Monday, December 30, 2024

मोर्शी नगर परिषदेची विकास कामे तात्काळ पूर्ण करावीत - खासदार डॉ. अनिल बोंडे

 




मोर्शी नगर परिषदेची विकास कामे तात्काळ पूर्ण करावीत

       - खासदार डॉ. अनिल बोंडे

 

अमरावती, दि. 30 ( जिमाका): मोर्शी शहरातील पाणीपुरवठ्याची समस्या तातडीने सोडविण्यात यावी. यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाने समन्वयाने काम करावे. तसेच मोर्शी नगरपरिषद येथील जिल्हा नियोजन अंतर्गत मंजूर असलेली कामे आणि इतर विकास कामे तात्काळ पूर्ण करावीत ,असे निर्देश खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे विविध विषयांचा आढावा खासदार डॉ .बोंडे यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते.  जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्र, अपर जिल्हाधिकारी विवेक जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत मस्के, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी प्रीती देशमुख, जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक महेश शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

खासदार डॉ. बोंडे म्हणाले, मोर्शी, वरूड, शे.घाट नगरपरिषद हद्दीतील पीआर कार्ड त्वरित वितरित करण्यात यावे. पीआर कार्ड नसल्यामुळे घरकुलाचा लाभ येथील लाभार्थ्यांना मिळण्यास अडचणी येत आहेत. प्रलंबित पीआर कार्ड प्रकरणांचा निपटारा कडून नागरिकांना कार्ड मिळवून द्यावे. येथील प्रलंबित पीआर कार्ड प्रकरणांची संख्या तसेच प्रलंबित असल्याची कारणे याबाबत काटेकोर आढावा घेऊन प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करुन याबाबतचा अहवाल सादर करावा. तसेच दलित वस्ती मधील विकास कामे प्राधान्याने पूर्ण करावी.  मोर्शी  तालुक्यातील लाडकी, येरला येथील पाण्याची टाकी शिकस्त झाली आहे.  ती धोकाग्रस्त असल्यामुळे  नवीन बांधण्यासाठी त्वरित कार्यवाही करावी .तसेच नगरपरिषद शेघाट येथील जिल्हा नियोजन अंतर्गत मंजूर असलेल्या रकमेमधून प्रलंबित कामे पूर्ण करण्यात यावी.  पर्यटनाचा विकास झाल्यास स्थानिकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतात. मौजा नांदुरा येथील ‘जय जवान जय किसान निसर्ग पर्यटन केंद्रा’ला चालना देण्याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात यावी , अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

वरुड नगर परिषद हद्दीतील आठवडी बाजार भरत असलेल्या जागेवर आरक्षण काढून लाभार्थ्यांना पट्टेवापटप करण्यात यावे. याशिवाय वरूड तालुक्यातील एकालविहीर ते लिंगा रस्त्यासाठी अधिग्रहित केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला त्यांना त्वरित मिळवून देण्यासाठी त्वरित कार्यवाही करावी. स्केटिंग खेळाचा प्रसार होण्यासाठी मोर्शी शहरातील क्रीडा संकुलाच्या किंवा नगर परिषदेच्या खुल्या जागेवर 20 हजार स्क्वेअर फूट जागेवर रोलर स्केटिंग रिंग तयार करण्यासाठी जिल्हा नियोजन अंतर्गत कारवाई करण्यात यावी, असे निर्देश दिले.

खासदार डॉ. बोंडे यांनी जिल्हा परिषद अंतर्गत विविध विषयांचाही आढावा घेतला.  यामध्ये प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या, मनरेगा अंतर्गत विकास कामे, नांदगाव पेठ येथील काशीनाथ बाबा मंदीर देवस्थानासंदर्भात आढावा घेतला .मेळघाट येथील आमनेरी किल्ला स्थळ पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्याबाबत आराखडा तयार करण्यासंदर्भात सूचना दिल्या. शहरे अतिक्रमणमुक्त व्हावी, यासाठी विशेष मोहीम राबवावी, असेही ते यावेळी म्हणाले.

00000

DIO NEWS AMRAVATI 30.12.2024




जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पीएचडीप्राप्त अनिकेत देशमुखचा सत्कार

पीएचडी प्राप्त करणारा पहिला अनाथ

अमरावती, दि. 30 (जिमाका) : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये पीएचडी प्राप्त करणारा अनिकेत वीरेंद्र देशमुख यांचा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे श्री. देशमुख हे अमरावती जिल्ह्यातून डॉक्टरेट प्राप्त करणारे पहिले अनाथ विद्यार्थी ठरले आहेत.

शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेचे अनिकेत वीरेंद्र देशमुख यांनी उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरेट पूर्ण केली आहे. त्यांनी 'कलम 35 ए रद्द करणे : कारणे आणि परिणाम' या विषयावर पीएचडीचा शोध प्रबंध सादर केला आहे. विद्यापीठाने 20 डिसेंबर रोजी अधिसूचना काढून त्यांना डॉक्टरेट प्रदान केली आहे

00000 


सहकार व्यवस्थापक पदविका प्रवेश सुरु

अमरावती, दि. 30 (जिमाका) : महाराष्ट्र शासन सहकार विभाग यांच्या वतीने प्रसिध्द केलेल्या परिपत्रकानुसार सहकारी संस्थामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास सहकारी व्यवस्थापन पदविका (डि.सी.एम.) अनिवार्य केले आहे. त्यामुळे राज्यातील सहकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे कामकाज सांभाळून हा अभ्यासक्रम दुरस्थ शिक्षण पध्दतीने पूर्ण करता यावा तसेच राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना सहकार क्षेत्रातील विविध सहकारी संस्थामध्ये सदर पदविका अभ्यासक्रमामुळे नोकरीची संधी उपलब्ध व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी संघाने 13 सहकार प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून हा अभ्यासक्रम पोस्टल पध्दतीने सुरु केला आहे.

या अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या, पुणे अंतर्गत भाऊसाहेब भोकरे सहकार प्रशिक्षण केंद्र ,अमरावती येथे  दिनांक 1 जानेवारी  ते 30 जून 2025 या कालावधीत प्रवेश सुरु राहील. त्यासाठी प्राचार्य भाऊसाहेब भोकरे सहकार प्रशिक्षण केंद्र येथे संपर्क  साधून प्रवेश निश्चित करावा. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक 9881047668 असे प्राचार्य भाऊसाहेब भोकरे सहकार प्रशिक्षण केंद्र, यांनी कळविले आहे.   

00000

                    अडगाव येथील अन्न विषबाधा त्वरित आटोक्यात

                                आरोग्य विभागाची कार्यवाही

अमरावती, दि. 30 (जिमाका) : अडगाव ता. मोर्शी येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये 1 ते 4 इयत्तेची मुले शिकत आहेत. एकूण पटावर 80 बालके असून शनिवार दिनांक 28 डिसेंबर 2024 रोजी एकूण 70 बालके शाळेमध्ये उपस्थित होती. शाळेमध्ये बालकांना माध्यान्य भोजनामध्ये वाटाणा खिचडी व मोट देण्यात आली. शनिवारी रात्री 8.30 वाजेनंतर काही बालकांना उलटी व पातळ संडास होण्यास सुरुवात झाली. एकुण 18 बालकांना उलटी, संडास हे लक्षणे घेऊन उपचाराला करिता आणण्यात आले. सर्वांचे वयोगट व लक्षणे सारखे असल्यामुळे रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात त्वरित उपचार सुरु करण्यात आले.

याबाबत माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी जिल्हास्तरीय शीघ्र प्रतिसादपथक तसेच तालुका आरोग्य अधिकारी, मोर्शी यांना तातडीने गावात भेट दिली. डॉ. आसोले जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनामध्ये अतिरिक्त जिल्हा  आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण पारिसे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. जुबेर अली व इतर सदस्य यांनी तातडीनेअडगाव येथे रिस्थितीचा आढावा घेवून उपाययोजना राबविण्यात  आल्या. डॉ. प्रविण पारिसे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जयस्वाल, डॉ. झुबेर अली, वैद्यकिय अधिकारी डॉ. बागडे, समुदाय आरोग्य अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांनी तात्काळ कार्यवाही करीत  परिस्थिती आटोक्यात आणली.

अडगाव येथील आयुर्वेदिक दवाखान्यामध्ये  एकलन कक्ष उघडण्यात आले. दोन वैद्यकिय अधिकारी, चार समुदाय आरोग्य अधिकारी, चार आरोग्य सेविका व इतर आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे.  एकलन कक्षामध्ये सर्व औषधे, बेड, रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आलेली असून कक्ष 24 तास कार्यरत आहे.

 उपचारासाठी एकूण 31 बालकांना दाखल करण्यात आले असून 23 बालकांना सलाईन मार्फत उपचार करण्यात आले आहे. यापैकी एकुण 11 बालकांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे संदर्भित करण्यात आले आहे.  सर्व बालकांची प्रकृती स्थिर आहे. शाळेतील इतर बालकांचा आशा स्वंयसेविकेमार्फत घरोघरी जाऊन तपासणी पाठपुरावा करण्यात येत आहे. जिल्हास्तरीय शीघ्र प्रतिसाद पथकामार्फत जिल्हा परिषद शाळेमधील तांदुळ, वाटाणा, मोट, कांदा-लसुण मसाला पॅकेट व पाण्याचा नमुना घेण्यात आला आहे. तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाला कळविण्यात आले  आहे. आरोग्य विभागाच्या तत्परतेमुळे सर्व  बालकांवर तात्काळ उपचार करण्यात आले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. आरोग्य विभागाच्या चमुच्या प्रयत्नांचे सर्व गावकरी, लोकप्रतिनिधी यांनी कौतुक केले.

00000

नववर्षानिमित्त शहरातील उड्डाणपुल मार्गावरील वाहतुक मार्गात बदल

अमरावती, दि. 30 (जिमाका) : नववर्ष स्वागतासाठी बहुसंख्येने नागरिक विशेषतः तरुण वर्ग आनंदोत्सव साजरा करतात. अशा वेळी वाहतुकीची कोंडी होवून अपघातासारखा अनुचित प्रकार घडू नये तसेच सार्वजनिक शांतता भंग होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी नागरीकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दि. 31 डिसेंबर 2024 चे रात्री 10 वाजेपासून ते 1 जानेवारी 2025 चे  सकाळी 6 वाजेपर्यंत पर्यंत नमुद कालावधीसाठी गाडगेबाबा समाधी ते शिवाजी शिक्षण संस्था व नेहरु स्टेडियम कडे येणारा उड्डाणपुल, इर्विन चौक ते राजापेठ पोलीस स्टेशन उड्डाणपुल , कुथे हॉस्पीटल ते नंदा मार्केट व कुशल ऑटोकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावरुन आवागमन करणारी सर्व प्रकारची वाहनांची नमुद कालावधीत वाहतुक बंद करण्यात येत आहे. जो कोणी वाहनधारक सदर अधिसुचनेचे उल्लघंन करील त्यांच्याविरुध्द मोटार वाहन कायदा 1988 व मुंबई पोलीस कायदा 1951 नुसार कार्यवाही करण्यात येईल. नागरिकांनी यास सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस उपायुक्त कल्पना बारवरकर यांनी केले आहे.

00000



Friday, December 27, 2024

DIO NEWS AMRAVATI 27.12.2024

 

माजी कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

अमरावती, दि. 27 (जिमाका) :  देशाचे माजी कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीदिनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

     यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विजय जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत मस्के, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांनीही त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

 

000000

बहिरम यात्रेनिमित्त वाहतूक मार्गात बदल

        अमरावती, दि. 27 (जिमाका): बहिरम यात्रेनिमित्त शनिवार, रविवार व शासकीय सुट्टीच्या दिवशी यात्रेकरूंची गैरसोय व अपघात टाळण्यासाठी दि. 31 जानेवारी 2025 पर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्र. 548 सी वरील वाहतुक परतवाडा ते बैतुल व बैतुल ते परतवाडा रस्त्याने येणारे-जाणारे जडवाहनांसाठी शनिवार, रविवार व शासकीय सुट्टीच्या दिवशी खरपी ते कारंजा बहिरम गावादरम्यान प्रवेश निषेध करून त्याऐवजी खरपी गावारून कजरगाव-सर्फापूर-कारंजा बहिरम व कारंजा बहिरम वरून सर्फापुर-करजगाव-खरपी या पर्यायी मार्गाने वाहतुक वळविण्यात आली आहे.

            सदर अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्या विरूध्द मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी कळविले आहे.

00000



तंबाखू नियंत्रण कायदयाबाबत कार्यशाळा संपन्न

अमरावती, दि. 27 (जिमाका) : सामान्य रुग्णालय, अमरावती येथे तंबाखू नियंत्रण कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता. यामध्ये मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, छत्रपती संभाजीनगर, पोलीस अधीक्षक कार्यालय, अमरावती तसेच जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंथन हॉल, पोलीस अधीक्षक कार्यालय, अमरावती येथे ही कार्यशाळा संपन्न झाली .

            पोलीस निरीक्षक किरण वानखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील डॉ. अली, डॉ. निकिता गायकवाड, विभागीय व्यवस्थापक मंगेश गायकवाड यांनी उपस्थितांना धूम्रपानाच्या दुष्परिणामाबाबत माहिती दिली. कायद्यान्वये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानाला प्रतिबंध आहे. तसेच अठरा वर्षाखाली व्यक्तींना तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन तसेच विक्री करण्यास प्रतिबंध आहे. कुठल्याही शैक्षणिक संस्थेच्या शंभर यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे प्रतिबंधित आहे. तंबाखूजन्य पदार्थाच्या व्यसनामुळे तरुणांमधील कर्करोग वाढत आहे. यासाठी सर्वांनी तंबाखू नियंत्रण कायद्याबाबत जनजनगृती करणे महत्त्वाचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.  कार्यशाळेचे संचालन विभागीय व्यवस्थापक अनिल गुंजे यांनी केले .

00000

वाहनांना नवीन नंबर प्लेट बसविण्याचे आवाहन

*31 मार्चपर्यंत मुदत

अमरावती, दि. 27 (जिमाका) : केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार राज्य शासनाने सर्व वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट बसविण्याची तरतूद केली आहे. त्यानुसार वाहनधारकांनी 31 मार्च पूर्वी नंबर प्लेट बसवावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

जिल्ह्यासाठी एजंसी निश्चित करण्यात आली आहे. एचएसआरपी नंबर प्लेटसाठी बुकींग करण्यासाठी mhhsrp.com पोर्टल निश्चित करण्यात आले आहे. वाहनधारकांनी पोर्टलवर बुकींग करून त्यांच्या सोईप्रमाणे अपॉइंटमेंट घेऊन एचएसआरपी नंबर प्लेट दि. 31 मार्च 2025 पूर्वी बसवून घेण्यात यावी. वाहनधारक अमरावती कार्यालयातील नोंदणीधारक नसला तरी अमरावतीमध्ये वाहन वापरत असल्यास वाहनास एचएसआरपी नंबर प्लेट बसविणे आवश्यक आहे.

            एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी दुचाकी, ट्रॅक्टरसाठी 450 रूपये, तीनचाकीसाठी 500 रूपये, इतर सर्व वाहनांसाठी 745 रूपयांप्रमाणे जीएसटी वगळून शुल्क आकारण्यात येणार आहे. वाहनधारकांना त्यांच्या वाहनावर एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याबाबत तक्रारी असल्यास संबंधित सेवापुरवठा धारकांच्या पोर्टल, तसेच अमरावती प्रादेशिक परिवहन कार्यालयात तक्रार दाखल करू शकतील.

वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे, तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना एचएसआरपी बसविणे आवश्यक आहे. यासाठी सर्वोच्च्‍ न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वाहनधारकांनी वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहे.

जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्या वाहनावर एचएसआरपी नंबर प्लेट बसविली नसल्यास वाहनाचे मालकी हस्तांतरण, पत्ता बदल, वित्त बोजा चढविणे, उतरविणे, दुय्यम प्रत, विमा अद्यावत करणे आदी कामकाज थांबविण्यात येणार आहे. एचएसआरपी नंबर प्लेट नसलेली वाहने, बनावट एचएसआरपी नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी कळविले आहे.

000000








सुपर स्पेशालीटीतील शिबिरात 55 जणांचे रक्तदान

अमरावती, दि. 27 (जिमाका) : विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल येथे आज दि. 27 डिसेंबर रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबीरात 55 जणांनी रक्तदान केले. 

रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अमोल नरोटे आणि विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांनी शिबिराचे आयोजन केले. शिबिरामध्ये रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी आणि खासगी वैद्यकीय संस्थेतील विद्यार्थी, विदर्भ आयुर्वेद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.

शिबिरासाठी महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजना विभाग प्रमुख डॉ. श्याम गावंडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव ढोपरे, डॉ. विक्रांत कुळमेथे, परिसेविका अलका जवंजाळ, वैद्यकीय समुपदेशक दिनेश हिवराळे, मुकादम श्रीकांत ढेंगे, विक्रांत येते यांनी सहकार्य केले. जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तपेढी अंतर्गत  डॉ. अविनाश उकंडे, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. राहुल खराटे, रक्त संक्रमण अधिकारी मिलिंद तायडे, जनसंपर्क अधिकारी संगिता गायधने, मंगेश उमप, प्रविण कळसकर यांनी रक्त संकलनाचे कार्य पाडले.

000000


Thursday, December 26, 2024

DIO NEWS AMRAVATI 26.12.2024

 




वीर बाल दिवसानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

       अमरावती, दि 26 (जिमाका) : वीर बालदिवस निमित्ताने जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात साहिबजादे बाबा जोरावार सिंह आणि बाबा फतेह सिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

      यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, तहसिलदार प्रशांत पडघम यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

00000

स्वामित्व योजनेंतर्गत तयार झालेल्या सनदांचे

पंतप्रधानांच्या यांच्या हस्ते आज ऑनलाईन वाटप

अमरावती, दि. 26 (जिमाका) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच स्वामित्व योजनेचे उद्घाटन केले. या योजनेचा उद्देश गावातील आबादी क्षेत्रातील घरांसाठी मालमत्ता पत्रक देणे हा आहे. ही योजना  ग्रामीण विकास विभाग, भूमि अभिलेख कार्यालय (महसूल विभाग) आणि सर्व्हे ऑफ इंडिया यांचा संयुक्त उपक्रम असून यासाठी ड्रोन तंत्रज्ञान आणि प्रगत नकाशांकन तंत्रांचा उपयोग केला जातो. ही योजना ग्रामिण समुदायांच्या आर्थिक समावेशनात सुधारणा, पतपुरवठ्यास सुलभता आणि एकूणच सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते.

             उद्या, शुक्रवार, दि. 27 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12.30 वाजता  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वामित्व योजनेतंर्गत 50 लाखांहून अधिक घरमालकांना मालमत्ता कार्डांचे, सनदचे ई-वितरण करतील, तसेच या योजनेतील लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमानंतर मंत्री महोदय किंवा लोकप्रतिनिधी, अधिकारी इत्यादींच्या उपस्थितीत स्थानिक कार्यक्रमांद्वारे मालमत्ता कार्डांचे, सनदचे प्रत्यक्ष वितरण करण्यात येणार आहे.

             स्वामित्व योजनेचे लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी अमरावती विभागातील जिल्ह्यांमधील तालुका आणि पंचायतस्तरावर एकुण 149 गावांमध्ये  स्वामित्व योजनेंतर्गत सनद वाटपाचा कार्यक्रम करण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावरील कार्यक्रम जिल्हा नियोजन भवन येथे होणार असून केंद्र शासनाकडून प्राप्त यादीनुसार खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या हस्ते मौजे रामगाव, तालुका अमरावती या गावातील सनद वाटपाचा कार्यक्रम होणार आहे.

          बुलढाणा जिल्ह्यातील एकुण 13 तालुक्यातील 50 गावांमध्ये सनद वाटप कार्यक्रम होणार असून तालुका स्तरावरील कार्यक्रम मोताळा तालुक्यामध्ये होणार आहे.  अकोला जिल्ह्यातील एकुण 7 तालुक्यातील 12 गावांमध्ये सनद वाटप कार्यक्रम राबविण्यात येणार असून जिल्हास्तरावरील कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणार आहे तसेच तालुका स्तरावरील कार्यक्रम मौजे भोकर, तालुका तेल्हारा येथे आयोजित करण्यात आला आहे.  यवतमाळ जिल्ह्यातील 9 तालुक्यातील 44 गावांमध्ये सनद वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये 2 तालुक्यातील एकुण 9 गावांमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.

00000

संत गाडगेबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनी आज

अमरावती, दि. 26 (जिमाका) : महाराष्ट्र शासन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्यामार्फत राबविल्या जाणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षण हे प्रात्यक्षिकाभिमुख असून औद्योगिक क्षेत्राला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाचा पुरवठा केला जातो. संस्थेत मिळणाऱ्या तांत्रिक कौशल्याबरोबरच  प्रशिक्षणार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने पूरक उपक्रम राबविणे व प्रशिक्षणार्थ्यांच्या कौशल्यास तसेच व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने विविध कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. संत गाडगेबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था  येथे जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शन 2024 चे आयोजन उद्या, शुक्रवार, दि . 27 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता करण्यात येणार आहे. यामध्ये अभियांत्रिकी व्यवसायमधून एकूण 2 मॉडेल व बिगर अभियांत्रिकी व्यवसायमधून 3 मॉडेलची संस्थास्तरावर निवड होऊन जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनीमध्ये समावेश करण्यात येणार आहे. सदर मॉडेल हे नाविण्यपूर्ण समाजसेवी तसेच व्यवसायाशी निगडित असल्यामुळे भविष्यकालीन औद्योगिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. या तंत्रप्रदर्शनीमध्ये सहभाग घेतलेल्या मॉडेल मधून 5 विजेत्या मॉडेलची निवड राज्यस्तरीय तंत्र प्रदर्शनकरिता करण्यात येईल.  प्रदर्शनीच्या नियोजनासाठी जिल्हाव्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी राम मुळे  यांच्या  अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तांत्रिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तंत्र प्रदर्शनीला भेट देण्याचे आवाहन उपसंचालक सुधा ठोंबरे यांनी केले आहे.

000000

Tuesday, December 24, 2024

DIO NEWS AMRAVATI 24.12.2024






 

पिंक ई-रिक्षाच्या लाभासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा 

                                                                  -जिल्हाधिकारी सौरभ कटियार

जिल्हाधिकारी कार्यालयात पिंक ई रिक्क्षाचे प्रात्यक्षिक

अमरावती, दि. 24(जिमाका) : पिंक ई-रिक्षा योजनेतून महिला व मुलींना रोजगार  प्राप्त होणार आहे. यातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होवून महिला व मुलींना सुरक्षित प्रवासाची हमी मिळणार आहे. या योजनेत राज्य शासनाकडून 20 टक्के अनुदान मिळणार आहे. यासाठी इच्छुक महिलांनी या संधीचा लाभ  घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पिंक इ रिक्क्षाचे प्रत्यक्ष सादरीकरण जिल्हाधिकारी श्री. कटियार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी रिना ढोमणे या महिलेने जिल्हाधिकारी श्री. कटियार, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, महिला व बाल विकास अधिकारी उमेश टेकाळे आणि जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे यांना ई रिक्षात बसवून वाहन चालविले. जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी या महिलेचे कौतुक करुन पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत आतापर्यंत 58 अर्ज मंजूर करण्यात आले आहे. अर्जांची छाननी प्रक्रिया सुरु आहे. महिला व बालविकास विभागातर्फे शहर आणि ग्रामीण भागातील गरजू महिलांना   अनुदानावर पिंक  रिक्षा देण्यात येणार आहे. पिंक ई-रिक्षा योजनेतून महिला व मुलींच्या रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुर्नवसन करणे, स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे, स्त्री सशक्तीकरणास चालना देणे, महिला व मुलींना सुरक्षित प्रवास करण्‍यासाठी नोकरी, तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालविण्यासाठी इतर सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कायनेटिक कंपनीच्या माध्यमातून महिलांना परवाना, परमिट, बॅच बिल्ला, प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

योजनेत ई-रिक्षाची किंमतीमध्ये जीएसटी, रजिस्ट्रेशन, रोड टॅक्स आदी करांचा समावेश राहणार आहे. नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका, अनुज्ञेय असलेल्या खासगी बँकाकडून ई-रिक्षा किंमतीच्या 70 टक्के कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. राज्य शासन 20 टक्के आर्थिक भार उचलेल, योजनेची लाभार्थी महिला-मुली यांना 10 टक्के स्वहिस्सा भरावा लागणार आहे. कर्जाची परतफेड करण्यासाठी 5 वर्षे मुदत राहणार आहे.

लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय 20 ते 40 वर्षे असावे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. विधवा, कायद्याने घटस्फोटित, राज्यगृहामधील इच्छुक प्रवेशित, अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती, अनुरक्षणगृह बालगृहातील आजी-माजी प्रवेशितांना प्राधान्य देण्यात येणार आहे.  दारिद्र्य रेषेखालील महिलांनाही प्राधान्य देण्यात येणार आहे.

लाभार्थींना योजनेसाठी अर्ज, आधार कार्ड, पॅन कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, कुटुंबप्रमुखाचा तीन लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला वार्षिक उत्पन्नाचा दाखला, मतदान कार्ड, केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट फोटो, मतदान ओळखपत्र, राशन कार्ड, महिला स्वत: रिक्षा चालवण्याचे हमीपत्र, महिलेचे बँक कर्ज नसल्याचे हमीपत्र, अटी व शर्ती पालन करण्याचे हमीपत्र द्यावे लागणार आहे.

योजनेसाठी महिला व बाल विकास भवन, कॅम्प रोड, अमरावती, समाज विकास अधिकारी महानगरपालिका, अमरावती, कार्यक्रम व्यवस्थापक, नरेगा, जिल्हा परिषद अमरावती, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी, अमरावती, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, ग्रामीण, गटविकास अधिकारी कार्यालय, मुख्याधिकारी, नगरपालिका, नगर पंचायत, लोक संचालित समूह साधन केंद्र, सखी वन स्टॉप सेंटर, जिल्हा स्त्री रुग्णालय परिसर, अमरावती याठिकाणी अर्ज करता येणार आहे.

योजनेचा लाभ एकदाच घेता येणार आहे, शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेतलेला नसावा, महिला कर्ज घेण्यास पात्र असावी, परतफेडची जबाबदारी महिलेची राहणार आहे. योजनेसाठी महिलांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी केले आहे.

                                                                        0000

सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिमेस सुरूवात

अमरावती, दि. 24 (जिमाका) : राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यातील सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहीम सोमवार, दि. 23 डिसेंबरपासून सुरूवात झाली आहे. मोहिमेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या मोहिमेंतर्गत ग्रामीण क्षेत्रातील अतिजोखमीच्या भागांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सदर मोहिम राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यातील सर्व क्षयरोग पथक अंतर्गत यापूर्वी निश्चित केलेल्या अतिजोखिमग्रस्त लोकसंख्येत कामासाठी स्थलांतरीत, तसेच खाणीमध्ये काम करणारे कामगार, बेघर, सामजिक गट, तसेच तुरूंग, वृद्धाश्रम, आश्रमशाळा व वसतिगृह, आदिवासी मुलांचे वसतिगृह, मनोरूग्णालय आदी ठिकाणी राबविण्यात येणार आहे. या शोध मोहिमेत आशा स्वयंसेविका आणि आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन सर्व सदस्यांची क्षय रोगासंदर्भातील तपासणी करणार आहे. ग्रामीण भागातील तपासणी व सर्वेक्षण कामासाठी 121 पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. मोहिमेचे पर्यवेक्षकांद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

सततचा खोकला, ताप, रात्री घाम येणे, वजनात लक्षणीय घट, भूक न लागणे, गेल्या 6 महिन्यात कधीही थुंकीत रक्त येणे, गेल्या एक महिन्यापासून छातीत दुखणे, टीबीविरोधी उपचारांचा इतिहास, श्वास लागणे, मानेवर गाठ येणे किंवा फुफ्फुसाव्यतिरिक्त इतर लक्षणे, थकवा येणे आदी लक्षणे असणाऱ्या संशयित व्यक्तींची तपासणी करण्यात येणार आहे. संबंधित व्यक्तींमध्ये लक्षणे आढळल्यास सदर व्यक्तीची तात्काळ थुंकी नमुने, क्ष-किरण, नॅट तपासणी करून तपासणीमध्ये क्षयरोग आढळून आल्यास रूग्णास क्षयरोगावरील औषधोपचार सुरू करण्यात येणार आहे. क्षयरोगाची तपासणी करून त्यामध्ये पॉझिटिव्ह आल्यास त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येणार आहे.

ही मोहिम क्षयरोग नियंत्रणासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या टीममार्फत संशयित क्षयरूग्णांचा शोध घेऊन त्यांच्या क्षयरोगाबाबत चाचण्या करून त्याद्वारे आढळलेल्या क्षयरूग्णांना वेळेत उपचार करणे सोयीचे होईल. तसेच मोहिम यशस्वीरित्या राबविण्यासाठी तालुका व जिल्हा स्तरावर या मोहिमेचे सनियंत्रण केल्या जाणार आहे. असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी कळविले आहे.

00000

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दौरा

अमरावती, दि. 24 (जिमाका) : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे शुक्रवार, दि. 27 डिसेंबर 2024 रोजी  जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

दौऱ्यानुसार, श्री. गडकरी यांचे शुक्रवार, दि. 27 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 9.10 वाजता बेलोरा विमानतळ येथे आगमन होईल. त्यानंतर सकाळी 9.50 पर्यंत राखीव राहिल. सकाळी 10 वाजता श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे आयोजित डॉ. पंजाबराव ऊर्फ भाऊसाहेब देशमुख पुरस्कार कार्यक्रमास उपस्थित राहतील. सकाळी 11.30 वाजता नागपूर-अमरावती बीओटी प्रकल्पाबाबत बैठक घेतील. सकाळी 11.250 वाजता नूतन विदर्भ शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 12.40 वाजता बेलोरा विमानतळ येथून नागपूरकडे प्रयाण करतील.

000000

मॅरेथॉनमुळे वाहतूक मार्गात बदल

        अमरावती, दि. 24 (जिमाका) : गुरूकुल बहुउद्देशीय शिक्षण संस्थेतर्फे माजी प्रधानमंत्री भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त बुधवार, दि. 25 डिसेंबर रोजी राज्‍यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धा अटल दौडचे आयोजन केले आहे. यामुळे शहरातील वाहतुकीच्या मार्गात बदल केले आहे.

            दौड स्पर्धा प्रकारातील विविध वयोगटातील सहभागी स्पर्धकांची संख्या लक्षात घेता दौड स्पर्धा मार्गावर अपघातासारखा अनुचित प्रकार घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, स्पर्धकांचा सुरक्षेच्या दृष्टीने स्पर्धा मार्गावर दि. 25 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या जड वाहनाची वाहतूक नियंत्रित करण्यात येणार आहे. त्यामुळे पोलीस उपायुक्त कल्पना बारवकर यांनी मुंबई पोलिस कायदा 1951 चे कलम 33 (1) (ब), तसेच मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 अन्वये अमरावती शहरातील रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या सर्व जड मालवाहू आणि प्रवाशी वाहनांना दि. 25 डिसेंबर 2024 चे सकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत प्रवेश बंद करण्यात येणार आहे, असे पोलिस उपायुक्त कल्पना बारवरकर यांनी कळविले आहे.

00000

सुशासन सप्ताहात एक कोटीवर अर्ज निकाली

अमरावती, दि. 24 (जिमाका) : माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या स्मरणार्थ दि. 19 ते 24 डिसेंबर दरम्यान सुशासन सप्ताह अभियान घेण्यात आले. यात एक कोटीवर अर्ज निकाली काढण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सुशासन सप्ताह राबविण्यात येत आहे. यात आपले सरकार आणि पीजी पोर्टलवरील प्रलंबित तक्रारी निकाली काढण्यात येत आहे. आपले सरकार पोर्टलवरील 2 हजार 772  तक्रारी आणि पीजी पोर्टलवरील 475 प्रकरणांचे निराकरण करण्यात आले. जिल्ह्यातील एकूण 38 विभागाकडून 770 सेवांचे एकूण 1 कोटी 7 लाख 66 हजार 342 अर्ज प्राप्त आहे. यापैकी 1 कोटी 4 लाख 29 हजार 29 अर्ज निकाली काढले आहेत. यात महसूल विभागाकडून 14 हजार 150 अर्ज निकाली काढले आहे.

शासन पद्धती, नवकल्पना आणि प्रतिकृती उपक्रम, ओळख, पदोन्नती आणि सर्वोत्तम दस्तऐवजीकरण सराव, नागरीकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी ‘प्रशासन आपल्या दारी’ मोहीम घेणे, प्रशासनाच्या माध्यमातून तळागाळातील नागरिकांपर्यंत ‘प्रशासन गाव की और’ मोहीम राबविणे ही सुशासन सप्ताह अभियानाची उद्दिष्टे आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दि. 17 डिसेंबर रोजी तयारीचा आढावा घेतला. तसेच सोमवार, दि.23 डिसेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी मनिष फुलझेले यांनी सादरीकरण केले.

00000



आधार ऑपरेटरचे प्रशिक्षण संपन्न

            अमरावती, दि. 24 (जिमाका): जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे आधार ऑपरेटरचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.  जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय आधारकेंद्र चालकांनी आधार नोंदणी करतांना योग्य पुरावे व त्याची  सत्त्यता तपासूनच नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या. यात कोणतीही हयगय केल्यास दंड आणि शिक्षेची तरतूदींचीही यावेळी माहिती दिली.

निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, अधीक्षक  निलेश खटके, तहसिलदार प्रशांत पडघम, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक जुनेद शेख, वरीष्ठ सहायक अभियंता  आशिष विधळे, जिल्हा आधार समन्वयक  मिलींद गोंडसे, जिल्हा आधार समन्वयक  गोकुल येवले यासह प्रशासनातील अधिकारी,कर्मचारी तसेच आधार ऑपरेटरचे प्रशिक्षण देण्यासाठी मुंबई प्रादेशिक आधार कार्यालयाचे मुख्य प्रशिक्षक युआयडीएआय कीर्ती मदलानी, विनय नागदिवे, आधार मुंबई कार्यालयाचे प्रतिनिधी अनिल मराठे यावेळीउपस्थित होते. प्रशिक्षणात जिल्ह्यातून 170 आधार  ऑपरेटर व सूपरवायजर उपस्थित होते.

आधार ऑपरेटर व परीवेक्षक यांना आधार नोंदणी व अपडेट करण्याचे निकष सांगण्यात आले.ऑपरेटर व परीवेक्षक यांना प्रत्यक्ष आधार नोंदणी व अद्यावत करताना येणा-या तांत्रिक अडचणी समजावून घेवून त्यावर उपाय सुचविले. तसेच उपस्थित आधार ऑपरेटर कडून उपस्थित झालेल्या प्रश्नांचे उत्तरे देण्यात आली. प्रशिक्षणाची प्रस्तावना निवासी उपजिल्हाधिकारी श्री.  भटकर यांनी केली तसेच   नागरिकांनी आधार नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या.

00000

 

हिवाळ्यामध्ये घ्या आरोग्याची काळजी

*जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले

        अमरावती, दि. 24 (जिमाका): हिवाळ्यामध्ये आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे. कारण हिवाळ्यामध्ये आरोग्याच्या छोट्या मोठ्या तक्रारी उद्भवतात. तापमानात घट झाल्याने सर्दी खोकला, ताप, त्वचेशी संबंधित विकार इत्यादी त्रास निर्माण होतात. या समस्या टाळण्यासाठी शरीराचे तापमान संतुलित ठेवणे आवश्यक आहे. हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी आहारापासून ते व्यायामापर्यंत सर्व गोष्ट्रींची योग्य ती काळजी घ्यायला हवी.

            असा असावा आहार: हिवाळ्यात खाण्यापिण्याच्या सवयीची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण या ऋतूमध्ये आजारांची लागण होण्याची शक्यता असते. आजारापासून दूर राहण्यासाठी आहारामध्ये अख्खे कडधान्य, सोजी इत्यादी पौष्टीक पदार्थाचा समावेश करावा. हे पदार्थ आपल्या ह्दयाच्या आरोग्यासाठी पोषक असतात. भाज्या आणि फळांचे सेवन करावे. त्यामध्ये व्हिटॅमिन आणि खनिजांचा समावेश असतो. थंडीमध्ये तेलकट तिखट खाद्य पदार्थांचे सेवन करणे टाळावे. तसेच हिवाळ्यात रक्तातील शर्करा आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहणे आवश्यक आहे. या ऋतूमध्ये आहारात कमी प्रमाणात मिठाचे सेवन करावे.

            पाणी आणि पेय :  या ऋतूत जास्तीतजास्त पाणी पिणे आवश्यक आहे. तसेच चहा आणि कॉफीचे मर्यादित सेवन करावे.

            व्यायाम : शरीर फीट राहण्यासाठी आहारासोबतच नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. शरीराची योग्य पद्धतीने हालचाल होणे गरजेचे आहे. चालण्याचा साधा आणि सोपा व्यायाम करू शकता. चालण्याच्या व्यायामामुळे शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि यामुळे रक्तप्रवाह देखील वाढतो. हिवाळ्यामध्ये आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी उबदार कपडे परिधान करावे. या दिवसात विशेषत: पाय मोजे, हात मोजे, कानटोपी या गोष्टींचा वापर करावा. तसेच पुरेशा प्रमाणात झोप देखील घ्यावी.

            त्वचेची काळजी : हिवाळ्यामध्ये हवा थंड असल्यामुळे त्वचा कोरडी पडते. त्यामुळे त्वचेची तेलाने मालिश करावी. आणि शक्य असल्यास रोज कोल्ड क्रीम लावावे. हिवाळ्यामध्ये तळहात व तळपायांना भेगा पडतात. अशा वेळी गरम पाण्याने हात व पाय स्वच्छ धुवावे आणि पेट्रोलियम जेलीचा वापर करावा. संपूर्ण त्वचेचे अंगभर वस्त्र घालुन धूळ व मातीपासून संरक्षण करावे. कृष्ठरोगांनी त्वचेची विशेष काळजी घ्यावी जेणेकरून हात पायांना जखमा होणार नाही. पायमोजे, हातमोजे, बुटाचा वापर करावा, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले यांनी कळविले आहे.

00000

 

संजय गांधी योजना व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांनी कागदपत्र सादर करावे

अमरावती, दि. 24 (जिमाका): संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचा लाभ महाडीबीटीमार्फत वितरीत करण्यात येणार आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ज्या लाभार्थी यांनी आवश्यक कागदपत्रे सादर केली नाहीत, ती आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन तहसिलदार अश्विनी जाधव यांनी केले आहे.

या योजनेच्या लाभार्थ्यांना यापुढे त्यांचे अनुदान महाडीबीटीमार्फत ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. ज्या लाभार्थ्यांनी अद्यापपर्यंत पासबुक, बँकेशी लिंक असलेल्या आधारकार्डाची छायांकित प्रत व मोबाईल नंबर संजय गांधी योजना विभागात सादर केलेले नाही, अशा लाभार्थ्यांचे दोनही योजनेचे अनुदान थांबविण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी आपले आधारकार्ड व पासबुकची छायांकित प्रत व मोबाईल नंबर तात्काळ तहसिल कार्यालय, नांदगाव खंडेश्वर, संजय गांधी विभाग येथे सादर करावे. तसेच आधारकार्ड अद्ययावत करून आधारकार्ड व मोबाईल नंबर बँकेशी लिंक करुन घ्यावे, असे कळविण्यात आले आहे.

00000

नववर्षोत्सवानिमित्त चिखलदरा येथील वाहतूक मार्गात बदल

अमरावती, दि.24 (जिमाका) : जिल्ह्यातील चिखलदरा हे थंड हवेचे पर्यटन स्थळ असून दि. 31 डिसेंबर रोजी अमरावती जिल्ह्यातील व आजूबाजूच्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक चिखलदरा येथे नववर्ष उत्सव साजरा करण्यासाठी येतात. या पार्श्वभूमीवर दि. 31 डिसेंबर 2024 ते 1 जानेवारी 2025 दरम्यान परतवाडा ते चिखलदरा मार्ग हा अरुंद व घाटवळणाचा असल्याने तेथे वाहनांची गर्दी होऊन  वाहतूक  खोळंबण्याची व अपघात होण्याची शक्यता असते. मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 अन्वये या कालावधीत वाहतुकीचे नियमन योग्य प्रकारे करता यावे, यासाठी दि. 31 डिसेंबर 2024 ला सकाळी 8 वाजेपासून दि. 1 जानेवारी 2025 ला सायंकाळी 6 वाजेपर्यंत परतवाडा ते धामणगाव मार्गे चिखलदरा हा  रस्ता जाण्यासाठी तसेच चिखलदरा, घटांग मार्गे परतवाडा हा रस्त येण्यासाठी  या मार्गाची वाहतूक एकमार्गी करण्यात येत आहे. या अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द मोटार वाहन कायदा 1988 व मुंबई पोलीस कायदा  1951 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार  यांनी दिले आहेत.

00000

 

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...