Monday, August 31, 2020

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे व्यक्तित्व व कार्य दीर्घकाळपर्यंत स्मरणात राहील पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडून शोक व्यक्त

 

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे व्यक्तित्व व कार्य दीर्घकाळपर्यंत स्मरणात राहील

पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडून शोक व्यक्त

 

अमरावती, दि. 31 : माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी हे देशाचे अग्रणी नेते, संवेदनशील व्यक्ती होते. त्यांचे व्यक्तित्व व कार्य दिर्घकाळापर्यंत देशाच्या स्मरणात राहील, अशा शब्दांत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी माजी राष्ट्रपती दिवंगत मुखर्जी यांना आदरांजली वाहिली. 

 

माजी राष्ट्रपती मुखर्जी यांच्या निधनाबद्दल पालकमंत्री श्रीमती यांनी शोक व्यक्त केला. दिवंगत मुखर्जी हे संवेदनशील व्यक्ती होते. त्यांचे सर्वांशी स्नेहाचे संबंध होते. भारतीय राजकीय मूल्यांची जपणूक त्यांनी आयुष्यभर केली. वंचित घटकांबाबत त्यांना विशेष आस्था होती. ते एक कृतीशील नेता व कुशल मार्गदर्शक होते. त्यांच्या जाण्याने नैतिक राजकीय मूल्यांची पाठराखण करणारा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला आहे, अशा शब्दात पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 

00000

 

विमानतळ विकासकामे सहा महिन्यात पूर्ण होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 



विमानतळ विकास आढावा बैठक

विमानतळ विकासकामे सहा महिन्यात पूर्ण होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे

-  पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 31 : अमरावती विमानतळ विकासाच्या प्रलंबित कामांबाबत तत्काळ माहिती सादर करावी व ही कामे येत्या सहा महिन्यांत पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

अमरावती येथील विमानतळ विकासाबाबत बैठक पालकमंत्री ॲड. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार सुलभाताई खोडके , माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता रजनी लोणारे आदी यावेळी उपस्थित होते.

प्राधिकरणाने डिसेंबरपर्यंत धावपट्टीचे काम पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. तथापि, प्रशासकीय इमारत व इतर कामेही वेळेत पूर्ण होऊन विमानसेवेला प्रारंभ होणे आवश्यक आहे. त्यासाठी फेज-1 व 2 मधील कोणती कामे प्रलंबित राहिली, त्याची माहिती सादर करावी. कामांचे पुनर्नियोजन करून सहा महिन्यात कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. आवश्यक तिथे शासनाकडे पाठपुरावा करू, असे श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

विमानतळ विकासकामांत बडनेरा यवतमाळ राज्य वळण महामार्गाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. विमानतळावर 1 लाख लीटर क्षमतेचे भूमिगत पाणीसाठी (जीएसआर)व्यवस्था झाली आहे.  संरक्षण भिंतीचे 15 कि.मी. लांबीचे बांधकाम हाती घेण्यात आले असून,  एटीआर 72-500 कोड सी-3 विमानाच्या तात्काळ उड्डाणासाठी आवश्यक साडेसात किमी संरक्षण भिंतीचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित दुस-या टप्प्यातील 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

धावपट्टीचे विस्तारीकरण, टॅक्सीवे, अप्रॉन, आयसोलेशन बे, पेरिफेरल रोड, जीएसई एरिया, स्वच्छता यंत्रणा आदी कामे 70 टक्के पूर्ण झाली आहेत. ती डिसेंबरपर्यंत पूर्ण होतील. तथापि, प्रशासकीय इमारतीचे अंदाजपत्रक, निविदा तयार करण्याचे काम अद्यापही झालेले नाही. त्याला गती देऊन हेही काम वेळेत पूर्ण करावे जेणेकरून विमानसेवेला आरंभ होऊन शहराच्या विकासाच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल, असेही निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, राष्ट्रीय महामार्ग क्र. सहा व राज्य महामार्गाला जोडणारा 03. 10 किमी लांबीच्या प्रमुख जिल्हा मार्ग क्र. 49 चे मजबुतीकरण, सुधारणा, त्याचप्रमाणे, डीव्हीओआर सेक्शनजवळील निंभोरा- जळू ॲप्रोच रोडचे बांधकाम या अडीच किलोमीटर लांबीच्या कामालाही गती द्यावी.

 

जिल्ह्याच्या औद्योगिक, वाणिज्यिक विकासाच्या दृष्टीने विमानतळ लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. त्यानुषंगाने प्रयत्न व्हावेत. याबाबत प्राधिकरणाच्या अधिका-यांसोबत मुंबईतही बैठक घेण्यात येईल व आवश्यक तिथे पाठपुरावा करू. मात्र, विकासकामांची गती मंदावता कामा नये, असे सुस्पष्ट निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.

 

00000

 

पर्यटन विकासाच्या दृष्टीने 'सिडको'ने चिखलदऱ्यातील कामे गतीने पूर्ण करावीत - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

चिखलदरा सिडको प्रकल्प आढावा बैठक



पर्यटन विकासाच्या दृष्टीने 'सिडको'ने चिखलदऱ्यातील कामे गतीने पूर्ण करावीत

- पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 31 : चिखलदरा येथे सिडकोकडून सुविधा व सौंदर्यीकरणाची विविध कामे राबविण्यात येत आहेत. पर्यटन विकासाच्या दृष्टीने ही कामे गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी दिले.

चिखलदरा येथे सिडकोकडून राबविण्यात येणाऱ्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार सुलभाताई खोडके, आमदार  राजकुमार पटेल, माजी आमदार 

वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी शैलेश नवाल आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, चिखलदरा व मेळघाट वनभूमी अमरावती जिल्ह्याची संपदा आहे. चिखलदरा पर्यटन विकासाच्या दृष्टीने सिडकोकडून अनेक सुविधा व सौंदर्य विकास कामे राबविण्यात येत आहेत. ही कामे गतीने पूर्ण करा. कामे पूर्णत्वास नेताना वनविभागाची परवानगी आदी अडथळे येत असतील तर वेळीच माहिती द्यावे. आवश्यक शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल.

यावेळी सिडकोतर्फे भीमकुंड सौंदर्यीकरण, चिखलदरा डायरीज गेटवे आदींबाबत सादरीकरण करण्यात आले. मेळघाटातील आदिम संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या संग्रहालयाचा समावेशही करण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी दिले.

 

हॉटेल व्यावसायिकांच्या प्रश्नाबाबत स्वतंत्र बैठक

 

व्याघ्र प्रकल्पाकडून चिखलदरा येथील हॉटेल व्यावसायिकांना कंजर्वेशन शुल्क आकारण्याबाबत नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. वस्तुतः चिखलदरा ही १९४८ मध्ये स्थापित गिरीस्थान नगरपालिका आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या क्षेत्रात असलेल्या हॉटेलला असे शुल्क लावू नये, अशी मागणी हॉटेल व्यावसायिक बांधवांनी यावेळी केली. 

याबाबत शासन स्तरावर स्वतंत्र बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.यावेळी त्यांनी वन मंत्री संजय राठोड यांच्याशीही दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यानुसार याविषयी मुंबई येथे स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय झाला.

 

 

 

 

पशुपालक बांधवांवरील अन्याय खपवून घेणार नाही

 

मेळघाटातील पशुपालक बांधवांची जनावरे वनविभागाने पकडली व मुदतीच्या आतच त्यांचा लिलाव केला, अशी तक्रार आहे. हे अत्यंत गंभीर आहे, अशा शब्दात पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.गरीब पशुपालक बांधवांच्या प्रश्नाकडे संवेदनशीलतेने पाहिले पाहिजे. त्यांच्यावरील अन्याय खपवून घेणार नाही. या गरीब पशुपालकांची जनावरे त्यांना परत मिळाली पाहिजेत. या पूर्ण प्रकरणाची चौकशी करून पशुपालक बांधवाना न्याय मिळवून द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले. याबाबत संबंधित अधिकारी यांची बैठक घेऊन तत्काळ प्रश्न सोडविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

 

00000

 

कष्टकरी महिलांसाठी आर्थिक साक्षरता कार्यक्रम राबविणार - महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 


कष्टकरी महिलांसाठी आर्थिक साक्षरता कार्यक्रम राबविणार

- महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 31 : हिशेब न आल्याने कष्टकरी भगिनीची कुणीही खिल्ली उडवू नये. त्यांच्या प्रामाणिक कष्टाची कदर व सन्मान केला पाहिजे. कष्टकरी भगिनीना आर्थिक साक्षर करण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडून प्रशिक्षण कार्यक्रम राबवू, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे सांगितले.

 

एका कष्टकरी महिलेला हिशेब येत नसल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रामाणिकपणे कष्ट करून उदरनिर्वाह करणाऱ्या माताभगिनींची थट्टा होता कामा नये. याकडे संवेदनशीलपणे पाहिले पाहिजे. त्यांना आर्थिक साक्षर करून सक्षम करणे ही जबाबदारी सर्वांचीच आहे. महिला व बालविकास विभागातर्फे महिलांमधील आर्थिक साक्षरता वाढविण्यासाठी राज्यात सर्वदूर प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येईल, असे 

श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

 

महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी विभागाकडून विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्यालाच जोडून असंघटित क्षेत्रातील महिलांमध्ये आर्थिक स्वावलंबनासह साक्षरता कार्यक्रम राज्यभर राबविण्यात येईल, असेही मंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

00000

 

पायाभूत सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 






सार्वजनिक इमारती विकास आढावा बैठक
पायाभूत सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही

- पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 31 : जिल्ह्यात सार्वजनिक इमारतीची प्रस्तावित कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण व्हावीत. विकासकामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

 

जिल्हा परिषद व इतर महत्वाच्या कार्यालयाच्या नियोजित प्रशासकीय इमारतींचा आराखडा,   नियोजन व अपेक्षित कामे आदींचा आढावा घेण्यासाठी  पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार सुलभाताई खोडके, आमदार राजकुमार पटेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे आदी यावेळी उपस्थित होते.

 

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, इमारतीचे आराखडे परिपूर्ण असावेत. त्यांची रचना चांगली व नाविन्यपूर्ण व्हावी. दीर्घकालीन दृष्टीने नियोजन व्हावे. इमारतींचे स्वरूप चांगले, कल्पक, सौंदर्यपूर्ण असावे. अमरावती जिल्हा ही संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख अशा अनेक संत, महात्मे व महापुरुषांची भूमी आहे. महापुरुषांच्या म्युरल्स, प्रतिमा आदींचा समावेश असावा.

 

इमारतींच्या प्रस्तावात फर्निचर, सभागृहात अभ्यागतांसाठी गॅलरी आदी सुविधांचा समावेश असावा. इमारतीचे काम दीर्घकाळासाठी असते. त्यादृष्टीने परिपूर्ण नियोजन करावे. आवश्यक निधीसाठी पाठपुरावा करण्यात येईल. निधीची कमतरता पडू देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

 

अमरावती जिल्हा परिषद, विविध पंचायत समिती, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विभागीय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय आदी विविध कार्यालयांच्या नियोजित इमारतीबाबत यावेळी चर्चा झाली.

 

00000

 

Sunday, August 30, 2020

 

‘मनरेगा’तील सिंचन विहीरींची मर्यादा २० पर्यंत वाढवली


कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी होणार लाभ

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. ३० : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत घेण्यात येणाऱ्या सिंचन विहिरींची मर्यादा गावाची लोकसंख्या लक्षात घेऊन पाचवरून २० पर्यंत वाढविण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे, त्यामुळे अनेक शेतकरी बांधवांना त्याचा लाभ मिळेल व सिंचनाची सोय होऊन कृषी उत्पादकता वाढण्यासही मदत होणार आहे, असा विश्वास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (म.ग्रा.रो.ह.यो.) एका ग्रामपंचायतीमध्ये एका वेळी ५ सिंचन विहीरी मंजूर करता येतील अशी मर्यादा यापूर्वी घालून देण्यात आलेली होती. सिंचन विहिरींच्या कामांची शेतकरी बांधवांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे ही मर्यादा वाढवून मिळावी अशी मागणी होत होती. या मागणीचा विचार करून शासनाने गावाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ही मर्यादा वीसपर्यंत वाढविता येईल, असा निर्णय घेतला आहे.

        मनरेगा योजना कोरोना संकटकाळात शासनाकडून अत्यंत व्यापकपणे राबविण्यात आली. त्याद्वारे सिंचन, जलसंधारण, रस्तेविकास आदीं अनेक कामांना चालना देण्यात आली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती झाली. अमरावती जिल्ह्यातही ही कामे व्यापकपणे राबविण्यात आली. त्यामुळे जिल्हा या कामांमध्ये राज्यात आघाडीवर राहिला आहे.

        आता मनरेगाअंतर्गत गावाच्या लोकसंख्येनुसार सिंचन विहिरींची मर्यादा वाढविल्याने सिंचन विहिरीचे प्रमाण वाढणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना अधिकाधिक सिंचन विहिरीचा लाभ मिळणार असल्याने कृषी उत्पादनात भर पडून शेतकरी बांधवांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसह सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी जलसंधारणाच्या विविध योजना व्यापकपणे व सातत्याने राबवाव्यात, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले आहेत.

            शासनाकडून ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सिंचन विहिरीची मर्यादा वाढवून देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. 

 

 

 

 

 

ग्रामपंचायतींची लोकसंख्या

 

१ हजार ५०० पर्यंत असेल तर पाच, १ हजार ५०१ ते ३ हजारापर्यंत लोकसंख्या असेल तर १०, ३ हजार ते ५००० पर्यंत १५ सिंचन विहिरी देता येतील. त्याचप्रमाणे, पाच हजारावरील लोकसंख्या असेल तर २० विहिरींची संख्या असणार आहे. त्यामुळे ग्रामीण परिसरातील अधिकाधिक शेतकरी बांधवांना सिंचन विहिरींचा लाभ मिळून कृषी उत्पादकता वाढण्यास व शेतकरी बांधवांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.

 

00000

Saturday, August 29, 2020

खरीप पीक परिस्थिती व योजनांचा कृषीमंत्र्यांकडून आढावा

 






खरीप पीक परिस्थिती व योजनांचा कृषीमंत्र्यांकडून आढावा

'पोकरा'तील प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढा

‘पोकरा’ची परिणामकारक अंमलबजावणी व्हावी

-कृषीमंत्री दादाजी भुसे

 

अमरावती, दि.२९ :हवामान बदलांना अनुकूल असा कृषीविकास करून शेतकरी व संपूर्ण कृषीक्षेत्राला सक्षम करण्याचा पोकरा योजनेचा हेतू आहे. तथापि,योजनेत सद्य:स्थितीत अमरावती जिल्ह्यात कृषी कार्यालयांकडून अनेक अर्ज प्रलंबित असल्याचे दिसते. त्यामुळे कृषी विभागाने मिशन मोडवर कामे करून महिनाभराच्या आत प्रलंबित कामांचा निपटारा करावा, असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे दिले.

जिल्ह्यातील खरीप परिस्थिती व विविध योजनांचा आढावा कृषी मंत्री श्री.भुसे यांनी आज नियोजन भवनात घेतला, त्यावेळी ते बोलत होते. महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू, आमदार बळवंतराव वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, कृषी संचालक नारायण शिसोदे, सह संचालक सुभाष नागरे, जिल्हा कृषी अधीक्षकअधिकारी विजय चवाळे आदी उपस्थित होते.

कृषी मंत्री श्री. भुसे म्हणाले की, अमरावतीच्या नियोजन भवनाच्या याच सभागृहात सरपंच महोदयांची बैठक आपण यापूर्वी पोकरा अंमलबजावणीबाबत घेतली होती. त्यानंतर या कामाला गती येणे अपेक्षित होते. तथापि, तालुका व उपविभागीय कृषी कार्यालयाकडे बरेच अर्ज प्रलंबित राहिल्याचे दिसते. हे अत्यंत गंभीर आहे, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. येत्या महिनाभरात त्यावरील कार्यवाही पूर्ण झाली पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वेळोवेळी पोकरा योजनेचा आढावा घेत आहेत. योजनेच्या अंमलबजावणीबाबत जिल्ह्यातील स्थिती सुधारली पाहिजे.

 

‘रिझल्ट ओरिएंटेड’ कामे करा

 

योजनेची परिणामकारक अंमलबजावणी झाली पाहिजे. जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाने प्राधान्याने हे काम पूर्णत्वास न्यावे, असे निर्देश कृषीमंत्र्यांनी दिले.परिस्थितीनुरूप बदलासाठी योजनेचे स्वरूप लवचिक ठेवले असून, लोकप्रतिनिधींच्या सूचना लक्षात घेऊनआवश्यक बदल करण्यात येतील, असे ही ते म्हणाले.

 

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत आधार प्रमाणीकरण झालेल्या १ लाख ११ हजार ८२० कर्जखात्या पैकी ९४ हजार ४८५ खात्यांना ६९६ कोटी ७९ लाख रक्कम प्राप्त झाली आहे. पात्र शेतकरी बांधवाना कर्जमुक्ती मिळून त्यांना खरीपाचे नवे कर्ज मिळावे हा या योजनेचा उद्देश आहे.जिल्ह्यात खरीपाचे ७६३ कोटी ९१ लाख रुपये अर्थात ४४ टक्के कर्ज वाटप  झालेआहे.कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीनंतर जिल्ह्यातील खरीप पीक कर्ज वितरणाचे प्रमाण वाढणे अपेक्षित होते. त्यामुळे मिशन मोडवर कामे करून कर्ज वितरणाला गती देण्याचे निर्देश कृषी मंत्री श्री.भुसे यांनी दिले.

 

यंदा अधिक पर्जन्यमानामुळे सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांचे नुकसान झाल्याचे दिसते. अनेक ठिकाणी किडीचा प्रादुर्भाव आहे. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करावेत. पीएम किसान योजने लागती देण्यासाठी विशेष मोहिम हाती घ्यावी, असेही निर्देश त्यांनी दिले. बियाणाचीउ गवण न झालेल्या क्षेत्राबाबत आवश्यक कार्यवाहीचे निर्देश ही त्यांनी दिले.

पोकरा योजनेच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी बाळासाहेब ठाकरे स्मार्टग्राम प्रकल्पाशी या योजनेची सांगड घालावी. ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेनुसार बाजारपेठ असलेल्या पिकांचे उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करणे व शेतकरी ते ग्राहक अशी साखळी तयार करणे असा हेतू ठेवून पोकराची अंमलबजावणी अधिक परिणामकारक करण्यात यावी, असे ही ते म्हणाले.

 

खारपाणपट्ट्यासाठी विशेष लक्ष पुरविणे गरजेचे :पालकमंत्री श्रीमती ठाकूर

 

जिल्ह्यात खारपाणपट्ट्यातील गावांचा पोकरा योजनेत समावेश आहे. त्यामुळे या परिसराचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन त्यानुरूप योजना राबविणे गरजेचे आहे, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले.स्थानिक स्तरावरयोजनांच्या अंमलबजावणीबाबत काही अडचणी येत असतील तर अधिका-यांनी लोकप्रतिनिधींना माहिती दिली पाहिजे. अंमलबजावणीत पारदर्शकता व स्पष्टता ठेवली पाहिजे, असे ही निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

 

अपघात विमा योजनेची परिपूर्ण अंमलबजावणी आवश्यक ;राज्यमंत्री श्री. कडू

 

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेच्या परिपूर्ण अंमलबजावणीसाठी कृषी विभागाने पोलिसांकडून वेळोवेळी माहिती घेऊन संबंधित कुटुंबाना लाभ मिळवून दिला पाहिजे. अनेकदा पात्र कुटुंबेही वंचित राहतात, असे राज्यमंत्री श्री.कडू यांनी सांगितले.कृषी सेवकांनी, अधिकाऱ्यांनी याबाबत पोलिस ठाण्याशी संपर्क ठेवून वेळोवेळी माहिती घ्यावी व कुठेही दुर्दैवाने अपघात झाल्यास संबंधित व्यक्तीच्या कुटुंबाला लाभ मिळवून द्यावा. सदर लाभ कृषी विभागाने स्वत: संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन दिला पाहिजे, असे निर्देश कृषीमंत्र्यांनी दिले.

          जिल्ह्यातील संत्रा पीकाचे क्षेत्र पाहता यानुषंगाने संशोधन व विकासासाठी स्वतंत्र संत्रा संशोधन केंद्र असावे, अशी सूचना ही श्री.कडू यांनी केली.

श्री.चवाळे यांनी सादरीकरण केले.

 

खरीपक्षेत्राबाबत…

जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र १२.२१ लाख हेक्टर असून लागवडी लायक क्षेत्र ७.८१ लाख हेक्टरआहे.यंदा खरीप पिकाचे पेरणी क्षेत्र ६ लाख ८१ हजार ६६० हेक्टर (९९ टक्के) आहे.वार्षिक पर्जन्यमान ८१५ मिमीआहे.यंदा आतापर्यंत पावसाची तालुका निहाय सरासरी ६७२ मिमीअसून, दि.२७ ऑगस्टअखेर प्रत्यक्ष पाऊस ६२६ मिमी अर्थात ९३ टक्के झाला आहे.

 

जिल्ह्यात २ लाख ४५ हजार ४०८  हे.क्षेत्रावर कापसाची, २ लाख ६६ हजार ९१७ हे.क्षेत्रावर सोयाबीनची, १ लाख ७ हजार ६९४ हे.क्षेत्रावर तुरीची, १५ हजार ९२५ हे.क्षेत्रावर मुगाची, ४ हजार ९२५ हे.क्षेत्रावर उडदाची, १६ हजार २४९ हे.क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झालेली आहे.संत्रा यामुख्य फळपिकाखालील लागवडीचे क्षेत्र ७० हजार ३१४ हे.आहे.

 

00000

Friday, August 28, 2020

पालकमंत्र्यांनी घेतला कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा

 


पालकमंत्र्यांनी घेतला कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा

ऑक्सिजन सिलेंडर उपलब्धतेसाठी सर्वंकष प्रयत्न व्हावेत

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. 28 : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यसेवेच्या अन्य सुविधांप्रमाणेच पुढील काळासाठी ऑक्सिजन सिलेंडरची पुरेशी उपलब्धता असण्यासाठी सर्वंकष प्रयत्न व्हावेत, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या उपस्थितीत पुनर्वसन उपाययोजनांबाबत बैठक झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार सुलभाताई खोडके, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, सचिव रवींद्र खांडेकर, संजय तीरथकर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोना नियंत्रणासाठी सर्वंकष व एकसंध प्रयत्नांची गरज आहे. सद्य:स्थितीत ऑक्सिजनची पुरेशी उपलब्धता असली तरीही रूग्णांची वाढती संख्या पाहता यापुढेही ऑक्सिजनच्या पुरेशा साठ्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत. यासाठी संबंधित उत्पादन करणा-या कंपनी व संस्थांनीही योगदान द्यावे. लिक्विड ऑक्सिजन टाकी तसेच राखीव ऑक्सीजन सिलेंडर याबाबत ऑक्सिजन पुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. लिक्वीड ऑक्सिजनच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ नयेत. आवश्यक तिथे शासनाकडून सर्वतोपरी साह्य करण्यात येईल.

रूग्णालयांनी उपचारासाठी आकारावयाच्या दरासंबंधी यापूर्वीच शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे कुठल्याही रूग्णालयाने त्याहून जादा दर आकारून रुग्णांची फसवणूक करू नये. असा प्रकार झाल्याचे आढळताच संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पालकमंत्र्यांनी यावेळी दिला.

कोरोना संसर्गाची जोखीम सर्वांना समान आहे. त्यामुळे दक्षता उपाययोजनांचा अवलंब करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे.  त्यानुषंगाने स्वच्छता, सोशल डिस्टन्स व मास्कचा वापर या त्रिसूत्रीचा अवलंब प्रत्येकाकडून होण्यासाठी भरीव जनजागृती होणे आवश्यक आहे. यासाठी स्वयंसेवी संस्थांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.

कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत जनजागृतीसाठी युवकांचे योगदान मिळविणे आवश्यक आहे. त्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सहकार्याने राष्ट्रीय सेवा योजना व इतर उपक्रमांचा सहभाग मिळवावा. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने पावले उचलावीत. संस्थेकडून पूर्णत: सहकार्य केले जाईल, असे पद्मश्री श्री. वैद्य यांनी सांगितले. याअनुषंगाने विद्यापीठाशी समन्वय साधण्यात येईल, असे जिल्हाधिका-यांनी सांगितले.

कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील स्थिती, आरोग्य यंत्रणा, उपलब्ध मनुष्यबळ व इतर आवश्यकता आदी विविध बाबींचा आढावा पालकमंत्र्यांनी यावेळी घेतला.

000

 

प्रकल्प पुनर्वसनाच्या कामांच्या सद्य:स्थितीचा अहवाल द्यावा

 


प्रकल्प पुनर्वसनाच्या कामांच्या सद्य:
स्थितीचा अहवाल द्यावा

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

अमरावती, दि. 28 : जिल्ह्यातील निम्न वर्धा, बेंबळा आदी प्रकल्पांच्या पुनर्वसनाच्या कामांची सद्य:स्थिती  व आवश्यक कार्यवाहीबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.

प्रकल्प पुनर्वसन उपाययोजनांबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज झाली, आमदार प्रताप अडसड, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, निम्न वर्धा प्रकल्प, बेंबळा प्रकल्प, जीवन प्राधिकरण आदींचे अधिकारी- कर्मचारी यावेळी  उपस्थित होते.

प्रकल्प पुनर्वसितांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रलंबित कामे, भूसंपादन, प्रलंबित निधी आदींचा सविस्तर अहवाल सादर करावा. आवश्यक तिथे शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल. मात्र, ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात यावीत. पुनर्वसित बांधवांच्या अडचणी जाणून घेऊन त्याचे वेळीच निराकरण करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

आमदार श्री. अडसड यांनी पुनर्वसितांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी व प्रलंबित कामे मार्गी लागण्यासाठी प्रशासनाने गतीने काम करणे आवश्यक असल्याचे सांगितले. गाव हस्तांतरणाची प्रक्रिया जिल्हा परिषदेकडून होण्याची सूचनाही त्यांनी केली.

याबाबत पुनर्वसनाच्या कामांना गती येण्यासाठी संबंधित प्रकल्प कार्यालयांनी वेळोवेळी माहिती देऊन नियोजनपूर्वक कामे पूर्णत्वास न्यावीत, असे जिल्हाधिका-यांनी सांगितले.

00000

 

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...