वरूड, मोर्शी येथील विकासकामांचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा कामे मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश
अमरावती, दि. 5 : रिद्धपूर विकास आराखड्यातील कामांसह वरूड, मोर्शी येथील विकासकामे मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत देण्यात आले.
आमदार डॉ. अनिल बोंडे, जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. त्यात विविध प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला.
रिद्धपूर विकास आराखड्यात रस्त्याचे काँक्रिटीकरण, प्रसाधनगृह, मोकळ्या भूखंडाला कुंपणे आदी कामे प्रस्तावित आहेत. ती दोन आठवड्यात पूर्ण करावीत. सालबर्डी येथील संत मारुती महाराज संस्थान येथील विकासकामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक मान्यता, निविदा आदी प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी. 70 गावे पाणीपुरवठा योजनेतील कामे लवकर पूर्ण करावीत, असे निर्देश डॉ. बोंडे यांनी दिले.
मुदतीत सर्व कामे होणे आवश्यक आहे. अधिका-यांनी प्राधान्याच्या व प्रलंबित कामांना गती द्यावी, असे निर्देश श्री. देशमुख यांनी दिले.
वरुड, मोर्शी परिसरात पाण्याची स्थिती लक्षात घेता शेतक-यांना बोअरची परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे करण्यात येणार आहे, असे डॉ. बोंडे यांनी सांगितले.
निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, उपजिल्हाधिकारी अजय लहाने, उपविभागीय अधिकारी मनोहर कडू, तहसीलदार अनिरुद्ध बक्षी, आशिष बिजवल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या श्रीमती बॅनर्जी, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, भूजल सर्वेक्षण अधिकारी संजय कराड यांच्यासह अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते.
00000
Comments
Post a Comment