भातकुलीला 2 जानेवारीला महाराजस्व अभियान नागरिकांनी अभियानाचा लाभ घ्यावा - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील
अमरावती, दि. 28 : प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी शासनाकडून 'महाराजस्व अभियान' राबविले जात असून, सर्वसामान्यांची प्रलंबित कामे त्याद्वारे तत्काळ निकाली काढण्यात येत आहेत. भातकुलीला 2 जानेवारीला महाराजस्व अभियान होणार असून, नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज केले.
अमरावती तालुक्यातील अंजनगाव बारी येथे 4 जानेवारीला महाराजस्व अभियान होणार आहे. महाराजस्व अभियान हे शेतकरी व सामान्य नागरिकांचे विविध शासकीय विभागाशी संबंधित असलेले प्रश्न एकाच ठिकाणी सोडविणारे व्यासपीठ आहे, असे सांगून श्री. पोटे पाटील म्हणाले की, ग्रामीण भागातील जनतेला विविध महसूली व अन्य विभागाशी संबंधित कामांसाठी तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी वारंवार जावे लागते. ही अडचण या अभियानाच्या माध्यमातून दूर होईल.
शिबिरात विविध योजनांच्या माहितीसह नागरिकांना व विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले, प्रमाणपत्रे, जमीनीचे दस्तऐवज आदी उपलब्ध करुन दिले जातील. गावपातळीवर ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना अभियानाव्दारे योजनांची माहिती व त्याचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे याविषयी माहिती मिळेल. आतापर्यंत जिल्ह्यात 39 ठिकाणी महाराजस्व अभियानाचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे. भातकुली व इतर ठिकाणी आयोजित अभियानाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
Comments
Post a Comment