जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेचे वाचन
अमरावती, दि. 26 : संविधानिक मुल्यांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने आज सकाळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवनात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.
अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी महसूल विजय जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताने संविधान स्वीकारले. या घटनेला आज 75 वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय संविधान व त्यातील मूल्य, हक्क-अधिकार व कलम यासंबंधी जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी उपस्थितांना माहिती दिली.
00000
अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना विनामूल्य स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण
*शुक्रवारी मुलाखतीचे आयोजन
अमरावती, दि. 26 : अचलपूर येथील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, माहिती व मार्गदर्शन केंद्रातर्फे आदिवासी उमेदवारांकरीता विनामूल्य स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येते. यासाठी शुक्रवार, दि. 29 नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.
शासनाच्या विविध पदांसाठी होणाऱ्या स्पर्धा परिक्षेकरीता आदिवासी उमेदवारांची विनामूल्य प्रशिक्षणाद्वारे तयारी करुन घेण्यात येते. या सत्राचा प्रशिक्षण कालावधी दि. १ डिसेंबर ते १५ मार्च २०२५ पर्यंत साडेतीन महिन्याचा राहणार आहे. या कालावधीत प्रशिक्षणार्थींना दरमहा एक हजार रूपये विद्यावेतन देण्यात येणार आहे.
प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी चार पुस्तकांचा संच विनामूल्य देण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी अनुसूचित जमातीच्या उमेदवारांनी अर्ज सादर केले आहे. यातून उमेदवारांची निवड करण्यासाठी शुक्रवारी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. अचलपूर येथील आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रात मुलाखती घेण्यात येणार आहे. या मुलाखतीला उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह उपस्थित राहावे. निवडयादी सायंकाळी ५ वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी 07223-221205, ७७०९४३२०२४ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा, वय १८ ते ३० दरम्यान असावे, उमेदवार किमान एसएससी उत्तीर्ण असावा, उमेदवाराचे नाव जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयात नोंदणी केलेली असावी.
यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र, एसएससी उत्तीर्णची गुणपत्रिका, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयात नोंदणी प्रमाणपत्र, उमेदवाराचा पासपोर्ट फोटो ही कागदपत्रे आवश्यक आहेत.
00000
No comments:
Post a Comment