Tuesday, June 25, 2019

खरीप पीक कर्ज वितरणाचा लाभ अधिकाधिक शेतक-यांना द्यावा - जिल्हाधिकारी शैलेश नवाल


अमरावती, दि. 25 : मान्सून व पेरणीचा हंगाम लक्षात घेता खरीप पीक कर्ज वितरणाला गती देऊन कर्ज वितरणाचा लाभ अधिकाधिक शेतक-यांना मिळावा यासाठी प्रयत्न व्हावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी अग्रणी बँक व संबंधित यंत्रणेच्या अधिका-यांशी आज जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा करून निर्देश दिले.
ते म्हणाले की, शेतक-यांना वेळेवर पीक कर्ज वाटप करण्याबाबत यापूर्वीच वेळोवेळी निर्देश देण्यात आले आहेत. पीक कर्ज वाटपाला प्राधान्य देऊन बँक अधिका-यांनी काम करावे. सर्वांनी संवेदनशीलपणे कामे करावीत. शेतकरी बांधवांना मेळाव्याच्या माध्यमातून आवश्यक कागदपत्रे व संपूर्ण माहिती द्यावी, असे जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी सांगितले. शेतकरी बांधवांना माहिती मिळण्यासाठी मेळाव्याची सर्वदूर प्रसिद्धी करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.
बँकांनी पीक कर्जासाठी अनावश्यक कागदपत्रे मागू नयेत. शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवठा करणे हे बँकांचे महत्वाचे काम आहे. त्यामुळे बँकांनी संवेदनशीलता बाळगून शेतकऱ्यांपर्यंत पोहचून त्यांना पीक कर्ज उपलब्ध करुन द्यावे. कुणीही पात्र शेतकरी कर्ज मिळण्यापासून वंचित राहता कामा नये, असे ते म्हणाले.
 बँकांकडून पीक कर्ज मंजूर करण्यास टाळाटाळ झाल्यास शेतकरी बांधवांनी तहसीलदार, सहायक निबंधक किंवा 1077 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...