Tuesday, November 29, 2022

समाजकल्याण विभागातर्फे पत्रकार बांधवांसाठी कार्यशाळा सामाजिक न्याय साकारण्यासाठी सर्व घटकांनी योगदान द्यावे - विविध मान्यवरांचे आवाहन

 










समाजकल्याण विभागातर्फे पत्रकार बांधवांसाठी कार्यशाळा

सामाजिक न्याय साकारण्यासाठी सर्व घटकांनी योगदान द्यावे

- विविध मान्यवरांचे आवाहन

अमरावती, दि. 29 : राज्यघटनेतील मुलभूत तत्त्वांचे संरक्षण करत असतानाच सामाजिक न्याय साकारण्यासाठी शासन, प्रशासन, माध्यमे, संस्था, नागरिक या सर्व घटकांनी योगदान द्यावे, असे आवाहन विविध वक्त्यांनी पत्रकार कार्यशाळेत आज केले.

सामाजिक न्याय विभागातर्फे संविधान दिन ते महापरिनिर्वाण दिनादरम्यान ‘समता पर्व’ आयोजित करण्यात आले असून त्याअंतर्गत पत्रकार बांधवांसाठी ‘सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा’ या विषयावरील कार्यशाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात झाली. समाजकल्याण उपायुक्त  सुनील वारे अध्यक्षस्थानी होते. अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपाल हरणे, प्र. माहिती उपसंचालक हर्षवर्धन पवार, जात पडताळणी समितीच्या उपायुक्त जया राऊत, सहायक आयुक्त माया केदार, जिल्हा समाजकल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर,                    डॉ. राजकुमार दासरवाड आदी उपस्थित होते.

सामाजिक न्याय विभागातर्फे वंचित घटकातील 37 लाख नागरिकांना दरवर्षी शिष्यवृत्ती, वसतीगृहे, विविध लाभाच्या योजनांचा लाभ देण्यात येतो. योजनांच्या अंमलबजावणीसाठी महाडीबीटीसारख्या प्रणाली विकसित करण्यात आल्या असून अनेक त्रुटी व तक्रारी दूर झाल्या आहेत. योजना, उपक्रमांची अधिक प्रभावी अंमलबजावणीसाठी माध्यमांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. वारे यांनी केले.

श्री. अग्रवाल म्हणाले की, सामाजिक न्याय संपूर्णत: अस्तित्त्वात येण्यासाठी अंतर्मुख होऊन मंथन होणे आवश्यक आहे. सामाजिक न्याय व महिला सबलीकरणाच्या संकल्पनेनुसार सर्वोच्च न्यायालयाने मुलीचा वडीलांच्या संपत्तीत अधिकार याबरोबरच मिळकत कराच्या 10 टक्के रकमेतून मजूरांसाठी कल्याणकारी योजना राबविण्याबाबत निर्णय दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेने हा निधी मजूरांसाठी खर्च केला पाहिजे. अशा विविध अंगांनी विचार व कृती करुन सामाजिक न्यायाची संकल्पना अस्तित्त्वात आणण्यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक आहे. सोशल मिडियाच्या आजच्या युगात नवनवी माध्यमे उदयास येत असताना मुद्रित माध्यमांनी विश्वासार्हता टिकवून ठेवली आहे, असेही ते म्हणाले.

श्री. हरणे म्हणाले की, सामाजिक न्याय प्रत्येक स्तरात निर्माण होऊन तळागाळातील घटकांचा विकास साधण्यासाठी सामाजिक न्याय विभागाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. न्याय मिळण्याची भूमिका सर्वांची असली पाहिजे. पत्रकार बांधवांनी आपल्या लेखणीचा वापर सामुहिक हितासाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले.

लोकशिक्षण घडविण्यात माध्यमांची भूमिका महत्त्वपूर्ण असून त्यासाठी योगदान देण्याचे आवाहन श्री. पवार यांनी केले. श्री. दासरवाड यांनी नवमाध्यमांबाबत माहिती दिली. श्रीमती राऊत यांनी जात पडताळणी प्रक्रियेची माहिती दिली. श्री. जाधवर यांनी विभागाच्या योजनांची माहिती दिली.

श्रीमती केदार यांनी प्रास्ताविकातून विविध योजना, उपक्रमांची माहिती दिली. विभागाच्या जनसंपर्क अधिकारी मंगला देशमुख यांनी सुत्रसंचालन केले. राजेंद्र बिलव यांनी आभार मानले. कार्यशाळेला पत्रकार बांधव, पत्रकारिता अभ्यासक्रमाचे विद्यार्थी व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.  

00000

 

Monday, November 28, 2022

डाक अदालत 13 डिसेंबरला तक्रारींचा तपशील 29 नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन

 डाक अदालत 13 डिसेंबरला

तक्रारींचा तपशील 29 नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 28 (जिमाका) : भारतीय डाक विभागामार्फत डाक अदालतीचे आयोजन 13 डिसेंबर रोजी प्रवर अधीक्षक, डाक घर अमरावती विभाग यांच्या कार्यालयामध्ये दुपारी 4 वाजता आयोजित करण्यात आली आहे. 

विभागातील पोस्टाच्या कामासंबंधी विशेषत: स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, डाक वस्तू रजिस्टर पार्सल, बचत बँक व मनी ऑर्डर अशा तस्सम तक्रारींचे निराकरण सहा आठवड्याच्या आत झाले नसेल व त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारी विचारात घेऊन डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. 

सर्व संबंधितांनी आपले अर्ज प्रवर अधीक्षक डाक घर अमरावती विभाग, अमरावती 444602 यांच्याकडे सादर करावा. त्यामध्ये तक्रारीचा सर्व तपशील, तक्रार केल्याची तारीख, ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव व हुद्दा इत्यादीसह उल्लेख करुन उद्या मंगळवार  दि. 29 नोव्हेंबरपर्यंत पाठवावे, असे प्रवर अधीक्षक डाकघर यांनी कळविले आहे.

00000

रब्बी हंगामातील पिकांसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत पाणी अर्ज सादर करावे

 रब्बी हंगामातील पिकांसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत

पाणी अर्ज सादर करावे

अमरावती, दि. 28 (जिमाका) : रब्बी हंगाम सन 2022-23 मध्ये बागायतदार शेतकऱ्यांनी सिंचनाचा लाभ घेण्यासाठी पाणी मागणी अर्ज संबंधित शाखा अधिकारी यांच्या कार्यालयात अथवा कालवा निरीक्षक अथवा मोजणीदार यांच्याकडे 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत सादर करण्याचे आवाहन अमरावती मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता सु.पां. आडे यांनी केले आहे. 

अमरावती मध्यम प्रकल्प विभागातील उपलब्ध पाणी पुरवठ्यानुसार रब्बी हंगामासाठी पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यानुसार शेतकऱ्यांनी आपले पाणी मागणी अर्ज नमुना 7 दोन प्रतीमध्ये विहित कालावधीमध्ये सादर करावा. पाणी मागणी अर्जाचे कोरे नमुने संबंधित उपविभाग शाखा कार्यालय व उपशाखा कार्यालयातून मोफत पुरविण्यात येत आहेत. 

शासनाच्या धोरणानुसार धरणातील उपलब्ध पाणी हे उन्हाळा हंगामाअखेर पुरवावे लागणार असल्याने प्रथम पिण्याच्या पाण्याची गरज भागवून उर्वरित पाण्यात शेती पिकासाठी व औद्योगिक कारखाने यांना पुरविण्याचे नियोजन आहे. उभ्या पिकांना पाणी घेतांना शेतकऱ्यांनी काटकसरीने पाणी घ्यावे व सुक्ष्म सिंचनावर भर द्यावा, असे अमरावती मध्यम प्रकल्प विभागामार्फत कळविण्यात आले आहे. 

पाणी मागणी अर्ज करण्यासंबंधी सूचना*

पाणी मागणी अर्ज करणारा स्वत: शेताचा मालक असावा. कुळ अगर वहीवाटदार असलेल्या शेतीसाठी मागणी अर्जासोबत मालकाचे संमतीपत्र जोडावे. अर्जामध्ये मागणी क्षेत्र पिकवार स्पष्ट नमूद करावे. अर्जावर खातेपुस्तिकेवरुन गाव, सर्वे क्रमांक, पोटहिस्से पिकाचे नाव आणि मागणीक्षेत्र अचूक नोंदवावे. अर्जात पाणीपट्टी, थकबाकीसंबंधी अचूक माहिती द्यावी. अर्जाची पूर्तता कालवा निरीक्षकाकडून तपासून दोन प्रतीत सादर करावे. पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्यातून रब्बी हंगामामध्ये 31 मार्च 2023 पर्यंत पाणीपुरवठा करण्यात येईल. प्रकल्पामध्ये पाणीसाठा उपलब्ध असल्यास इच्छुक शेतकऱ्यांना 15 एप्रिल 2023 पर्यंत त्यांच्या मागणी अर्जानुसार पाणीपुरवठा करण्यात येईल. 

प्रथम पाणी दिल्यानंतर सिंचन केलेल्या पीक क्षेत्राची मोजणी सिंचन शाखेच्या मोजणीदाराकडून करण्यात येईल. शेतकऱ्याच्या शेतातील पाटचारी/शेतचारी सुस्थितीत नसल्यास अशा शेतकऱ्यांचा पाणी अर्ज मंजूर करण्यात येणार नाही. अर्ज मंजूर होताच कालवा निरीक्षकाकडून पाणीपुरवठा संबंधीची माहिती ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर लावण्यात येईल. कडधान्ये, डाळी, तेलबिया, रब्बी भुसार पिके यांच्यासाठी प्राधान्यक्रमाने पाणीसाठ्याच्या उपलब्धतेनुसार पाणी पुरवठा करण्यात येईल. रब्बी हंगामासाठी अमरावती मध्यम प्रकल्प विभागांतर्गत मध्यम प्रकल्प, लघू प्रकल्प, उपसा सिंचन योजना इत्यादी पाठबंधारे प्रकल्पांच्या समादेश क्षेत्रात असलेल्या शेतकऱ्यांनी याची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

00000

Friday, November 25, 2022

संविधानदिन ते महापरिनिर्वाणदिनादरम्यान साजरे होणार ‘समता पर्व’ समाजकल्याण कार्यालयामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन

संविधानदिन ते महापरिनिर्वाणदिनादरम्यान साजरे होणार ‘समता पर्व’

समाजकल्याण कार्यालयामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन

अमरावती दि. 25: जिल्ह्यात संविधानदिन (दि. 26 नोव्हेंबर) ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन (दि. 6 डिसेंबर) दरम्यान समता पर्व साजरे करण्यात येणार असून, त्यात समाजकल्याण कार्यालयातर्फे रोज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. 

संविधानदिनी दि. 26 नोव्हेंबरला सामाजिक न्यायभवनात, तसेच सर्व कार्यालये, शाळा-महाविद्यालयात संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन होणार आहे, अशी माहिती सहायक आयुक्त माया केदार यांनी दिली. त्या म्हणाल्या की, संविधानदिनी प्रभात फेरीही काढण्यात येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करुन प्रभात फेरी इर्विन चौक ते पंचवटी येथे जाऊन डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या स्मारकास अभिवादन करुन सामाजिक न्याय भवनापर्यंत जाईल.

 त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन, तसेच डॉ. राजेश मिरगे यांचे संविधान जागृती या विषयावर व्याख्यान होईल. यावेळी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या उपस्थितीत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने दीडशे व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते जात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येईल.

दुस-या दिवशी अर्थात दि. 27 नोव्हेंबरला महाविद्यालये, शाळा, वसतिगृहे, निवासी शाळा तसेच आश्रमशाळा  येथे विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा, लेखी परीक्षा, वक्तृत्व स्पर्धा आदी कार्यक्रम होतील. दि. 28 नोव्हेंबरला सामाजिक न्याय भवन येथे संविधानविषयक व्याख्यान होईल. दि. 29 नोव्हेंबरला सामाजिक न्याय भवन येथे (सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा) या विषयावर पत्रकार  कार्यशाळा होईल. दि. 30 नोव्हेंबरला अनुसूचित जाती उत्थान, दशा आणि दिशा या विषयावर भित्तीपत्रक, पोस्टर्स, बॅनर, चित्रकला स्पर्धा होईल. तसेच सामाजिक कार्यकर्ते, प्रतिनिधी, कर्मचारी वर्ग यांच्यासाठी कार्यशाळा होईल. दि. 1 डिसेंबरला जिल्हा स्तरावर युवा गटांची कार्यशाळा होईल.

उपक्रमात दि. 2 डिसेंबरला अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीला भेटी देण्याचा कार्यक्रम होईल. दि. 3 डिसेंबरला जात प्रमाणपत्र पडताळणी शिबिर, तसेच सर्व तालुकास्तरावर योजना माहिती कार्यशाळा होईल. दि. 4 डिसेंबरला ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तृतीयपंथी व वृद्धांसाठी माहिती कार्यशाळा होईल. दि. 5 डिसेंबरला संविधान जागृती सांस्कृतिक कार्यक्रम होईल. महापरिनिर्वाण दिनी दि. 6 डिसेंबरला समारोप कार्यक्रमात लाभार्थ्यांना विविध लाभाचे वाटप, बक्षीस वितरण आदी कार्यक्रम होतील. या पर्वात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन श्रीमती केदार यांनी केले.

 ०००

 

संविधानदिनी कार्यालये व शाळांमध्ये उद्देशिकेचे सामूहिक वाचन अधिकाधिक सहभागाबाबत जिल्हाधिका-यांचे आवाहन

 

संविधानदिनी कार्यालये व शाळांमध्ये उद्देशिकेचे सामूहिक वाचन
अधिकाधिक सहभागाबाबत जिल्हाधिका-यांचे आवाहन 
          
          अमरावती, दि. 25 - भारतीय संविधानाबाबत जनजागृतीसाठी संविधान दिनानिमित्त शनिवार, दि. 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता सर्व कार्यालये व शाळा-महाविद्यालयांत संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात येणार आहे. या उपक्रमात अधिकाधिक संस्थांनी सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे. संविधानदिनानिमित्त समाजकल्याण आयुक्तालय व जिल्हा प्रशासनातर्फे हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यात जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती, सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालये आदी ठिकाणी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात येणार आहे. संविधानबाबत जनजागृती व्हावी यासाठी शाळा व संस्थांनी संविधान यात्रा काढावी. संविधानाची उद्देशिका, मूलभूत हक्क, कर्तव्ये, जबाबदा-या आदी महत्वाची कलमे ठळकरित्या फलकांद्वारे प्रदर्शित करावेत. निबंध, भित्तीपत्रके, मूलभूत तत्वांवर चर्चा, वेबिनार, व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी केले. संविधानातील मूलतत्त्वे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे व त्यांना जागरूक नागरिक बनवणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे, असे समाजकल्याण सहायक आयुक्त माया केदार यांनी सांगितले. 
00000

क्षयरुग्णांच्या मदतीसाठी बना ‘निक्षय मित्र’

 

क्षयरुग्णांच्या मदतीसाठी बना ‘निक्षय मित्र’

अमरावती, दि. 25 : केंद्र शासनाने प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत अभियान हा उपक्रम देशभर सुरु केला आहे. सन 2025 पर्यंत देशाला क्षयरोग मुक्त करण्याचे उद्दिष्ट असून जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत या उपक्रमाबाबत जनजागृती होण्यासाठी क्षयरुग्णांना वेगवेगळ्या पध्दतीने मदत देऊन त्यांना औषधोपचार मिळून देण्यात येत आहे. क्षयरुग्णांना मदत म्हणून ‘निक्षय मित्र नोंदणी’ करण्याचे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रमेश बनसोड यांनी केले आहे.

            प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियानांतर्गत देशातून क्षयरोग दुरीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून ते पूर्ण करण्यासाठी नागरिक व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग महत्त्वाचा आहे. समाजातील विविध घटक जसे दानशूर व्यक्ती, राजकीय व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था, इतर कार्यालय व संस्था, औद्योगिक संस्था, राजकीय संस्था अशा नोंदणी केलेल्या निक्षय मित्रांमार्फत आवश्यकतेनुसार क्षयरुग्णांच्या पोषक आहारात सहाय्य दिले जाते. यासाठी जिल्हा क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत उपचार मिळणाऱ्या क्षयरुग्णांना ‘निक्षय मित्र’ म्हणून सहभागी होण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

            ‘निक्षय मित्र’ नोंदणी करण्यासाठी http://reports.nikshay.in/FormIO/Donar Registration या संकेतस्थळावर नाव नोंदणी करावी. नाव नोंदणीनंतर स्थानिक जिल्हा क्षयरोग अधिकारी यांना संपर्क करण्यासाठी तपशील उपलब्ध होतो. त्यानंतर त्यांच्या कार्यक्षेत्रातील उपचार घेणाऱ्या क्षय रुग्णांची व मदत घेण्यास इच्छुक असणाऱ्या क्षयरुग्णांची यादी उपलब्ध होते. एक निक्षय मित्र एक किंवा अनेक क्षय रुग्णांना दत्तक घेऊ शकतात व कमीत-कमी सहा महिने व जास्तीत जास्त 3 वर्ष मदत करु शकतात. क्षयरुग्णांना पोषक आहार देण्यासाठी प्रती महिना, प्रती रुग्ण सुमारे 300 रुपये ते 500 रुपये इतका खर्च येतो.

            अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1800-11-6666 तसेच डॉ. रमेश बनसोड यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9881102303 यावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी केले आहे.

00000

 

Thursday, November 24, 2022

नेहरू युवा केंद्र स्वयंसेवक नामांकन कार्यक्रम

 

नेहरू युवा केंद्र स्वयंसेवक नामांकन कार्यक्रम

       अमरावती, दि. 24 : नेहरू युवा केंद्र, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय केंद्र शासनाव्दारे तक्षशिला अभियांत्रिकी महाविद्यालय येथे स्वयंसेवक नामांकन कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य शैलेश शेकापूरे, प्रमुख मार्गदर्शक सुबोध धुरंदर, नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी स्नेहल बासुतकर यावेळी उपस्थित होत्या. 

युवकांना राष्ट्र निर्माण प्रक्रियेत भाग घेण्याची संधी स्वयंसेवक नामांकन कार्यक्रमामार्फत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच त्यांचे व्यक्तित्व  आणि कौशल्य विकसित करण्यात येणार आहे. स्वयंसेवक म्हणून नामांकन करण्यासाठी स्वयंसेवकाचे वय वर्षे  15-29 या वयोगटातील हवे. तसेच तो नेहरू युवा केंद्राच्या कुठल्याही युवा मंडळाचा सदस्य नसावा. याशिवाय तो कुठल्याही बेकायशीर कामात आरोपी असू नये, असे श्रीमती बासुतकर यांनी कळविले.

या कार्यक्रमाच्या माध्यमांतून युवकांना संगीत, नृत्य, खेळ, चित्रकला आदी कला जोपासण्याची संधी दिली जाईल. नेहरू युवा केंद्राव्दारे आयोजित केले जाणारे जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यास संधी दिली जाईल. कार्यक्रमासाठी युवा स्वयंसेवक साक्षी केवटी यांनी सहकार्य केले. 

0000

आदिवासी युवकांना स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत

 

आदिवासी युवकांना स्पर्धा परीक्षा पूर्व

प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत

अमरावती, दि. 24 (जिमाका) : आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रामार्फत शासनाव्दारे घेण्यात येणाऱ्या स्पर्धापरीक्षेसाठी विनामुल्य प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षण कालावधी हा साडेतीन महिन्यांचा असून या कालावधीत प्रशिक्षणार्थींना दरमहा एक हजार रुपये विद्यावेतन देण्यात येते. प्रशिक्षण यशस्विरित्या पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विविध विषयांच्या चार पुस्तकांचा संच विनामूल्य देण्यात येतो. या प्रशिक्षणासाठी उमेदवार हा आदिवासी प्रवर्गातील हवा. उमेदवाराचे वय 1 डिसेंबर 2022 रोजी किमान 18 वर्षे पूर्ण तसेच दि. 15 मार्च 2023 रोजी 30 वर्ष पूर्ण केलेले असावे. उमेदवार किमान दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेला असावा. सद्यस्थितीत तो कोणतेही शिक्षण अथवा प्रशिक्षण घेत नसावा. इच्छुक उमेदवारांनी दि. 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, माहिती व मार्गदर्शन केंद्र, जयस्तंभ चौक, मातोश्री मंगल कार्यालयामागे, लाल पुलाजवळ, अचलपूर, कॅम्प परवाडा ता. अचलपूर येथे संपर्क साधावा. 

अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 07223-221205 तसेच भ्रमणध्वनी क्रमांक 7709432024 येथे संपर्क साधावा. अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, दहावी उत्तीर्णची गुणपत्रिका, उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे ऑनलाईन कार्ड, प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास कार्यालयात नाव नोंदविल्याचे नोंदणी कार्ड इत्यादी आवश्यक प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती व अलीकडच्या काळातील छायाचित्र जोडणे आवश्यक आहे. यापूर्वी प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करु नये. इच्छुक व पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी अ.सं. ठाकरे यांनी केले आहे. 

00000

Wednesday, November 23, 2022

ग्रंथोत्सवात रंगली काव्य मैफल

 


ग्रंथोत्सवात रंगली काव्य मैफल

अमरावती, दि. 23 (जिमाका) :  वाचन संस्कृती वृध्दिंगत होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘ग्रंथोत्सव’ राबविण्यात येत आहे. याच धर्तीवर अमरावती शासकीय विभागीय ग्रंथालय येथे नुकतेच ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ग्रंथदिंडीसह प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, विविध विषयांवर परिसंवाद, एकपात्री प्रयोग तसेच कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. या विविधरंगी कार्यक्रमांना वाचक, लेखक, ग्रंथप्रेमी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
‘जे न देखे रवि, ते देखे कवि’ या उक्तीनुसार कवी संमेलनामध्ये कवींनी बहारदार काव्य सादर केले. प्रतिभाशाली काव्यातून कवि संमेलनाची मैफल रंगली. करुण, वीर, हास्य अशा नऊही रसांनीयुक्त कवितांचे सादरीकरण करुन कवींनी त्यांच्या भावना उलगडल्यात.
कवी संमेलनाचे अध्यक्ष राज यावलीकर यांनी वऱ्हाडी थाटात कविता सादर केल्या. ग्रामीण जीवनाचे हुबेहुब वर्णन त्यांनी काव्यातून मांडले. विष्णू सोळंके यांनी देशभक्तीपर रोमहर्षक गीत सादर केले. अनंत नांदूरकर यांचे मराठीसह हिंदी आणि ऊर्दू भाषेतून बहारदार गजल सादर केल्या. संघमित्रा खंडारे यांनी ‘माऊली’ या विषयावर काव्य सादर केले. भगवान फाळके, प्रा. ज्ञानेश्वर गटकर, माहिती अधिकारी अपर्णा यावलकर यांनी विविध विषयांवर स्वरचित कविता सादर केल्या. कवी संमेलनाला रसिकांनी भरभरुन दाद दिली. या कार्यक्रमाचे निवेदन सुप्रसिध्द निवेदक पवन नालट यांनी केले.
                                           समाज माध्यमे आणि साहित्य : परिसंवाद

ग्रंथोत्सवात आयोजित ‘समाज माध्यमे आणि साहित्य’ या परिसंवादात तपोवन संस्थेचे सचिव तथा प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांनी मार्गदर्शन केले. आज सर्वत्र समाज माध्यमांव्दारे माहितीचा ओघ सातत्त्याने वाहत आहे. या माहितीच्या प्रवाहात वाहून न जाता यातील नेमके काय घ्यावे, याची समज असायला हवी. प्रत्येक काळातील साहित्य हा त्या समाजाचा आरसा असतो. साहित्याचा प्रसार करण्यासाठी समाज माध्यमाची भूमिका महत्त्वाची असल्याचे ते यावेळी म्हणाले. प्रसिध्द चित्रकार सुनील यावलीकर, प्रा. ज्ञानेश्वर गटकर यांनी समाज माध्यमांच्या काळातही पुस्तकांचे महत्त्व अबाधित असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.

 वाङ्मय चर्चा, विविध विषयावर परिसंवाद, एकपात्री प्रयोग, पुस्तक प्रदर्शन व विक्री, मुलाखत आणि काव्य मैफल या भरगच्च कार्यक्रमाने ग्रंथोत्सव उत्साहात साजरा झाला.
विभागीय ग्रंथपाल अरविंद ढोणे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष चंद्रकांत चांगदे, अविनाश दुधे, प्रा. हेमंत खडके आदी यावेळी उपस्थित होते.
 
00000

Monday, November 21, 2022

जिल्हाधिकाऱ्यांचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद





 

जिल्हाधिकाऱ्यांचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद


अमरावती, दि. २१ : श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र पदवीच्या तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील राष्ट्रीय सूचनाविज्ञान केंद्राला भेट देऊन उपक्रमांची माहिती घेतली.


जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधून विविध विषयांवर मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राचे कामकाज, यंत्रणेचे स्वरूप व जबाबदारी आदी विविध विषयांबाबत विद्यार्थ्यांनी माहिती जाणून घेतली. निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके, महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

०००

परिवहन विभागातर्फे बाईक रॅलीद्वारे रस्ता सुरक्षा जनजागृती



 

परिवहन विभागातर्फे बाईक रॅलीद्वारे रस्ता सुरक्षा जनजागृती

अमरावती, दि. २१ : जागतिक अपघातग्रस्त स्मृतिदिनानिमित्त प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षाविषयक जनजागृतीसाठी शहरात आज मोटरसायकल रॅली काढण्यात आली. त्यात ५० परिवहन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी  सहभाग घेतला.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ हा उपक्रम राबविला जातो. यावेळी प्रादेशिक  परिवहन अधिकारी आर. टी. गित्ते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राज बागडी, सहायक परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके, निरीक्षक वैभव गुल्हाने यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

शहरातील इर्विन चौक, राजकमल चौक, जयस्तंभ चौक, पंचवटी चौक अशा प्रमुख ठिकाणांना रॅलीने भेट देत रस्ता विषयक  सुरक्षितता व दक्षतेबाबत जनजागृती करण्यात आली.  रॅलीने टोलनाक्यांनाही भेट देऊन रस्ता सुरक्षितता नियमांची पत्रके वाहनचालकांना वाटण्यात आली. रॅलीत परिवहन विभागाचे ५० अधिकारी व कर्मचारी बाईकवर हेल्मेटसह सहभागी झाले होते.

नांदगावपेठ टोल नाक्यावर रस्ता सुरक्षा प्रबोधन कार्यक्रम झाला. त्यात विविध वाहनचालक, एसटी महामंडळ कर्मचारी व प्रवासी अशा सुमारे दीडशे व्यक्तींनी सहभाग नोंदवला. यावेळी सर्वांनी दक्षता पालनाबाबत प्रतिज्ञाही घेतली. अपघात टाळण्यासाठी सर्वांनी दक्षता नियमांचे संघटितपणे पालन करूया, असे आवाहन यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. गित्ते यांनी केले.

00000

 

Saturday, November 19, 2022

आव्हानांचा स्वीकार सकारात्मकतेने करा स्पर्धेत यश मिळवितांना…परिसंवादाचा सूर


 





आव्हानांचा स्वीकार सकारात्मकतेने करा

स्पर्धेत यश मिळवितांना…परिसंवादाचा सूर

 

अमरावती, दि. 19 (विमाका) : अमरावती जिल्हा प्रशासन व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे विभागीय मराठी ग्रंथालयात आयोजित ‘जिल्हा ग्रंथोत्सवा’त आज ‘स्पर्धेत यश मिळवितांना’ या विषयावर परिसंवादचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पोलीस उपायुक्त विक्रम साळी, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, तहसीलदार मदन जाधव यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी स्वानुभवातून मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना श्री. साळी म्हणाले की, स्पर्धा परीक्षांची तयारी करताना स्वयंप्रेरित असणे अत्यंत गरजेचे आहे. स्पर्धा परिक्षांसाठी तयारी करतांना इतरांशी स्वत:ची तुलना करु नका. कालपेक्षा आज आपली काय प्रगती झाली, याबाबत स्वत:शी  संवाद साधा. परीक्षा देतांना आव्हानांचा स्वीकार आनंदाने आणि सकारात्मकतेने करा. वाचन केवळ परीक्षेच्या यशप्राप्तीपुरतेच न ठेवता ही सवय आयुष्यभर अंगिकारा. ज्या पदावर तुमची नियुक्ती झाली आहे, त्या पदाला न्याय मिळवून देण्यासाठी निरपेक्ष वृत्ती स्वत:मध्ये रुजवा. ध्येय निश्चिती आणि सकारात्मकतेमुळे कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळविणे कठीण नसल्याचे ते यावेळी म्हणाले.

विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून ध्येय निश्चित करावे. समाज माध्यमांचा अगदी जुजबी वापर करावा. आज सर्वत्र स्पर्धेचे युग असल्यामुळे आपले प्रयत्न इतरांपेक्षा सरस ठरतील, यासाठी अविरत प्रयत्नशील रहाणे गरजेचे आहे. स्वत:ची टिपणे काढा. बाजारात तयार साहित्यांवर विसंबून राहू नका. अपयशाने खचून न जाता सकारात्मक वृत्ती बाळगा. प्रबळ इच्छाशक्ती, चौफेर वाचन आणि सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास स्पर्धा परीक्षा अवघड नाहीत, असे मत श्रीमती वर्षा भाकरे यांनी व्यक्त केले.

आपले इच्छित ध्येय गाठेपर्यंत विश्रांती घेऊ नका. समाजमाध्यमांच्या वापराबाबत स्वत:वर निर्बंध लादा. तुम्हीच तुमचे परीक्षक व्हा. ज्यावेळी तुम्ही स्वत:वर नियंत्रण मिळवू शकाल, त्यावेळी स्पर्धेत यश मिळविणे कठीण नाही. बदलांचा स्वीकार करण्याची मानसिकता ठेवा. अवांतर वाचनासह संदर्भग्रंथांचे वाचन वाढवा. दैनंदिन वृत्तपत्रांच्या नोंदी घ्या. अनावश्यक वेळ कुठेही खर्च होणार नाही, यांची दक्षता घ्या. ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्या गोष्टी आनंदाने स्वीकारा. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतरही रोजची आव्हाने संपत नाही. यासाठी केवळ स्पर्धेपुरतेच नाही तर यशस्वी आयुष्य जगण्यासाठी शरीरासह मनाचीही मशागत करा. अपयश आल्यास खचून जावू नका. तर उपलब्ध दुसऱ्या पर्यायाकडे वळण्याचा संदेश मदन जाधव यांनी दिला.

कार्यक्रमाचे संचालन जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष चंद्रकांत चांगदे यांनी केले. विभागीय ग्रंथपाल अरविंद ढोणे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी तसेच विद्यार्थी, ग्रंथप्रेमी, साहित्यरसिक, नागरिक आदी यावेळी उपस्थित होते.  

00000

Friday, November 18, 2022

दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा ग्रंथदिंडीने शुभारंभ वाचन संस्कृती रुजविणाऱ्या पोस्टरांच्या माध्यमातून जनजागृती

 







दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा ग्रंथदिंडीने शुभारंभ

वाचन संस्कृती रुजविणाऱ्या पोस्टरांच्या माध्यमातून जनजागृती

 

       अमरावती, दि. १८ : जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्याव्दारे दि. १८ व १९ नोव्हेंबरला आयोजित दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा शुभारंभ निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके यांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडीने आज (दि. 18 नोव्हेंबर) झाला.

यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रफुल कचवे, तहसीलदार संतोष काकडे, सहायक ग्रंथालय संचालक अरविंद ढोणे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष चंद्रकांत चांगदे यांचेसह विभागाचे अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत इर्विन चौक स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते विभागीय ग्रंथालय कार्यालयापर्यंत ग्रंथ व पुस्तकाने सजलेल्या देखन्या पालखीसह ग्रंथदिंडीचे मार्गक्रमण झाले.

या ग्रंथदिंडीत जिल्हा परिषद शासकीय मुलींची शाळेच्या विद्यार्थींनींनी मंगेश पाडगावकर लिखीत

ग्रंथ आमचे हाती, ग्रंथ आमचे साथी ! ग्रंथ उजळती अज्ञानाच्या, अंधाराच्या राती !

जयाला नसे आवड वाचनाची, कसा गोडी चाखील तो जीवनाची !

ग्रंथालयावीण जो गाव राही, तिथे जीवना अर्थ काहीच नाही !

अशा वाचन संस्कृतीचे महत्व विशद करणाऱ्या विविध पोस्टरांच्या माध्यमातून जनजागृती केली. गणतूसवातील ग्रंथ प्रदर्शन व विक्री उद्या शनिवार दिनांक 19 नोव्हेंबर ला रात्री आठ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुली आहे ग्रंथप्रेमी आणि नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. सुरज मडावी यांनी केले आहे.

00000

अमरावती जिल्हा ग्रंथोत्सवाचा उत्साहात शुभारंभ ग्रंथांचे महत्त्व समाजमाध्यमांच्या युगातही अबाधित - खासदार डॉ. अनिल बोंडे

 







अमरावती जिल्हा ग्रंथोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

ग्रंथांचे महत्त्व समाजमाध्यमांच्या युगातही अबाधित

- खासदार डॉ. अनिल बोंडे

 

अमरावती, दि. 18  : ग्रंथदिंडी, कवी, लेखक, रसिक, वाचकांची मांदियाळी, वाङमय चर्चा, परिसंवाद, कवीसंमेलन असा भरगच्च कार्यक्रम असलेल्या अमरावती जिल्हा ग्रंथोत्सवाचा शुभारंभ आज झाला. अमरावती जिल्हा प्रशासन व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे विभागीय मराठी ग्रंथालयात आयोजित जिल्हा ग्रंथोत्सवाचा शुभारंभ खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी पवनीत कौर  यांच्या उपस्थितीत झाला. ग्रंथोत्सवानिमित्त शहरातून उत्साहात ग्रंथदिंडी काढण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रफुल कचवे, तहसीलदार संतोष काकडे तसेच ग्रंथप्रेमी, साहित्यरसिक, नागरिक यावेळी उपस्थित होते.  खासदार डॉ. बोंडे म्हणाले की, वाचन संस्कृती वृध्दिंगत व्हावी,  ‘ग्रंथोत्सव’ घेतला जातो. लेखक, वाचक आणि प्रकाशक या त्रिवेणी संगमातून संस्कारक्षम विचार करणारी पिढी तयार होते. ग्रंथांचे महत्त्व समाजमाध्यमांच्या युगातही अबाधित असल्याचे खासदार डॉ. बोंडे यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, वाचन संस्कृतीच्या माध्यमातून माणूस घडत असतो.

वाचनाची गोडी लहानपणापासून लागल्यास त्या व्यक्तीतील वैचारिक प्रगल्भता वाढीस लागते. ‘वाचाल तर वाचाल’ ही म्हण प्रत्येकाने अंगीकारणे गरजेचे आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ‘ज्ञानेश्वरी’च्या माध्यमातून तर तुकडोजी महाराजांनी ‘ग्रामगीते’च्या माध्यमातून आयुष्याचे सार समजावून सांगितले आहे. संत एकनाथ महाराजांनी ‘भारुड’ तर अन्य संतांनीही ओवी तसेच ग्रंथांच्या माध्यमातून जगण्याची मूल्ये सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत मांडली आहेत. वेदकाळापासून ग्रंथांचे महत्त्व अबाधित आहे. संतांची शिकवण आज आपल्याला ग्रंथांच्या माध्यमातून मिळते. यावरुन आपल्या पूर्वजांना असणारे ग्रंथांचे महत्त्व जाणवते.  आज वाचनाची माध्यमे बदलत आहे. ऑडिओ बुकच्या माध्यमातून पुस्तके ऐकता येतात. ई-बुक्स एका क्लिकवर उपलब्ध आहेत. परंतु पुस्तक हातात धरुन केलेल्या वाचनाची अनुभूती हा वेगळा आनंद आहे.

            श्रीमती पवनीत कौर यांनी ग्रंथालयाची पाहणी करून स्पर्धा परीक्षा तसेच महिला कक्षातील विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या. याप्रसंगी प्रकाशक संघटनेचे अध्यक्ष नंदकिशोर बजाज, विभागीय ग्रंथपाल अरविंद ढोणे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष चंद्रकांत चांगदे, माहिती अधिकारी अपर्णा यावलकर आदी उपस्थित होते.

ग्रंथोत्सवातील ग्रंथ प्रदर्शन व विक्री उद्या शनिवार दि. 19 नोव्हेंबर 2022 पर्यंत रात्री 8 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले आहे. ग्रंथप्रेमी आणि नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन डॉ. सुरज मडावी यांनी केले आहे.

00000

Thursday, November 17, 2022

मूग,उडीद आणि सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन

मूग,उडीद आणि सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्यासाठी

 शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन 


        अमरावती, दि. 17 : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत नाफेडमार्फत हंगाम 2022-23 मध्ये मूग, उडीद आणि सोयाबीनसाठी ऑनलाईन पध्दतीने नोंदणी खरेदी सुरू करण्यात आली आहे. यासाठी मूग 7 हजार 755 रूपये, उडीद 6 हजार 600 रूपये व सोयाबीन 4 हजार 300 रूपये प्रती क्विंटल भाव शासनाने निश्चित केले आहेत.  

      नोंदणीसाठी हंगाम 2022-23 मधील पीक पेरा नोंद असलेल्या तलाठ्याचे सही, शिक्क्यानिशी ऑनलाइन सात-बारा, आधारकार्डची छायांकित प्रत, बँक पासबुक छायांकित प्रत सोबत आणावी. बँक पासबुकवर शेतकऱ्यांचे पूर्ण नाव, खाते क्रमांक, आय. एफ. एस. सी. कोड स्पष्ट नमुद असावा. यामध्ये जनधन बँक खाते किंवा पतसंस्थेतील खाते क्रमांक देऊ नये. जिल्हा मार्केटिंग कार्यालयामार्फत चांदुररेल्वे, दर्यापूर, धारणी, तिवसा, अचलपूर येथे खरेदी विक्री संघामार्फत तसेच अचलपूर येथे जयसिंग विविध कार्यकारी सहकारी सोसायटी पथ्रोट व नेरपिंगळाई विविध कार्यकारी सहकारी सोसायटी नेरपिंगळाई मार्फत नोंदणी सुरू आहे. 

      वरील केंद्राच्या ठिकाणी मूग, उडीद, सोयाबीन हमी भावाने खरेदीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. 

000000

‘बालविवाहमुक्त जिल्हा’ अभियान प्रभावीपणे राबवा - जिल्हाधिकारी पवनीत कौर








 ‘बालविवाहमुक्त जिल्हा’ अभियान प्रभावीपणे राबवा

 

-         जिल्हाधिकारी पवनीत कौर

       अमरावती, दि. 17 : ‘बालविवाहमुक्त जिल्हा’ हे अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी शासकीय यंत्रणांनी एकत्रित येऊन काम करावे. जिल्हा, तालुका तसेच सर्व ग्रामपंचायत स्तरावरील प्रशासनाने या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपले गाव ‘बालविवाहमुक्त गाव’ म्हणून घोषित व्हावे, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे केले.

            जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे जिल्हा महिला व बाल विकास विभाग तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षाचा आढावा जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा महिला बाल विकास अधिकारी उमेश टेकाडे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

            बालविवाहमुक्त जिल्हा अभियान राबविण्यासाठी जिल्हा, तालुका आणि ग्रामीण स्तरावरील प्रशासकीय यंत्रणांना प्रशिक्षण देण्यात येईल. यामध्ये शिक्षण विभाग, महिला बाल विकास विभाग, पोलीस विभाग, ग्राम विकास विभाग तसेच आरोग्य विभाग या विभागांना प्रशिक्षण देण्यात येईल. गावातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा सेविकायांनी गावात होणारे बालविवाह टाळण्यासाठी गावकऱ्यांना समुपदेशन करावे. ‘आमच्या गावात एकही बालविवाह होणार नाही’, असा ठराव ग्रामसभेमध्ये सर्वानुमते मंजूर करुन घेण्यात यावा, जेणेकरुन कोणत्याही गावात बालविवाह होणार असल्यास त्याची माहिती तात्काळ प्रशासनाला कळेल आणि प्रशासन यावर कारवाई करु शकेल, अशी माहिती श्रीमती कौर यांनी यावेळी दिली.

            टास्क फोर्स बैठकींतर्गत कोविड काळामध्ये पालक गमावलेल्या बालकांच्या सद्य:स्थितीबाबत यावेळी आढावा घेण्यात आला. कोविडमध्ये एक पालक गमावलेल्या बालकांची संख्या 477, तर दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या 19 आहे. या 19 पैकी 15 बालकांना केंद्र शासनामार्फत 10 लक्ष रुपये तर राज्य शासनामार्फत 5 लक्ष रुपये अशी एकूण 15 लक्ष रुपयांची मदत करण्यात आलेली आहे. या मुलांना बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात आला आहे. तसेच महिला व बाल विकास विभागामार्फत अनाथ प्रमाणपत्र देण्यात आले आहे, अशी माहिती अजय डबले यांनी यावेळी दिली.

            बालकांच्या संरक्षणासाठी 1098 या हेल्पलाईन क्रमांकाला सर्वत्र प्रसिद्धी देण्यात यावी. पोलीस विभागांच्या गाड्यांवर हा हेल्पलाईन क्रमांक लावण्यात यावा तसेच प्रत्येक शाळेच्या दर्शनी भागात या क्रमांकाची प्रसिद्धी करण्यात यावी. जेणेकरुन विद्यार्थ्यांना गरजेच्यावेळी हा क्रमांक लक्षात राहील.

            बाल कल्याण समितीचा आढावा यावेळी घेण्यात आला. अल्पवयीन अविवाहित गरोदर मुलींचा निवाऱ्याचा प्रश्न उपस्थित होतो, अशावेळी या मुलींना प्रसुती होईपर्यंत वन स्टॉप सेंटरला ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी दिले.

            जिल्हा महिला व बालविकास विभागामार्फत दि. 14 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत दत्तक विधान सप्ताह राबविण्यात येत आहे. यासाठी www.cara.nic.in (टोल फ्रि क्रमांक 1800111311) या संकेतस्थळावर नोंदणी करुन इच्छुक पालक कायदेशीररित्या मुल दत्तक घेऊ शकतात. अवैध पद्धतीने मुल दत्तक घेतल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊ शकतो. याबाबतच्या भित्तीपत्रकाचे यावेळी जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

00000

Wednesday, November 9, 2022

विधी सेवा प्राधिकरणामार्फत रविवारी नियोजनभवनात महाशिबिर

विधी सेवा प्राधिकरणामार्फत  रविवारी नियोजनभवनात महाशिबिर

 

अमरावती, दि. 9 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा वकील संघ व अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने

 ‘विधी सेवा महाशिबिर’  रविवार, दि. 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात होणार आहे.

या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे उपस्थित असतील. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.पी. पाटकर अध्यक्षस्थानी असतील.

            ‘कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाव्दारे नागरिकांचे सशक्तीकरण आणि हक हमारा भी तो है 75’ या विषयावर हे महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे. इच्छुकांनी या महाशिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जी. आर. पाटील व जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ऍड. शोएब  खान यांनी केले आहे.

00000 

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...