पोषण अभियानाच्या यशस्वितेसाठी सर्वांनी योगदान द्यावे - कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांचे आवाहन
पोषण माह उपक्रमाचे उद्घाटन
पुढची पिढी सशक्त झाली तर देश सशक्त होईल. पोषण अभियानात अमरावती जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असून यंदा तो पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी सगळे मिळून प्रयत्न करूया, असे आवाहन कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज वरुड येथे केले.
महिला व बालविकास विभागातर्फे वरुड येथील दीनदयाळ उपाध्याय सभागृहात केंद्र शासन पुरस्कृत पोषण अभियानात पोषण माह उपक्रमाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. श्रीमती वसुधाताई बोंडे, जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात,गजाननराव खडसे, विजयभाऊ श्रीराव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. बोंडे म्हणाले की, पोषण अभियानाच्या यशस्वितेसाठी सर्वदूर जागृती व्हावी. अंगणवाडी सेविकांकडून चांगली कामगिरी होत आहे. वरूडमधील चार अंगणवाडी सेविकांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. या अभियानातही सर्वांनी उत्तम योगदान द्यावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शासनाने महिला व बालकल्याणासाठी अनेक योजनांना चालना दिली आहे. अमरावती स्त्री रुग्णालयात मिल्क बँक सुरू करण्यात आली आहे. हिरकणी कक्ष उपक्रम ठिकठिकाणी राबवण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.
श्रीमती बोंडे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्व नागरिकांनी पोषण जागृतीची शपथ घेतली. श्री. थोरात यांनी प्रास्ताविक केले. साधना पांडे यांनी स्वागतगीत सादर केले.
०००
Comments
Post a Comment