लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
अमरावती, दि. 23 (जिमाका) : राज्य शासनाच्या सेवेतील विविध पदे राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येतात. सन 2025 या वर्षातील विविध पदांच्या आगामी परीक्षांचे वेळापत्रक आयोगाने जाहीर केले आहे. विविध परीक्षांचे नियोजन करताना उमेदवारांना सोईचे व्हावे, यासाठी सदर वेळापत्रक उपयुक्त ठरणार आहे.
वेळापत्रकानुसार दि.5 जानेवारी रोजी महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व व मुख्य परी़क्षा होणार आहे. यामध्ये सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक श्रेणी-1, मुद्रांक निरीक्षक या पदांसाठी परीक्षा होईल.
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षा दि.2 फेब्रुवारी रोजी होणार आहे. उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक, बेलिफ व लिपीक, लिपीक-टंकलेखक, सहायक मोटार वाहन निरीक्षक या पदांचा यामध्ये समावेश आहे. दि.16 मार्च रोजी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर व न्यायदंडाधिकारी या पदासाठीची पूर्व व मुख्य परीक्षा घेण्यात येईल. राज्य सेवा मुख्य परीक्षा दि.26, 27 व 28 एप्रिल रोजी एकुण 35 संवर्गासाठी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा दि.10 ते 15 मे रोजी सहायक वनसंरक्षक व वनक्षेत्रपाल या पदांसाठी घेतली जाईल.
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा सहायक कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, उपविभागीय जलसंधारण अधिकारी, जलसंधारण अधिकारी या पदांसाठी दि.18 मे रोजी घेतली जाईल. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा राज्य सेवा 35 संवर्ग, यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, विद्युत अभियांत्रिकी सेवा, स्थापत्य अभियांत्रिकी, कृषी सेवा, सहायक नियंत्रक लेखापाल, अन्न व औषध प्रशासकीय सेवा, वनसेवा यासाठी दि.28 सप्टेंबर रोजी होईल.
राज्य सेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा, अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा, निरीक्षक वैधमापन शास्त्र मुख्य परीक्षा, महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा या परीक्षांच्या तारखा स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.
दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व व मुख्य परीक्षा दि. 12 ऑक्टोबर रोजी होणार आहे. महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षा सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलिस उप निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, मुद्रांक निरीक्षक या पदांसाठी दि.9 नोव्हेंबरला होईल.
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षा उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक, बेलिफ व लिपिक, लिपिक-टंकलेखक, सहायक मोटर वाहन निरीक्षक या पदांसाठी घेण्यात येईल. सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा दि.30 नोव्हेंबरला होणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अवर सचिव र. प्र. ओतारी यांनी कळविले आहे.
00000
रब्बी हंगामासाठी पिकांना पाणी
उपलब्ध करुन दिले जाणार
अमरावती, दि. 23 (जिमाका) : जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस पडला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद जलसंधारण विभागाच्याअखत्यारित येणाऱ्या जिल्ह्यातील 247 पैकी 224 कोल्हापुरी, साठवण बंधाऱ्यात जलसाठा पर्याप्त प्रमाणात आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचा ग्रामीण भागातील सुमारे 6 हजार 344 हेक्टर सिंचन क्षेत्राला लाभ होणार आहे. आहे. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांनी केले आहे.
कोल्हापुरी बंधाऱ्यातून 6 हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी लागणारे 224 बंधाऱ्यात पाणी अडविण्यात आले. हा जलसाठा कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा, पहूर ता. नांदगाव खंडेश्वर येथे अडविण्यात आला आहे. जिल्हा परिषद जलसंधारण विभागाकडून या बंधाऱ्याच्या कामासाठी जिल्हा निधी व जिल्हा वार्षिक निधीमधून विविध कामे करण्यासाठी नियोजन केले होते. या नियोजनामधून केलेल्या कामामुळे कोल्हापुरी व साठवण बंधारे तुडुंब भरलेली आहेत. जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाच्या कार्यक्षेत्रातील 14 तालुक्यांत 247 कोल्हापुरी व साठवण बंधारे आहेत. या बंधाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात जलसंचय झाला आहे. त्यामुळे आता रब्बी हंगामात शेती पिकांना पाणी उपलब्ध करण्याचे नियोजन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती महापात्र यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले आहे.
जिल्ह्यात दरवर्षी रब्बी हंगामात गहू, हरभरा या रब्बी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. या पिकांना सिंचनाची सोय व्हावी, यासाठी जलसंधारण विभागाकडून शेती पिकांसाठी शेतकऱ्यांना कोल्हापुरी व साठवण बंधाऱ्याच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून दिल्या जाते. यंदा जिल्हा परिषद जलसंधारण विभागाकडील 247 बंधाऱ्यांमध्ये जलसाठा करण्याचे पावसाळ्यापूर्वी नियोजन करण्यात आले. त्यानुसार 247 कोल्हापुरी व साठवण बंधाऱ्यांमध्ये यंदा चांगला पाऊस पडल्याने शंभर टक्के जलसाठा झालेला आहे. या जलसाठ्यातून सुमारे 6 हजार 344.01 हेक्टर एवढ्या क्षेत्राला सिंचन सुविधेचा लाभ होणार आहे. जलसंधारण विभागाने शेतकऱ्यांकडून पाणी मागणी अर्ज मागविले आहेत.
000000
अल्पसंख्यांक समुदायातील विदयार्थ्यांसाठी परदेश शिष्यवृत्तीचे
अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबरपर्यंत
अमरावती, दि. 23 (जिमाका): देशातील नामांकित शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्यातील सन 2024-25 मध्ये अल्पसंख्यांक समुदायातील विदयार्थ्यांसाठी परदेश शिष्यवृत्तीचे अर्ज मागविण्यात येत आहे़. शिष्यवृत्तीचा अर्ज सादर करण्याची मुदत दि . 31 डिसेंबर 2024 आहे.
सन 2024-25 मध्ये राज्यातील अल्पसंख्यांक समुदायातील विदयार्थ्यांसाठी परदेशात पदव्युत्तर पदवी व पी. एच. डी. अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यासाठी शासनाच्या अल्पसंख्यांक विभागाने मंजुरी दिलेली आहे. या योजनेअंतर्गत रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्षरित्या व ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ताज्या घडामोडीमध्ये विस्तृत जाहिरात प्रसिध्द
करण्यात आलेली आहे.
अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि.31 डिसेंबर असून अर्ज आयुक्त, समाज कल्याण, ३, चर्च पथ, पुणे-01 यांचे कार्यालयात सादर करावयाचे आहेत. अर्जाचा नमुना व अधिक सविस्तर माहितीसाठी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.
000000
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार
योजनेचे ऑनलाईन अर्जासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
अमरावती, दि. 23 (जिमाका) : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील इयत्ता 11 वी व त्यापुढील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांना घरभाडे व इतर खर्च भागविण्यासाठी अर्थसहाय्य मंजूर करण्यात येते. सन 2024-25 या चालू शैक्षणिक वर्षापासून ही योजना ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी https://hmas.
अधिक माहितीसाठी सामाजिक न्याय भवन सहायक आयुक्त, समाज कल्याण अमरावती चांदुर रेल्वे रोड सी.पी. ऑफीसच्या मागे अमरावती तसेच ई-मेल आयडी- speldswo_amtrediffmail.
000000
पर्यटन क्षेत्रातील महिला उद्योजकांना
व्यवसाय सुरू वाढ करण्यासाठी व्याज परतावा योजना
अमरावती, दि. 23 (जिमाका) : पर्यटन संचालनालयामार्फत पर्यटन क्षेत्रातील महिला उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी अथवा व्यवसायात वाढ करण्यासाठी व्याज परतावा योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पर्यटनाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या महिलांना मान्यता प्राप्त बँकेमार्फत घेतलेल्या 15 लाखाच्या मर्यादेत कर्ज मंजुर केले असल्यास त्यावरील व्याजाचा परतावा (12 टक्के मर्यादेत) 4.5 लाख किंवा 7 वर्ष कालावधीकरिता यापैकी जे आधी घडेल ते पर्यटन संचालनालयाकडून व्याजाचा परतावा म्हणुन अदा करण्यात येईल.
अटी व शर्ती
पर्यटन व्यवसाय ठिकाण महाराष्ट्रात असावे, तसेच पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत असला पाहिजे. महिला अर्जदार महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी तसेच पर्यटन व्यवसाय महिलांच्या मालकीच्या व त्यांनी चालविलेला असावा. पर्यटन व्यवसायासाठी आवश्यक सर्व परवानग्या प्राप्त असाव्यात. लाभार्थ्यांचे बँक खाते, आधार लिंक असावे तसेच कर्जाचे हप्ते वेळेत भरले पाहिजेत.
आई महिला केंद्रित पर्यटन धोरणाअंतर्गत पात्र व्यवसाय पुढीलप्रमाणे :होम स्टे, रेस्टॅरेन्ट, प्रसाद दुकाने, उपहारगृह, रिसॉर्ट, बेकरी, कॅफे,निवासी व न्याहारी, टूर ऑपरेटर, टूर गाईड, ट्रॅव्हल एजन्ट, फास्ट फूड, कृषी पर्यटन केंद्र, महिला चलित कॉमन किचन, इव्हेट मॅनेजमेंट, हॉटेल, मोटेल,आयुर्वेद योगा सेंटर, वेलनेस सेंटर, ट्री हाउस, पर्यटन व्हिला, वूडन कॉटेजेस, मेडीकल पर्यटन, टुरिस्ट ट्रान्सपोर्ट ऑपरेटर, साहसी पर्यटन (जमीन, हवा, जल) इ-व्हेईकल (रिक्षा, मोटर सायकल, बस व इतर चारचाकी वाहने), आदिवासी, निर्सग पर्यटनाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या फायदेशीर ठरणारे उदा. हस्तकला, सोव्हेनिअर शॉप, स्थानिक उत्पादनाची विक्री केंद्र, धार्मिक स्थळी निर्माल्य व प्रसाद विक्री करणारे मान्यताप्राप्त दुकाने यांचा समावेश आहे.
अधिक माहितीसाठी पर्यटन संचालनालय, प्रादेशिक कार्यालय, केशव कॉलनी, विद्याभारती महाविद्यालय रोड, कॅम्प, अमरावती येथील दुरध्वनी क्र. 0721-2990457, श्रीमती उज्ज्वला काळे (मो.क्र. 8379058060), गणेश पाटील (मो. क्र. 9579934619 ) यांच्याशी तसेच संकेतस्थळ www.maharashtratourism.gov.in
बेवारस मृत इसम अमोल भेंडे
नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन
अमरावती, दि. 23 (जिमाका): पोलिस ठाणे सिटी कोतवाली अमरावती (शहर) अंतर्गत बेवारस मृत इसम अमोल भेंडे हे जिल्हा सामान्य रुग्णालय, वार्ड क्र. 15 च्या व्हराड्यांत मृत अवस्थेत आढळले. त्यांना इर्विन दवाखाना, वार्ड क्र. 30 मध्ये उपचारासाठी आणले असता तपासणीअंती मृत घोषित करण्यात आले. त्यांचे प्रेत हे शवविच्छेदनासाठी इर्विन मरच्युरीमध्ये ठेवण्यात आले आहे. मृतकाचे नाव अमोल भेंडे, वय 50 वर्षे असून संबंधितांनी पोलीस स्टेशन सिटी कोतवाली, अमरावती येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
000000
No comments:
Post a Comment