Tuesday, December 24, 2024

DIO NEWS AMRAVATI 24.12.2024






 

पिंक ई-रिक्षाच्या लाभासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा 

                                                                  -जिल्हाधिकारी सौरभ कटियार

जिल्हाधिकारी कार्यालयात पिंक ई रिक्क्षाचे प्रात्यक्षिक

अमरावती, दि. 24(जिमाका) : पिंक ई-रिक्षा योजनेतून महिला व मुलींना रोजगार  प्राप्त होणार आहे. यातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होवून महिला व मुलींना सुरक्षित प्रवासाची हमी मिळणार आहे. या योजनेत राज्य शासनाकडून 20 टक्के अनुदान मिळणार आहे. यासाठी इच्छुक महिलांनी या संधीचा लाभ  घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पिंक इ रिक्क्षाचे प्रत्यक्ष सादरीकरण जिल्हाधिकारी श्री. कटियार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी रिना ढोमणे या महिलेने जिल्हाधिकारी श्री. कटियार, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, महिला व बाल विकास अधिकारी उमेश टेकाळे आणि जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे यांना ई रिक्षात बसवून वाहन चालविले. जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी या महिलेचे कौतुक करुन पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत आतापर्यंत 58 अर्ज मंजूर करण्यात आले आहे. अर्जांची छाननी प्रक्रिया सुरु आहे. महिला व बालविकास विभागातर्फे शहर आणि ग्रामीण भागातील गरजू महिलांना   अनुदानावर पिंक  रिक्षा देण्यात येणार आहे. पिंक ई-रिक्षा योजनेतून महिला व मुलींच्या रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुर्नवसन करणे, स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे, स्त्री सशक्तीकरणास चालना देणे, महिला व मुलींना सुरक्षित प्रवास करण्‍यासाठी नोकरी, तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालविण्यासाठी इतर सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कायनेटिक कंपनीच्या माध्यमातून महिलांना परवाना, परमिट, बॅच बिल्ला, प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

योजनेत ई-रिक्षाची किंमतीमध्ये जीएसटी, रजिस्ट्रेशन, रोड टॅक्स आदी करांचा समावेश राहणार आहे. नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका, अनुज्ञेय असलेल्या खासगी बँकाकडून ई-रिक्षा किंमतीच्या 70 टक्के कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. राज्य शासन 20 टक्के आर्थिक भार उचलेल, योजनेची लाभार्थी महिला-मुली यांना 10 टक्के स्वहिस्सा भरावा लागणार आहे. कर्जाची परतफेड करण्यासाठी 5 वर्षे मुदत राहणार आहे.

लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय 20 ते 40 वर्षे असावे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. विधवा, कायद्याने घटस्फोटित, राज्यगृहामधील इच्छुक प्रवेशित, अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती, अनुरक्षणगृह बालगृहातील आजी-माजी प्रवेशितांना प्राधान्य देण्यात येणार आहे.  दारिद्र्य रेषेखालील महिलांनाही प्राधान्य देण्यात येणार आहे.

लाभार्थींना योजनेसाठी अर्ज, आधार कार्ड, पॅन कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, कुटुंबप्रमुखाचा तीन लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला वार्षिक उत्पन्नाचा दाखला, मतदान कार्ड, केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट फोटो, मतदान ओळखपत्र, राशन कार्ड, महिला स्वत: रिक्षा चालवण्याचे हमीपत्र, महिलेचे बँक कर्ज नसल्याचे हमीपत्र, अटी व शर्ती पालन करण्याचे हमीपत्र द्यावे लागणार आहे.

योजनेसाठी महिला व बाल विकास भवन, कॅम्प रोड, अमरावती, समाज विकास अधिकारी महानगरपालिका, अमरावती, कार्यक्रम व्यवस्थापक, नरेगा, जिल्हा परिषद अमरावती, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी, अमरावती, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, ग्रामीण, गटविकास अधिकारी कार्यालय, मुख्याधिकारी, नगरपालिका, नगर पंचायत, लोक संचालित समूह साधन केंद्र, सखी वन स्टॉप सेंटर, जिल्हा स्त्री रुग्णालय परिसर, अमरावती याठिकाणी अर्ज करता येणार आहे.

योजनेचा लाभ एकदाच घेता येणार आहे, शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेतलेला नसावा, महिला कर्ज घेण्यास पात्र असावी, परतफेडची जबाबदारी महिलेची राहणार आहे. योजनेसाठी महिलांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी केले आहे.

                                                                        0000

सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिमेस सुरूवात

अमरावती, दि. 24 (जिमाका) : राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यातील सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहीम सोमवार, दि. 23 डिसेंबरपासून सुरूवात झाली आहे. मोहिमेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या मोहिमेंतर्गत ग्रामीण क्षेत्रातील अतिजोखमीच्या भागांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सदर मोहिम राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यातील सर्व क्षयरोग पथक अंतर्गत यापूर्वी निश्चित केलेल्या अतिजोखिमग्रस्त लोकसंख्येत कामासाठी स्थलांतरीत, तसेच खाणीमध्ये काम करणारे कामगार, बेघर, सामजिक गट, तसेच तुरूंग, वृद्धाश्रम, आश्रमशाळा व वसतिगृह, आदिवासी मुलांचे वसतिगृह, मनोरूग्णालय आदी ठिकाणी राबविण्यात येणार आहे. या शोध मोहिमेत आशा स्वयंसेविका आणि आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन सर्व सदस्यांची क्षय रोगासंदर्भातील तपासणी करणार आहे. ग्रामीण भागातील तपासणी व सर्वेक्षण कामासाठी 121 पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. मोहिमेचे पर्यवेक्षकांद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

सततचा खोकला, ताप, रात्री घाम येणे, वजनात लक्षणीय घट, भूक न लागणे, गेल्या 6 महिन्यात कधीही थुंकीत रक्त येणे, गेल्या एक महिन्यापासून छातीत दुखणे, टीबीविरोधी उपचारांचा इतिहास, श्वास लागणे, मानेवर गाठ येणे किंवा फुफ्फुसाव्यतिरिक्त इतर लक्षणे, थकवा येणे आदी लक्षणे असणाऱ्या संशयित व्यक्तींची तपासणी करण्यात येणार आहे. संबंधित व्यक्तींमध्ये लक्षणे आढळल्यास सदर व्यक्तीची तात्काळ थुंकी नमुने, क्ष-किरण, नॅट तपासणी करून तपासणीमध्ये क्षयरोग आढळून आल्यास रूग्णास क्षयरोगावरील औषधोपचार सुरू करण्यात येणार आहे. क्षयरोगाची तपासणी करून त्यामध्ये पॉझिटिव्ह आल्यास त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येणार आहे.

ही मोहिम क्षयरोग नियंत्रणासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या टीममार्फत संशयित क्षयरूग्णांचा शोध घेऊन त्यांच्या क्षयरोगाबाबत चाचण्या करून त्याद्वारे आढळलेल्या क्षयरूग्णांना वेळेत उपचार करणे सोयीचे होईल. तसेच मोहिम यशस्वीरित्या राबविण्यासाठी तालुका व जिल्हा स्तरावर या मोहिमेचे सनियंत्रण केल्या जाणार आहे. असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी कळविले आहे.

00000

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दौरा

अमरावती, दि. 24 (जिमाका) : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे शुक्रवार, दि. 27 डिसेंबर 2024 रोजी  जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

दौऱ्यानुसार, श्री. गडकरी यांचे शुक्रवार, दि. 27 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 9.10 वाजता बेलोरा विमानतळ येथे आगमन होईल. त्यानंतर सकाळी 9.50 पर्यंत राखीव राहिल. सकाळी 10 वाजता श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे आयोजित डॉ. पंजाबराव ऊर्फ भाऊसाहेब देशमुख पुरस्कार कार्यक्रमास उपस्थित राहतील. सकाळी 11.30 वाजता नागपूर-अमरावती बीओटी प्रकल्पाबाबत बैठक घेतील. सकाळी 11.250 वाजता नूतन विदर्भ शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 12.40 वाजता बेलोरा विमानतळ येथून नागपूरकडे प्रयाण करतील.

000000

मॅरेथॉनमुळे वाहतूक मार्गात बदल

        अमरावती, दि. 24 (जिमाका) : गुरूकुल बहुउद्देशीय शिक्षण संस्थेतर्फे माजी प्रधानमंत्री भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त बुधवार, दि. 25 डिसेंबर रोजी राज्‍यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धा अटल दौडचे आयोजन केले आहे. यामुळे शहरातील वाहतुकीच्या मार्गात बदल केले आहे.

            दौड स्पर्धा प्रकारातील विविध वयोगटातील सहभागी स्पर्धकांची संख्या लक्षात घेता दौड स्पर्धा मार्गावर अपघातासारखा अनुचित प्रकार घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, स्पर्धकांचा सुरक्षेच्या दृष्टीने स्पर्धा मार्गावर दि. 25 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या जड वाहनाची वाहतूक नियंत्रित करण्यात येणार आहे. त्यामुळे पोलीस उपायुक्त कल्पना बारवकर यांनी मुंबई पोलिस कायदा 1951 चे कलम 33 (1) (ब), तसेच मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 अन्वये अमरावती शहरातील रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या सर्व जड मालवाहू आणि प्रवाशी वाहनांना दि. 25 डिसेंबर 2024 चे सकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत प्रवेश बंद करण्यात येणार आहे, असे पोलिस उपायुक्त कल्पना बारवरकर यांनी कळविले आहे.

00000

सुशासन सप्ताहात एक कोटीवर अर्ज निकाली

अमरावती, दि. 24 (जिमाका) : माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या स्मरणार्थ दि. 19 ते 24 डिसेंबर दरम्यान सुशासन सप्ताह अभियान घेण्यात आले. यात एक कोटीवर अर्ज निकाली काढण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सुशासन सप्ताह राबविण्यात येत आहे. यात आपले सरकार आणि पीजी पोर्टलवरील प्रलंबित तक्रारी निकाली काढण्यात येत आहे. आपले सरकार पोर्टलवरील 2 हजार 772  तक्रारी आणि पीजी पोर्टलवरील 475 प्रकरणांचे निराकरण करण्यात आले. जिल्ह्यातील एकूण 38 विभागाकडून 770 सेवांचे एकूण 1 कोटी 7 लाख 66 हजार 342 अर्ज प्राप्त आहे. यापैकी 1 कोटी 4 लाख 29 हजार 29 अर्ज निकाली काढले आहेत. यात महसूल विभागाकडून 14 हजार 150 अर्ज निकाली काढले आहे.

शासन पद्धती, नवकल्पना आणि प्रतिकृती उपक्रम, ओळख, पदोन्नती आणि सर्वोत्तम दस्तऐवजीकरण सराव, नागरीकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी ‘प्रशासन आपल्या दारी’ मोहीम घेणे, प्रशासनाच्या माध्यमातून तळागाळातील नागरिकांपर्यंत ‘प्रशासन गाव की और’ मोहीम राबविणे ही सुशासन सप्ताह अभियानाची उद्दिष्टे आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दि. 17 डिसेंबर रोजी तयारीचा आढावा घेतला. तसेच सोमवार, दि.23 डिसेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी मनिष फुलझेले यांनी सादरीकरण केले.

00000



आधार ऑपरेटरचे प्रशिक्षण संपन्न

            अमरावती, दि. 24 (जिमाका): जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे आधार ऑपरेटरचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.  जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय आधारकेंद्र चालकांनी आधार नोंदणी करतांना योग्य पुरावे व त्याची  सत्त्यता तपासूनच नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या. यात कोणतीही हयगय केल्यास दंड आणि शिक्षेची तरतूदींचीही यावेळी माहिती दिली.

निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, अधीक्षक  निलेश खटके, तहसिलदार प्रशांत पडघम, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक जुनेद शेख, वरीष्ठ सहायक अभियंता  आशिष विधळे, जिल्हा आधार समन्वयक  मिलींद गोंडसे, जिल्हा आधार समन्वयक  गोकुल येवले यासह प्रशासनातील अधिकारी,कर्मचारी तसेच आधार ऑपरेटरचे प्रशिक्षण देण्यासाठी मुंबई प्रादेशिक आधार कार्यालयाचे मुख्य प्रशिक्षक युआयडीएआय कीर्ती मदलानी, विनय नागदिवे, आधार मुंबई कार्यालयाचे प्रतिनिधी अनिल मराठे यावेळीउपस्थित होते. प्रशिक्षणात जिल्ह्यातून 170 आधार  ऑपरेटर व सूपरवायजर उपस्थित होते.

आधार ऑपरेटर व परीवेक्षक यांना आधार नोंदणी व अपडेट करण्याचे निकष सांगण्यात आले.ऑपरेटर व परीवेक्षक यांना प्रत्यक्ष आधार नोंदणी व अद्यावत करताना येणा-या तांत्रिक अडचणी समजावून घेवून त्यावर उपाय सुचविले. तसेच उपस्थित आधार ऑपरेटर कडून उपस्थित झालेल्या प्रश्नांचे उत्तरे देण्यात आली. प्रशिक्षणाची प्रस्तावना निवासी उपजिल्हाधिकारी श्री.  भटकर यांनी केली तसेच   नागरिकांनी आधार नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या.

00000

 

हिवाळ्यामध्ये घ्या आरोग्याची काळजी

*जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले

        अमरावती, दि. 24 (जिमाका): हिवाळ्यामध्ये आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे. कारण हिवाळ्यामध्ये आरोग्याच्या छोट्या मोठ्या तक्रारी उद्भवतात. तापमानात घट झाल्याने सर्दी खोकला, ताप, त्वचेशी संबंधित विकार इत्यादी त्रास निर्माण होतात. या समस्या टाळण्यासाठी शरीराचे तापमान संतुलित ठेवणे आवश्यक आहे. हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी आहारापासून ते व्यायामापर्यंत सर्व गोष्ट्रींची योग्य ती काळजी घ्यायला हवी.

            असा असावा आहार: हिवाळ्यात खाण्यापिण्याच्या सवयीची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण या ऋतूमध्ये आजारांची लागण होण्याची शक्यता असते. आजारापासून दूर राहण्यासाठी आहारामध्ये अख्खे कडधान्य, सोजी इत्यादी पौष्टीक पदार्थाचा समावेश करावा. हे पदार्थ आपल्या ह्दयाच्या आरोग्यासाठी पोषक असतात. भाज्या आणि फळांचे सेवन करावे. त्यामध्ये व्हिटॅमिन आणि खनिजांचा समावेश असतो. थंडीमध्ये तेलकट तिखट खाद्य पदार्थांचे सेवन करणे टाळावे. तसेच हिवाळ्यात रक्तातील शर्करा आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहणे आवश्यक आहे. या ऋतूमध्ये आहारात कमी प्रमाणात मिठाचे सेवन करावे.

            पाणी आणि पेय :  या ऋतूत जास्तीतजास्त पाणी पिणे आवश्यक आहे. तसेच चहा आणि कॉफीचे मर्यादित सेवन करावे.

            व्यायाम : शरीर फीट राहण्यासाठी आहारासोबतच नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. शरीराची योग्य पद्धतीने हालचाल होणे गरजेचे आहे. चालण्याचा साधा आणि सोपा व्यायाम करू शकता. चालण्याच्या व्यायामामुळे शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि यामुळे रक्तप्रवाह देखील वाढतो. हिवाळ्यामध्ये आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी उबदार कपडे परिधान करावे. या दिवसात विशेषत: पाय मोजे, हात मोजे, कानटोपी या गोष्टींचा वापर करावा. तसेच पुरेशा प्रमाणात झोप देखील घ्यावी.

            त्वचेची काळजी : हिवाळ्यामध्ये हवा थंड असल्यामुळे त्वचा कोरडी पडते. त्यामुळे त्वचेची तेलाने मालिश करावी. आणि शक्य असल्यास रोज कोल्ड क्रीम लावावे. हिवाळ्यामध्ये तळहात व तळपायांना भेगा पडतात. अशा वेळी गरम पाण्याने हात व पाय स्वच्छ धुवावे आणि पेट्रोलियम जेलीचा वापर करावा. संपूर्ण त्वचेचे अंगभर वस्त्र घालुन धूळ व मातीपासून संरक्षण करावे. कृष्ठरोगांनी त्वचेची विशेष काळजी घ्यावी जेणेकरून हात पायांना जखमा होणार नाही. पायमोजे, हातमोजे, बुटाचा वापर करावा, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले यांनी कळविले आहे.

00000

 

संजय गांधी योजना व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांनी कागदपत्र सादर करावे

अमरावती, दि. 24 (जिमाका): संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचा लाभ महाडीबीटीमार्फत वितरीत करण्यात येणार आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ज्या लाभार्थी यांनी आवश्यक कागदपत्रे सादर केली नाहीत, ती आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन तहसिलदार अश्विनी जाधव यांनी केले आहे.

या योजनेच्या लाभार्थ्यांना यापुढे त्यांचे अनुदान महाडीबीटीमार्फत ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. ज्या लाभार्थ्यांनी अद्यापपर्यंत पासबुक, बँकेशी लिंक असलेल्या आधारकार्डाची छायांकित प्रत व मोबाईल नंबर संजय गांधी योजना विभागात सादर केलेले नाही, अशा लाभार्थ्यांचे दोनही योजनेचे अनुदान थांबविण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी आपले आधारकार्ड व पासबुकची छायांकित प्रत व मोबाईल नंबर तात्काळ तहसिल कार्यालय, नांदगाव खंडेश्वर, संजय गांधी विभाग येथे सादर करावे. तसेच आधारकार्ड अद्ययावत करून आधारकार्ड व मोबाईल नंबर बँकेशी लिंक करुन घ्यावे, असे कळविण्यात आले आहे.

00000

नववर्षोत्सवानिमित्त चिखलदरा येथील वाहतूक मार्गात बदल

अमरावती, दि.24 (जिमाका) : जिल्ह्यातील चिखलदरा हे थंड हवेचे पर्यटन स्थळ असून दि. 31 डिसेंबर रोजी अमरावती जिल्ह्यातील व आजूबाजूच्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक चिखलदरा येथे नववर्ष उत्सव साजरा करण्यासाठी येतात. या पार्श्वभूमीवर दि. 31 डिसेंबर 2024 ते 1 जानेवारी 2025 दरम्यान परतवाडा ते चिखलदरा मार्ग हा अरुंद व घाटवळणाचा असल्याने तेथे वाहनांची गर्दी होऊन  वाहतूक  खोळंबण्याची व अपघात होण्याची शक्यता असते. मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 अन्वये या कालावधीत वाहतुकीचे नियमन योग्य प्रकारे करता यावे, यासाठी दि. 31 डिसेंबर 2024 ला सकाळी 8 वाजेपासून दि. 1 जानेवारी 2025 ला सायंकाळी 6 वाजेपर्यंत परतवाडा ते धामणगाव मार्गे चिखलदरा हा  रस्ता जाण्यासाठी तसेच चिखलदरा, घटांग मार्गे परतवाडा हा रस्त येण्यासाठी  या मार्गाची वाहतूक एकमार्गी करण्यात येत आहे. या अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द मोटार वाहन कायदा 1988 व मुंबई पोलीस कायदा  1951 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार  यांनी दिले आहेत.

00000

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...