Wednesday, March 29, 2023

जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरामेळघाट व्याघ्र प्रकल्पाला जागतिक मानकाचा दर्जा

जिल्ह्याच्या  शिरपेचात मानाचा तुरा
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला जागतिक मानकाचा दर्जा

अमरावती, दि. 29 : जागतिक स्तरावरील ‘ग्लोबल टायगर फोरम’तर्फे (जीटीएफ) मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला ‘कंझर्वेशन ॲश्युअर्ड टायगर स्टँडर्ड’ (कॅटस्) या जागतिक मानकाचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे. वाघाच्या संवर्धनासाठी आवश्यक मानकांची पूर्तता प्रकल्पाने केली असल्याने हा बहुमान प्राप्त झाला असून, अरण्यसमृद्ध अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.  

 
सातपुड्याच्या पर्वतरांगांत वसलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प देशातील पहिल्या नऊ व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे. उंच समांतर पर्वतरांगा, उत्तुंग सागवृक्ष, मिश्र वनांचे पट्टे, धबधबे यांनी समृद्ध मेळघाटात गौर, सांबरसारख्या प्राण्यांपासून पक्षी, फुलपाखरे, कीटकांपर्यंत विपुल जैवविविधता आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा सन्मान मिळण्याचा योग प्रकल्पाच्या अधिकारी व कर्मचा-यांच्या, तसेच अमरावतीकरांच्या आनंदात भर घालणारा आहे.

व्याघ्र प्रकल्पाचे सामाजिक, सांस्कृतिक, जैविक महत्व, व्यवस्थापन नियोजन, स्थानिक समुदाय, पर्यटन, संरक्षण, अधिवास विकास, वाघांची संख्या अशा सात विषयांबाबत झालेल्या कामांचा सविस्तर अहवाल प्रकल्पातर्फे टायगर फोरमकडे सादर करण्यात आला. फोरमच्या चमूने व्याघ्र प्रकल्पातील विविध ठिकाणी भेटी देऊन या कामांची पाहणी केली. निवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक दर्जाचे अधिकारी या चमूत सहभागी असतात. या चमूने प्रत्यक्ष कामे, व्यवस्थापनाचा दर्जा, संरक्षण दर्जा याची तपासणी करून अहवाल ग्लोबल फोरमला दिला. त्यानुसार फोरमकडून जागतिक मानक प्रकल्पाला जाहीर करण्यात आले आहे.   

‘कॅटस्’नंतर ‘मॅनेजमेंट इफेक्टिव्ह इव्हॅल्यूशन’तर्फे विविध विषयांवर पाहणी केलेली असून, मेळघाट व्याघ्र प्रकल्प सकारात्मक गुण प्राप्त करेल, असा विश्वास प्रकल्पाच्या संचालिका जयोती बॅनर्जी यांनी व्यक्त केला. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात संवर्धन व संरक्षण कार्यात अहोरात्र झटणा-या क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी, मानद वन्यजीव रक्षक, स्वयंसेवी संस्था यांचे सहकार्य या कामासाठी मिळाले असून, या सर्वांचे अभिनंदन श्रीमती बॅनर्जी यांनी केले.

          ०००

Tuesday, March 28, 2023

जिल्ह्यात कृषी विभागातर्फे चारशेहून अधिक शेतीशाळा पीक मार्गदर्शनासाठी शेतीशाळा प्रभावी माध्यम

 



जिल्ह्यात कृषी विभागातर्फे चारशेहून अधिक शेतीशाळा

पीक मार्गदर्शनासाठी शेतीशाळा प्रभावी माध्यम

 

अमरावती, दि. २८ :  शेतकरी बांधवांना शेतातील पिकाविषयी प्रत्यक्ष माहिती, मार्गदर्शन देणारी शेतीशाळा हे प्रभावी माध्यम ठरले आहे. कृषी उत्पादकतेत भर पडण्यासाठी आवश्यक बाबींचे प्रशिक्षणच याद्वारे मिळत असून, जिल्ह्यात कृषी विभागातर्फे चारशेहून अधिक शेतीशाळा घेण्यात आल्या आहेत.

प्रत्यक्ष शेतावर या शेतीशाळा घेण्यात येत असून, शेतक-यांकडून घेतले जाणा-या पिकांची परिपूर्ण माहिती व मार्गदर्शन त्यांना देण्यात येते. गावातील पीक क्षेत्र निवडून परिसरातील त्या पिकाचे उत्पादन घेणा-या शेतकरी बांधवांना एकत्र आणून त्यांना व्याख्याने व अधिकाधिक प्रात्यक्षिकातून अनुभवाधारित शिक्षण दिले जाते. आवश्यक तिथे अद्ययावत तंत्रज्ञानाचे पथदर्शी प्रात्यक्षिकही घेतले जाते. एकात्मिक पीक व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आदी बाबींचे धडे या शेतीशाळेतून मिळतात.

खरीप व रब्बी हंगामात पीकनिहाय शेतीशाळा घेतल्या जातात. गत वर्षभरात संत्रा फळपीकासाठी 131, कापूस पिकासाठी 28, सोयाबीनसाठी 112, तुरीसाठी 56, हरभ-यासाठी 6, ज्वारी व मूगासाठी प्रत्येकी 2 शेतीशाळा घेण्यात आल्या. धारणी व चिखलदरा तालुक्यात सावा व कुटकी पिकांसाठीही शेतीशाळा घेण्यात आली. त्याशिवाय, मूल्यविकास शाळाही आयोजित करण्यात आल्या. ‘स्मार्ट’तर्फे 60, ‘आत्मा’तर्फे 337 व कृषी विभागातर्फे 11 अशा एकूण 408 शेतीशाळा घेण्यात आल्याची माहिती ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने यांनी दिली.

कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावतात. त्याचप्रमाणे, या माध्यमातून शेतकरी बांधव एकत्र येत असल्याने चर्चेतूनही शंकांचे निरसन होते व अनेक बाबी आत्मसात होत जातात. शेतकरी समूह एकत्र येत असल्याने त्यांच्या गरजांवर आधारित कार्यक्रम किंवा अभ्यासक्रम राबविण्यास प्रशासनालाही दिशा मिळते. प्रत्येक कृषी सहायकाच्या कार्यक्षेत्रात एक गाव निवडून तेथील प्रमुख पिकासाठी शेतीशाळेचे आयोजन होते. महिला कर्मचा-यांकडून महिला शेतक-यांसाठी शेतीशाळा घेतल्या जातात. शेतीशाळेसाठी लागणारे प्रशिक्षण साहित्यही यावेळी पुरवले जाते.

 शेतीशाळेत प्रात्यक्षिक केल्यामुळे आवश्यक बाबी नेमक्या कळून शेतकरी निर्णयक्षम होण्यास मदत होते.  सहकार्याची भावना वाढीस लागते. उत्कृष्ट शेतीशाळा स्पर्धाही आयोजित केल्या जातात. त्यामुळे कर्मचा-यांना प्रोत्साहन मिळते, अशी प्रतिक्रिया श्रीमती निस्ताने यांनी दिली.

 

00000

Monday, March 27, 2023

अवैध उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्यासाठी गौण खनिज धोरण - महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

 










अवैध उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्यासाठी गौण खनिज धोरण

-        महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

 

            अमरावती, दि. 27 : राज्यातील गौण खनिजांचे अवैध उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्याकरिता लवकरच गौण खनिज धोरण आणि वाळू धोरण आणण्यात येईल. त्यामुळे नागरिकांना कमी दरात वाळू उपलब्ध होईल, त्यासाठी आवश्यक डेपो आदी तयारी प्रशासनाकडून होत आहेत, असे प्रतिपादन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे केले.

            महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महसूल व पशुसंवर्धन विभागाची बैठक नियोजनभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. माजी राज्यमंत्री तथा आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार प्रताप अडसड, विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, जिल्हाधिकारी पवनीत कौर, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर, सहायक जिल्हाधिकारी रिचर्ड यानथन, उपायुक्त संजय पवार आदी यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले की, राज्यात यावर्षीपासून नविन वाळू धोरण शासनाने आणले असून आगामी पंधरा दिवसात त्याची सर्वच जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणी होणार आहे. नविन वाळू धोरण सर्वसामान्यांच्या हिताचे आहे. अमरावती जिल्ह्यात 17 वाळू डेपो प्रस्तावित आहेत.  दरम्यान कुठेही अवैध उत्खनन, वाहतूक आढळून आल्यास साठे जप्त व दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

खारपाणपट्ट्याबाबत जिल्हाधिकारी स्तरावर खनिजपट्टा मंजूर केल्यानंतर पुढील पाच वर्षांच्या नूतनीकरणासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा लागतो. ही प्रक्रिया गतीने होण्यासाठी नुतनीकरणाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

अमरावती जिल्ह्यात जमीन मोजणीची ७ हजार ७२६ प्रलंबित प्रकरणे दि. १ एप्रिल २०२२ ते २८ फेब्रुवारी २०२३ दरम्यान निकाली काढण्यात आली. तथापि, अर्ज प्राप्त झाल्यापासून मर्यादित कालावधीत मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे. मोजणी अचूकपणे होण्यासाठी रोव्हर मशीन व अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करावा, जेणेकरुन कमी कालावधीत संबंधितांना जमीन मोजणीसह नकाशा घरपोच उपलब्ध होईल. पीआर कार्ड प्रलंबित असल्याच्याही तक्रारी प्राप्त होतात. ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. प्रधानमंत्री आवास योजनेची कामे गतीने पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

            जिल्ह्यात दि. १६ ते १९ मार्च दरम्यान अवकाळी पावसाने झालेल्या प्राथमिक नुकसानाच्या अहवालानुसार १६४ गावातील ३ हजार ४०८.६१ हे.आर. बाधित क्षेत्रफळावरील पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. पात्र शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई व विम्याचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले.

 

            पशुसंवर्धन विभागाचा आढावाही श्री. विखे-पाटील यांनी घेतला. लम्पी आजार रोखण्यासाठी राज्यातच लस तयार करण्यात येणार आहे. मेळघाटातील पशुपालक बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी व चारा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने मुरघास उपलब्धता, चारा वैरण कार्यक्रम आदी प्रयत्न करण्याचे सूचना त्यांनी दिल्या.

महाराजस्व अभियानात गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमण असल्याने बंद झालेल्या पांदण शेत व शिवार रस्ते मोकळे करण्याची मोहीम राबविण्यात आली. त्यात दि. १.८.२०२२ पासून ३५३.६७ किमी लांबीच्या २८५ रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यात आले, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. गायरान अतिक्रमण, महाराजस्व अभियान आदी विविध बाबींचा आढावाही मंत्री महोदयांनी घेतला. अहिल्यादेवी होळकर समाजसेवा पुरस्कारांचे वितरण मंत्री महोदयांच्या हस्ते झाले. यावेळी श्रीमती पुष्पाताई साखरे, प्रेमा लव्हाळे, रोमा बजाज, निलीमाताई पाटील आदींना 10 हजार रुपये रोख, शाल, स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

 

00000

 

 

 

 

 

 

 

 

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण

 











महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण

शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटीबध्द

-राधाकृष्ण विखे-पाटील

 

        अमरावती, दि. २७: तहसील कार्यालय हे तालुक्याच्या विकासाचे केंद्रबिंदू असते. ग्रामीण भागातील सामान्य जनतेच्या मागण्या, प्रश्न व अडीअडचणी या ठिकाणाहून सोडविण्यात येते. सद्यस्थितीत प्रत्येक क्षेत्रात ऑनलाईन तंत्रज्ञान विकसित झाले असून प्रशासनाची व्याप्ती वाढली आहे. तहसील कार्यालयाच्या नवनिर्मित वास्तूच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन तथा दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज येथे केले.   

जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण मंत्री श्री. विखे-पाटील यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करुन आज झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. आमदार प्रताप अडसड, आमदार प्रवीण पोटे-पाटील, जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, जिल्हाधिकारी पवनीत कौर,  अधीक्षक अभियंता श्रीमती रुपा गिरासे, उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारी, नागरिक यावेळी उपस्थित होते.  

            मंत्री श्री. विखे- पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सर्वच क्षेत्रात देश प्रगती करीत आहे. अमरावती जिल्ह्याला संत महात्मे व थोर पुरुषांची परंपरा लाभलेली आहे. जिल्ह्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक, राजकीय ठेवा असून क्षेत्रफळाने सुध्दा जिल्हा मोठा आहे. जिल्हा अग्रगण्य राहण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनात विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासनाने लोकाभिमुख अर्थसंकल्प मांडला आहे. सामान्य जनतेच्याहिताच्या विविध योजना, प्रकल्प शासनाव्दारे पूर्ण केल्या जात आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत सामान्य लोकांना 600 रुपये प्रती ब्रासप्रमाणे वाळू उपलब्ध करुन देण्यासाठी नवीन वाळू धोरण अंमलात आणले आहे. तसेच शेतजमीन मोजणी अगदी अचूकपणे होण्यासाठी रोव्हर मशीनव्दारे मोजणी कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेतून मोजणीचा अर्ज केल्यापासून दोन महिन्याच्या आत संबंधितांना जमीन मोजणीसह नकाशा घरपोच उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करुन सामान्य जनतेला विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन कटीबध्द असल्याचे श्री. विखे-पाटील यांनी यावेळी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, राज्य शासनाच्या उत्तम नियोजनातून जिल्ह्याच्या सिंचन अनुशेष भरुन काढण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या ‘हर घर जल या मोहिमे अंतर्गत सर्वांना शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. येत्या तीन महिन्यात सर्व पांदण रस्ते, शिव रस्ते शेतकऱ्यांना शेतमाल ने-आण करण्यासाठी खुले करण्यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

 

इंदू कंस्ट्रकशन तर्फे तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात आले असून त्यासाठी  771 कोटी खर्च आला आहे. सुमारे 2271 चौ.मि. बांधकाम करण्यात आले असून सुसज्ज इमारत उभारण्यात आली आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता राजेश सोनवाल यांनी प्रास्ताविकेतून दिली.

तहसील कार्यालयाच्या नवीन वास्तूच्या माध्यमातून सामान्य नागरिक, शेतकरी, गोरगरीबांची कामे विहित मुदतीत पूर्ण व्हावीत, असे आमदार प्रताप अडसळ यांनी सांगितले. वीजेच्या बचतीसाठी प्रशासनाच्या सर्व शासकीय कार्यालयात सौर उर्जा प्रकल्प बसविण्यात यावेत, असे आमदार प्रवीण पोटे-पाटील यांनी यावेळी सांगितले.

यावेळी तहसीलदार यांच्या कक्षाचेही मंत्री श्री. विखे-पाटील यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले.

00000

 

 

 

 

 

 

 

Friday, March 24, 2023

क्षयरोग निर्मूलनासाठी ‘स्टँडर्ड रेजिमन’नुसार उपचार आवश्यक - डॉ. अजय डवले

 क्षयरोग निर्मूलनासाठी ‘स्टँडर्ड रेजिमन’नुसार उपचार आवश्यक

-  डॉ. अजय डवले


अमरावती, दि. 24 : जगात क्षयरोगाने दरवर्षी 16 लाख मृत्यू होतात. त्यातील 25 टक्के मृत्यू भारतात होतात. क्षयरोग निर्मूलनासाठी ‘स्टँडर्ड रेजिमन’नुसार अचूक निदान, तत्काळ उपचार व पाठपुरावा आवश्यक असून, त्यासाठी शासकीय आरोग्य यंत्रणा सतत प्रयत्नरत असते, असे आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. अजय डवले यांनी येथे सांगितले.   


जागतिक क्षयरोग दिनानिमित्त केंद्रातर्फे आयोजित जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, क्षयरूग्णांच्या मृत्यूची भारतातील आकडेवारी चिंताजनक आहे. कोविडकाळात हे प्रमाण आणखी वाढले. क्षयरोगासाठी अचूक उपचारप्रणालीचे पालन होणे आवश्यक असते. अनेकदा तसा औषधोपचार न मिळाल्याने रूग्ण प्रकृतीत सुधारणा होत नाही. शासकीय आरोग्य यंत्रणा तंतोतंत निदान, अचूक उपचार व पाठपुरावा काटेकोरपणे करते. निक्षय मित्र व शासनाला सहकार्य करणा-या स्वयंसेवी संस्थाही रूग्णाला रोगमुक्त करण्यास तत्पर असतात. या यंत्रणेचा लाभ गरजूंना मिळण्यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले.


डॉ. वासनिक यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. आश्लेष पाचघरे, मंगेश पाटणे, श्रीमती बन्सोड, श्रीमती कुटे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आयोजित निबंध स्पर्धेत 30 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. गणेश प्रधान, तारा शर्मा, श्री. मुंद्रे आदी उपस्थित होते. निखिल ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले.


०००

आदिवासी युवकांसाठी विनामूल्य स्पर्धापरीक्षापूर्व प्रशिक्षण

 आदिवासी युवकांसाठी विनामूल्य स्पर्धापरीक्षापूर्व प्रशिक्षण


 अमरावती, दि. 24 : परतवाड्यातील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राद्वारे विविध पदांच्या स्पर्धा परीक्षेसाठी आदिवासी उमेदवारांची विनामूल्य प्रशिक्षण देऊन तयारी करून घेतली जाते. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


 प्रशिक्षण कालावधी साडेतीन महिन्यांचा असून त्यात प्रशिक्षणार्थीना दरमहा एक हजार रूपये विद्यावेतन देण्यात येते. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणारांना विविध विषयांच्या चार पुस्तकांचा संच विनामूल्य मिळतो. प्रशिक्षणासाठी किमान पात्रता दहावी उत्तीर्ण आहे, तसेच दि. 1 एप्रिल 2023 रोजी वयाची किमान 18 वर्षे पूर्ण असावीत. त्याचप्रमाणे, दि. 15 जुलै 2023 रोजी 30 वर्षे पूर्ण केलेली नसावी.  


 प्रशिक्षणाचे सत्र एप्रिलमध्ये सुरू होत असून, इच्छूकांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, जयस्तंभ चौक, मातोश्री मंगल कार्यालयामागे, लाल पुलाजवळ, अचलपूर कॅम्प, परतवाडा, जि. अमरावती (दूरध्वनी क्र. 07223-221205 व मोबाईल नं. 7709432024 या क्रमांकावर संपर्क साधावा. 


      अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, दहावी उत्तीर्ण गुणपत्रिका, उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र तसेच जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे ऑनलाईन कार्ड


        ( http://rojgar.mahaswayam.in) आदी प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती व एक स्वत:चा पासपोर्ट साईज फोटो जोडणे आवश्यक आहे. यापूर्वी प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करू नये.


०००

चुरणीत वैद्यकीय शिबिराचा दीड हजारांवर रूग्णांना लाभ

 चुरणीत वैद्यकीय शिबिराचा दीड हजारांवर रूग्णांना लाभ


 अमरावती, दि. 24 : चिखलदरा तालुक्यातील चुरणी येथील ग्रामीण रुग्णालयात चार दिवसांचे वैद्यकीय व दंतरोग आणि नेत्रतपासणी शिबीर नुकतेच झाले. मेळघाटातील दुर्गम भागातील दीड हजारांवर रूग्णांना त्याचा लाभ झाला.

 

मेळघाटबरोबरच मध्यप्रदेशातील रुग्णांनीही शिबिराचा लाभ घेतला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे यांच्या मार्गदर्शनात शिबीर घेण्यात आले. त्यात 1 हजार 638 रुग्णांची तपासणी करण्यात आली. तपासणीत दंतरोग, स्त्रीरोग, बालरोग, जनरल शस्त्रक्रिया कान, नाक, घसा, अस्थिव्यंग या सर्व प्रकारातील एकूण 80 शस्त्रक्रिया करण्यात आल्या व 5 रुग्णांना पुढील उपचारासाठी मोठ्या रूग्णालयांत संदर्भित करण्यात आले, अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक व नेत्र शल्यचिकित्सक डॉ. रामदेव वर्मा यांनी दिली.


 डॉ. वर्मा यांनी  एक काच बिंदू रूग्ण व 40 संशयित मोतीबिंदू रुग्णांपैकी 29 रुग्णांची निवड करून मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात संदर्भित केले. सामान्य शस्त्रक्रियांमध्ये 30 दंत शस्त्रक्रिया, पाच ऑर्थो, एक गायनिक, एक ऑप्थोल्मिक अशा 43 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शिबीरात हर्निया, हायड्रोसिल, शरीरावरील विविध प्रकारच्या गाठी आदींवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्याचप्रमाणे, रक्तदाब, रक्तशर्करा आदी तपासणीसह विविध आजारांवर विनामूल्य उपचार करण्यात आले.  


      शिबीरात नेत्र रुग्णांना चष्मे वाटप करून व राष्ट्रीय स्वच्छता अभियानाद्वारे स्वच्छतेचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करून आरोग्याविषयी सूचना देण्यात आल्या. कान, नाक, घसा शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. गवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. पांडुरंग पावडे, अस्थिव्यंग तज्ज्ञ डॉ. संजय पवार व डॉ. प्रविण मुरले, भूलतज्ज्ञ डॉ. भागवणे, डॉ. मनोज इंगळे, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. आश्विनी पटेल, बालरोग तज्ज्ञ डॉ. मालोकर, दंतरोग तज्ज्ञ डॉ. आतिश पवार, डॉ. शिरीष इंगळे, डॉ. पंकज मुळे, गायनिक तज्ज्ञ डॉ. अप्रिम शेख, डॉ. सतीश ठाकरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. दासरवार सर, डॉ. धुर्वे सर, डॉ. लेखिका मॅडम आदींनी शस्त्रक्रियेसाठी योगदान दिले.


नेत्रचिकित्सा अधिकारी आर. एल. फसाटे व श्रीमती स्वाती कुरले यांनी शिबीरामध्ये बहुमूल्य योगदान दिले. शाहिस्ता कुरेशी, प्रेरणा वाडीकर, खीना पाटोरकर, प्रिती भारवे, पुजा, सरोजिनी, नरेंद्र पंडोले, गोविंद पाटील, अमोल बनसोड, श्री. पातोंड, अर्जून टाले, श्री. गोंडाणे, श्री. खंडारे, श्री. गहाणे, श्री. चिमोटे, श्री. अलोकर, निलेश खापरे, श्रीमती रामकली आदी उपस्थित होते.  


00000

एपीएल कार्डधारक शेतकरी बांधवांना धान्याऐवजी वर्षाकाठी अठराशे रुपये अमरावती जिल्ह्यात पावणेचार लाख लाभार्थ्यांना लाभ

 एपीएल कार्डधारक शेतकरी बांधवांना धान्याऐवजी वर्षाकाठी अठराशे रुपये

 अमरावती जिल्ह्यात पावणेचार लाख लाभार्थ्यांना लाभ

         अमरावती, दि. 24 : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त चौदा जिल्ह्यांतील एपीएल शिधापत्रिकाधारक शेतकरी बांधवांना अन्नधान्याऐवजी आता थेट रोख रक्कम हस्तांतरण (डीबीटी) करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, प्रति लाभार्थी वार्षिक एक हजार आठशे रूपये रुपये  देण्यात येणार आहेत. अमरावती जिल्ह्यातील 3 लाख 79 हजार 882 लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.


       राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांतर्गत एपीएल शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबांना प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांप्रमाणे अन्नधान्याचा लाभ देण्यात येत होता. मात्र राज्य शासनाने अन्नधान्याऐवजी रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अमरावती जिल्ह्यातील एकूण 93 हजार 778 शेतकरी कुटूंबांतील  3 लाख 79 हजार 882 या व्यक्तींना दरवर्षी 1 हजार 800 रुपये डीबीटीद्वारे देण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी डी. के. वानखडे यांनी दिली.

      राज्यात अमरावती विभागातील अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, तसेच नागपूर विभागातील वर्धा, तर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली अशा एकूण 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांचा समावेश आहे.

     राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमानुसार राज्य शासनाकडून योजनेसाठी गहू, तांदूळ आदी आवश्यक अन्नधान्याची केंद्र शासनाच्या नॉन एनएफएसए  योजनेत केली जात होती, तसेच शेतक-यांना प्रतिमाह प्रति सदस्य 5 किलो अन्नधान्य, दोन रू. प्रति किलो गहू व 3 रू. प्रति किलो तांदुळ या दराने उपलब्ध करुन देण्यात येत होते. तथापि, या योजनेत काही कारणांस्तव  गहू व तांदुळ उपलब्ध होणार नसल्याचे भारतीय अन्न महामंडळाने कळविले आहे. त्यामुळे  शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी आता थेट रक्कम डीबीटीद्वारे देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. 

    त्यानुसार प्रति लाभार्थी प्रति महिना दीडशे रुपये याप्रमाणे 1 हजार 800 रुपये वार्षिक देण्यात येणार आहे. यासाठीची तरतूद शासनाने या अर्थसंकल्पात केली आहे. त्याचा लाभ जानेवारी 2023 पासुन पूर्वलक्षी प्रभावाने शेतक-यांना देण्यात येणार आहे. 


 


       00000

Tuesday, March 21, 2023

विभागीय आयुक्तांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी

 






विभागीय आयुक्तांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी

पंचनामे तात्काळ पूर्ण करा

-विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

 

अमरावती, दि. 20 : अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे व्यवस्थित व काळजीपूर्वक करा. नुकसान भरपाईपासून एकही शेतकरी वंचित राहू नये, असे आदेश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज दिले.

अमरावती जिल्ह्यातील काही भागात शनिवार व रविवारदरम्यान (दि. 18 व 19 मार्च) अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे जिल्ह्यातील शेती व शेतमालाचे नुकसान झाले आहे. दोन दिवसात जिल्ह्यात सरासरी 14.5 मि. मी. पाऊस पडला.  तसेच अमरावती तालुक्यात 663.50 हे.आर शेतीचे नुकसान झाले. त्यात गहू, हरभरा, संत्रा पीकाचे नुकसान झाल्याचा अहवाल आहे. वडगांव माहोरे येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय व जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केली. यावेळी डॉ. पाण्डेय यांनी जिल्हा प्रशासनाला त्वरित कार्यवाही करण्याची सूचना दिली. जिल्हा प्रशासनामार्फत नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करुन पंचनामा करण्याची कार्यवाही सुरु आहे.

डॉ. पाण्डेय यांनी वडगांव माहोरे येथील पांडुरंग श्रीखंडे या शेतकऱ्याच्या शेतातील संत्री फळपीकाची पाहणी केली. शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यात येईल.  एकही  शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. त्यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच येथील अन्य शेतकऱ्यांच्या शेतातील वांगी, कांदा, गहू या पीकांचीही पाहणी केली.  यावेळी सरपंच माला माहोरे, तहसीलदार अविनाश काकडे, तालुका कृषी अधिकारी नीता कवाने, कृषी सेवक पल्लवी बंड तसेच शेतकरी, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

00000

 

'इन्फ्लूएंझा’बाबत परिस्थितीचा आढावा यंत्रणा सुसज्ज करा; तपासण्यांचे प्रमाण वाढवा - जिल्हाधिकारी पवनीत कौर

 





'इन्फ्लूएंझा’बाबत परिस्थितीचा आढावा

यंत्रणा सुसज्ज करा; तपासण्यांचे प्रमाण वाढवा

-      जिल्हाधिकारी पवनीत कौर

 

अमरावती, दि. 20 : जिल्ह्यात इन्फ्लुएंझाचे रूग्ण आढळून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर तपासण्यांचे प्रमाण वाढवावे. आवश्यक तिथे तत्काळ उपचारासाठी आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवा, असे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे दिले.

जिल्ह्यात उद्भवलेल्या इन्फ्लूएंझा संसर्ग एच -३ एन- २ आजाराविषयीची आढावा बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली महसूलभवनात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदाळे, डॉ. प्रमोद निरवणे, डॉ. सुभाष ढोले, डॉ. प्रशांत घोडाम, इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉ. विक्रम देशमुख, डॉ. प्रशांत ठाकरे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्रीमती कौर म्हणाल्या की,   बाधित रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत, यासाठी आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवावी.  रोज किमान एक हजार तपासण्या व्हाव्यात. औषधसाठा पुरेसा असल्याची खात्री करावी. लसीकरणाचा वेग वाढवावा. आवश्यक तिथे खासगी रुग्णालयांची मदत घ्यावी. इन्फ्लुएंझाची लक्षणे आढळल्यास वेळीच उपचार सुरु करावेत. तातडीने उपचार सुरु केल्यास रूग्ण लवकर बरा होण्यास मदत होते. याबाबत अधिक माहिती लोकांपर्यंत पोहचावी यासाठी जनजागृती करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले.

            कोविड 19, तसेच इन्फ्लूएंझाबाबतीत नियमित रुग्ण सर्वेक्षण, सहवासितांचे सर्वेक्षण आवश्यक आहे. विषाणूची लक्षणे दिसताच 72 तासांच्या आत डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतल्यास तो नियंत्रणात येऊ शकतो. ही माहिती सर्वदूर पोहोचविण्याचे आवाहनही त्यांनी केले.

मार्गदर्शक सूचना

    इन्फ्लूएंझाचे टाईप A, B आणि C, असे प्रकार आहेत. इन्फ्लूएंझा टाईप ‘ए’ चे उपप्रकार H1 N1, H2N2,H3 N2 असे आहेत. यात ताप, खोकला, घशात खवखव, धाप लागणे, न्यूमोनिया अशी लक्षणे आढळतात.

             यासंदर्भात काही मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत. यात, रुग्णाच्या सहवासात आल्यापासून दहा दिवसांत फ्ल्यू सारखी काही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा. सर्दी खोकला अंगावर काढू नका त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्याने फ्लूवरील औषध सुरु करावे. डॉक्टरांच्या सल्ल्याने सुरु केलेल्या उपचारा सोबतच गरम पाण्याची वाफ घ्यावी. खोकला असल्यास मास्क किंवा तीन पदर करुन हात रुमाल वापरावा. आजारी व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे, अशा सूचनांचा समावेश आहे.

00000

Monday, March 13, 2023

विभागीय लोकशाही दिनात 10 तक्रारींवर कार्यवाही

 




 

विभागीय  लोकशाही दिनात 10 तक्रारींवर कार्यवाही

         अमरावती, दि.13:  विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली  विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षात आज विभागीय लोकशाही दिन घेण्यात आला. यावेळी  प्रलंबित  8 तक्रारींचा आढावा घेण्यात आला. तसेच  नवीन वेळेवर आलेल्या 2 तक्रारी संबंधितांकडे पुढील कार्यवाहीसाठी सुपूर्द करण्यात आल्या.

उपायुक्त संजय पवार, एम. व्ही. प्रधान, श्री. कवडे, पोलीस उपअधीक्षक प्रदीप सूर्यवंशी, कामगार विभागाचे राहुल काळे, ठाणेदार राजीव साळवे यांच्यासह सहकार, आरोग्य, महापालिका, महिला व बाल विकास, भूमापन, लेखा व कोषागारे आदी विभागाचे अधिकारी  यावेळी  उपस्थित होते.

00000

 

Wednesday, March 8, 2023

जागतिक महिलादिनानिमित्त 119 महिलांचे मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण

 राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण व दृष्टीक्षिणता कार्यक्रम

जागतिक महिलादिनानिमित्त 119 महिलांचे

मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण

सर्वोकृष्ट नेत्र शल्य चिकित्सक म्हणून डॉ. नम्रता सोनवणे यांचा गौरव

अमरावती, दि. 8 : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा सामान्य रुग्णालय येथे 1 ते 8 मार्च या कालावधीत 119 महिलांचे मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्र विभागात दरवर्षी मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रिया करण्यात येतात. या आर्थिक वर्षात फेब्रुवारी अखेरपर्यंत 4 हजार 670 मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या.

मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रिया कार्याच्या यशस्वीतेबद्दल महिला दिनाचे औचित्य साधून नेत्र शल्य चिकित्सक डॉ. नम्रता सोनवणे यांना ‘जनऔषधी दिवस व ‘महिला आरोग्य दिनानिमित्त मुंबई येथे राज्यपाल व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांच्या हस्ते ‘सर्वोकृष्ट नेत्र शल्य चिकित्सक कार्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. नेत्र विभागाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांनी श्रीमती डॉ. सोनवणे तसेच नेत्र विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले.

जागतिक महिला दिनानिमित्त अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नरेंद्र सोळंके, अधिसेविका ललिता अटाळकर, आहारतज्ज्ञ कविता देशमुख, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक व जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक व जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ. संतोष भोंडवे, नेत्र शल्य चिकित्सक डॉ. कुणाल वानखडे, डॉ. दिप्ती उमरे, डॉ. अंकिता राऊत, विभाग प्रमुख विद्या भुसारे, नेत्र शस्त्रक्रियागृह प्रमुख प्रमिला कांबळे, नेत्र शल्यगृह परिचारिका सोनाली चांदेकर, कांचन सातार, सविता मुंदाणे, पल्लवी पेठे, मोनाली शिरभाते, आम्रपाली क्षीरसागर, गोपाल डागर, नेत्र कक्ष परिचर विरु चव्हाण, विक्की मोगरे, शुभांगी ढोके, रुपेश सोनगडे आदी उपस्थित होते.

नेत्र विभागातील नेत्र चिकित्सा अधिकारी भरत गोयनका, राजेंद्र फसाटे, मनोज देशमुख, अमित शिंदे, पूजा चव्हाण, निलेश ढेंगळे तसेच अतिदक्षता विभागाच्या प्रमुख परिचारिका मंदा ढगे, कालिंदी ढगे, मनिषा कांबळे, श्रीमती धाकडे, श्रीमती सारा, रेखा तेटू, श्रीमती लोणारे, शोभा पेंदाम, कांचन कटके आदी परिचारिका उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे संचालन आणि आभार सेवानिवृत्त नेत्र चिकित्सा अधिकारी गायत्री फडनीस यांनी केले. डॉ. नरेंद्र सोळंके यांनी महिला आरोग्याबद्दल घ्यावयाच्या दक्षतेबाबत यावेळी मार्गदर्शन केले.

0000





Friday, March 3, 2023

धान्य महोत्सव दालनातील सेंद्रीय धान्याला अमरावतीकरांची पसंती

 जिल्हा कृषी महोत्सव 2023

 

धान्य महोत्सव दालनातील सेंद्रीय धान्याला

अमरावतीकरांची पसंती

 

अमरावती, दि. 3 : कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेतर्फे (आत्मा), महिला आर्थिक विकास महामंडळ व कारितास इंडिया यांच्या सहकार्याने सायन्सकोर मैदानावर सुरु असलेल्या प्राकृतिक कृषी, मिलेटस् व जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचा आज तिसरा दिवस आहे. हा महोत्सव 5 मार्चपर्यंत चालणार आहे. यात भरडधान्यापासून तयार करण्यात आलेले पौष्टिक व चविष्ट पदार्थ, सेंद्रीय डाळी, धान्य, कृषी अवजारे  विक्रीस उपलब्ध आहेत. कृषी महोत्सवाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

धान्य महोत्सव दालन

जिल्हा कृषी महोत्सवाम


















ध्ये स्वतंत्ररित्या ‘धान्य महोत्सव दालन स्थापन करण्यात आले आहे. या दालनामध्ये केवळ अमरावती जिल्ह्यातीलच नाही तर विदर्भातूनही शेतकरी सेंद्रीय धान्य विक्रीस घेऊन आले आहे. या सेंद्रीय धान्याला नागरिकांकडून चांगली मागणी होत आहे. यामध्ये चनाडाळ, विनापॉलीश केलेली तुरीची डाळ, विविध वाणाचे तांदूळ उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागात तुरीच्या डाळीपासून तयार करण्यात येणारा चविष्ट ‘कळणा तसेच आरोग्यवर्धक ‘खपली गहू अमरावतीकरांना आकर्षित करीत आहे. येथे धारणी व मेळघाट भागातील कुटकी, सावा, कोदो, राजगिरा या पौष्टिक भरडधान्यापासून तयार पीठे, भाजणी पीठे यांची रेलचेल आहे. तसेच शेतीसाठी आवश्यक असणारे गांडूळ खत, वर्मी वॉश फवारणी द्रावण आणि परसातील बागेसाठी लागणारे उत्कृष्ट प्रतीचे नैसर्गिक खतेही उपलब्ध आहेत.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, गणोरी, ता. भातकुली येथील बचतगटामार्फत ग्रामीण भागात प्रसिध्द असणारी ‘चणोली ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. तसेच येथे अद्रक, विलायची टाकलेला स्वादयुक्त गुळाची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. जळगाव येथून आलेले केळीचे चिप्स तसेच ‘सुकेळी, रोस्टेड ज्वारी यांनाही चांगली मागणी आहे. याशिवाय विनारंगाची नैसर्गिक हळद पावडर घरीच तयार करण्यासाठी हळदीचे तुकडेही उपलब्ध आहेत. या दालनामध्येच नैसर्गिक रंगापासून तयार केलेले कुंकू, अगरबत्ती, धूपबत्ती यांचेही स्टॉल्स आहेत.

 

शेतकऱ्यांना मदतनीस ठरणारी शेती उपकरणे

          जिल्हा कृषी महोत्सवामध्ये शेती उपकरणाचे स्वतंत्र दालन आहे. यामध्ये नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित शेती उपकरणे शेतकऱ्यांना प्रात्याक्षिकासह दाखविण्यात येत आहे. तसेच विक्रीसही उपलब्ध आहे. ‘पॉवर वीडर या यंत्राव्दारे शेतीतील आंतरमशागतीचे काम करणे सुलभ होते. यामध्ये डवरणे, खुरपणी, रोटाव्हेटर, फवारणी यासारखी कामे करता येतात.  यावर शेतकऱ्यांना सबसिडीही मिळते. येथे शेती कामास सहाय्य ठरणारे विविध आकाराचे ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांना प्रात्याक्षिकांसाठी ठेवण्यात आले आहे. तसेच शेती कामांसाठी उपयुक्त असणारे ‘इलेक्ट्रीक मिनी ट्रॅक्टर शेतकऱ्यांसह नागरिकांचेही लक्ष वेधून घेत आहे. शेतीच्या कामाव्यतिरीक्त मिनी ट्रॅक्टर इलेक्ट्रीक बाईक म्हणूनही वापरता येते.

          या महोत्सवाला केवळ दोन दिवस उरले असून जास्तीत जास्त शेतकरी तसेच नागरिकांनी या महोत्सवाला भेट देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

00000

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...