Thursday, September 26, 2019

अमरावती विधानसभा मतदारसंघात 3 लाख 45 हजार 597 मतदार

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 



*309 मतदान केंद्रे
अमरावती, दि. 26 : अमरावती विधानसभा मतदारसंघात 3 लाख 45 हजार 597 मतदार असून, त्यात पुरुष मतदार 1 लाख 77 हजार 231 व महिला मतदार 1 लाख 68 हजार 89, इतर मतदार 13 व सेना दलातील मतदार 264 आहेत, असे या मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत यांनी आज पत्रकारांना सांगितले.
निवडणूक कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी उपविभागीय कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तहसीलदार प्रज्ञा महांडुळे, तहसीलदार संतोष काकडे आदी उपस्थित होते.
श्री. राजपूत म्हणाले की, जुलै महिन्यातील विशेष पुनरीक्षण व निरंतर अद्ययावतीकरणानंतर 2 हजार 687 पुरुष व 1 हजार 448 महिला असे एकूण 4 हजार 135 नवीन मतदार नोंदविण्यात आले आहेत. त्यांना एपिक ओळखपत्र वितरीत करण्यात आले आहे.
मतदारसंघात 291 नियमित व 18 सहाय्यकारी अशी एकूण 309 मतदान केंद्रे असतील. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार एका मतदान केंद्रावर 1550 पर्यंत कमाल मतदार संख्या असू शकते. मतदारसंघातील पोलीस, महापालिका यासह सर्व शासकीय यंत्रणांची सभा घेऊन निर्देश दिले आहेत. आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी 7 भरारी पथके व 3 स्थिर निरीक्षण पथके नेमली आहेत. निवडणूकीसाठी 340 मतदान पथके गठित केली असून त्यात 1 हजार 360 कर्मचा-यांची नेमणूक केली आहे, असेही श्री. राजपूत म्हणाले.
 मतदान जनजागृतीसाठी स्वीप मोहिमेत कार्यक्रम सुरु आहेत. निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशासन सुसज्ज आहे, असेही त्यांनी सांगितले.

Wednesday, September 25, 2019

मेळघाटातील दुर्गम मतदान केंद्रांसाठी सक्षम संपर्कयंत्रणा उभारावी - विभागीय आयुक्त पीयूष सिंह




विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019
विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांच्या उपस्थितीत बैठक


अमरावती, दि. 25 : मेळघाटातील  अतिदुर्गम परिसरातील 133 मतदान केंद्रांवर मोबाईल नेटवर्क मिळत नाही. अशा मतदान केंद्रावर वनविभाग व पोलीस विभागाने संयुक्तपणे त्यांची वायरलेस यंत्रणा वापरुन सक्षम  संपर्क यंत्रणा कार्यान्वित करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी आज येथे दिले.
मेळघाट क्षेत्रातील दुर्गम भागात निवडणूक कार्यासाठी आवश्यक बाबीसंदर्भात वनविभाग, पोलीस विभागाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल,   अतिरिक्त पोलीस अधिक्षक शाम घुगे, उपवनसंरक्षक शिवा बाला, वायरलेस पोलीस अधिक्षक आय.डी. कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी (वायरलेस) एस. टी. हांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे, निवडणूक नायब तहसीलदार श्री. चंदनशिवे तसेच महावितरणचे अधिकारी यावेळी बैठकीला उपस्थित होते.
मेळघाटातील दुर्गम भागातील गावामध्ये वॉकी टॉकी कनेक्ट होत आहेत किंवा कसे, हे सर्वप्रथम तपासून घ्यावे व त्यातील त्रुटी दूर कराव्यात. वनविभागाने ही कार्यवाही करावी. त्यानंतर पोलीस विभागाने त्यांची वायरलेस यंत्रणा कार्यान्वित करावी. ही यंत्रणा योग्य पद्धतीने संपर्क राखते किंवा कसे, याबाबत तपासणी घ्यावी. सेक्टर अधिकारी, वनविभागाचे व पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांनी समन्वयाने संपर्क सुविधाची तपासणी करावी. ही सगळी कामे 11 ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त श्री. सिंह यांनी दिले.
                                     दीडशे कर्मचा-यांकडून 11 ऑक्टोबरला संयुक्त तपासणी
वनविभाग, पोलीस व निवडणूक कार्यासाठी नेमलेल्या सुमारे दीडशे कर्मचा-यांकडून 11 ऑक्टोबर रोजी संयुक्त तपासणी करण्यात येणार आहे, त्याअनुषंगाने सर्व विभागांनी समन्वयाने सोपविलेली कामे पूर्ण होण्यासाठी आजपासूनच कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. नवाल यांनी दिले. ते म्हणाले की, निवडणूकीच्या राष्ट्रीय कार्यात कुठलीही बाधा येणार नाही, यादृष्टीने वनविभागाने त्यांच्या अधिनस्त असणारे सर्व टॉवर व आवश्यक यंत्रणा संपर्कासाठी उपलब्ध करुन द्यावे.
क्षेत्राधिकारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व वनपाल यांच्यात समन्वय असण्यासाठी ट्रायल रन घेण्यात येईल. मतदान केंद्राशी संपर्कासाठी पोलीस व वनविभागाच्या वॉकी टॉकीचा वापर करावा. त्याशिवाय, या परिसरात उंचावरील ठिकाणी मोबाईल नेटवर्क मिळते. अशी ठिकाणे हेरून त्याचा संपर्क यंत्रणेत समावेश करता येतो किंवा कसे, याचाही पडताळा करावा, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले.

Wednesday, September 18, 2019

2 कोटी 12 लक्ष रुपयाच्या विकास कामाचे पालकमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन






अमरावती, दि. 18 :  वरुड तालुक्यातील लिंगा येथील 2 कोटी 12 लक्ष रुपये निधीच्या विविध विकास  कामांचे पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या हस्ते आज भूमीपूजन करण्यात आले.
यावेळी डॉ. वसुधाताई बोंडे, लिंगाच्या सरपंच सतीबाई मेवलिया, भाजपा पदाधिकारी राजकुमार राऊत, ज्योतीताई कुकडे यांचेसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
एकल विहीर ते लिंगा रस्त्याचे रुपये 2 कोटी रुपये निधीतून बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले.लिंगा येथे पाण्याच्या टाकीचे व गोविंद सोमकुंवर यांच्या घरापर्यंत रूपये पाच लक्ष रुपये निधीचे रस्ता बांधकाम, तसेच लिंगा येथे व्यायाम शाळेचे रुपये सात लक्ष रुपये निधीचे बांधकाम करणे आदी कामाचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला.
रस्तेविकासात राज्यात ऐतिहासिक निर्माण कार्य होत आहे. सर्वदूर पायाभूत सुविधां च्या उभारणीतून राज्याची विकासाकडे वाटचाल होत आहे, असे पालकमंत्री डॉ. बोंडे यांनी यावेळी सांगितले. 

Wednesday, September 11, 2019

पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या पुढाकाराने होणार संत्रा फळबागांचे पुनरुज्जीवन



            सहा कोटी रूपयांचा जिल्ह्यात निधी मंजूर

अमरावती, दि. 11 : अपुरा पाऊस व तापमानामुळे नष्ट होत चाललेल्या जिल्ह्यातील संत्रा बागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी 
 कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या निर्देशानुसार ६ कोटी रुपये निधी ला फलोत्पादन विभागाने मंजूरी दिली असून त्यातून जुन्या बागा वाचविण्यासाठी विविध उपाय अंमलात येणार आहेत. बदलते पर्यावरण, अपुरा पाऊस व तापमानामुळे जिल्ह्यातील जुन्या संत्रा बागाचे नुकसान होऊन जिल्ह्यातील संत्रा बागा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तर काही बागा वाळलेल्या आणि अर्धवट जळालेल्या स्थितीत आहेत. त्यामुळे या बागा वाचविण्यासाठी रोग ग्रस्त फांद्या कापून काढणे, बोर्डो पेस्ट लावणे, रासायनिक खत देणे, बुरशीनाशक व कीटकनाशक फवारणी करणे आदी बाबींचा अवलंब करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक लाभार्थ्याला एक हेक्टर मर्यादेत लाभ देण्यात येणार आहे.
राज्याचे कृषीमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी यापूर्वीच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आणि मनरेगा अंतर्गत पुन्हा बागनिर्मिती करीता मागेल त्याला मंजूरी ही प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिलेले आहेत. 
जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकरी बांधवांनी या निर्णयाबद्दल पालकमंत्री डॉ. बोंडे यांचे मनपूर्वक आभार मानले आहेत.
00000

Tuesday, September 10, 2019

वरुड-टेंभुरखेडा-गव्हाणकुंड-बहादा-मांगरुळी-हातुर्णा रस्त्याचे भूमिपूजन शेतकरी बांधवांनी गट शेतीकडे वळावे कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे





अमरावती, दि. १० :  शेतीच्या विकासासाठी गटशेती ही काळाची गरज असून, त्याकडे शेतकऱ्यांनी वळावे. गटशेतीमुळे एकत्रित , संघटित व्यवसायाचे लाभ मिळतात व शासनाचे  अनुदान व सवलतीचाही लाभ मिळतो, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज गव्हाणकुंड येथे केले.
      वरुड-टेंभुरखेडा-गव्हाणकुंड-बहादा-जरुड-मांगरुळी-काचुर्णा-नांदगांव-हातुर्णा या १४५ कोटी ३२ लक्ष रुपयांच्या रस्ता बांधकामासह एकुण १४७ रुपयांच्या विकासकामांचे भुमिपूजन राज्याचे कृषिमंत्री डॉ. बोंडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
डॉ. बोंडे म्हणाले की, विविध उपक्रमांतून गव्हाणकुंड गावात अनेक विधायक बदल घडून आले. गव्हाण कुंडला ब वर्ग दर्जा मिळून २ कोटी रुपये मिळाले. सौर ऊर्जा प्रकल्प आला. लवकर हे काम सुरू होईल. शेकदरी धरणावरून पाईपलाईनने शेतापर्यंत पाणी जाईल. जिल्ह्याला २०० पॅक हाऊस लक्ष्यांक आहे. त्याचा लाभ अनेकांना मिळेल. 
हातूरणापासून ते टेंभुरखेडा वरुड रस्ता हायब्रीड ऍनुईटीतुन तयार होत आहे. आता शेतकरी बांधवांनी उद्योगप्रवण होणे गरजेचे आहे. त्यासाठी गटशेती हा योग्य मार्ग आहे. संघटित व्यवसायाचे लाभ त्यातून मिळतात. झपाट्याने विकसित होत असलेली नागपूर सारखी बाजारपेठ नजिक आहे. त्यामुळे
शेतीमालावर प्रक्रिया करून चांगला माल चढ्या भावाने विकता येईल. शासकीय मत्स्य विज्ञान महाविद्यालय, प्रॉम कारखाना, संत्रा प्रकल्प असे विविध प्रकल्प परिसरात आकारास येत आहेत.
          शेतकरी बांधवांसह शेतमजूर बांधवांसाठी विमा,शिक्षण, आरोग्य योजना कृषी विभागाकडून राबविण्याचे नियोजन आहे,  असे ही त्यांनी सांगितले.  सरपंच सुमित्रा ताई मुरूमकर यांच्यासह
प्रगती महिला संघाच्या महिला सदस्य उपस्थित होत्या.

घातखेड येथील 'केव्हीके'मध्ये जैविक औषधे निर्मिती प्रयोगशाळेचा शुभारंभ जैविक शेतीला प्रोत्साहन, सूक्ष्म सिंचनाद्वारे शेतीचा विकास -कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे




अमरावती, दि. १० : जमिनीची उत्पादकता वाढविण्यासाठी जैविक निविष्ठा निर्मितीला प्रोत्साहन व सूक्ष्म सिंचनावर भर याद्वारे शेतीचा विकास घडवून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज घातखेडा येथे केले.
घातखेडा येथील कृषी विज्ञान केंद्रात जैविक औषधे निर्मिती प्रयोगशाळेचा शुभारंभ करताना ते बोलत होते. खासदार नवनीत राणा, संस्थेच्या अध्यक्ष वसुधाताई देशमुख, जि. प. सदस्य प्रकाश साबळे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विजय चवाळे, डॉ. अर्चना बारब्दे आदी यावेळी उपस्थित होते.
कृषी मंत्री डॉ. बोंडे म्हणाले की, ग्राम परिवर्तनासाठी विविध योजनांसह गट शेतीला चालना देण्यात येत आहे. त्यासाठी गट शेतीला अवजार बँक, बी बियाणे, सौर कुंपण आदी अनेक साह्य देण्यात येत आहे. मालावर प्रक्रिया करून तो विकल्यास त्याची किंमत वाढते. त्यामुळे बचत गटांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग व विपणनाचे जाळे निर्माण करण्यात येत आहे.
शासनाने सूक्ष्म सिंचन वाढविण्यावर भर दिला आहे. त्यासाठी ठिबकवर अनुदान ८० टक्के करण्यात आले. कालव्यात पाणी वाया जाते म्हणून पाईपलाइनने पाणी शेतीला पुरविण्यात येणार आहे. जैविक शेतीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियान राबविण्यात येत आहे. कृषी विज्ञान केंद्र हा कृषी विद्यापीठ व नागरिकातील दुवा आहे.  कृषी तज्ज्ञ व संशोधकांची नाळ शेतकऱ्यांशी नाळ जुळलेली पाहिजे.  शेतीचे अद्यावत तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचविले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
खासदार श्रीमती राणा, श्रीमती देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले. जलशक्ती अभियानात शेतकरी मेळावाही यावेळी झाला. डॉ. अतुल कळसकर यांनी प्रास्ताविक केले. परिसरातील अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.

०००

Monday, September 9, 2019

‘एमसीएमसी’ सदस्यांचे व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रशिक्षण



अमरावती, दि. 9 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीच्या (एमसीएमसी) सदस्यांचे व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे प्रशिक्षण आज झाले.
निवडणूक आयोगाचे महासंचालक धीरेंद्र ओझा यांनी  आचारसंहिता, एमसीएमसीची भूमिका, पेड न्यूज व अपेक्षित कार्यवाही, सोशल मीडियावरील प्रसारित मजकूर आदी विविध विषयांवर यावेळी मार्गदर्शन केले.
उमेदवार किंवा पक्षाची प्रत्येक राजकीय जाहिरात पूर्वप्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे अशी कार्यवाही वेळेत होईल व आचारसंहितेचा भंग होऊ नये, यादृष्टीने यंत्रणा सुसज्ज ठेवावी. सोशल मीडियावरील मजकुराचे संनियंत्रण करण्यासाठी अशा माध्यमांच्या प्रशासनाकडून सहकार्य मिळविण्यात येत आहे.  सोशल किंवा कुठल्याही माध्यमातून  आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यावर तत्काळ कार्यवाही व्हावी, असे निर्देश त्यांनी दिले.  
            उप निवडणूक निर्णय अधिकारी उदयसिंह राजपूत, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, आकाशवाणीचे मुख्य कार्यक्रम अधिकारी एकनाथ नाडगे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव यांच्यासह विविध कर्मचारी उपस्थित होते.
                                                            00000  

Saturday, September 7, 2019

स्वीप मोहिमेसाठी जिल्हास्तरीय समितीची पुनर्रचना मोहिमेद्वारे सर्वदूर मतदार जागृती करावी - जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री






अमरावती, दि.  6 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्वीप मोहिम भारत निवडणूक आयोगाने हाती घेतली असून, मतदार जागृतीच्या दृष्टीने सर्वंकष प्रयत्न करण्याचे निर्देश स्वीप मोहिमेच्या नोडल अधिकारी तथा जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी आज येथे दिले.
            स्वीप मोहिमेच्या समिती सदस्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
            उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, सहायक कामगार आयुक्त अनिल कुटे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी मंगला मून, शिक्षणाधिकारी निलिमा टाके,  कार्यक्रम अधिकारी अजय साखरे, आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी विनोद गवळी, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जितेंद्रकुमार झा आदी उपस्थित होते. विविध विभागांच्या माध्यमातून निरनिराळे उपक्रम राबवून मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. त्यांनी सर्वांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश श्रीमती खत्री यांनी दिले.  
                                                            जिल्हास्तरीय समितीचे पुनर्गठन
स्वीप मोहिमेच्या प्रभावशाली अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समितीचे पुनर्गठन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल हे समितीचे अध्यक्ष व जि. प. मुख्य कार्यकारी मनीषा खत्री सदस्य सचिव आहेत. समितीत महापालिका आयुक्त संजय निपाणे, न. प. प्रशासन अधिकारी दीपक कासार, तिवसा न. पं. मुख्याधिकारी सुमेध अलोणे, ग्रामविकास अधिकारी दीपक बांबटकर, शिक्षणाधिकारी निलिमा टाके, प्रिया देशमुख, सहायक कामगार आयुक्त अनिल कुटे, उपनिबंधक संदीप जाधव, महिला व बालकल्याण अधिकारी सुनील मेसरे, समाजकल्याण अधिकारी मंगला मून, आकाशवाणी अधिकारी एकनाथ नाडगे,  धारणी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी सुशीलकुमार खिल्लारे, प्रादेशिक अधिकारी सुधीर फुके, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, एनसीसी कमांडर ब्रिगेडीअर संग्राम दळवी, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी सुधीर फुके, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जितेंद्रकुमार झा, औद्योगिक वसाहत सहकारी संस्थेचे अध्यक्ष वीरेंद्र लढ्ढा, रोटरी क्लबचे सारंग राऊत, नेहरू युवा केंद्राचे समन्वयक स्नेहल बसुटेकर, एनएसएसचे राजेश बुरंगे, आरोग्य कार्यक्रम अधिकारी अजय साखरे यांच्यासह जिल्हा आयकॉन प्रतिनिधी म्हणून शुकमणी बाबरेकर व अपूर्वा शेंडे यांचाही समावेश करण्यात आला आहे.
00000

राजे उमाजी नाईक जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन



  राजे उमाजी नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
           निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित वरिष्ठ अधिकारी कर्मचारी यांनीही राजे उमाजी नाईक यांना पुष्प वाहून आदरांजली वाहिली.



Friday, September 6, 2019

पोलीस विभागाने कम्युनीटी पोलीसींगचे कार्यक्रम राबवावे - पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे

पोलीसांच्या 208 निवासस्थान बांधकामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन








अमरावती, दि. 6 : अलिकडच्या काळात देश व जागतिक पातळीवर वेगाने होत असलेल्या शैक्षणिक, औद्योगिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीमुळे सर्वसामान्य जनतेत सर्वत्र बदलाचे वारे वेगाने वाहत आहेत. या सकारात्मक बदला बरोबरच गुन्हेगारीचे स्वरुप, दशतवाद, घातपाती कृत्य यामुळे नागरिकांच्या जिवीताचा व मालमत्तेच्या सुरक्षेचा धोका निर्माण झाला आहे. हे धोके लक्षात घेऊन सामान्य जनतेच्या सुरक्षिततेसाठी पोलीस विभागाने कम्युनीटी पोलीसींग अंतर्गत जनजागृती कार्यक्रम राबवावे, असे कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज सांगितले.
            पोलीस अधिक्षक ग्रामीण पोलीस विभागाव्दारे आयोजित बडनेरा जवळील मौजा कोंडेश्वर येथे 208 पोलीस निवासस्थानांच्या बांधकामाचे भूमीपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते कुदळ मारुन व कोनशिलेचे अणावरन करुन आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या भूमीपूजन सोहळ्याला खासदार नवनीत रवि राणा, शिक्षक सल्लागार समितीचे उपाध्यक्ष तथा आमदार डॉ. श्रीकांत देशपांडे, आमदार रवि राणा, उपमहापौर संध्याताई टिकले, विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, पोलीस आयुक्त संजय बावीस्कर, पोलीस अधिक्षक हरी बालाजी एन., अपर पोलीस अधिक्षक श्याम घुगे, पोलीस उपायुक्त प्रदीप सुर्यवंशी, शशिकांत सातव यांचेसह पोलीस अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते.
            डॉ. बोंडे म्हणाले की, ज्याप्रकारे सैनिक देशाच्या सीमेचे रक्षण करते त्याप्रमाणे पोलीस हे देशाच्या अंतर्गत घडणाऱ्या गुन्हेगारी, आंतकवाद, घातपात आणि जनसामान्यांच्या संरक्षणासाठी काम करते. पोलीस विभाग समाजाकडून एका विशिष्ट शिस्तिचे पालन करुन घेत असतात. पोलीसांच्या कथा आणि व्यथा संदर्भात पूर्णपणे जाणीव असल्याचे त्यांनी सांगितले. चोवीस तास काम करणाऱ्या पोलीसांना हक्काचे घर असावे असा मनोदय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुध्दा व्यक्त केला असून त्यासाठी पोलीस गृहनिर्माण महामंडळाच्या अनुषंगाने धोरण आखण्यात आले आहे. पोलीस खाते अधिक सक्षम करण्यासाठी वरिष्ठ पदावर पदोन्नतीसह पोलीसांची रिक्त पदे भरण्यात येत आहे. पोलीसांना गुन्ह्यांचा तपास अधिक जलदगतीने होण्यासाठी अद्ययावत फॉरेन्सिक लॅब अमरावतीत स्थापन करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीसांच्या भावना व समस्या जाणून घेऊन अनेक वर्षापासून रखडलेले प्रश्न सोडविले आहे. पोलीसांना सन्मानपूर्वक भत्तेवाढ, आरोग्य व कुटूंब कल्याण योजना, निवासासाठी क्वार्टर, पोलीस स्टेशनचे नविणीकरण आदी सुविधा पुरविल्या आहे.
            सर्व सामान्य जनतेत पोलीसांविषयी असलेली भिती घालवून आदर निर्माण करण्यासाठी कम्युनिटी पोलीसींग तसेच सोशल पोलीसींग होणे आवश्यक आहे. पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या गरीब लोकांना गुन्हेगार न समजता सौहार्दपूवर्क वागणूक देऊन त्यांचे म्हणने ऐकून घेतले पाहिजे. लोकांमध्ये जावून त्यांच्या समस्यांचे निराकरण करुन त्यांच्यातील भिती दूर केली पाहिजे. सलोख्याचे वातावरणात ठेवून कायदा व सुव्यवस्थेचे अमंलबाजवणी झाली पाहिजे. पोलीसांचे मानसिक व शारीरिक आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी सोशल रिलेशनशिप संबंधी सातत्याने प्रशिक्षण दिले पाहिजे. त्यांच्या घरात आनंददायी वातावरण राहण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हींग श्री. श्री. रविशंकर यांचे प्रशिक्षण पोलीसांना व त्यांच्या कुटूंबियांना सुध्दा दिले पाहिजे. ग्रामीण भागात होणाऱ्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस विभागाकडून चौकाचौकात तसेच संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात यावे व त्याची देखभालीची जबाबदारी संबंधित पोलीस स्टेशनला सोपविण्यात यावी.
            पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी अकरा हेक्टर क्षेत्रफळावर निर्माण होणाऱ्या 208 शासकीय निवासस्थानांच्या बाधकाम हे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करावे. याठिकाणी सर्व सोयी- सुविधायुक्त इमारतींचे निर्माण करावे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्ष लागवड सुध्दा करण्यात आली.
            खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन हे वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत आहे. त्याठिकाणी इमारतींचे दुरुस्ती करुन सर्व सोयी-सुविधायुक्त दर्जेदार पध्दतीची पोलीस ठाणे उभारावे.
            सन 1998 मध्ये पोलीस अधिक्षक ग्रामीण क्षेत्र आणि पोलीस आयुक्तालयाची जिल्हयात स्वतंत्रपणे निर्मिती झाली आहे. तेव्हापासून दोन्ही महत्वाच्या पोलीस विभागांना स्वतंत्र इमारत, परेड ग्राउंड इत्यादी यंत्रणा उभारण्यात आली आहे. पंरतू सदर जागा ही अपूरी पडत असल्यामुळे मौजा कोंडेश्वर येथे 11 हेक्टर जमीनवर सुमारे 44 कोटीचा निधी खर्चून पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रामीण पोलीस मुख्यालय तसेच अधिकारी कर्मचारी यांचेसाठी शासकीय निवासस्थान बांधण्यात येणार आहे. पोलीस क्वार्टरचे बांधकाम कंत्राटदार धनुष्मृती बिल्डकॉन प्रा.लि. तसेच तांत्रिक सल्लागार आणि आर्किटेक्ट एम बी मालेवार डिझाईन्स प्रा. लिमिटेड यांचेकडून होणार आहे, अशी माहिती पोलीस अधिक्षक हरी बालाजी एन. यांनी प्रास्ताविकातून दिली.
            यावेळी आमदार रवि राणा, आमदार श्रीकांत देशपांडे तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांचीही समायोचित भाषणे झाली. उपस्थितांचे आभार अपर पोलीस अधिक्षक शाम घुगे यांनी मानले. कार्यक्रमाला पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
00000

Thursday, September 5, 2019

जिल्हा नियोजन समितीची बैठक नियोजित निधीनुसार विकासकामे पूर्ण करा - पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे





अमरावती, दि. 5 : अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार सर्व विकासकामे पूर्ण होतील याची दक्षता प्रशासनाने घेण्याचे निर्देश पालकमंत्री तथा कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिले.
ही बैठक आज नियोजनभवनात झाली. विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. सुनील देशमुख, खासदार नवनीत राणा, आमदार वीरेंद्र जगताप, आमदार रमेश बुंदिले, आमदार प्रभुदास भिलावेकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कोल्हे, महापालिका आयुक्त संजय निपाणे आदी उपस्थित होते. 
            जिल्हा वार्षिक योजनेत (सर्वसाधारण) 197 कोटी 80 लक्ष रुपये मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार 34 कोटी 84 लक्ष रूपये खर्चाला प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे. उर्वरित कार्यवाही गतीने करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.  सर्वसाधारण योजनेतून 118 कोटी 68 लक्ष रूपये प्राप्त निधीतून 45 कोटी 99 लक्ष रुपये खर्च झाले. प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या 96 कोटी 73 लक्ष रूपये मंजूर नियतव्ययानुसार  58 कोटी 25 लक्ष रूपये प्राप्त व 16 कोटी 87 लक्ष रूपये वितरीत झाले. त्यातील 9 कोटी 53 लक्ष रूपये रक्कम विविध विकासकामांवर खर्च झाली आहे.  अनुसूचित जाती उपयोजना नियतव्ययानुसार 98 कोटी 92 लक्ष 32 कोटी 28 लक्ष निधी तरतूद यंत्रणांना वितरीत करण्यात आली व विविध कामांसाठी खर्च झाली.
पीसीएक्स इंडेक्स मध्ये रस्त्याची निवड योग्यरीत्या न झाल्याचे मत काही सदस्यांनी मांडले. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी पीसीआय इंडेक्स तपासून समसमान वाटप झाले किंवा नाही, हे तपासावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. जलयुक्त शिवारच्या कामांना गती द्यावी, तसेच जलशक्ती अभियानात अधिक उपक्रम राबविण्यात यावे. नाला खोलीकरनामुळे पांदणरस्ते बाधित होऊ नये म्हणून आवश्यक ठिकाणी पूल बांधण्यात येईल. सिमेंट रस्त्यामुळे पाणी अडते व साचते. त्यामुळे शेतीचे नुकसान होते, अशा तक्रारी आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी कच्च्या नाल्या तयार करण्याबाबत कार्यवाही व्हावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

वन्य प्राण्यांपासून शेती संरक्षणासाठी सौर कुंपण योजनेचा लाभ मिळावा. चराईक्षेत्र गावापासून दूर असता कामा नये. वन खात्याच्या अधिकारी- कर्मचा-यांनी गावातील नागरिकांशी सौजन्याने वागावे, असे निर्देश त्यांनी दिले. कर्जपुरवठ्याला गती मिळावी. ऊर्जा विकासासाठी सहा कोटी निधीतून नियोजित कामे करावीत. पालकमंत्री पांदण रस्तेविकास योजनेत कन्व्हर्जन्सनुसार निधीतून रस्ते करण्यात यावेत, असे निर्देशही त्यांनी दिले. जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांनी प्रास्ताविक केले.
                                                             ०००

शेतकऱ्यांचे जीवन सुखकर होण्यासाठी विज्ञानाचा वापर करावा - पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे










स्पर्धेत क्रमांक पटकाविणाऱ्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सत्कार

अमरावती, दि. 5 : विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षण घेत असतांना त्या शिक्षणाचा उपयोग शेती व शेतीशी निगडीत क्षेत्रात संशोधन करुन नवनवीन यंत्रसामुग्री तयार करावी. विज्ञानाच्या वापर करुन शेतकऱ्यांचे जीवन सुखकर होईल यासाठी विद्यार्थ्यांनी नवनवीन संशोधन करावे, असे आवाहन कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज केले.
येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे जिल्हा नाविण्य परिषदेच्या तसेच विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालक कार्यालय, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, साहचार्य मंडळ व उन्नत भारत अभियानच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय स्टार्टअप बिझनेस प्लॅन कॉम्पिटिशनच्या बक्षीस वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. प्रसिध्द युवा उद्योजक सुहाज गोपीनाथ, सुकाणू समितीचे प्रमुख दिनेश सुर्यवंशी, एमआयडीसी असोसिएशनचे किरण पातुरकर,  तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. डी. वी. जाधव, नवोक्रम संचालक डॉ. डी.टी. इंगोले, चेंबर ऑफ कॉमर्सचे असोशिएशनचे अध्यक्ष विनोद कलंत्री आदी यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी पालकमंत्र्यांनी स्टार्टअप स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या अविष्कार-प्रकल्पांची पाहणी केली. स्पर्धेत सहभागी झालेल्या विविध महाविद्यालयाच्या 287 स्पर्धकांचे पालकमंत्र्यांनी सहभागी झाल्यानिमित्त अभिनंदन करुन डॉ. बोंडे म्हणाले की, आयुष्यात यशस्वी जीवनासाठी नवनव्या कल्पनांना आकार द्यायला युवा पीढीने शिकले पाहिजे.  आपल्या संकल्पनांना वाट देऊन त्या साकार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी धडपड करावी. भारत देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. देशाची 35 टक्के लोकसंख्या ही 30 वर्षाखालील आहे. तरुणांनी अध्यासित केलेल्या तंत्रशिक्षणाचा व प्रशिक्षणाचा उपयोग समान्य जनतेचे जीवन सोयीचे होण्यासाठी उपयोग करावा. रेन वॉटर हारवेस्टींग, सोलर पॉवर, शेतीशी निगडीत यंत्रसामुग्री आदी क्षेत्रात संशोधन करुन मानवजातीच्या उपयोगाच्या यंत्रसामुग्री, प्रकल्प निर्माण करावे, असे आवाहन त्यांनी केले.
युवकांनी नोकरीच्या मागे न पळता, स्वत: प्रशिक्षीत होऊन इतरांना रोजगार उपलब्ध होईल यादृष्टीने उद्योजक बनावे. बेरोजगार युवकांच्या हातांना काम देऊन त्यांना निर्भर करण्यासाठी वस्त्रोद्योग, स्टील प्रकल्प, दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या वस्तुंचा प्रकल्प निर्मिती इत्यादी क्षेत्रात कामगिरी करावी. आपल्या क्षेत्रात कापूस पीक खात्रीशीर पिक आहे. कापूस पीकावर प्रक्रीया करुन उत्तम दर्जाचे वस्त्र निर्मितीचे प्रकल्प उभारण्यासाठी येथील आयटीआय, पॉलीटेक्नीक, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना खूप वाव आहे. त्यासाठी शासन सुध्दा कर्ज व भाग भांडवल उपलब्ध करुन युवा उद्योजकांना मदत करते. या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. बोंडे यांनी केले.
राज्याच्या ग्रामीण भागातील मुलांना शहरी भागातील मुलांपेक्षा मुलभूत व शेतीशी निगडीत चांगले ज्ञान असते. तंत्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षण केंद्रांनी त्यांच्यातील सुप्त गुणांना ओळखून कौशल्य विकासाचे व कृषी विषयाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण देऊन ग्रामीण मुलांना प्रशिक्षीत करावे. देशाचे भवितव्य घडविण्यात युवा पीढींचे महत्वपूर्ण योगदान आहे.
कार्यक्रमात शालेय संशोधक म्हणून विश्वभारती शाळेच्या भार्गवी, साची जैयस्वाल आणि आर्या या तीन मुलींचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस, प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या वेस्ट वॉटर व रेन वॉटर हारवेस्टींगच्या प्रकल्पाची निवड समितीव्दारे करण्यात आली.  
तसेच कार्यक्रमात यंग संशोधक, सीनीयर संशोधक आणि मास्टर संशोधक या तीन प्रवर्गामध्ये अनुक्रमे प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या शंतनु गावंडे, संदीप कुमार, मारुफ अहमद, रुपेश चौधरी यांचा यंग संशोधक या कॅटॅगिरीसाठी, रुपाली करुले रजनी चव्हाण, मनीष वालेचा यांचा सीनीयर संशोधक या कॅटॅगीरीसाठी तर सेवकराम कुंभारे यांचा मास्टर संशोधक कॅटॅगीरीसाठी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस म्हणून स्पर्धेचे मॉमेन्टो, प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला शाळा- अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रशिक्षण महाविद्यालय, आयटीआय महाविद्यालयातील तसेच सर्व शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी- विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.

मोर्शीतील पुरग्रस्त भागांची पालकमंत्र्याकडून पाहणी








नुकसानग्रस्त कुटूंबांना पंधरा हजार रुपये तातडीची मदत
नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने करावे
अमरावती, दि. 5 : बुधवारी (4 सप्टेंबर रोजी) मोर्शी शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नलदमयंती नदीला आलेल्या पुरामुळे शहरातील पेठपुरा, भोईपुरा, सुलतानपुरा, मोईमपुरा, मालवीयपुरा, आठवडी बाजार, मेन मार्केट, आंबेडकर चौक, खोलगटपुरा या भागात आठ ते नऊ फुट पर्यंत पुराचे पाणी शिरले होते. आज राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी पुरग्रस्त भागांना तातडीने भेट देऊन क्षतीग्रस्त भागांची, घरांची व परिसराची पाहणी केली. नुकसानग्रस्त कुटूंबांना पंधरा हजार रुपये तातडीची मदत देण्यात येईल, असे कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी मोर्शी येथे सांगितले.
            यावेळी मोर्शीचे नगराध्यक्ष आप्पासाहेब गेडाम, कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे, मोर्शीचे मुख्याधिकारी तसेच महसूल विभगाचे अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते.
डॉ. बोंडे म्हणाले की, नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना तातडीची मदत म्हणून पंधरा हजार रुपये प्रती कुटूंब याप्रमाणे सहायता निधी त्यांच्या खात्यात जमा केला जाईल. पुराचे पाणी आता ओसरले असून नुकसानग्रस्त भागातील कुटूंबांचे, शेतीचे आणि क्षतीग्रस्त घरांचे, जनावरांचे सर्वेक्षण करुन पंचनाम्याची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. बाधितांना तातडीने प्रशासनाकडून मदत देण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. ले.
            पुराच्या पाणी घरात शिरल्यामुळे कुटूंबांचे घरातील साहित्य व जनावरांची हाणी झाली आहे. पुराच्या पाण्यामुळे नुकसान झालेल्या कुटूंबांची प्रशासनाव्दारे नगर परिषदेच्या शाळेत निवासाची व जेवणाची सोय करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी काल रात्रीच पुरग्रस्त भागांची पाहणी करुन बांधीत कुटूंबांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे महसूल यंत्रणाला आदेश दिलेत. तसेच त्यांच्या जेवणाची व निवासाची सुविधा नगर परिषदेच्या शाळेत केली.
पालकमंत्री पुढे म्हणाले की, राज्यात ज्याठिकाणी पुराच्या पाण्यात शेतजमिन खरडून गेली त्याठिकाणी 38 हजार रुपये प्रती हेक्टर मदतनिधी देण्यात येते. बागायती-फळबागांच्या नुकसानीसाठी 18 हजार रुपये, ओलीताच्या पिकांसाठी 13 हजार रुपये तर कोरडवाहूसाठी 6 हजार 800 रुपये नुकसान भरपाई दिली जाते. अशाच पध्दतीने नियमानुसार मतदनिधी शेतीच्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिला जाईल. मोर्शी तालुक्यातील नल दमयंतीच्या काठावर असलेले खेडे चिखलसावंगी, चिंचोली गवळी, आष्टेगाव व इतर गावांत शेतीचे व शेती पिकाचे नुकसान झाले आहे त्याक्षेत्राचे कृषी सहायकांकडून पंचनामे करण्याची प्रक्रीया सुरु करण्यात आली असून शेतकऱ्यांना शासनाकडून मदतनिधी दिला जाणार आहे. सर्व लोकांनी शांततेने व सयंमाने राहून मदत घ्यावी प्रशासन व शासन संपूर्णत: त्यांच्या पाठीशी आहे. कुठलीही आपत्ती आली तर प्रशासनाला कळवावे.

00000

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...