मतदान केंद्रावर सर्व सुविधा पुरवाव्यात
-जिल्हाधिकारी सौरभ कटियार
अमरावती, दि. 16 : जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील
निवडणुकी पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता यंत्रणांनी फक्त मतदानावर लक्ष केंद्रित
करावे. मतदान केंद्रावर मतदानासाठी येणाऱ्या मतदारांना सुखद अनुभव देण्यासाठी आवश्यक
सर्व सुविधा पुरवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी सर्व कट्यार यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक आढावा घेण्यात आला. यावेळी
अतिरिक्त जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांच्यासह
सर्व निवडणूक निर्णय अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी, निवडणुकीसाठी ठरविण्यात
आलेल्या मतदान केंद्राची पाहणी करण्यात यावी. याठिकाणी परिसर स्वच्छ ठेवणे, शेड, पाणी,
स्वच्छतागृह यासह विजेची पुरेशी व्यवस्था असल्याबाबत खात्री बाळगण्यात यावी. या बाबींसाठी
तातडीने सर्व मतदान केंद्राची पाहणी करण्यात यावी. मतदान केंद्रावर सर्व सुविधा पुरविण्यात
याव्यात. यामुळे नागरिकांना मतदान करताना करणे सुकर होईल.
मतदानादरम्यान
दि. 19 ते 21 नोव्हेंबर दरम्यान विविध अहवाल द्यावयाचे असतात. याची पूर्वतयारी आधीच
करून ठेवण्यात यावी. अहवाल सादर करण्याची जबाबदारी सोपविण्यात यावी. अहवाल सादर करताना
ते वेळेत सादर होतील याची काळजी घ्यावी.
नागरिकांना मतदानाची माहिती प्राप्त व्हावी, यासाठी वोटर
स्लिप वाटप करण्यात येत आहे. अद्यापही काही भागात या वोटर स्लिप कमी प्रमाणात वाटप
झालेल्या आहे. याठिकाणी दोन दिवसात सर्व वोटर
स्लिप वाटप होईल, याची काळजी घ्यावी.
मतमोजणीमध्ये पोस्टल बॅलेटने झालेले मतदान काळजीपूर्वक
मोजावे. याकामी स्वतंत्रपणे मनुष्यबळ नेमण्यात यावे. विधानसभा निवडणुकीत विजयी उमेदवारांमध्ये
कमी अंतर असल्याने सर्वांचे लक्ष पोस्टल बॅलेट वर राहणार आहे. त्यामुळे सर्व विधानसभा
क्षेत्रामध्ये एकसारखी प्रक्रिया राबविण्यात यावी. मतदानाची टक्केवारी नोंदविताना ती
योग्यरीत्या भरण्यात यावी. प्रामुख्याने अंतिम टक्केवारी सादर करताना काळजी घ्यावी,
असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी दिले.
00000
विशेष सामान्य निरीक्षकांकडून
निवडणुकीचा आढावा
अमरावती, दि. 16 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
आज विशेष सामान्य निरीक्षक राम मोहन मिश्रा यांनी जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघाचा
आढावा घेतला. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी निवडणूक विषयक तयारीची माहिती दिली.
यावेळी
मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, महापालिकेचे आयुक्त सचिन कलंत्रे, पोलीस
आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्यासह विधानसभा निवडणुकीचे
सर्व निरीक्षक उपस्थित होते.
राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी विशेष सामान्य
निरीक्षक म्हणून राम मोहन मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी जिल्ह्यातील
आठही विधानसभा मतदारसंघातील निवडणूकविषयक तयारीचा आढावा घेतला. निवडणुकीच्या अनुषंगाने
झालेले मतदान यंत्राचे सरमिसळीकरण, मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांची नियुक्ती, पोलीस
कर्मचाऱ्यांची नियुक्ती, गृह मतदान आणि कर्मचाऱ्यांच्या मतदानाबाबत माहिती घेतली. मतदान
केंद्रावर आवश्यक सुविधा पुरवण्याचे निर्देश त्यांनी दिले.
मतदान प्रक्रिया आणि मतदान यंत्र ठेवण्यात येणाऱ्या ठिकाणी
आवश्यक त्या सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यात याव्यात. या ठिकाणी आवश्यकतेनुसार सीआरपीएफ,
सीएपीएफ यांची नियुक्ती करण्यात यावी. क्रिटिकल मतदान केंद्रावर अतिरिक्त लक्ष ठेवण्यात
यावे. तसेच सी-व्हिजील आणि इतर ठिकाणाहून येणाऱ्या तक्रारींचा वेळीच निपटारा करण्यात
यावा. निवडणुकीसाठी स्थिर पथक, फिरते पथक यांच्याकडून योग्य कार्यवाही व्हावी. निवडणुकीदरम्यान
कोणतीही अफवा पसरविली जाणार नाही, यासाठी सोशल मीडियावरही विशेष लक्ष द्यावे. निवडणूक
प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची निर्देशही श्री. मिश्रा
यांनी दिले.
बैठकीपूर्वी श्री. मिश्रा यांनी विभागीय आयुक्त डॉ. निधी
पांण्डेय आणि विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांच्याशी चर्चा केली.
00000
शहरात कलम 37 (1) व
(3) लागू
अमरावती, दि. 16 (जिमाका) : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित
राहावी, यासाठी अमरावती शहर पोलिस आयुक्त यांनी
महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले
आहे.
सदर प्रतिबंधात्मक आदेश शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी,
याकरिता पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला असून तो
दि. 17 नोव्हेंबर ते दि. 2 डिसेंबर 2024 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या
कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अमरावती
शहर पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी कळविले आहे.
000
No comments:
Post a Comment