Friday, November 29, 2024

DIO NEWS AMRAVATI 29.11.2024

 

कुष्ठरोगाबाबत  अमरावतीत कार्यशाळा

        अमरावती, दि. 29 (जिमाका): कुष्ठरोगाविषयी समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी मंगळवार, दि. 17 ‍डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता ‘कुष्ठरोग जनजागृती आणि मानवअधिकार’ विषयावर  दोन दिवसांची कार्यशाळा हॉटेल ग्रेस इन येथे आयोजित केली आहे. सदर कार्यशाळेचे आयोजन आंतरराष्ट्रीय कुष्ठ निवारण संस्था, पुणे यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

00000

स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्यास रविवारपर्यंत मुदतवाढ

            अमरावती, दि. 29 (जिमाका): शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी रविवार, दि. 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन  करण्यात आले आहे.

अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसल्यास विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधांसाठी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट लाभ जमा करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येते. योजनेचे निकष व अटी पोर्टलवर उपलब्ध आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा विहित नमुना hmas.mahait.org वर उपलब्ध आहे.

परिपूर्ण कागदपत्रासह महाविद्यालयातील समानसंधी केंद्रामार्फत सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामध्ये दि. 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी सामाजिक न्याय भवन, सहायक आयुक्त, समाज कल्याण, अमरावती, तसेच speldswo_amt@rediffmail.com व दुरध्वनी क्रमांक 0721-2661261 यावर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.

00000

एकलव्य शाळेतील प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 29 (जिमाका): , चिखलदरा व धारणी येथील एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कुलमध्ये येत्या शैक्षणिक वर्षात आदिवासी क्षेत्रातील अनुसूचित जमाती, आदीम जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात सहावीच्या सीबीएससी  माध्यम, तसेच सातवी ते नववीच्या वर्गातील अनुशेष भरून काढण्यासाठी प्रवेशपूर्व परीक्षा घेऊन प्रवेश देण्यात  येणार आहे. शासकीय, अनुदानित आश्रमशाळा, सर्व जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका शाळा तसेच इतर शाळेत सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात पाचवी ते आठवीत प्रवेशित असलेले विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न सहा लक्षापेक्षा जास्त नसावे.यासाठी परीक्षा दि. 25 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 ते 2  या कालावधीत आश्रमशाळेच्या ठिकाणी घेण्यात येईल.

शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत प्रवेश अर्ज प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी, अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती येथे स्वीकारल्या जाणार आहेत. तसेच प्रवेश अर्ज सर्व शासकीय, अनुदानित आश्रमशाळा व एकलव्य रेसिडेंशिल स्कुल, चिखलदरा येथे उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी यांचे दुरध्वनी क्रमांक 07226-224217 तसेच 9370593558 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणीच्या प्रियंवदा म्हाडदळकर यांनी केले आहे.

00000

 सोमवारी जिल्हा लोकशाही दिन

            अमरावती, दि. 29 (जिमाका) : जिल्हा लोकशाही दिन सोमवार, दिनांक 2 डिसेंबर 2024 रोजी सकाळी  11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी संबंधितांनी अहवालासह व्यक्तिश: उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक  यांनी केले आहे.

00000

ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधनासाठी आधार पडताळणी करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 29 (जिमाका): राजर्षी शाहू महाराज  ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना मानधनात डीबीटी द्वारे अदा करण्यात येत आहेत. यासाठी लाभार्थ्यांनी आधार क्रमांकाची पडताळणी दि. 13 डिसेंबर 2024 पुर्वी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 आधार पडताळणी करण्यासाठी mahakalasanman.org/AdharVerification.aspx या लिंकवर आाधार व्हेरिफिकेशन करावे. आधार क्रमांक पडताळणी केली नसल्यास  लाभार्थी मानधनापासून वंचित राहतील. तसेच आधार क्रमांक अद्यावत करून बँक खात्याशी संलग्न करून व दुरध्वनी क्रमांक बँक खात्याशी संलग्न असल्याची खात्री करावी, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जिल्हा परिषदचे बालासाहेब बायस यांनी केले आहे.

00000 

पाच लाख बालकांना जंतनाशक गोळी वितरीत होणार

*बुधवारी जंतनाशक दिन राबविणार

अमरावती, दि. 29 (जिमाका) : जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत बुधवार, दि. 4 डिसेंबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन राबविण्यात येणार आहे. या दिवशी 1 ते 19 वर्षातील मुलांना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. जिल्ह्यात 5 लाख 19 हजार 239 लाभार्थ्यांना बुधवारी जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे.

राष्ट्रीय जंतनाशक दिन दि. 4 डिसेंबर आणि मॉप अप दिन दि. 10 डिसेंबर रोजी राबविण्यात येणार आहे. यात 1 ते 19 वर्ष वयोगटातील सर्व मुला-मुलीना जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावण्यात येणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण पारिसे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय जंतनाशक दिन राबविला जाणार आहे. या मोहिमेत 1 ते 2 वर्षे वयोगटातील बालकांना अर्धा गोळीची मात्रा पावडर करून दिली जाणार आहे, तर 2 ते 19 वर्षे वयोगटातील सर्वांना एक गोळी चावून खावी लागणार आहे. ही मोहिम सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, अंगणवाडी, शाळाबाह्य मुलांमध्ये राबविण्यात येणार आहे.

या गोळीचा फायदा रक्ताशय अॅनिमिया कमी होतो, शाळेतील उपस्थिती नियमित होते, बालक क्रियाशील बनते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते, शारीरिक व बौद्धीक वाढ सुधारते, आरोग्य चांगले राहते, अल्बेंडेझोलच्या एका डोसमुळे जंताचा नाश होतो. या गोळीचा दुष्परिणाम नाही, ही गोळी प्रत्यक्ष खाऊ घालायची आहे. ती घरी घेऊन जाता येणार नाही. शाळाबाह्य मुलांना आशा स्वयंसेविकेमार्फत गोळीचे वाटप करण्यात येणार आहे. पालक, शिक्षक, संस्थानी मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

0000







क्रीडा क्षेत्राला प्रशासनाची सर्वतोपरी मदत

-जिल्हाधिकारी सौरभ कटियार

अमरावती, दि. 29(जिमाका) : जिल्ह्यात क्रीडा संस्कृतीचा विकास होणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे पूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिली.

हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात जिल्हा प्रशासनातर्फे नेमबाजीचे अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष श्रीकांतराव चेंडके, सचिव माधुरी चेंडके, शासकीय ज्ञान विज्ञान संस्थेचे संचालक सतिश माळोदे, डॉ. एस. एस. कुमार, डॉ. एस. सी. देशपांडे, प्राचार्य श्रीनिवास देशपांडे आदी उपस्थित होते.

श्री. कटियार यांनी, देशामध्ये आज क्रिडा क्षेत्रात मोजक्या चांगल्या संस्था कार्यरत आहे. यात एचव्हीपीएमचे नाव आहे. संस्थेचा जुना इतिहास आहे. संस्थेने परंपरा आणि आदर्श कायम ठेवली आहे. संस्थेने नेमबाजीसाठी सुविधा निर्माण करून दिली आहे. त्यामुळे प्राविण्यप्राप्त खेळाडू तयार होऊन पदके प्राप्त करीत आहे. प्रशासन खेळाडूंना चांगल्या सुविधा प्राप्त करून देण्यासाठी कटिबद्ध आहे. खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट प्रदर्शन करून पदके प्राप्त करून संस्थेला गौरव प्राप्त करून द्यावा, असे आवाहन केले.

श्री. माळोदे यांनी संस्थेने नेमबाजीसाठी कमी वेळेत कायापालट करून खेळाडूंसाठी सुविधा निर्माण केली आहे. संस्थेने मिशन ऑलिंपिकचे उद्दिष्ट ठेवले आहे, यासाठी पूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले.

श्रीमती चेंडके यांनी प्रास्ताविकातून सर्वांच्या मदतीने नेमबाजीची सुविधा निर्माण झाली आहे. या खेळासाठी उपलब्ध असलेल्या सुविधेतून खेळाडूंनी नेत्रदिपक यश मिळविले आहे. यानंतरही संस्थेतर्फे खेळाडूंना चांगल्या सुविधा देण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच अत्याधुनिक साहित्य देण्यात आल्याबद्दल आभार मानले.

यावेळी जान्हवी मानतकर यांच्यासह विविध स्पर्धांमध्ये पदकप्राप्त खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. आनंद महाजन यांनी सूत्रसंचालन केले.

00000


Thursday, November 28, 2024

DIO NEWS AMRAVATI 28.11.2024

 











सक्रीय जनसहभागाने मतदानाच्या टक्केवारीत वाढ

-जिल्हाधिकारी सौरभ कटियार

*स्वीपमध्ये सहभागी संस्था, संघटना, नागरिकांचा सत्कार

अमरावती, दि. 28 : जिल्ह्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी सक्रीय सहभाग नोंदवत उत्साहात मतदान केले. याचा परिणाम म्हणून जिल्ह्याच्या मतदानाच्या टक्केवारीत सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. मतदारांमध्ये जनजागृती आणि मतदान करण्याचा चांगल्या अनुभवामुळे या टक्केवारीत वाढ झाल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.

जिल्हा परिषदेत स्वीप उपक्रमांतर्गत सक्रीय सहभाग नोंदविलेल्या संस्था, संघटना, शासकीय यंत्रणा, मतदारसंघात उत्कृष्ट कार्य करणारे प्रतिनिधी, माध्यमांचे प्रतिनिधी यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, सहायक जिल्हाधिकारी अमर राऊत, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी, मतदान करायला आलेल्यांना चांगला अनुभव येणे आवश्यक आहे. यासाठी प्रशासनाने मतदान केंद्र स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, दिव्यांगांसाठी विशेष व्यवस्था केली. निवडणुकीचे सुनियोजन करण्यात आल्यामुळे संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पडली. जनजागृती, हेल्पलाईन, सायकल रॅली अशा विविध उपक्रम ग्रामपातळी ते शहरी भागापर्यंत केल्याने नागरिकांना प्रोत्साहित केले. पोलिस, महापालिका, ग्रामपंचायत, माजी सैनिक, महिला, आशासेविका, सामाजिक संस्था, संघटना, पत्रकार यांच्या सहकार्यामुळे मतदार आणि प्रशासन यांच्यात दुहेरी संवाद झाला. प्रशासनाने केलेल्या तयारीमुळे विधानसभा निवडणुकीत कोणतीही तक्रार प्राप्त झाली नसल्याचे सांगितले.

श्री. कलंत्रे यांनी मतदान प्रक्रियेत अनेक बदल होत असतानाही मतदारांनी गेल्या 73 वर्षात लोकशाहीवर विश्वास ठेवला आहे. यामुळे मतदारांचे अभिनंदन करणे योग्य राहिल. विधानसभा निवडणुकीत सर्वांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाल्याचे सांगितले.

श्रीमती महापात्र यांनी प्रास्ताविकातून नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आला. यात त्यांना सहभागी करून घेण्यात आले. स्वीपमध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमांना जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनामुळे अधिक प्रभावीपणे ही मोहिम राबविण्यात आली. या राष्ट्रीय कर्तव्यात प्रशासनाने केलेल्या जनजागृतीमुळे जिल्ह्यात शांततेत मतदान पार पडले. शहर ते ग्रामीण भागातील जनजागृतीच्या उपक्रमात सर्व यंत्रणांनी योगदान दिले.

000000


सामाजिक दायित्वातून आरोग्य, शिक्षण क्षेत्राला मदत करावी

-जिल्हाधिकारी सौरभ कटियार

*जिल्हा शल्यचिकित्सकांकडे वैद्यकीय उपकरणे सुपूर्द

अमरावती, दि. 28 : जिल्ह्यात सामाजिक उत्तरदायित्वातून देण्यात येणारी मदत ही प्रामुख्याने आरोग्य आणि शिक्षण क्षेत्राला मदत करणारी असावी, तसेच येत्या काळात सीएसआरमधून मदत करताना जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधल्यास प्रामुख्याने ज्या बाबींसाठी राज्य शासनाचा निधी येत नाही, अशी उपकरणे आणि सुविधा निर्माण करण्यास मदत होईल, असे मत जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी व्यक्त केले.

एनएक्सटी इन्फ्रातर्फे जिल्हा शल्य चिकित्सक यांना पाच व्हेंटीलेटर, ईसीजी मशिन आणि इतर वैद्यकीय उपकरणे सुपूर्द करण्यात आली. जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, एमएस एनएक्सटी इन्फ्राचे थानगिल्ला मुरली, हरीश सिंग उपस्थित होते.

एनएक्सटी इन्फ्रातर्फे जिल्ह्यात रस्त्यांचे प्रकल्प पूर्ण केले आहेत. या प्रकल्पांतर्गत सीएसआर निधीतून आरोग्य सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला. यातून पाच व्हेंटीलेअर, ईसीजी मशिन आणि इतर वैद्यकीय उपकरणे देण्यात आली आहे. या वैद्यकीय उपकरणांतून जिल्हा रूग्णालयात रूग्णांना सुविधा मिळणार आहे. येत्या काळातही कंपनीने सीएसआरमधून आरोग्यासह शिक्षण क्षेत्रातही योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी केले.

000000

Wednesday, November 27, 2024

DIO NEWS AMRAVATI 27.11.2024

 

विकसित भारत यंग लिडरर्स डायलॉग स्पर्धेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 27 (जिमाका): राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन 12 ते 16 जानेवारी 2025 या कालावधीत दिल्ली येथे होणार आहे. या अनुषंगाने राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी विकसित भारत यंग लिडरर्स डायलॉगसाठी  माय भारत पोर्टलवर नोंदणी करून स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय व शालेय शिक्षण व साक्षरता विभाग भारत सरकार यांनी केले आहे.

भारत निर्माणासाठी नवीन संकल्पना विचारात घेवून युवांना राष्ट्र निर्माण कार्यामध्ये सहभागी करून राष्ट्रीय युवा महोत्सव अंतर्गत विकसित भारत यंग लिडरर्स  डायलॉग अंतर्गत विविध संकल्पना निश्चित करण्यात आल्या आहेत.

 प्रथम टप्प्यात विकसित भारत क्विझमध्ये वैयक्तिकरित्या स्पर्धकांना सहभागी होता येईल. प्रश्न मंजुषा स्पर्धा, सामान्यज्ञान व भारताची कामगिरी या बाबींवर ही स्पर्धा होणार आहे. यासाठी माय भारत पोर्टलवर शैक्षणिक संस्था व महाविद्यालयांनी सहभाग नोंदवावा. या स्पर्धा दि. 25 नोव्हेंबर 5 डिसेंबर 2024 या कालावधीत होणार आहे.

व्दितीय टप्प्यात विकसित भारत यावर निबंध लेखन स्पर्धा घेतली जाईल. निबंध स्पर्धा ऑन लाईन पध्दतीने  दि. 8 ते 15 डिसेंबर 2024  या कालावधीत होणार आहे.

 तृतीय टप्प्यात विकसित भारत  पीपीटी चॅलेंजवर निर्धारित विषयांवर राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा घेण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक राज्यातून 4 युवांची निवड करण्यात येणार आहे. दि 20 ते 26 डिसेंबर कालावधीत या स्पर्धा होणार आहेत.

चतुर्थ टप्प्यात राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी निवड झालेल्या युवांना दि. 11 जानेवारी 2025 रोजी सादरीकरण करावे लागेल. जिल्ह्यातील 15 ते 29 वर्षाआतील  युवक व युवतींनी माय भारत पोर्टलवर नोंदणी करून स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

00000

 

आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत

सोयाबीन खरेदी केंद्र सुरु

अमरावती, दि. 27 (जिमाका): हंगाम 2024-25साठी केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत सोयाबीन खरेदी केंद्र हमीभाव रूपये 4 हजार 892 या दराने अमरावती जिल्ह्यामध्ये जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्यामार्फत 9 ठिकाणी तर विदर्भ को-ऑप मार्केटिंग फेडरेशन लिमिटेट, नागपूर (व्ही. सी.एम. एफ) यांच्यामार्फत 11 ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहेत.

जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्यामार्फत अचलपूर, सहकारी शेतकी खरेदी विक्री सहकारी संस्था, अचलपूर, चांदूर रेल्वे, सहकारी शेतकी खरेदी विक्री सहकारी संस्था, चांदुर रेल्वे, दर्यापूर, सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्था, दर्यापूर, खल्लार, सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्था, अंतर्गत खल्लार, धारणी, सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्था, धारणी, नांदगाव खंडेश्वर, सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्था, नांदगाव खंडेश्वर, तिवसा, सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्था, तिवसा, अचलपूर, मे. जयसिंग विविध कार्यकारी सहकारी संस्था, अचलपूर, नेरपिंगळाई, विविध कार्यकारी सहकारी संस्था, नेरपिंगळाई येथे असे 9 केंद्र सुरु करण्यात आलेली आहेत.

तसेच विदर्भ को-ऑप मार्केटिंग फेडरेशन लिमिटेट नागपूर यांचे मार्फत एकुण 11 केंद्र सुरु करण्यात आली आहेत.

            अमरावती, सहकारी शेतकी विक्री सहकारी संस्था, अमरावती, धामणगाव रेल्वे, सहाकारी शेतकी खरेदी विक्री संस्था, धामणगाव रेल्वे, वरूड, सहकारी शेतकी खरेदी विक्री सहकारी संस्था, वरूड, मोर्शी, सहकारी शेतकी खरेदी विक्री सहकारी संस्था, वरूड, मोर्शी, सहकारी शेतकी खरेदी विक्री सहकारी संस्था, मोर्शी, चांदुर बाजार, सहकारी शेतकी खरेदी विक्री सहकारी संस्था, चांदूर बाजार, अंजनगाव सुर्जी , सहकारी शेतकी खरेदी विक्री सहकारी संस्था, अंजनगाव सुर्जी, शिंगणापूर, विविध कार्यकारी सहकारी संस्था, शिंगणापूर ता. दर्यापूर, येवदा, एफ. पी. ओ. गणेशपूर ता. दर्यापूर, भातकुली, एफ. पी. ओ. भातकुली ता. भातकुली, कापूसतळणी, एफ. पी. ओ. कापूसतळणी ता. अंजनगाव सुर्जी येथे ही केंद्र आहेत.

            वरील प्रमाणे सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत. या खरेदी केंद्रावर सोयाबीन शेतमाल दि. 12 जानेवारी 2025 पर्यंत खरेदी करण्यात येणार असून नोंदणी सद्यस्थितीमध्ये सुरू आहे. ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंद असलेला 7/12 उतारा पिकाच्या नोंदीसहीत, चालू वर्षाचा जमिनीचा 8-अ, आधारकार्ड व आधार लिंक असलेले बँक पासबुक इत्यादी कागदपत्रे सोबत आणावयाची आहेत. या खरेदी केंद्रावर केवळ एफ. ए. क्यु. दर्जाचा शेतमाल विक्रीसाठी आणावयाचा असून शेतमालाचे प्रतवारीचे निकष खालीलप्रमाणे आहेत.

            माती, काडीकचरा, बाह्यप्रदार्थ 2 टक्के, इतर मिश्रण 3 टक्के, इजा पोहोचलेले दाणे 3 टक्के, किरकोळ इजा पोहोचलेले दाणे 4 टक्के, अपरिपक्व दाणे 3 टक्के, कीड लागलेले दाणे 4 टक्के, आद्रता 12 टक्के. तरी सर्व शेतकरी यांनी याची नोंद घेऊन वाळलेला  व आद्रता 12 टक्के पर्यंत असलेला सोयाबीन शेतमाल खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावा व शासनाचे योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थाचे शंकर कुंभार यांनी केले आहे.

000000

 

Tuesday, November 26, 2024

DIO NEWS AMRAVATI 26.11.2024


 

जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेचे वाचन

अमरावती, दि. 26 :  संविधानिक मुल्यांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने आज सकाळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवनात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.

अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर,  उपजिल्हाधिकारी महसूल विजय जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताने संविधान स्वीकारले. या घटनेला आज 75 वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय संविधान व त्यातील मूल्य, हक्क-अधिकार व कलम यासंबंधी जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी उपस्थितांना माहिती दिली.

00000

अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना विनामूल्य स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण

*शुक्रवारी मुलाखतीचे आयोजन

अमरावती, दि. 26 : अचलपूर येथील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, माहिती व मार्गदर्शन केंद्रातर्फे आदिवासी उमेदवारांकरीता विनामूल्य स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येते. यासाठी शुक्रवार, दि. 29 नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.

शासनाच्‍या विविध पदांसाठी होणाऱ्या स्पर्धा परिक्षेकरीता आदिवासी उमेदवारांची विनामूल्य प्रशिक्षणाद्वारे तयारी करुन घेण्यात येते. या सत्राचा प्रशिक्षण कालावधी दि. १ डिसेंबर ते १५ मार्च २०२५ पर्यंत साडेतीन महिन्याचा राहणार आहे. या कालावधीत प्रशिक्षणार्थींना दरमहा एक हजार रूपये विद्यावेतन देण्यात येणार आहे.

प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी चार पुस्तकांचा संच विनामूल्य देण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी अनुसूचित जमातीच्या उमेदवारांनी अर्ज सादर केले आहे. यातून उमेदवारांची निवड करण्यासाठी शुक्रवारी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. अचलपूर येथील आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रात मुलाखती घेण्यात येणार आहे. या मुलाखतीला उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह उपस्थित राहावे. निवडयादी सायंकाळी ५ वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी 07223-221205, ७७०९४३२०२४ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा, वय १८ ते ३० दरम्यान असावे, उमेदवार किमान एसएससी उत्तीर्ण असावा, उमेदवाराचे नाव जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयात नोंदणी केलेली असावी.

यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र, एसएससी उत्तीर्णची गुणपत्रिका, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयात नोंदणी प्रमाणपत्र, उमेदवाराचा पासपोर्ट फोटो ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

00000


Monday, November 25, 2024

DIO NEWS AMRAVATI 25.11.2024

 



राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची अडसड कुटुंबियांना भेट

अमरावती, दि. 25 (जिमाका) : राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी आज अरुणभाऊ अडसड यांच्या कुटुंबियांना सदिच्छा भेट दिली.

राज्यपाल श्री. बागडे यांनी गनेडीवाल ले-आउट येथील अडसड यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी श्री. अडसड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. अडसड कुटुंबियांच्या वतीने श्री. बागडे यांचे औक्षवण करण्यात आले. तसेच शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या भेटीनंतर ते नागपूरकडे रवाना झाले.

0000

बालकांचे बँकखाते आधार सिडिंग करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 25 (जिमाका) : महिला व बाल विकास विभागातर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपण योजना राबविण्यात येते. या येाजनेच्या लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे लाभ देण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थ्यांनी बालकांचे बँकखाते आधार सिडिंग करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

योजनेचा लाभ प्राप्त होत असलेल्या दहा वर्षाच्या आत असलेल्या बालकांचे पालकांसोबत संयुक्त खाते उघडून सदर खात्याशी बालकाचा आधार क्रमांक सिडिंग करावा. तसेच बालकांचे वय दहा वर्षापेक्षा अधिक असल्यास स्वतंत्र बँक खाते उघडून आधार क्रमांक सिडिंग करावा. बालकाचा आधार क्रमांक बँक खात्याशी सिडिंग नसल्यास सदर योजनेचा लाभ जमा होणार नाही, याची लाभार्थ्यांच्या पालकांनी नोंद घ्यावी. याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, महिला व बाल विकास भवन, राणी दुर्गावती चौक, गर्ल्स हायस्कुलजवळ, अमरावती येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला बालविकास अधिकारी डॉ. उमेश टेकाळे यांनी केले आहे.

00000



पशूपालकांनी पशूगणनेस सहकार्य करावे

-जिल्हाधिकारी सौरभ कटियार

*राज्यात 21व्या पशूगणनेस सुरवात

*माहिती पुस्तिकेचे विमोचन

अमरावती, दि. 25 (जिमाका) : आजपासून राज्यातील पशूगणनेला सुरवात झाली आहे. सांख्यिकी माहितीसाठी ही पशूगणना अचूक होणे आवश्यक आहे. त्यामुळे पशूगणनेसाठी पशूपालक, गौशाळाचालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.

जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची सभा आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, जिल्हा पशूसंवर्धन उपआयुक्त डॉ. संजय कावरे, महानगरपालिका उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, परिवहन विभागाचे सिद्धार्थ ठोके यांच्यासह अशासकीय सदस्य उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी, पशूची सांख्यिकी माहिती व्हावी, यासाठी दर पाच वर्षांनी पशूगणना होते. यासाठी प्रगणकाची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी पशूपालकांनी सहकार्य करावे, तसेच जिल्ह्यात जनावरांचे 100 टक्के रोगप्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे. तसेच अशासकीय सदस्यांना कामकाजासाठी कार्यालयात जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच बँक खातेही उघडण्यात आले आहे. त्यामुळे समितीचे कामकाज करणे सुलभ होणार आहे.

पोलिस विभागातर्फे गेल्या कालावधीत पकडलेल्या जनावरांची माहिती सादर करण्यात आली. यात 586 जनावरे जप्त करण्यात आली असून 65 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी जप्त केलेली जनावरे नोंदणीकृत असलेल्या गौशाळेत देण्यात यावी. यामुळे त्यांचे पोषण योग्यप्रकारे होण्यास मदत मिळेल. नोंदणी केलेल्या गौशाळांना 20 लाख रूपये अनुदान आणि प्रती जनावरामागे प्रतिदिन 50 रूपये अनुदान‍ मिळणार आहे. पोलिसांनी गौवंश वाहतूक केलेली वाहने जप्त करून परिवहन विभागाच्या मदतीने वाहनाचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करावी. तसेच वन विभानानेही त्यांच्याकडील पकडलेली जनावरे नोंदणीकृत गौशाळेला देण्याची कार्यवाही करावी, असे सांगितले. यावेळी उपस्थितांच्या हस्ते माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.

00000

Friday, November 22, 2024

DIO NEWS AMRAVATI 22.11.2024

                                              निवडणुक निरीक्षक (मतमोजणी) यांचे शहरात आगमन

अमरावती, दि. 22 (जिमाका):  विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार, दि. 20 नोव्हेंबर रोजी उत्साहात मतदान पार पडले. मतमोजणी उद्या, शनिवार, दिनांक 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे.  38- अमरावती विधानसभा मतदार संघासाठी निवडणुक निरीक्षक (मतमोजणी) सौरभ स्वामी यांचे शहरात आगमन झाले आहे.

00000

निवडणुक निरीक्षक (मतमोजणी) यांचे शहरात आगमन

अमरावती, दि. 22 (जिमाका):  विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार, दि. 20 नोव्हेंबर रोजी उत्साहात मतदान पार पडले. मतमोजणी उद्या, शनिवार, दिनांक 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे.  37- बडनेरा विधानसभा मतदार संघासाठी निवडणुक निरीक्षक (मतमोजणी) प्रांजल हजारीका यांचे शहरात आगमन झाले आहे.

00000

लोकशाही भवनात मतमोजणीची तयारी पूर्ण

*अमरावती, बडनेरा मतदारसंघाची मतमोजणी

अमरावती, दि. 22 (जिमाका) : विद्यापीठ रस्त्यावरील लोकशाही भवनात अमरावती आणि बडनेरा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे. पोस्टल बॅलेट, ईटीपीबीएमएस आणि ईव्हीएम वरील मतमोजणीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार पडल्यानंतर शनिवार, दि. 23 नोव्हेंबर 2024 मतमोजणी होणार आहे. यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आली आहे. अमरावती विधानसभा मतदारसंघातील 345 आणि 23 सहायक मतदानकेंद्रावर मतदान घेण्यात आले आहे. या सर्व मतदानकेंद्रावर ईव्हीएमद्वारे झालेले मतदान मतमोजणीकरीता प्रत्येक फेरीसाठी 14 टेबल, तसेच पोस्टल मतपत्रीकेची मतमोजणी करण्याकरीता 10 आणि ईटीपीबीएमएसकरीता 1 याप्रमाणे व्यवस्था करण्यात आली आहे.

            मतमोजणी वेळी याठिकाणी गर्दी होणार असल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निवडणूक आयोगामार्फत सौरभ स्वामी यांची मतमोजणी निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मतमोजणी निरीक्षक मतमोजणी प्रक्रियेवर नियंत्रण ठेवून त्याची पाहणी करतील. मतमोजणीची माहिती देण्यासाठी मिडीया कक्ष स्थापन करण्यात आला आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल भटकर यांनी कळविले आहे.

00000


जिल्हाधिकाऱ्यांकडून मतमोजणी केंद्राची पाहणी

अमरावती, दि. 22 : विधानसभा निवडणुकीसाठी लोकशाही भवनात मतमोजणी होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पाडावी, यासाठी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी मतमोजणी केंद्राला भेट देऊन आवश्यक असलेल्या तयारीची पाहणी केली.

मतमोजणी केंद्राला त्री-स्तरीय सुरक्षा पुरवण्यात आली आहे. शनिवार, दि. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणीच्या दिवशी कोरडा दिवस घोषित करण्यात आला आहे. तसेच शस्त्राचा वापर प्रतिबंधित करण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उमेदवार किंवा उमेदवाराचे प्रतिनिधी आणि मतमोजणी अधिकारी, कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही मतमोजणी स्थळाच्या 100 मीटर परिसराच्या आत प्रवेश देण्यात येणार नाही. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना अधिकृत पास दाखविल्याशिवाय प्रवेश देण्यात येणार नाही.

लोकशाही भवनात मतमोजणी होणार असल्यामुळे बियाणी चौक ते विद्यापीठ रस्यासेवरील वाहतूक रस्ता वळविण्यात आली आहे. मतमोजणीच्या ठिकाणी झेरॉक्स, फॅक्स, ई-मेल इतर संपर्क साधनांच्या वापरावर प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच शंभर मीटर परिसरामध्ये मोबाईल फोन, वायरलेस सेट, ट्रांजिस्टर, कॅलक्युलेटर आदी प्रकारच्या साधनांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. मतमोजणी केंद्रापासून शंभर मीटरचा परिसर हा पादचारी क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. या परिसरात निवडणूक कामाव्यतिरिक्त इतर वाहनांना प्रवेश देण्यात येणार नाही. सदर आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार कारवाई करण्यात येणार आहे,

00000

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...