Official Blogger Account of District Information Office, Amravati DGIPR, Government of Maharashtra
Friday, November 30, 2018
Tuesday, November 27, 2018
जिल्ह्यात मीझल्स रुबेला लसीकरण मोहिमेचा उत्साहात प्रारंभ मोहिमेच्या यशस्वितेसाठी सर्वांनी सहकार्य करावे -जि. प. अध्यक्ष नितीन गोंडाणे यांचे आवाहन
जिल्ह्यात मीझल्स रुबेला लसीकरण मोहिमेचा उत्साहात प्रारंभ
मोहिमेच्या यशस्वितेसाठी सर्वांनी सहकार्य करावे
-जि. प. अध्यक्ष नितीन गोंडाणे यांचे आवाहन
अमरावती, दि. 27 : नवी पिढी सुदृढ व सशक्त होण्यासाठी राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाचे मोठे योगदान आहे. येणा-या पिढीच्या भवितव्यासाठी पालक व समाजातील सर्व घटकांनी सहकार्य देऊन मीझल्स रुबेला लसीकरण मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी आज येथे केले.
गोवर आणि रुबेला या आजारांच्या समूळ उच्चाटनासाठी लसीकरण मोहिमेचा जिल्ह्यात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ येथील अरूणोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाने झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. जि. प. उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सभापती जयंतराव देशमुख, उपमहापौर संध्याताई टिकले, अरुणोदय संस्थेचे अध्यक्ष डॉ. वसंतराव लुंगे, डॉ. सोनाली शिरभाते, प्रशांत डवरे, रिताताई मोकमकार, नीलिमा काळे, महापालिका आयुक्त संजय निपाणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ठमके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, माध्यमिक शिक्षणाधिकारी निलिमा टाके, डॉ. पद्माकर सोमवंशी आदी उपस्थित होते.
प्रारंभी लसीकरण कक्षाचे उद्घाटन व लसीकरणाचा कार्यक्रम झाला. या मोहिमेत समाजातील विविध घटकांनी सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन श्रीमती टिकले यांनी केले. लसीकरणाची आवश्यकता ओळखून पालकांनी मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन श्री. लुंगे यांनी केले. देवी व त्यानंतर पोलिओ या रोगांच्या समूळ उच्चाटनानंतर आणि आता गोवर रुबेला लसीकरण मोहिमेचा महायज्ञ सुरु करण्यात आला आहे. या नव्या पिढीसाठीच्या या पवित्र कार्यात सर्वांनी योगदान द्यावे, असे डॉ. निकम म्हणाले.
गोवर-रुबेलाची लस गेल्या 40 वर्षांपासून जगातील 149 देशांमध्ये यशस्वीपणे वापरली जात आहे. राज्यात सुमारे ३ कोटी ३८ लाख बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून जिल्ह्यात सहा लाखांहून अधिक बालकांचे लसीकरण होणार आहे. त्यासाठी एएनएम, आशा व अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. लसीकरणाच्या पहिल्या दोन आठवड्यांत सर्व शाळांमध्ये व त्यापुढील दोन आठवडे अंगणवाडी, फिरत्या पथकाद्वारे व बाह्यसंपर्क लसीकरण सत्र राबविण्यात येणार आहे, असे डॉ.आसोले यांनी सांगितले.
जिल्ह्यातील बालके या लसीकरणापासून वंचित राहू नये म्हणून अंगणवाडी सेविकांकडे प्रत्येक बालकाची नोंद ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर शाळाबाह्य मुलांची देखील नोंद ठेवण्यात आली आहे. बालरोगतज्ज्ञांची संघटना, अखिल भारतीय वैद्यकीय संघटना (आय एम ए) यांची देखील मदत घेण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.
लसीकरण झालेल्या बालकांना यावेळी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सीमा नैताम, डॉ. घोडाम, डॉ. रेवती साबळे, जागतिक आरोग्य संघटनेचे अमेय धात्रक, डॉ. मानसी मुरके, पल्लवी आगरकर यांच्यासह पालक, विद्यार्थी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Sunday, November 18, 2018
" महावॉकेथॉन " रॅलीने शहरात रस्ते सुरक्षा जागृती
सार्वजनिक बांधकाम व परिवहनच्या 100 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग
अमरावती, दि. 18 : परिवहन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने आज शहरातून " महावॉकेथॉन " रॅलीद्वारे रस्ते सुरक्षा जनजागृती करण्यात आली. रस्ते नियम व दक्षता याबाबत जनजागृतीच्या उद्देशाने काढण्यात आलेल्या या " महावॉकेथॉन" रॅलीमध्ये सुमारे 100 हून अधिक अधिकारी-कर्मचारी व नागरिक सहभागी होऊन २ किलोमीटर्सचे अंतर चालून ही महावॉकेथॉन रॅली यशस्वी केली.
सार्वजनिक बांधकाम विभाग व परिवहन विभागाच्या सहकार्याने निघालेल्या या रॅलीत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रादेशिक परिवहन अधिकारी आर.टी. गीते व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता विवेक साळवे यांच्या हस्ते झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे, यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री. नवघरे ,श्री. काझी यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते
राज्यात एकाच दिवशी- एकाच वेळी महावॉकेथॉन रॅली काढण्यात आली. शहरात आरटीओ ऑफिस,गर्ल्स हायस्कूल चौक,पंचवटी चौक, कॅम्प परिसर असा रॅलीचा मार्ग होता. या रॅलीमध्ये वाहतूक नियम, रस्ते सुरक्षा, जबाबदारीपूर्वक वाहन चालवणे, वाहनाचे भोंगे न वाजविणे याबाबत माहिती देणारे संदेश प्रसारित करण्यात आले. नागरिक, तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांनी रस्ते सुरक्षेबाबत घोषणाही दिल्या. या रॅलीत बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील सर्व अधिकारी,कर्मचारी, कंत्राटदार तसेच सेवाभावी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता.
00000
आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह क्र. 3 चे लोकार्पण
उर्वरित वसतिगृहांच्या इमारतीही सर्व सुविधायुक्त उभारणार
- पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील
*पावणेचार कोटींच्या निधीतून सुसज्ज वसतिगृह
*180 विद्यार्थिनींची निवास क्षमता
*दुस-या टप्प्यात 360 विद्यार्थिनींचे वसतिगृह उभारणार
अमरावती, दि. 18 : अमरावती जिल्ह्यात गत चार वर्षांत 22 हजार कोटींच्या कामांना चालना मिळाली. जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमत:च इतका मोठा निधी प्राप्त होऊन विकासाला मोठी गती मिळाली. आदिवासी विद्यार्थिनींच्या शासकीय वसतिगृहाच्या इमारतीप्रमाणेच उर्वरित प्रस्तावित वसतिगृहांच्या इमारतीही सुसज्ज व सर्व सुविधांनी युक्त अशा उभारण्यात येतील, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे केले.
एकात्मिक आदिवासी प्रकल्पातर्फे नवसारी येथे आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह क्र. 3 च्या नूतन इमारतीचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. खासदार आनंदराव अडसूळ, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष तथा आमदार प्रभुदास भिलावेकर, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, विजयराज शिंदे, प्रकल्प अधिकारी राहूल कर्डिले आदी उपस्थित होते. प्रारंभी श्री. पोटे पाटील यांनी थोर क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
पालकमंत्री श्री. पोटे पाटील यावेळी म्हणाले की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना न्याय व हक्क मिळवून देण्याचे कार्य केले. त्याला अनुसरून शासनाने तळागाळातील आणि वंचित समाजासाठी कल्याणकारी योजना आणल्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गतिमान निर्णय घेत अनेक प्रकल्प व योजनांना चालना दिली. त्यामुळे राज्यात मोठे निर्माणकार्य होत आहे.
ते पुढे म्हणाले की, वंचित समाजाच्या प्रगतीसाठी समाजातील विद्यार्थ्यांनीही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश मिळवून अधिकारी व्हावे. स्वत:ची प्रगती घडवून आणत असताना समाजासाठीही योगदान द्यावे. आपल्या घटनादत्त अधिकारांचे संरक्षण करत समाजाचा विकास घडवून आणावा, असे आवाहन त्यांनी केले.
शासनाने आदिवासी विकासासाठी अनेक कल्याणकारी योजना अंमलात आणल्या आहेत. त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे, असे श्री. अडसूळ यांनी सांगितले. विद्यार्थिनी वसतिगृहासाठी इमारत होणे आवश्यक होते. मुख्यमंत्र्यांच्या तत्काळ निर्णयाने व पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याने हे काम मार्गी लागले. मुलांच्या वसतिगृहासाठी इमारत करण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत, असे श्री. भिलावेकर यांनी सांगितले.
वसतिगृहाची सुसज्ज इमारत
वसतिगृहाची इमारत जी प्लस थ्री असून, विद्यार्थिनी निवास क्षमता 180 आहे. एकूण 3 कोटी 68 लाख रुपयांच्या निधीतून उभारलेल्या या इमारतीत किचन, डायनिंग, पँट्री भांडार, कार्यालय, अधिक्षक निवासस्थान व सिक रुम अशी रचना आहे. पहिल्या व तिस-या मजल्यावर 10 खोल्या व एक अभ्यासिका आहे. एका खोलीत सहा विद्यार्थिनी राहू शकतात. अंदाजपत्रकात काँक्रिट रस्ता, सुरक्षारक्षक केबिन, अभ्यागत कक्ष, स्वच्छतागृह, वाहनतळ आदी अंतर्भूत आहे. दुस-या टप्प्यात 360 विद्यार्थिनी क्षमतेच्या वसतिगृह इमारतीच्या बांधकामासाठी अप्पर आयुक्तांकडे प्रस्ताव देण्यात आला आहे, असे श्री. कर्डिले यांनी सांगितले. गुल्लरघाट येथील मुख्याध्यापक जवाहर गाढवे यांनी सूत्रसंचालन केले.
00000

Saturday, November 17, 2018
महात्मा गांधीजींच्या अमरावती भेटीला 85 वर्षे पूर्ण पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांना ‘महाराष्ट्र आणि महात्मा गांधी’ ग्रंथाची सन्मानपूर्वक भेट
अमरावती, दि. 17 : अमरावतीचे भूषण असलेल्या श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ या जगप्रसिद्ध संस्थेला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दि. 16 नोव्हेंबर 1933 रोजी भेट दिली होती. या घटनेला काल 85 वर्षे पूर्ण झाली. हे औचित्य साधून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित ‘महाराष्ट्र आणि गांधीजी’ हा ग्रंथ संस्थेचे सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांना सन्मानपूर्वक भेट देण्यात आला.
माहिती उपसंचालक राधाकृष्ण मुळी यांच्या हस्ते हा ग्रंथ श्री. वैद्य यांना देण्यात आला. जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार यावेळी उपस्थित होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि महाराष्ट्र यांच्यातील अनुबंधाचा वेध घेणा-या ‘महाराष्ट्र आणि गांधीजी’ या ग्रंथाची प्रत आवर्जून भेट दिल्याबद्दल श्री. वैद्य यांनी यावेळी आनंद व्यक्त केला.
महात्मा गांधी यांनी दि. 16 नोव्हेंबर 1933 ला मंडळाला भेट दिली होती. त्यावेळी मंडळातील विद्यार्थ्यांचे शारीरिक खेळ व नगर संरक्षक दलातील हरिजन पलटणीच्या कवायतींचे आयोजन मंडळाने केले होते. यादिवशी शहरात गांधीजींच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे मोठी गर्दी उसळली होती. मंडळाच्या स्वयंसेवकांनी या गर्दीचे नियंत्रण केले होते, अशी माहिती श्री. वैद्य यांनी यावेळी दिली.
मंडळाच्या विविध उपक्रमांची माहिती श्री. वैद्य यांनी यावेळी दिली.
महाराष्ट्र आणि महात्मा गांधी या ग्रंथात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, अण्णा हजारे, डॉ. अभय बंग, डॉ. विकास आमटे यांच्यासह अनेक मान्यवरांचे लेख समाविष्ट आहेत. हा ग्रंथ जिल्हा माहिती कार्यालयात उपलब्ध आहे.
00000
Friday, November 16, 2018
पालकमंत्र्यांकडून शहरात स्वच्छता कामांची पाहणी बाजार व गर्दीच्या ठिकाणी प्रभावीपणे स्वच्छता मोहिम राबवा - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील
अमरावती, दि. 16: शहरातील विविध बाजार, गर्दीची व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता काटेकोर असली पाहिजे. अस्वच्छतेबाबत स्थानिक नगरसेवकांच्या तक्रारी लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही करुन निविदा प्रक्रिया राबवावी व स्वच्छतेच्या कामांत सातत्य ठेवावे, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज दिले.
पालकमंत्र्यांनी स्थानिक नगरसेवकांसह आज शहरात स्वच्छता कामांची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. महापालिकेचे आयुक्त संजय निपाणे, पालिकेच्या आरोग्याधिकारी श्रीमती नैताम, अतिक्रमण निर्मूलन अधिकारी श्री. कुत्तरमारे, स्वच्छता निरीक्षक यावेळी उपस्थित होते.
स्वच्छता पाहणी दौऱ्यात प्रारंभी शंकरनगर परिसर, फरशी स्टॉप परिसर, गौरक्षणाच्या बाजूचा दस्तुरनगर परिसर, शिवधारा नेत्रालय, जयभारतनगर चपराशीपुरा परिसर, बेलपुरा, रेल्वेस्टेशन, जुना कॉटन मार्केट रोड आदी परिसराची पालकमंत्र्यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी भाजी बाजार व इतवारा बाजारातील भागांची पाहणी केली. यावेळी पालकमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.
श्री. पोटे पाटील म्हणाले, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तसेच साथीच्या रोगांच्या प्रतिबंधासाठी परिसर स्वच्छ असणे अत्यंत आवश्यक आहे. भाजीबाजार, इतवारा बाजारातील भाजीविक्रेत्या व दुकानदारांना कायमस्वरुपी सिमेंट-काँक्रिटचे ओटे बांधून द्यावे. परिसरात सांडपाण्याची सुरळीत व्यवस्था होण्यासाठी नाल्यांचे बांधकाम करावे. सडक्या भाजीपाल्याची दुर्गंधी व मोकाट गुराढोरांचा वावर रोखण्यासाठी जागोजागी कंटेनर ठेवावे आणि त्याची नित्याने साफसफाई करावी. नागरिकांना येणे-जाणे सोयीचे व्हावे यासाठी भाजीपाला विक्रेता व दुकानदारांना साहित्य आपल्या जागेतच ठेवण्यास सूचित करावे. परिसरात स्वच्छता मोहिम प्रभावीपणे राबवावी, असे आदेश त्यांनी दिले.
स्वच्छतेच्या ठेक्यासंदर्भात नगरसेवकांच्या तक्रारी आहेत. स्वच्छतेच्या ठेक्यांची प्रक्रिया नव्याने राबवून तक्रारींचा तातडीने निपटारा करावा, असेही त्यांनी मनपा प्रशासनाला आदेश दिले. यावेळी प्रभागाचे नगरसेवक, भाजीपाला विक्रेते, दुकानदार उपस्थित होते.
Tuesday, November 13, 2018
सामाजिक न्याय मंत्र्यांचा नागरिकांशी गुरुवारी ई- लाईव्ह संवाद
अमरावती, दि. 13 : सामाजिक न्याय विभागातर्फे गत चार वर्षांत राबविण्यात आलेले महत्वपूर्ण निर्णय व योजनांबाबत सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले हे दि. 15 नोव्हेंबरला सकाळी 11. 30 वाजता राज्यातील नागरिकांशी, विद्यार्थ्यांशी व सामाजिक न्याय विभागातील कार्यरत सर्व कर्मचा-यांसमवेत ई- लाईव्ह संवाद साधणार आहेत.
या कार्यक्रमाचे प्रक्षेपण http://elearning. parthinfotech.in या लिंकद्वारे प्रसारित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात प्रश्न विचारू इच्छिणा-या व्यक्तींनी 8384858685 या मोबाईल क्रमांकावर व्हाटसॲपद्वारे प्रश्न विचारावेत. हे प्रक्षेपण लाईव्ह व्हिडीओ, स्मार्ट फोन्स, टॅबलेटवर पाहता येईल. कार्यक्रमात सहभागाचे आवाहन सहायक समाजकल्याण आयुक्त मंगला मून यांनी केले आहे.
00000
Tuesday, November 6, 2018
गोवर रुबेला आजाराच्या प्रतिबंधासाठी एमएमआर लस
· 9 महिने ते 15 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील
सर्व बालकांसाठी गोवर रुबेला लसीकरण मोहिम
· आरोग्य खात्याच्या तिसऱ्या महायज्ञात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन
· 27 नोव्हेंबर पासून विशेष अभियान राबविणार
अमरावती, दि.6 : गोवर आणि रुबेला या लहान मुलांना होणाऱ्या आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी देश पातळीवर नियोजनबद्ध रितीने कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे. गोवर हा सर्वांना माहिती असलेला संसर्गजन्य आजार असून मुलांमध्ये मृत्यु तसेच अपंगत्व आणणारा आजार आहे. रुबेला या आजारामुळे जन्मत: व्यंग असलेली बालके जन्माला येतात. गोवर हा व्हायरसमुळे होणारा आजार असून संसर्गातून होते. ज्या मुलांना लस मिळाली नसेल अशा रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 90 टक्के पेक्षा जास्त बालकांना हा आजार संसर्गातून होतो.
रुबेला ज्याला जर्मन मिझल सुद्धा म्हटल्या जाते हा सौम्य स्वरुपाचा आजार असला तरी गर्भवती मातेस हा आजार झाल्यास तिला व तिच्या बालकांमध्ये गंभीर स्वरुपाची गुंतागूंत याच्यामुळे होऊ शकते. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणातून भारतात दरवर्षी सुमारे 25 लाख बालकांना गोवरचा आजार होऊन 90 हजार बालके या आजारामुळे दगावण्याचे नोंदविले आहे. परंतू या दोन्ही आजारावर एमएमआर लसीमुळे प्रतिबंध करता येतो. या रोगांवर मात करण्यासाठी गोवर रुबेला लसीकरण मोहिम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत 9 महिने पूर्ण व 15 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील सर्व बालकांना गोवर रुबेला लसीचा एक डोस देण्यात येईल.
गोवर प्रमाणे रुबेला हा आजार सुद्धा लसीद्वारे नियंत्रित केला जाऊ शकतो. ज्यामध्ये रुबेलाची लस किंवा गोवर मम्पस रुबेला लस (MMR) चा वापर केला जातो. प्रगतीशील राष्ट्रांमध्ये पालकांना आपल्या पाल्यांकरीता या लसीकरणाच्या सेवा बरेचदा मिळत नाहीत. त्यामुळे या बालकांना या आजांरापासून संरक्षण देता येत नाही. गरीबी, आरोग्यसेवांचा व माहितीचा अभाव या सर्व गोष्टीमुळे अशा कुटुंबाला सर्व सेवांपासून मुकावे लागते आणि म्हणून ही सर्व बालके आजारांना बळी पडतात.
गोवर हा माहित असलेल्या आजारापैकी सर्वात जास्त संसर्गजन्य आजार असून मुलांमध्ये मृत्यु तसेच अपंगत्व आणणारा आजार आहे. रुबेला या आजारामुळे जन्मत: व्यंग असलेली बालके जन्माला येतात. गोवर हा व्हायरसमुळे होणारा आजार असून संसर्गातून होते. ज्या मुलांना लस मिळाली नसेल अशा रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 90 टक्के पेक्षा जास्त बालकांना हा आजार संसर्गातून होतो. गोवर आजाराच्या लक्षणामध्ये ताप, खोकला आणि अंगावर लालसर ठिपके दिसून येतात. गोवरामुळे प्रतिकारक शक्ती कमी होते आणि त्यामुळे निमोनिया, आंधळेपणा, डायरिया आणि मेंदूज्वरासारखे आजार उद्भवतात. 5 वर्षाच्या आतील बालकांमध्ये या गुंतागुंतीचे प्रमाण खूप जास्त असते. या आजारातून बालक दुरुस्त झाले तरी काही प्रमाणात त्यांच्यात अपंगत्व राहते. गोवर रुबेलाचे लसीमुळे यामध्ये बरीच सुधारण झाली असली तरी भारतात दरवर्षी जवळपास 25 लक्ष बालकांना गोवरचा आजार होतो 90 हजार बालके दगावतात. याचाच अर्थ दररोज सरासरी 246 बालके गोवरामुळे मरण पावतात आणि महत्त्वाचे म्हणजे हा आजार आण गोवरच्या लसीचे 2 डोज देऊन पूर्णपणे थांबवू शकतो.
रुबेला ज्याला जर्मन मिझल सुद्धा म्हटल्या जाते हा सौम्य स्वरुपाचा आजार असला तरी गर्भवती मातेस हा आजार झाल्यास तिला व तिच्या बालकांमध्ये गंभीर स्वरुपाची गुंतागूंत याच्यामुळे होऊ शकते. गर्भवती मातेस पहिल्या तिमाहित हा आजार झाल्यास बालकामध्ये कंजेनायटल रुबेला सिंड्रोम हा भयंकर आजार होण्याची दाट शक्यता असते. या आजारात बालकामध्ये वेगवेगळ्या जन्मत:च व्यंग असतात. त्यामध्ये प्रामुख्याने ह्रदयाचे आजार तसेच बहिरेपणा आणि आंधळेपणा येऊ शकतो. दरवर्षी 1 लाखांपेक्षा जास्त कंजेनायटल रुबेला सिंड्रोम (सी.आर.एस.) लस आजाराची बालके जन्माला येतात. जन्मत:च व्यंग घेऊन असलेल्या या बालकांमुळे संपूर्ण कुटुंब मानसिक, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या कमजोर होऊन जाते. गोवर प्रमाणे रुबेला हा आजार सुद्धा लसीद्वारे नियंत्रित केला जाऊ शकतो. ज्यामध्ये रुबेलाची लस किंवा गोवर मम्पस रुबेला लस (MMR) चा वापर केला जातो. प्रगतीशील राष्ट्रांमध्ये पालकांना आपल्या पाल्यांकरीता या लसीकरणाच्या सेवा बरेचदा मिळत नाहीत. त्यामुळे या बालकांना या आजांरापासून संरक्षण देता येत नाही. गरीबी, आरोग्यसेवांचा व माहितीचा अभाव या सर्व गोष्टीमुळे अशा कुटुंबाला सर्व सेवांपासून मुकावे लागते आणि म्हणून ही सर्व बालके आजारांना बळी पडतात.
गोवर व रुबेलाचे प्रगत राष्ट्रांमधून सन 2002 सालीच उच्चाटन झाले आहे. परंतू अशा आजाराचा रुग्ण त्या देशात जातो आणि त्या ठिकाणी लस न मिळालेला बालक अशा रुग्णांच्या संपर्कात येते तेव्हा त्याला हा असा आजार होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे नियमित लसीकरण अतिशय आवश्यक आहे. गोवर, रुबेला आणि कंजेनायटल रुबेला सिंड्रोम (सी.आर.एस.) हे आपण थांबवू शकतो. त्याकरीता नियमित लसीकरण अतिशय महत्वाचे आहे. परंतू त्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे. नियमित लसीकरणाच्या माध्यमातून आपण हे प्रमाण बरच कमी करु शकलो आहे.
एमआर कॅम्पेन
लसीमुळे रोखल्या जाऊ शकणाऱ्या आजारांपासून संरक्षण मिळण्यासाठी तसेच लोकांचे स्वास्थ सुधारण्यासाठी भारत सरकारने एमआर कॅम्पेन सुरु केले आहे. या मोहिमेमध्ये भारतातील 9 महिने ते 15 वर्षाखालील 40 कोटींपेक्षा जास्त बालकांना द्यायची आहे. सन 2017 मध्ये सुरु झालेली ही मोहिम 2 वर्षे राबवायची आहे. या मोहिमेमध्ये 9 महिने ते 15 वर्षाखालील वयोगटातील प्रत्येक बालकाला एमआर लसीचा 1 डोस द्यावयाचा आहे. या मोहिमेमध्ये शासनाचे विविध विभागासोबत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्था सहकार्य करीत आहे. यामध्ये लायन्स, रोटरी, आ.एम.ए., आय.ए.पी. अशा अनेक अशासकीय सेवाभावी संस्था आहेत.
मोहिम
गोवर लसीप्रमाणे एमएमआर लसीचे 2 डोस दिले जातात. गोवर रुबेला या लसीचा अंतर्भाव नोव्हेंबर 2018 पासून शासकीय लसीकरण कार्यक्रमात करण्यात येईल. परंतू या पूर्वी गोवर रुबेला लसीची मोहिम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येईल. या मोहिमेत 9 महिने पूर्ण व 15 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील सर्व बालकांना गोवर रुबेला लसीचा 1 डोस देण्यात येईल. ही लस इंजेक्शन द्वारे उजव्या दंडात (सब क्युट्यानियस) देण्यात येईल. बालकांना ह्या लसीचा डोस दिलेले असतील तरीही मोहिमेतील या जादाचा डोस देणे आवश्यक आहे. जादाचा डोस दिल्याने बालकाला कोणतेही नुकसान होत नाही.
ही मोहिम दि.27 नोव्हेंबर पासून राबविण्यास सुरुवात केली जाणार आहे. ही मोहिम सुमारे 5 आठवडे चालेल. सुरुवातीचे 2 आठवडे प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना डोस देण्यात येईल. त्यानंतर 2 आठवडे शाळेत न जाणाऱ्या विद्यार्थ्यांना डोस देण्यात येईल. पाचव्या आठवडयात राहिलेल्या सर्व मुलांना डोस देण्यात येईल.
या लसीचा कोणताही दुष्पपरिणाम नाही. अगदी नगण्य स्वरुपात एखाद्या मुलांना किरकोळ दुष्परिणाम होऊ शकतो. त्यावर तातडीने इलाज केल्यास कोणताही धोका नाही. ही लस घेतल्यावर मुलांना गोवर व रुबेला या दोन्ही रोगांपासून बचाव होईल. तरी या मोहिमेत सर्वांनी सहभागी होऊन आपल्या 9 महिने पूर्ण व 15 वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना एमआर लसीचा डोस देऊन त्यांना गोवर व रुबेला आजारांपासून मुक्त करावे.
सोबतच आरोग्य खात्याने प्रारंभ केलेल्या या तिसऱ्या महायज्ञात सहभागी होऊन गोवर रुबेला या आजाराची आहूती देऊन संपूर्ण भारताला रोगमुक्त करुन निरोगी व सशक्त भारताचे स्वप्न साकार करण्याचे आवाहन आरोग्य खात्यासोबतच जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभाग, रोटरी इंटरनॅशनल, आय.एम.ए., आय.ए.पी. इत्यादीकडून करण्यात येत आहे.
00000
Monday, November 5, 2018
पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश बोंडअळीसाठी जिल्ह्यात मदत निधी उपलब्ध
अमरावती, दि. 5 : गतवर्षीच्या बोंडअळी नुकसानापोटी शेतक-यांसाठी जाहीर झालेल्या अनुदानाचे सुमारे 60 कोटी 86 लाख रुपयांचा निधी जिल्ह्यात उपलब्ध झाला आहे. या अनुदानापासून कुणीही पात्र शेतकरी वंचित राहू नये, यासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी कृषी विभागाकडे पाठपुरावा केला.
गतवर्षी गुलाबी बोंडअळीमुळे जिल्ह्यात कपाशीचे मोठे नुकसान झाले होते. त्यासाठी शासनाने एनडीआरएफच्या निकषांप्रमाणे 182 कोटींची मदत जाहीर केली. सुमारे 2 लाख 22 हजार 586 हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी 1 लाख 99 हजार हेक्टर क्षेत्र कपाशीबाधित असल्याने 182 कोटी 60 लाख रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे मागितला.
शासनाने हा निधी तीन टप्प्यात उपलब्ध करुन दिला. तिस-या टप्प्यातील 60 कोटी 86 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने दिवाळीपूर्वी ही रक्कम शेतक-यांच्या बँक खात्यात मिळणार आहे. पालकमंत्री श्री. पोटे पाटील यांनी कृषी विभागाच्या सचिवांशी चर्चा करुन तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. या कार्यवाहीमुळे शेतक-यांना दिलासा मिळाला आहे.
अनुदानाच्या तिस-या टप्प्यात अमरावती तालुक्याला सुमारे 2 कोटी 51 लाख, भातकुली 1 कोटी 83 लाख, नांदगाव खंडेश्वर 2 कोटी 95 लाख, चांदूर रेल्वे 7 कोटी 31 लाख, वरुड 5 कोटी 58 लाख, धामणगाव रेल्वे 6 कोटी 92 लाख, मोर्शी 6 कोटी 40 लाख, तिवसा 6 कोटी 23 लाख, चांदूर बाजार 3 कोटी 26 लाख, अचलपूर 5 कोटी 11 लाख, अंजनगाव सुर्जी 5 कोटी 65 लाख, दर्यापूर 4 कोटी 44 लाख, धारणी 2 कोटी 25 लाख, चिखलदरा 33 लाख असे वितरण झाले.
Thursday, November 1, 2018
कृषी विकास परिषदेच्या यशस्वितेसाठी समन्वयाने काम करावे
- आमदार डॉ. अनिल बोंडे
अमरावती, दि. 1 : वरुड येथे नियोजित राष्ट्रीय कृषी विकास परिषदेच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी येथे दिले.
वरुड येथे दि. 4 ते 7 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय कृषी विकास परिषद होणार आहे. त्याच्या पूर्वतयारीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
डॉ. बोंडे म्हणाले की, परिषदेत विविध विभागांची महत्वपूर्ण योजनांची माहिती देणारी दालने असतील. परिषदेतून शेतकरी बांधवांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी देशभरातील नामवंत कृषी मार्गदर्शकांना निमंत्रित करण्यात येईल. आवश्यक तिथे प्रात्यक्षिकांतून मार्गदर्शन करण्यात येईल. नामवंत कंपन्या, प्रयोगशील शेतकरी शास्त्रज्ञ आदींचा सहभाग परिषदेत असेल.
ते पुढे म्हणाले की, पशुसंवर्धन हा महत्वाचा पूरक व्यवसाय असल्याने पशुसंवर्धन विभागाने प्रभावीपणे दालनाची मांडणी करावी. पशुप्रदर्शनाचा अंतर्भाव असावा. मोर्शी तालुक्यात बहुवार्षिक चारा पीकांची यशस्वी लागवड झाली आहे. त्याचेही प्रात्यक्षिक दाखविण्यात येईल. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासह एनआरसीसी, कॉटन रिसर्च इन्स्टिट्यूट, कृषी विज्ञान केंद्र, मेडा व शासनाची विविध महामंडळे यांचाही सहभाग मिळविण्यात येईल.
संत्रा पीक जिल्ह्यातील महत्वाचे फळपीक आहे. हे लक्षात घेऊन त्यादृष्टीने नवीन संशोधन व प्रयोगांची माहिती देणारी दालने असावीत. विविध बँकांकडून शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध उपक्रम व सुविधांबाबत कक्षाचा समावेश परिषदेत असेल. तसे पत्र अग्रणी बँकेने बँकांना द्यावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
उपविभागीय कृषी अधिकारी श्री. देशमुख, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी श्री. रहाटे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एल. के. झा, खादी ग्रामोद्योग विकास महामंडळाचे प्रदीप चेचरे, सहकार अधिकारी श्री. पतंगे, कृषी उद्योग विकास महामंडळाचे सत्यजीत ठोसरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
'जय महाराष्ट्र' मध्ये पर्यावरण राज्यमंत्री प्रविण पोटे-पाटील
मुंबई, दि. १ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात पर्यावरण राज्यमंत्री प्रविण पोटे-पाटील यांची 'प्रदूषणमुक्त दिवाळी' या विषयावर मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दि. २ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७.३० ते ८.००या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदका शिबानी जोशी यांनी घेतली आहे.
दिवाळी पर्यावरणपूरक होण्याच्या उद्देशाने पर्यावरण विभागाने केलेले नियोजन व जनजागृती, फटाक्यांमुळे हवा आणि ध्वनिमुळे होणारे गंभीर स्वरूपाचे परिणाम, दिवाळीच्या दिवसांत हजारो टनांनी वाढणारी घनक-याची समस्या व उपाययोजना, लहान मुलांमध्ये जागृती करण्यासाठी राबविण्यात आलेली विशष मोहिम याविषयी सविस्तर माहिती श्री. पाटील यांनी 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून दिली.
‘जलयुक्त’मुळे पिंपरी निपाणी परिसरात भूजलपातळी उंचावली जलसंधारणात पिंपरी निपाणी गावाचा पॅटर्न निर्माण
अमरावती, दि. 1 : पारंपरिक सिमेंट बंधा-यांऐवजी जलयुक्त शिवार योजनेत रिचार्ज शाफ्ट व ट्रेंचच्या माध्यमातून पाणी मुरवल्याने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपरी निपाणी व लगतच्या परिसराची भूजलपातळी उंचावली असून, कृषी उत्पादकतेतही भर पडली आहे.
जागतिक बँकेच्या सहकार्याने पाणीपुरवठा विभाग व भूजल सर्वेक्षण विभागातर्फे पिंपरी निपाणी व परिसराचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात भूशास्त्रीय अभ्यास करून तेथे जलयुक्त शिवार मोहिमेच्या माध्यमातून अनेक कामे राबवण्यात आली. त्याचा फायदा भूस्तरात पाणी मुरण्यास झाला आणि परिसरातील भूजलपातळीत वाढ झाली.
जलयुक्त शिवार योजनेत जलसंधारणाच्या विविध प्रकारच्या कामांचा समावेश असल्याने परिसराची भौगोलिक वैशिष्ट्ये लक्षात घेऊन तशी कामे राबविण्यात येतात. शिवाय, लोकसहभागाचे मोठे बळ योजनेला मिळाले. त्यातून जिल्हाभर झालेली अनेक कामे शेतीसाठी लाभकारक ठरत आहेत.
गतवर्षीच्या तुलनेत पर्जन्यमान कमी असले तरी जलयुक्त शिवारच्या कामांमुळे एकूण जिल्ह्याच्या भूजलपातळीतील सरासरी तूट पाऊस कमी होऊनही 0.59 टक्क्यांनी भरून निघाली आहे. पूर्वी ही तूट वजा 1.86 टक्के होती. आता तिचे प्रमाण वजा 1. 27 एवढे आहे, असे भूजल सर्वेक्षणचे वरिष्ठ भूवैज्ञानिक संजय कराड यांनी सांगितले. पारंपरिक कामांऐवजी भौगोलिक स्थितीचा विचार करुन रिचार्ज शाफ्ट, ट्रेंच,ढाळीचे बांध अशी वैविध्यपूर्ण कामांचा जलयुक्त शिवार योजनेत समावेश आहे.
पिंपरी येथील कामांबाबत माहिती देताना श्री. कराड म्हणाले की, पिंपरी निपाणी येथे आम्ही खोलीकरणाऐवजी ट्रेंच करण्यावर भर दिला. याठिकाणी पूर्वी चार सिमेंट बंधारे होते. तेथील सगळे पाणी बेंबळा नदीकडे जात होते. पाणी पुरेशा प्रमाणात मुरत नव्हते. त्यामुळे तेथील भौगोलिक स्थितीचा विचार करून आम्ही 50 मीटर लांब, सात मीटर रुंद व अडीच मीटर खोलीचे ट्रेंच केले. त्यानंतर पुन्हा 15 मीटरचे अंतर सोडून पुन्हा ट्रेंच असे पाच ट्रेंच केले. त्यावरच्या बाजूला गॅबियन बंधारे घेतले. ट्रेंचमध्ये रिचार्ज शाफ्ट घेतले. त्याची परिणती पाणी गावाच्या परिसरातील भूस्तरात मुरण्यात झाली.
ते पुढे म्हणाले की, जमिनीत वर 2 फुट मातीचा स्तर, त्याखाली 20 फुटांपर्यंत कच्चा मुरुम, त्यानंतर खडक आणि साधारणत: 35 फुटांखाली पक्का दगड आहे. या पक्क्या दगडामुळे पाणी मुरण्यास अडथळा ठरत होता. त्यामुळे ज्या ठिकाणी विहीरींची खोली 40 फुटांहून अधिक आहे, तिथे पाणी पोचून विहीर भरायला ऑक्टोबर उजाडायचा. जलयुक्त शिवार योजनेत रिचार्ज शाफ्टची मोठी कामे झाल्याने भूस्तरात अधिक खोलीपर्यंत पाणी मुरायला मदत झाली.
रिचार्ज शाफ्टसाठी आम्ही साधारणत: 100 फूट बोअर केले. भोवती खड्ड्यात माती, टोळगोटे असा फिल्टर मीडिया तयार केला. त्यामुळे पक्क्या दगडामुळे येणारा अडथळा दूर झाला व पाणी खालच्या स्तरात पोहोचले. अधिक खोलीच्या विहिरींनाही मान्सूनच्या पहिल्या महिन्यातच पाणी आले, असेही ते म्हणाले.
पिंपरी निपाणीचे सरपंच विशाल रिठे जलयुक्तच्या या यशाबद्दल म्हणाले की, गतवर्षी नोव्हेंबरमध्ये टंचाई जाणवत होती. त्यावेळी विहिरी अधिग्रहणाचा प्रस्ताव आम्ही टाकला होता. शिवाय, टँकरही लावावा लागला. यंदा मात्र जलयुक्तमधून गावक-यांनी श्रमदानातून अनेक कामे केली. त्यामुळे पहिल्याच पावसात पाणी यायला सुरुवात झाली. एका ट्रेंचच्या परिघात 15 लाख लीटर पाणी साधारणत साठले. त्यामुळे पेयजलाचा प्रश्न तर सुटलाच शिवाय यंदा गावातील सुमारे ३०० एकरावर रब्बीचे पीकही घेतले जात आहे. आता आम्ही गावकरी कंटूर बांध, ढाळीचे बांध यासह शेततळ्यांची कामे करणार आहोत.
माथा ते पायथा अशी संकल्पना जलसंधारणात असल्याने टाकळी गिलबा या गावालाही मोठा लाभ झाला. विहीरीवर सिंचन असणा-या शेतक-यांना तर याचा लाभ झालाच. मात्र, विहीरी नसलेल्या शेतक-यांनाही लाभ झाला. कारण, पाणी जमिनीत मुरल्याने भूस्तरातील पाण्याचा अंश टिकून राहिला. परिसरातील कृषी उत्पादकताही वाढल्याने शेतकरी समाधानी आहेत, असेही श्री. रिठे यांनी सांगितले.
व्यवसाय सुलभतेमध्ये भारताची 77 व्या स्थानी झेप; मुख्यमंत्र्यांकडून प्रधानमंत्र्यांचे अभिनंदन
मुंबई, दि. 31: जागतिक बँकेने जाहीर केलेल्या व्यवसाय सुलभता (ईझ ऑफ डुईंग बिझनेस) निर्देशांकामध्ये भारताने आजवरचे सर्वोच्च असे 77 वे स्थान गाठले असून या ऐतिहासिक कामगिरीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे तसेच केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली व केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे.
मुख्यमंत्री अभिनंदन करताना म्हणतात, 2014 मध्ये भारत जागतिक व्यवसाय सुलभतेमध्ये 142 व्या स्थानी होता. प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने व्यवसाय सुलभता धोरणावर भर देऊन त्याची यशस्वी अंमलबजावणी केली. याचा परिणाम म्हणून मागील चार वर्षांत भारताने तब्बल 65 स्थानांची झेप घेतली आहे. मागील दोन वर्षांचा विचार केला तर ही झेप 53 स्थानांची (2015 मधील 130 क्रमांकावरुन 77 वर) आहे. तर मागील एका वर्षात 23 स्थानांनी (2017 मध्ये 100 वरुन 77) भारताने आगेकूच केली आहे.
ही कामगिरी प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या कठोर मेहनतीचे फळ असून ही झेप म्हणजे जागतिक पटलावर भारताने नोंदवलेला मोठा विक्रम आहे. या प्रक्रियेमध्ये महाराष्ट्राचेही लक्षणीय योगदान आहे. देशाचे वित्तीय केंद्र असलेल्या मुंबईतील व्यावसायिक सुलभतेसाठी अनेक निर्णय राज्य सरकारने घेतले. राज्यातील उद्योगांसाठी एक खिडकी योजनेसह परवाना सुलभता आणि अन्य निर्णय घेतल्याने यात सुधारणा झाली. भविष्यात आणखी भरीव योगदान देण्यासाठी राज्य प्रयत्न करेल, असे आश्वस्त करुन या यशामध्ये वाटा असलेल्या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.
Subscribe to:
Posts (Atom)
-
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत पोलीस अधीक्षक ग्रामीण कार्यालय येथे प्रशिक्षणाची संधी; 3 सप्टेंबरला मेळाव्याचे आयोजन ...
-
निती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमातंर्गत 'संपुर्णता अभियानाचे' चिखलदरा येथून सुरुवात; विकासाच्या विविध योजना राबविणार ...
-
'तपोवन'चा अमृतमहोत्सव : पद्मश्री शिवाजीराव पटवर्धन यांची १३० वी जयंती दाजीसाहेबांचे मानवसेवेचे व्रत समर्थपणे व एकजुटी...