उर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या डावा- उजवा कालवा सल्लागार समितीची बैठक
प्रकल्पाच्या 22 शाखांच्या आकृतीबंधाबाबत तात्काळ कार्यवाही करावी
- पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील
अमरावती, दि. 2 : उर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या पाणी वितरणासाठी आवश्यक 22 शाखांचा आकृतीबंध मंजूर करण्यासाठी सचिवस्तरीय बैठक घ्यावी, त्याचप्रमाणे या शाखांबाबतची कार्यवाही लोकप्रतिनिधींना वेळोवेळी कळवावी, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी आज येथे दिले.
उर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या उजवा व डावा कालवा सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री श्री. पोटे- पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, आमदार वीरेंद्र जगताप, आमदार यशोमती ठाकूर, समितीचे सदस्य विजय मुळे, प्रकाश टेकाडे, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, अधिक्षक अभियंता र.कृ. ढवळे, कार्यकारी अभियंता प्र.पु. पोटफोडे आदी उपस्थित होते.
श्री. पोटे- पाटील म्हणाले की, प्रकल्पाच्या 22 शाखांचे काम मार्गी लागण्याबाबत मुख्य अभियंत्यांनी तातडीने कार्यवाही करावी. या कामांची माहिती लोकप्रतिनिधींना वेळोवेळी दिली पाहिजे. कालव्याचा विसर्ग मोठ्या गतीने होतो. त्यामुळे कुणी पडून दुर्देवी अपघात घडल्यास पाणी थांबविण्यात येते. त्यामुळे शेतक-यांचेही नुकसान होते. त्यामुळे आवश्यक ठिकाणी सुरक्षिततेसाठी जाळ्या बसविण्यात याव्यात. कालव्यांवर वाढलेल्या बाभळी, तणकट आदी साफ करण्याची कार्यवाही गतीने करावी, तसेच त्यासाठी उपलब्ध यंत्रे जलयुक्त शिवार आदी कामांसाठी वापरु नये. आवश्यक तिथे पाईपलाईन देताना सुरक्षिततेसाठी शेतक-यांसोबत समन्वय ठेवावा, असे निर्देशही त्यांनी दिले.
प्रकल्पाचा अधिक लाभ मिळविण्यासाठी नगदी पीकांचे क्षेत्र वाढविणे व पीक प्रक्रिया उद्योगांना चालना मिळणे यासाठी व्हावेत, अशी सूचना आमदार श्री. जगताप यांनी केली.
सद्य:स्थितीत 97 पाणी वापर संस्था आहेत. त्या संपूर्ण सक्षमतेने कार्यरत व्हाव्यात. यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचे श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.
जिल्ह्यात पूर्वमान्सून पिकांचे क्षेत्र वाढून शेतक-यांना लाभ मिळण्यासाठी पूर्वमान्सून पाणी सोडता येईल किंवा कसे, याबाबत एप्रिलमध्ये बैठक घेण्यात यावी. जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांनीही समितीच्या बैठकांना उपस्थित राहण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
00000
Comments
Post a Comment