Thursday, June 27, 2019

एकही जि. प. शाळा विनाशिक्षक नाही - मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री




            अमरावती, दि. 27 : जिल्हा परिषदेची कोणताही शाळा विनाशिक्षक राहणार नाही, अशी व्यवस्था प्रशासनाकडून करण्याचे आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी स्पष्ट केले आहे.  शाळांमध्ये वीजपुरवठाही पूर्ववत करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले आहे.  
               जिल्हा परिषदेच्या काही शाळांमध्ये वीज पुरवठा नसल्याने शैक्षणिक कार्यक्रमात व्यत्यय, तसेच शिक्षकांअभावी अडचणी येत असल्याच्या तक्रारी होत आहेत.  शाळाखोल्यांची स्थिती व वीजपुरवठा, थकित देयकांबाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी  कार्यालयाकडून आढावा मार्च-एप्रिल या कालावधीत घेण्यात आला होता. त्यानंतर निवडणूक मतदान केंद्रांच्या उपयोगासाठी असलेल्या शाळा, तसेच थकित देयकाअभावी वीजपुरवठा खंडित झालेल्या शाळा यांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. गट शिक्षणाधिकारी स्तरावरील उपलब्ध निधीमधून ही देयके देण्याबाबत निर्देशही देण्यात आले, असे श्रीमती खत्री यांनी नमूद केले आहे.
          ज्या शाळेतून शिक्षकांच्या बदल्या झाल्या. तिथे शिक्षकांची पर्यायी व्यवस्था गट शिक्षणाधिका-यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे एकही शाळा विनाशिक्षक राहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Wednesday, June 26, 2019

समता दिंडीला शहरात मोठा प्रतिसाद





अमरावती, दि. 26 : राजर्षी शाहू महाराज यांची जयंती अर्थात समतादिनानिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे काढण्यात आलेल्या समता दिंडीला आज शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
इर्विन चौकापासून सकाळी आठच्या सुमारास या दिंडीला सुरुवात झाली. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इर्विन चौकातील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, श्रीमती वसुधाताई बोंडे यांच्या हस्ते हारार्पण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून समता दिंडी मार्गस्थ झाली.
दिंडीत विविध शाळा- महाविद्यालयांच्या सुमारे अडीचशे विद्यार्थी- विद्यार्थिनींचा सहभाग होता. इर्विन चौक, दुर्गावती चौक, मालटेकडी चौक ते सामाजिक न्यायभवन असा दिंडीचा मार्ग होता.  
सहायक समाजकल्याण आयुक्त मंगला मून, जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रशांत थोरात, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप काळे यांच्यासह अनेक मान्यवर दिंडीत सहभागी झाले होते.

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन




अमरावती, दि. 26 : राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात  त्यांच्या प्रतिमे पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी विधी अधिकारी नरेंद्र बोहरा  यांनी व विविध अधिकारी- कर्मचा-यांनी पुष्प अर्पण करून राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन केले.
00000
सामाजिक न्याय दिनानिमित्त सामाजिक न्यायभवनात कार्यक्रम
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या क्रांतिकारी कार्याने परिवर्तनाला गती
-वित्त सहसंचालक उत्तमराव सोनकांबळे

अमरावती, दि. 26 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या क्रांतिकारी कार्यामुळे देशातील परिवर्तनाच्या चळवळीला गती मिळाली, असे प्रतिपादन वित्त व कोषागार सहसंचालक उत्तमराव सोनकांबळे यांनी आज येथे केले.
राजर्षी शाहू महाराज यांची जयंती अर्थात सामाजिक न्याय दिनानिमित्त सामाजिक न्याय भवनात आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. समाजकल्याण उपायुक्त सुनील वारे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रादेशिक उपायुक्त विजय साळवे, वित्त व लेखा सहसंचालक डॉ. प्रकाश दासे, समाजकार्य महाविद्यालयाचे डॉ. दिलीप काळे, सहायक समाजकल्याण आयुक्त मंगला मून, प्रा. प्रवीण खांडवे आदी यावेळी उपस्थित होते.
श्री. सोनकांबळे म्हणाले की, महापुरुषांचे कार्य पाठ्यपुस्तकातून नव्हे, तर समाजाच्या विद्यापीठातून चांगले कळते. शाहू, फुले, आंबेडकरांनी मोठ्या सामाजिक सुधारणांसाठी शिक्षणाच्या क्षेत्रात महत्वाचे कार्य केले. राजर्षी शाहू महाराज यांनी शिक्षणासाठी आपल्या अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली. मागास वर्गासाठी आरक्षण व विविध वसतिगृहांची उभारणी केली. त्यांचे निर्णय क्रांतिकारी व परिवर्तन घडवणारे होते.
श्री. सोनकांबळे यांनी यावेळी सिंधु संस्कृतीपासून ते आजचे भारतीय समाजकारण, स्थित्यंतरे यांची अभ्यासपूर्ण मांडणी केली.
श्री. वारे म्हणाले की, द्वेषावर आधारित जातिभेदाची भावना समूळ मिटविण्यासाठी व समतेचे राज्य आणण्यासाठी सर्वांनी फुले- शाहू- आंबेडकर ही विचारधारा आत्मसात केली पाहिजे.
 श्री. खांडवे यांनी यावेळी छतावरील पाण्याचे व्यवस्थापनाबाबत सादरीकरण केले. उत्तमराव भैसने, मुरलीधर पिसे, नारायणराव मेंढे, भाऊसाहेब पेठे, सुरेश स्वर्गे, सखुबाई वाळसे, श्री. खंडारे, श्री. हातागडे आदींना यावेळी विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. व्यसनमुक्तीच्या कार्याबद्दल श्रीकृष्ण पखाले यांचाही पुरस्काराने गौरव करण्यात आला. 
श्रीमती मून यांनी प्रास्ताविक केले. समाजकल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर यांनी आभार मानले. श्री. पखाले यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी श्यामभाऊ आकोडे, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, लेखाधिकारी मोहन आगळे, नितीन दांडगे यांच्यासह अनेक अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
                                                       




Tuesday, June 25, 2019

खरीप पीक कर्ज वितरणाचा लाभ अधिकाधिक शेतक-यांना द्यावा - जिल्हाधिकारी शैलेश नवाल


अमरावती, दि. 25 : मान्सून व पेरणीचा हंगाम लक्षात घेता खरीप पीक कर्ज वितरणाला गती देऊन कर्ज वितरणाचा लाभ अधिकाधिक शेतक-यांना मिळावा यासाठी प्रयत्न व्हावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी अग्रणी बँक व संबंधित यंत्रणेच्या अधिका-यांशी आज जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा करून निर्देश दिले.
ते म्हणाले की, शेतक-यांना वेळेवर पीक कर्ज वाटप करण्याबाबत यापूर्वीच वेळोवेळी निर्देश देण्यात आले आहेत. पीक कर्ज वाटपाला प्राधान्य देऊन बँक अधिका-यांनी काम करावे. सर्वांनी संवेदनशीलपणे कामे करावीत. शेतकरी बांधवांना मेळाव्याच्या माध्यमातून आवश्यक कागदपत्रे व संपूर्ण माहिती द्यावी, असे जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी सांगितले. शेतकरी बांधवांना माहिती मिळण्यासाठी मेळाव्याची सर्वदूर प्रसिद्धी करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.
बँकांनी पीक कर्जासाठी अनावश्यक कागदपत्रे मागू नयेत. शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवठा करणे हे बँकांचे महत्वाचे काम आहे. त्यामुळे बँकांनी संवेदनशीलता बाळगून शेतकऱ्यांपर्यंत पोहचून त्यांना पीक कर्ज उपलब्ध करुन द्यावे. कुणीही पात्र शेतकरी कर्ज मिळण्यापासून वंचित राहता कामा नये, असे ते म्हणाले.
 बँकांकडून पीक कर्ज मंजूर करण्यास टाळाटाळ झाल्यास शेतकरी बांधवांनी तहसीलदार, सहायक निबंधक किंवा 1077 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

कृषी मंत्री यांचा जिल्ह्यात पहिला कार्यक्रम उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान योजनांचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नरत - कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे







अमरावती, दि. 23 : शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यादृष्टीने शासन प्रयत्नरत असून कृषी प्रशासनानेही गतीने कार्य करावे, असे कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज येथे सांगितले.
             कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेतर्फे उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानात तालुकास्तरीय शेतकरी व कृषी मित्र प्रशिक्षण कार्यक्रम वरुड तालुक्यातील मुसळखेडा येथे झाला, त्यावेळी ते बोलत होते. कृषी मंत्री पद मिळाल्यानंतर त्यांचा जिल्ह्यातील हा पहिलाच कार्यक्रम होता. संत योगीराज महाराज, वरुडच्या नगराध्यक्षा स्वाती आंडे,  श्रीमती वसुधाताई बोंडे, कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, जिल्हा कृषी विकास अधिकारी कुर्बान तडवी आदी उपस्थित होते.
           ज्या मातीने मला पहिल्यांदा आमदार केले, तिचे पहिल्यांदा दर्शन घेणार हे ठरवले होते. त्यामुळे इथे पहिला कार्यक्रम घेतला, असे सांगून डॉ. बोंडे म्हणाले की, कृषी मंत्री पदाच्या रूपाने मोठी जबाबदारी मिळाली आहे. सध्या महाराष्ट्र दुष्काळाच्या परिस्थितीतून जात आहे. राज्यात चांगले पर्जन्यमान होण्याची गरज आहे. त्यामुळे राज्यात सर्वदूर चांगला पाऊस पडावा अशी प्रार्थना आपण सर्व मिळून करूया, असे आवाहन डॉ. बोंडे यांनी प्रारंभी केले. 
          ते म्हणाले की, मान्सून लक्षात घेता कृषी खात्याने संपूर्ण ताकदीने काम करावे. रिक्त पदे भरण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सकारात्मक आहेत.   विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्न करावे. कृषी सहायक हा योजनेच्या अंमलबजावणी यंत्रणेचा महत्वाचा घटक असल्याने कृषी सहायकाला ग्रामपंचायत इमारतीत बसण्यासाठी जागा देण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे पीक विम्याच्या तक्रारींचे वेळीच निराकरण करण्यासाठी विमा कंपनीचा प्रतिनिधी कृषी कार्यालयात उपलब्ध असला पाहिजे. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी ही प्रक्रिया गतिमान व अद्ययावत माहिती ठेवली पाहिजे, असे निर्देश त्यांनी दिले.
  
वाळलेल्या झाडांचे पंचनामे करा

जिल्ह्यात 68 हजार हेक्टर पैकी 14 हेक्टर संत्रा झाडे वाळली आहेत. त्यांचे तातडीने प्राथमिक सर्वेक्षण व पंचनामे करून घ्यावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
शेतकरी व वंचितांचे प्रश्न सोडविण्यासाठी पद आहे. त्यामुळे सत्कार नकोत. आपण सगळ्यांनी मिळून सत्कार्य करूया. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नवभारताचे निर्माण होत आहे. या विकासप्रक्रियेत सहभागी होऊन आपणही योगदान देऊया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 
प्रारंभी डॉ. बोंडे यांनी श्री हनुमान मंदीर व संत यशवंत महाराज यांच्या मंदिरात दर्शन घेतले. यावेळी संस्कार भारती तर्फे मंत्री महोदयांची ग्रंथतुला करण्यात आली. कार्यक्रमाला मोठा जनसमुदाय उपस्थित होता. वरुड- मोर्शी शहरात व विविध गावात ठिकठिकाणी विविध संस्था व नागरिक यांच्याकडून मंत्री महोदयांचे स्वागत करण्यात आले.
कार्यशाळेत कृषी तज्ज्ञ श्याम ताथो डे यांनी मार्गदर्शन केले.
00000

जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक आजारी उद्योगांच्या पुनर्वसनासाठी सर्वंकष प्रयत्न करावे - जिल्हाधिकारी शैलेश नवाल





अमरावती, दि. 25 : औद्योगिक वसाहतीतीतल आजारी व बंद उद्योगांच्या पुनवर्सनासाठी सर्वंकष प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संजय बांगर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता राहूल बनसोड, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक एल. के. झा यांच्यासह मनपा प्रशासन व विद्युत विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.
श्री. नवाल म्हणाले की, लघुउद्योगांच्या विकासासाठी शासनाव्दारे विविध उपक्रम राबविण्यात येतात. आजारी व बंद स्थितीत असलेल्या उद्योगांबाबत आवश्यक उपाययोजना वेळोवेळी राबविल्या पाहिजेत. त्यामुळे संबंधित यंत्रणेने अशा उद्योगांची  सद्य:स्थिती तपासावी व आवश्यक उपाययोजना कराव्यात. एनपीए युनिट म्हणून आढळलेल्या उद्योगांबाबत योग्य कार्यवाही तत्काळ करावी.
          ते पुढे म्हणाले की, शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व उद्योगात पर्यवेक्षीय श्रेणीत किमान पन्नास टक्के, अपर्यवेक्षीय श्रेणीत ऐंशी टक्के व पर्यवेक्षीय सहित इतर श्रेणीत किमान ऐंशी टक्के स्थानिक लोकांना रोजगार देणे आवश्यक आहे. त्यानुसार एमआयडीसी प्रशासनाने सद्य:स्थिती तपासून कार्यवाही करावी व स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा.
          एमआयडीसीमध्ये लघु उद्योग स्थापित करण्यासाठी महिला उद्योजकांसाठी भूखंड राखीव ठेवण्यात यावे. उद्योग विभागाच्या पॅकेज स्कीम प्रोत्साहन योजनेचा जिल्ह्यातील गरजू उद्योजकांना लाभ देण्यात यावा, असेही निर्देश श्री. नवाल यांनी म्हणाले.
          एमआयडीसीच्या क्षेत्रात कुठल्याही दुर्घटनेवर तातडीने नियंत्रण करण्यासाठी त्याठिकाणी अग्निशमण यंत्रणा, रस्ते निर्मिती, रुग्णालय व पोलीस चौकी आदी सुविधा तातडीने उभारण्यात याव्यात. जिल्ह्यातील नव्याने स्थापित वस्त्रोद्योग कारखान्यात जिल्ह्यातील युवकांना रोजगार मिळावा यासाठी औद्यौगिक प्रशिक्षण संस्थेत त्यासंबंधीचा ट्रेड प्रशिक्षणाची सुरुवात करुन कुशल प्रशिक्षणार्थी उपलब्ध करावेत, असेही श्री. नवाल यांनी यावेळी सांगितले.
                   एमआयडीसी रस्त्यालगतची अतिक्रमणावर कारवाई होणे गरजेचे आहे, तसेच औद्योगिक वसाहतीत स्वच्छता राखण्यासाठी पुरेसे कंटेनर आदी व्यवस्था करण्याची सूचना श्री. पातुरकर यांनी केली. याबाबत तत्काळ कार्यवाहीचे निर्देश जिल्हाधिका-यांनी पालिका प्रशासनाला दिले.
00000

Friday, June 21, 2019

जिल्ह्यात ठिकठिकाणी योग प्रात्यक्षिके निरामय जीवनासाठी योग आवश्यक - जिल्हाधिकारी शैलेश नवाल










अमरावती,दि. 21: शरीर आणि मन या दोन्ही बाबी संतुलित ठेवण्यासाठी योग हा उत्तम पर्याय आहे. योगशास्त्रातून आयुष्यात संयम व शिस्त येते. निरोगी व निरामय जीवन जगण्यासाठी योग कलेचा दैनंदिन आयुष्यात समावेश करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे सांगितले.
जिल्हा प्रशासन, क्रीडा विभाग, शिक्षण विभाग, भारत स्वाभिमान (न्यास) पतंजली योग समिती, आर्ट ऑफ लिव्हिंग, जेसीआय सेंच्युरियन व योग क्षेत्रात कार्यरत विविध संस्था यांच्या सहकार्याने विभागीय क्रिडा संकुलात आंतरराष्ट्रीय जागतिक योग दिनानिमित्त योग प्रात्यक्षिके व साधनेचा कार्यक्रम झाला, त्यावेळी ते बोलत होते.
विभागीय क्रीडा संकुलात आज योगदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी सकाळी साडेसहापासूनच शहरातील अनेक मान्यवर, व्यावसायिक, गृहिणी, विविध शाळा- महाविद्यालयांचे विद्यार्थी आदी विविध क्षेत्रातील व्यक्तींची मोठी उपस्थिती होती. सातच्या सुमारास संकुलातील सभागृहात योग प्रात्यक्षिकांना सुरुवात झाली.   आर्ट ऑफ लिव्हिंगचे जिल्हा समन्वयक व योगप्रशिक्षक निरज अग्रवाल व त्यांच्या सहका-यांनी योग प्रात्यक्षिकांबद्दल मार्गदर्शन केले.  योगाच्या अवलंबामुळे केवळ शारीरीकच नव्हे, तर मानसिक कणखरपणा प्राप्त होतो व शांततेची अनुभूती मिळते, असे प्रशिक्षकांनी यावेळी सांगितले. प्रात्यक्षिकांद्वारे शरीर व मन संतुलन, समूह साधनेतून निर्माण होणारा नाद यांचा एक वेगळा अनुभव यानिमित्ताने सर्वांना घेता आला. 
शहरात श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ परिसर, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय,  श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, विद्याभारती महाविद्यालय,  महर्षी गुरुकुल योगसाधना केंद्र, जिजाऊ सभागृह, पतंजली योग केंद्र, मोझरी गुरुकुंज, पोलीस मुख्यालय, एसआरपी कँप, मध्यवर्ती कारागृह परिसर, श्री संत गाडगेबाबा समाधी मंदिर, भारतीय महाविद्यालय, समर्थ विद्यालय, सेंट फ्रान्सिस विद्यालय, एलआयसी कार्यालय आदी विविध ठिकाणी योगदिनाचे आयोजन करण्यात आले होते. तालुका मुख्यालयातही योगदिनाचे आयोजन करण्यात आले होते, असे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी सांगितले.
क्रीडा उपसंचालक श्रीमती प्रतिभा देशमुख, माध्यमिक शिक्षणाधिकारी निलिमा टाके यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.  

पुनर्वसन प्राधिकरणाच्या उपाध्यक्षांकडून पुनर्वसितांच्या प्रश्नांचा आढावा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न कायमस्वरुपी सोडविणार - माधव भांडारी





*पुनर्वसनाच्या प्रश्नांसंबंधी थेट संवादातून तोडगा
अमरावती, दि. 21 : प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक निधी व पॅकेजची तरतूद यापूर्वीच करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणांनी प्रकल्पग्रस्तांचे सुनियोजित पुनर्वसन होण्यासाठी त्यांच्याशी समन्वय ठेवून वेगाने कामे पूर्ण करावी. येत्या दोन वर्षात प्रकल्पग्रस्तांच्या पुनवर्सनाचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यात येईल, असे राज्य पुनवर्सन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी आज येथे सांगितले.
            विभागीय आयुक्त कार्यालयात अमरावती विभागातील सिंचन प्रकल्प व पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात आढावा बैठक श्री. भांडारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त पीयूष सिंह, पुनर्वसन उपायुक्त प्रमोद देशमुख, अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल, अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अमरावती जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, यवतमाळ जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा आदी उपस्थित होते.
            श्री. भांडारी म्हणाले की, विभागात 28 प्रकल्पांच्या पुनर्वसनाची कामे सुरु आहेत. ज्या प्रकल्पांच्या पुनवर्सनाची कामे पूर्ण झाली आहेत, तेथील अधिसूचना रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण करुन अहवाल शासनास द्यावा. पुनर्वसित गावांतील सुविधा, सद्य:स्थिती याची संयुक्त पाहणी जिल्हा पुनवर्सन अधिकारी, महसूल यंत्रणा व प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी यांनी करुन त्याठिकाणी तातडीने आवश्यक सुविधा पुरविण्याची कार्यवाही करावी. प्रकल्पग्रस्तांना गावठाण भूखंडावर प्रधानमंत्री आवासयोजनेत घरे बांधून द्यावीत.  
            ते पुढे म्हणाले, विभागातील सर्वच प्रकल्पांची कामे पूर्ण झाल्याचे दिसत आहे. 2013 च्या भूसंपादन कायद्यानुसार प्रकल्पबाधितांना मोबदला देण्याची कार्यवाही करण्यात यावी. ज्या प्रकल्पांचे पुनवर्सन अपूर्ण आहे, त्याठिकाणी जुलैअखेरपर्यंत कुठल्याही परिस्थितीत कार्यादेश काढून कामे पूर्ण करावी. पुनर्वसित गावांमध्ये प्रथमत: पिण्याचे पाणी, रस्ते, शाळा, वीज जोडणी, आरोग्य सुविधा आदी  मुलभूत सुविधा पुरवाव्या. ज्या प्रकल्पांचा स्थानिक गावाला फायदा कमी प्रमाणात होत आहे, अशा ठिकाणी प्रकल्पातील जलसाठा कमी करु नये. प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या जमीनीवर अतिक्रमण झाल्याच्या तक्रारी आहेत. त्याबाबत प्रशासकीय यंत्रणांनी प्रत्यक्ष पाहणी करुन प्रकल्पबाधितांचे अतिक्रमण कायम ठेवून इतरांचे अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करावी, असे श्री. भांडारी यांनी सांगितले.
            पुनर्वसित गावात नागरी सुविधांचे काम पूर्ण झाल्यानंतर जिल्हा परिषदेला हस्तांतरित करण्यात यावे. जिल्हा परिषद प्रशासनाने सुविधांची उपयुक्तता टिकून ठेवण्यासाठी देखभाल- दुरुस्ती वेळोवेळी करावी. जिथे पुनवर्सन प्रक्रिया पूर्ण होऊन 10 वर्षाचा कालावधी झाला आहे, त्या कुटूंबांच्या नावे आठ-अ नुसार भूखंड  करुन द्यावा. प्रकल्पबाधितांच्या वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये रुपांतरित करुन द्याव्या. पुनवर्सित गावात किमान 350 लोकसंख्या असल्यास ग्रामपंचायत स्थापण्याचा प्रस्ताव शासनाला द्यावा.  प्रकल्प बाधितांच्या समित्या स्थापित करण्यासाठी प्राथमिक तयारी करुन अहवाल सादर करावा. पुनवर्सनासंदर्भातील धोरणात्मक निर्णयासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करावे. प्रकल्पग्रस्तांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यादृष्टीने मुद्रा योजना व कौशल्य विकास योजने अंतर्गत प्रशिक्षण देऊन उद्योग उभारणीसाठी सहकार्य करावे, असेही निर्देश त्यांनी दिले.
 येत्या महिन्यात राज्यतील सर्व जिल्हा पुनवर्सन अधिकाऱ्यांची व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेण्यात येईल, असेही यावेळी जाहीर करण्यात आले. उपायुक्त प्रमोद देशमुख यांनी विभागातील सिंचन प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत सादरीकरणाच्या माध्यमातून माहिती दिली.
                                    ०००

Thursday, June 20, 2019

कृषी योजनांसाठी शेतकऱ्यांना एकच अर्ज करावा लागणार कृषी मंत्र्यांनी घेतला महाडीबीटी पोर्टलचा आढावा


मुंबई, दि. 20 : शेतकऱ्यांकरीता असलेली पीक विमा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, दुष्काळी मदत, या योजनांचा समावेश नव्यानेच विकसीत करण्यात येत असलेल्या महाडीबीटी पोर्टल मध्ये करावा. कृषीविषयक सर्व योजनांचे लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांना एकच अर्ज करावा लागेल अशी सुविधा या पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज येथे दिले.
विधानभवनात आयोजित करण्यात आलेल्या कृषी विभागाच्या बैठकीत ते बोलत होते.  कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प संचालक विकास रस्तोगी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना कृषीविषयक योजनांची संपूर्ण माहिती व्हावी आणि योजनांमधील अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करता यावे याकरिता ‘महाडीबीटी’ हे नव पोर्टल विकसीत करण्यात येत आहे. विभागाच्या वतीने पोर्टलबाबत सादरीकरण यावेळी कृषीमंत्र्यांना करण्यात आले. महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळाचा या पोर्टलमध्ये समावेश करता येईल याबद्दलही विचार करावा, अशी सूचना डॉ. बोंडे यांनी केली. या पोर्टलमध्ये सध्या 11 योजनांची माहिती संकलीत करण्यात आली आहे. यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, एकात्मिक फळबाग योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना, बिरसा मुंडा कृषी स्वावलंबी योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबी योजना, दुष्काळी क्षेत्र विकास, राष्ट्रीय अन्नसुरक्षा, अन्नधान्य, तेलबिया, उस, कापूस, राष्ट्रीय कृषी विकास योजना(वयक्तीक लाभार्थी). या पोर्टलवर सर्वप्रथम शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागणार आहे.
00000

Tuesday, June 18, 2019

प्रधानमंत्री जनआरोग्य योजना एकही पात्र व्यक्ती वंचित राहता कामा नये - जिल्हाधिकारी शैलेश नवाल



अमरावती, दि.  18 :   आयुष्यमान भारत कार्यक्रमाद्वारे प्रधानमंत्री जनआरोग्य योजना राबविण्यात येत असून, एकही पात्र नागरिक त्यापासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिले.
योजनेबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यासह अनेक अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
 श्री. नवाल म्हणाले की, लाभार्थी कुटुंबांना प्रतिवर्ष पाच लाख रुपयांपर्यंत सर्जिकल आणि मेडिकल उपचार मान्यताप्राप्त खासगी आणि शासकीय रुग्णालयामार्फत उपलब्ध होणार आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व विविध घटकांच्या सहभागासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वाक्षरीचे पत्र आशासेविका, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत पाठविण्यात आली आहेत. लाभार्थी कुटुंबांनी योजनेचा लाभ घेण्याकरिता लाभार्थींना स्वतःची ई-कार्ड तयार करणे आवश्यक आहे. त्यासाठी सेतू केंद्र किंवा आरोग्य मित्रांना भेटून कार्ड तयार करून घेण्याबाबत संबंधित नागरिकांमध्ये जागृती करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
          शिधापत्रिका तसेच प्रधानमंत्री महोदयांच्या स्वाक्षरीचे पत्र आणि स्वतःचे ओळखपत्र, आधार कार्ड दाखवून हे ई- कार्ड प्राप्त करता येते. या कार्डाच्या आधारे आरोग्य विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे.  या योजनेत सामाजिक आर्थिक जातीय जनगणनेतील (एसईसीसी डेटा) राज्यातील 83 लक्ष 72 हजार कुटुंबांचा समावेश असून यामध्ये शहरी भागातील 24 लाख 81 हजार व ग्रामीण भागातील 58 लक्ष 99 हजार कुटुंबे समाविष्ट आहेत, अशी माहिती डॉ. निकम यांनी दिली.
          ते म्हणाले की, योजनेत जिल्ह्यात एकूण 3 लाख 73 हजार 266 कुटुंबांचा समावेश असून, त्यात 2 लाख 83 हजार 229 ग्रामीण व 90 हजार 37 शहरी कुटुंबे आहेत. एकूण 4 हजार 62 कार्डवाटप झाले आहे. ही गती वाढविण्यासाठी जागृती करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

ग्रामीण भागातील घराची भौगोलिक स्थिती, कुटुंबातील कमावती व्यक्ती, अनुसूचित जाती व जमाती, भूमीहीन  शेतकरी आदी  वर्गांतील कुटुंबाचा तर शहरी भागातील कचरावेचक, भिकारी, घरकामगार, फेरीवाले, बांधकाम मजूर, कारागीर आदी वर्गातील कुटुंबांचा समावेश प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत आहे. या योजनेबाबत माहितीसाठी टोल फ्री क्रमांक 1800 111 565 तसेच 14 555 आहे.
                                                 
                                      महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत लाभार्थी कुटुंबीयांना प्रति वर्ष प्रति कुटुंब रुपये दीड  लक्ष रुपयांचा लाभ रुग्णालयातून घेण्यात येतो. या योजनेत 971 सर्जिकल व मेडिकल आजारांवर उपचार घेता येतो. आतापर्यंत सदर योजनेत 48 हजार आठ रुग्णांना लाभ देण्यात आला आहे. योजनेबाबत टोल फ्री क्रमांक 1800 233 2200 तसेच 155 388 असा आहे.
                                      000  

Saturday, June 15, 2019

पालकमंत्र्यांच्या हस्ते सुमारे सात कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन

           जिल्ह्यातील महत्वाच्या दोन रस्त्यांच्या सुधारणा कामांचे भूमिपूजन आज पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या हस्ते झाले.
 आमदार रमेश बुंदिले,  जि. प. सदस्य प्रवीण तायडे, जयंत आमले यांच्यासह अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 
            दर्यापूर ते आसेगाव राज्यमार्ग सुधारणा कामाचे, मार्की- निरूळ गंगामाई- मिर्झापूर- महिमापूर रस्ता सुधारणा कामाचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. दर्यापूर ते आसेगाव मार्ग सुधारणा कामाचे मूल्य चार कोटी रु., तर  मार्की महिमापूर रस्ता सुधारणा कामाचे मूल्य तीन कोटी रु. आहे.

           

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याला मोठा विकासनिधी मिळवून दिला आहे. त्यामुळे अनेक विकासकामांना चालना मिळाली. या रस्त्यांच्या सुधारणेमुळे परिसरातील नागरिकांना लाभ मिळेल. ही कामे वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री श्री. पोटे पाटील यांनी यावेळी दिले. अधिकारी व कर्मचा-यांसह परिसरातील नागरिकही यावेळी उपस्थित होते.

अंजनगाव सुर्जी पंचायत समितीच्या इमारतीचे भूमिपूजन जिल्ह्यात सर्वदूर पायाभूत सुविधांचा विकास - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील






अमरावती, दि. १५ : कृषी, उद्योग, आरोग्य, शिक्षण अशा विविध क्षेत्रांसह रस्तेविकास व पायाभूत सुविधांसाठी जिल्ह्यात सुमारे 25 हजार कोटी रूपये निधीतून अनेक विकासकामे होत आहेत. जिल्ह्यात सर्वदूर व समतोल विकास याद्वारे होत आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे केले.  
          अंजनगाव सुर्जी पंचायत समितीच्या इमारतीचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. आमदार रमेश बुंदिले, नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे, जि. प. उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, महिला व बालकल्याण सभापती वनिता पाल, आरोग्य सभापती बळवंत वानखेडे, पंचायत समितीच्या सभापती प्रियंकाताई दाळू, उपसभापती महेश खारोडे,  जि. प. सदस्य प्रवीण तायडे, विठ्ठल चव्हाण, जयंत आमले, गटविकास अधिकारी धोत्रे, दाळू महाराज आदी उपस्थित होते. 
          पालकमंत्री श्री. पोटे पाटील म्हणाले की, गत पावणेपाच वर्षात जिल्ह्यात सर्वच भागात विविध विकासकामांना चालना देण्यात आली. पालकमंत्री पांदणरस्ते योजनेसारखी योजना ग्रामविकासात महत्वपूर्ण ठरली आहे. जलपुनर्भरणासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग व शोषखड्ड्याच्या योजनेला चालना दिली आहे. यापुढे जलयुक्त शिवार व सिंचन विकासावर भर देऊन कामे करणार आहे. पंचायत समितीची ही इमारत विहित मुदतीत पूर्ण करावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.  
          पालकमंत्र्यांच्या प्रयत्नामुळे रस्तेविकासाची व पायाभूत सुविधांची मोठी कामे जिल्ह्यात झाली, असे श्री. बुंदिले म्हणाले.  श्री. पोटे पाटील यांच्या संकल्पनेतून आकारास आलेली पालकमंत्री पांदण रस्ते योजना राज्यभर अंमलात आली. या योजनेत नियम व अटींचे थोड्या प्रमाणात सुलभीकरण होण्याची गरज श्री. वानखेडे यांनी व्यक्त केली. श्री. लाडोळे, श्री. ढोमणे, श्री. खारोडे, नितीन पटेल यांनी मनोगत व्यक्त केले.

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...