मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक केले.
पोलीस आयुक्त  दत्तात्रय मंडलिक म्हणाले रक्तदानामुळे एखाद्या रुग्णाचा जीव वाचतो, रुग्णालयात रक्ताची नेहमीच गरज असते. रक्तदान हे फार मोठे कार्य आहे, हजारो लाखो जणांचे जीव वाचविणारा हा उपक्रम घेतल्याबद्दल माहेश्वरी महिला मंडळाचे कौतुक केले. पोलीस आयुक्त मंडलिक पुढे म्हणाले, उईके परिवाराने देशासाठी फार मोठे बलिदान केले आहे. शहिद पंजाबचे बलिदान देशासाठी झाले आहे. या भूमीपुत्राच्या सलामीसाठी हा कार्यक्रम महिला माहेश्वरी मंडळाने घेतल्याबद्दल त्यांने कौतुक करुन धन्यवाद दिले.

00000




केबल जोडण्या संदर्भात विनाक्रम (रॅण्डम)
सर्वेक्षण सोडत दि.1 ऑक्टोबर रोजी
          अमरावती, दि.23 (जिमाका): दि.25 मार्च 2015 रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्यात केबल जोडण्यांचे संदर्भात विनाक्रम (रॅण्डम) सर्वेक्षण करण्याकरीता प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी सोडत काढून प्रत्येक जिल्ह्यातुन तीन केबल ऑपरेटर व एक बहूविध यंत्रणा परीचालक (एमएसओ) यांची केबल जोडण्यांचे सर्वेक्षणाकरीता निवड करावयाची आहे. याकरीता सोडत क्र. 17 दि.1 ऑक्टोबर 16 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती येथे दुपारी 12.30 वा. सभागृह क्र. 1 मध्ये काढण्यात येणार आहे. या सोडतीकरीता अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा व वाशिम या जिल्ह्यातील सर्व केबल ऑपरेटर व बहूविध यंत्रणा परीचालक (एमएसओ) यांनी उपरोक्त ठिकाणी वेळेवर हजर राहण्याचे आवाहन विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

00000
राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील दि.26 व 27 सप्टेंबर रोजी 
अमरावती जिल्हा दौऱ्यावर
          अमरावती, दि.26 (जिमाका): गृह (शहरे), नगरविकास, सामान्य प्रशासन, नगरविकास, बंदरे, विधी व न्याय, संसदिय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील दि.26 व 27 सप्टेंबर, 16 रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत असुन दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
          दि.26 सप्टेंबर, 16 रोजी सोयीनुसार बुलडाणा येथून मोटारीने अमरावती कडे प्रयाण. अमरावती येथे आगमन व शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे मुक्काम. दि. 27 सप्टेंबर 16 रोजी दिवसभर अमरावती येथील विविध स्थानिक कार्यक्रमांस उपस्थिती. सायं 7.05 वा. अमरावती येथून अमरावती एक्सप्रेसने मुंबई कडे प्रयाण.

00000
21 वर्षाची सोनु विनायकराव कावलकर बेपत्ता
          अमरावती, दि.23 (जिमाका): पोलिस आयुक्तालय अमरावती, शहर पोलिस ठाणे फ्रेजरपुरा हद्दीतील कु. सोनु विनायकराव कावलकर ही राहणार पिंपरी निपानी ता. नांदगांव खंडेश्वर, जि.अमरावती (हल्ली मुक्काम-तांत्रीक कॉलनी, अमरावती) दि.19 ऑगस्ट, 16 पासुन बेपत्ता आहे. फिर्यादी बेपत्ता मुलीचे पिता विनायक मो. कावलकर यांनी दिलेल्या माहिती नुसार सोनू ही नेहमी प्रमाणे घराला कुलुप लावुन युवा शक्ती कॉलेज येथे सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यत गेली होती. फिर्यादी हे गावावरुन परत आल्यावर त्यांना घरी कुलुप लागलेले दिसले. त्यांनी आपल्या मुलीची वाट पाहिली, परंतु ती घरी परत आली नाही. तिचा आजुबाजुला व नातेवाईकांकडे शोध घेतला, तरीपण ती मिळुन आली नाही. पोलिस ठाणे फ्रेजरपुरा येथे दि.19 ऑगस्ट, 16 रोजी मिसींग रजिस्टर क्र. 92/2016 प्रमाणे बेपत्ता असल्याची नोंद घेण्यात आली आहे. अद्यापर्यंत तिचा शोध लागला नाही, असे सहा.पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा, अमरावती शहर यांनी कळविले आहे.
          बेपत्ता कु. सोनु विनायकराव कावलकर ही 21 वर्षाची असुन तिची उंची 5 फुट 2 इंच आहे. तिचा रंग सावळा, बांधा सडपातळ, अंगात सलवार कुर्ता घातलेला आहे. टी.व्ही.एस वेगो क्र. एम.एच.27-ए. डब्ल्यु. 9897 गाडी सोबत घेऊन गेली आहे.  ज्या कोणाला ह्या मुलीबाबत काही माहिती सांगावयाचे असल्यास किंवा शोध लागला तर पोलिस स्टेशन फ्रेजरपुरा येथे 0721-2552600 या क्रमांकावर किंवा नियंत्रण कक्ष अमरावती शहर येथे 0721-2551000 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन गुन्हे शाखा, अमरावती शहराचे सहायक पोलीस आयुक्त यांनी केले आहे.

                                                          00000
ग्रंथालयाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी दि.25 सप्टेंबरला कार्यशाळा
*जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या हस्ते उद्घाटन
*राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता
          अमरावती, दि.23 (जिमाका): राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता अंतर्गत अनुदान योजनेतुन ग्रंथालयासाठी राबविण्यात येणाऱ्या व असमान अर्थसाह्याच्या विविध योजनांच्या व ग्रंथालय संचालनालयाकडुन राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्याच्या उद्देशाने रविवार, दि.25 सप्टेंबर 16 रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. राजकमल चौक येथील मनपा टाऊन हॉल येथे होणाऱ्या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या हस्ते सकाळी 11 वा. करण्यात येईल.
राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय अमरावतीच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे ग्रंथालय संचालक किरण धांडोरे, विशेष अतिथी म्हणुन मनपा आयुक्त हेमंतकुमार पवार, अप्पर कोषागार अधिकारी कि. ग. चौधरी, राजा राममोहन रॉय ग्रंथालय कोलकाताचे पश्चिम विभागाचे सहाय्यक क्षेत्रीय अधिकारी दिपांजन चटर्जी, जिल्हा ग्रंथालय संघ अमरावतीचे सह कार्यवाहक प्रदीप चौधरी, शिवाजी महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. महेंद्र मेटे, शासकीय विभागीय ग्रंथालय अमरावतीचे राजेंश पाटील, जिल्हा ग्रंथालय संघ अमरावतीचे कार्यवाहक राम देशपांडे सहाय्यक ग्रंथालय संचालक मिनाक्षी कांबळे प्रामुख्याने उपस्थित राहतील.
          सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यत चालणाऱ्या कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रादरम्यान ग्रंथालयाच्या कार्यपुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयाचे प्रतिनिधी, कर्मचाऱ्यांसह ग्रंथप्रेमीनी एक दिवसीय कार्यशाळेत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अ. वा. सुर्यवंशी यांनी केले आहे.

00000
राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील दि.21 सप्टेंबर रोजी 
अमरावती जिल्हा दौऱ्यावर
          अमरावती, दि.21(जिमाका): गृह (शहरे), नगरविकास, सामान्य प्रशासन, नगरविकास, बंदरे, विधी व न्याय, संसदिय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील दि.21 सप्टेंबर, 16 रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत असुन दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
          दि.21 सप्टेंबर, 16 रोजी दिवसभर अमरावती येथील विविध स्थानीक कार्यक्रमास उपस्थिती. सोयीनुसार अमरावती येथुन मोटारीने अकोला कडे प्रयाण.  

00000
अमरावती जिल्ह्यातील रेती स्थळांचे ई-निविदा-ई-लिलाव
(पहिला टप्पा-पहिली फेरी)

            अमरावती, दि.21 (जिमाका): सन 2016-17 (30 सप्टेंबर 2017 अखेर पर्यत) वर्षाकरीता अमरावती जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील 10 तालुक्यामधील 54 रेती स्थळांचे लिलाव प्रक्रिया ई-निविदा-ई-लिलाव (पहिला टप्पा-पहिली फेरी) ऑनलाईन प्रणाली द्वारे दि.20 सप्टेंबर 2016 पासुन सुरु होत आहे. ई-निविदा बाबतचा संपूर्ण तपशील हा https://eauctioncollamr.abcprocure.com तसेच ई-लिलाव बाबतचा संपूर्ण तपशील https://www.eauctioncollamr.abcprocure.com या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. रेतीघाटा संबंधीची विस्तृत माहिती उपरोक्त वेबसाईटवर तसेच सर्व संबंधित कार्यालयात तसेच amravati.nic.in वेबसाईट वर उपलब्ध राहील. ई-निविदा-ई-लिलाव मध्ये भाग घेण्यापूर्वी सदर प्रक्रियेत भाग घेणाऱ्यांन नव्याने नोंदणी करणे तसेच डिजीटल सर्टीफिकेट काढणे आवश्यक आहे. ई-निविदाधारक तसेच लिलावधारकाकडे पॅन कार्ड, व्हॅट रजिस्ट्रेशन (टीन कार्ड) असणे आवश्यक आहे. त्याशिवाय त्यांना रेती ई-निविदा प्रक्रियेत भाग घेता येणार नाही. रेती लिलावच्या ई-निविदा-ई-लिलाव प्रक्रियेत सर्व संबंधितांना भाग घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केले आहे.
00000

काचावार/कोल्हे/21-09-2016/16-31 वाजता

Wednesday, September 21, 2016

महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची
सह व्यवस्थापकीय संचालक यांची पहाणी
* शेतकऱ्यांना व्यावहारिक फायदे लक्षात आणून द्या

            अमरावती, दि.21 (जिमाका): विदर्भातील शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे, शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाला अधिक शिघ्र गतीने मोठ्या बाजारपेठेमध्ये पोहचविण्यासाठी व्यवस्था निर्माण असावी, शेतकऱ्यांना आपल्या शेतमालावर प्रक्रिया करुन त्यांचा अधिक लाभ घेता यावा या करीता महाराष्ट्र कृषि समृद्धी विकसित करणे आणि त्या कृषि समृद्ध केंद्राला नागपूर व मुंबईला जोडण्यासाठी महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असुन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर यांनी नांदगाव खंडेश्वर येथील शासकीय ई-क्लास, एमआयडीसी, धामणगाव रेल्वे येथील जागेची पहाणी केली.

          या उच्चस्तरीय पहाणी पथकात सह व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर यांच्यासह जिल्हाधिकारी किरण गित्ते, एमएसआरडीसी चे मुख्य अभियंता उल्हास देबडवार, अधिक्षक अभियंता सुनिल देशमुख, इंडिया मॅजिक आयचे राजेश देशमुख, कार्यकारी अभियंता घोडके, कार्यकारी अभियंता हेमंत दवे, अन्य वरिष्ठ अधिकारी, उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, तहसिलदार वाहुरवाघ, राजगडकर आदी उपस्थित होते.

          नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवणी, रसुलापूर, चिखली वैद्य येथील शेतकऱ्यांचा महामार्गाला जमीन देण्याबाबतचा विरोध लक्षात घेवून या गावांना वगळून पर्यायी मार्गाची पडताळणी देखील पहाणी दरम्यान उच्चस्तरीय पथकाने केली.

          त्यांनतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवनमध्ये नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील महामार्गाशी संबंधित तलाठी व संवादक यांची बैठक घेवून या तालुक्यातील महामार्गाशी संबंधित सर्व शेतकऱ्यांचे काय म्हणणे आहे हे ऐकूण घेतले. महाराष्ट्र समृद्धी महामार्ग व कृषि समृद्धी केंद्र या प्रकल्पात जास्तीत जास्त शेतकरी भागीदार होतील या दृष्टीने प्रयत्न करावेत कारण हा प्रकल्प शेतकऱ्यांचा आहे. शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा प्रत्यक्ष फायदा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. केवळ अपवाद म्हणून भुसंपादन कायद्याचा वापर करण्यात येईल असे सांगून कुरुंदकर म्हणाले, आपण शेतकऱ्यांशीही संवाद साधला आहे. या प्रकल्पा संदर्भात शेतकऱ्यांचे रास्त म्हणणे ऐकूण त्यानुसार धोरनात्मक बदल करण्यात येईल. वर्धा, नाशिक या जिल्ह्यात शेतकऱ्यांचा या प्रकल्पासाठी वाढता पाठिंबा आहे. शेतकरी स्वयंस्फुर्तीने पुढे येवून संमतीपत्र देत आहेत. तलाठी व संवादकांनी प्रकल्पाशी संबंधित प्रत्येक शेतकऱ्यांशी संवाद साधुन रेडीरेकनर नुसार व भागीदारी पद्धतीने काय फायदे होतात याचा प्रत्यक्ष कागदपत्र माहिती दाखवावी. शेतकऱ्यांचे पुर्ण समाधान होईपर्यंत हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. काही लोक हेतु

पुरस्सर जाणिव पुर्वक सकारात्मक विचार करु देत नाहित. कृषि समृद्धी प्रकल्पाच्या ठिकाणी शाळा, कॉलेज, प्रक्रिया उद्योग, कोल्ड स्टोरेज, वीज, पाणी आदी सर्वच सोयी उपलब्ध होणार आहे. एक प्रकारचे नवीन शहरच वसणार आहे. विससित लेआऊटमध्ये हा भुखंड असणार आहे. प्रत्येक गावाचा नकाशा तयार करुन महामार्गाची आरआर व्हॅल्यु दाखवावी. शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधावा, गटागटात चर्चा करावी, शंका असल्यास वरिष्ठांशी चर्चा करावी. वरिष्ठ प्रत्यक्ष संबंधित शेतकऱ्यांपर्यंत जावून खुलासा करतील.

          राज्याचे मा.मुख्यमंत्री यांनी विदर्भ, मराठवाड्यातील संपादकांशी प्रत्यक्ष चर्चा या प्रकल्पाबाबत केली. बहुतांश शेतकऱ्यांची या प्रकल्पासाठी संमती दर्शविली आहे. ज्यांनी ज्यांनी संमती दर्शविली आहे त्यांच्याकडून या महिन्याअखेर संमतीपत्र घ्यावे. या प्रकल्पासाठी ज्यांच्या ज्यांच्या जमीनी लागणार आहे तो शेतकरी, जिल्हाधिकारी, शासन यांच्यामध्ये करार होणार असुन तलाठ्यांनी कृषि समृद्धी प्रकल्पातील भागीदारीच्या अगोदरची स्थिती व नंतरची स्थिती याची तुलना करुन दाखवावी. या प्रकल्पातील योजनेचे वैयक्तिक व सामुहिक फायदे समजावुन सांगावे. ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांकडून विरोध होईल त्या ठिकाणी पर्यायी मार्ग काढण्यात येईल. शेतकऱ्यांचे नुसकान होवू नये म्हणून महसुल यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी आराखडे तयार करुन शेतकऱ्यांना दाखवावेत. हे करत असतांना सर्व्हे नंबर निहाय आराखडे करावे.

          महाराष्ट्र शासनाच्या वतीने दि.7 सप्टेंबर, 16 रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसुचनेनुसार असलेल्या शेतकऱ्यांना प्रकल्पात भागीदार करुन घेतले जाणार आहे. या भागीदारीमध्ये शेतकऱ्यांना भुसंचयन योजनेनुसार मोबदला दिला जाईल. सोबतच भुसंपादनाचाही पर्याय शेतकऱ्यांसाठी उपलब्ध राहणार आहे.

          भुसंचयन मध्ये शेतकरी भागीदार झाले तर त्यांना जिरायत जमीनीकरीता 25 टक्के बिनशेती विकसित भुखंड तसेच बागायती जमीनीकरीता 30 टक्के बिनशेती विकसित भुखंड कृषि समृद्धी केंद्र येथे मिळणार आहे अशी माहिती यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिली.

          यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांनीही बैठकित उपयुक्त मार्गदर्शन केले.  
00000

काचावार/गावंडे/सागर/दि.20-09-2016/17-45 वाजता







भातकुली तालुक्यातील 21 गावांमध्ये
रास्तभाव दुकान मंजुरीसाठी स्वयंम सहाय्यता बचत गटांकडून अर्ज आमंत्रित *जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
            अमरावती दि.21 (जिमाका): शासन आदेशानुसार रास्तभाव दुकाने स्वयं सहाय्यता महिला बचत गटांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी डी. के वानखडे यांनी भातकुली तालुका क्षेत्रातील 21 गावांकरीता दि. 20 सप्टेंबर ते 5 ऑक्टोंबर 16 दरम्यान संबंधितांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे.   
          दि. 20 सप्टेंबर ते 5 ऑक्टोंबर 16 दरम्यान भातकुली तालुक्यातील परलाम, नवथाळ बु., चेचरवाडी, उमरापुर, ततारपुर, इब्राहिमपुर, उदापुर, मक्रमपुर, नारायणपुर, वंडली, बोकुरखेडा, मलकापुर, कृष्णापुर, कोलटेक, निंदोळी, बैलमारखेडा, सरमसपुर, अडवी, डेंगुरखेडा, काकरखेडा, मक्रंदाबाद या गावात रास्तभाव दुकानांसाठी स्वयं सहायता महिला बचत गटांना अर्ज सादर करण्याचे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संबंधीत महिला बचतगटांना अर्ज कार्यालयीन वेळेत भातकुली तहसील कार्यालयामध्ये विक्री व स्वीकृत केल्या जातील.   
          जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या दिशानिर्देशानुसार ज्या गावासाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याच गावातील स्वयं सहाय्यता महिला बचत गटांना अर्ज करता येणार आहे. स्वयं सहाय्यता बचत गटाची निवड करतांना महिला स्वयं सहायता गटांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. महिला बचत गट उपलब्ध न झाल्यास पुरुष बचत गटांना प्राधान्य देण्यात येईल. जेष्ठ, वर्धनक्षम व नियमित गटांचा निवडीदरम्यान विचार करण्यात येणार आहे. रास्त भाव दुकान परवाना मंजुर करण्याची कार्यवाही जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती द्वारे करण्यात येईल. समिती समक्ष परवाना मंजुरीसाठी येणारे प्रस्ताव महिला ग्रामसभेसमोर विचारार्थ व शिफारशीसाठी ठेवील. महिला ग्रामसभेच्या शिफारशीनुसार प्रस्तावाला अंतिम मंजुरी देण्यात येईल.
          संबंधीत स्वयं सहाय्यता महिला बचत गटांनी विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रासह रास्तभाव दुकानांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी डी. के. वानखडे यांनी केले आहे.
00000

काचावार/कोल्हे/दि.21-09-2016/15-59 वाजता

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...