Friday, August 28, 2020

पालकमंत्र्यांच्या हस्ते अतिक्रमण नियमानुकूल नमूना आठचे वितरण

 








पालकमंत्र्यांच्या हस्ते अतिक्रमण नियमानुकूल नमूना आठचे वितरण

वलगाव येथील 254 अतिक्रमणे नियमानुकूल

प्रत्येक गरजूला हक्काचे घर मिळवून देणार

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

*कोरोना नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अवलंबिण्याचे आवाहन

अमरावती, दि. 28 : आपले स्वत:चे हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यामुळे विविध आवास योजनांच्या माध्यमातून माध्यमातून गोरगरीबांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यात येत आहे. वलगाव ग्रामपंचायतीअंतर्गत 254 अतिक्रमण प्रशासनाव्दारे नियमानुकूल केल्याने गोरगरीबांना हक्काचे घर उपलब्ध होईल. यापुढेही जिल्ह्यातील प्रत्येक गरजू व्यक्तीला घरकुल मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे सांगितले.

वलगाव येथील सिकची रिसोर्ट येथे ‘सर्वांसाठी घरे 2022’अंतर्गत अडीचशेवर अतिक्रमणे नियमानुकूल झाल्याने नमुना 8 प्रमाणपत्राचे पालकमंत्र्याच्या हस्ते लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. ‍पंचायत समिती सभापती संजनाताई काळे,  जि. प. सदस्य गजानन राठोड, सरपंच मोहिनीताई मोहोड, उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, अनिसभाई मिर्झा, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी रणजीत भोसले, प्रमोद कापडे आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, वलगाव ग्रामपंचायतअंतर्गत येणारे अतिक्रमण नियमानुकूल झाल्याने येथील गोरगरीबांना नागरिकांना हक्काचे घर उपलब्ध होईल. संबंधित व्यक्तींना शासनाच्या घरकुल योजनेतून घरकुलाचा लाभ दिला जाईल. या माध्यमातून त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. येथील पदाधिकारी व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून हे काम पूर्णत्वास नेले, तथापि,  यापुढेही उर्वरित 329 जागांचे राहिलेल्या नियमानुकूलनाची प्रक्रिया येत्या दोन महिन्यात पूर्ण करुन  संबंधितांना लाभ मिळवून द्यावा, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

 

पालकमंत्री श्रीमती ठाकूर पुढे म्हणाल्या की, जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अजूनही कोरोनाविरुध्दची लढाई संपलेली नाही. कोरोना विषाणूच्या महामारीमुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यावर मात करून विकासाची प्रक्रिया पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. मात्र, कोरोना नियंत्रणासाठी नागरिकांनीही साथ देणे आवश्यक आहे. कोरोना संसर्गाची जोखीम सर्वांना समान आहे. त्यामुळे स्वच्छता, मास्कचा वापर व सोशल डिस्टन्स आदींचा अवलंब करून स्वत:ची काळजी घेतली नाही तर व्हेटिंलेटर लागण्याची वेळ येऊ शकते, याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे. त्यामुळे मास्कचा वापर, सॅनिटायझर वापरणे, हात स्वच्छ धुणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, बोलताना सोशल डिस्टन्स पाळणे आदी उपाययोजना कसोशीने पाळाव्यात. सर्दी, खोकला, ताप, श्वसनास त्रास होत असल्यास तत्काळ जवळच्या रुग्णालयात जावून तपासणी करावी. स्वत:सह कुटूंबातील इतरांना कोरोनाची बाधा होणार याची दक्षता घ्यावी. आजाराचे लक्षणे आढळल्यास तत्काळ रुग्णालयात जाऊन उपचार करावा.

कोविड 19 हा आजार पूर्णपणे बरा होणार आजार आहे. त्यामुळे घाबरुन न जाता आजाराची लक्षणे दिसल्यास स्वत:हून समोर या. आणि आपल्यासह इतरांना बाधित होण्यापासून बचाव करा, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

अतिक्रमण नियमानुकूल झाल्याने नमुना 8 प्रमाणपत्रांचे काहीजणांना प्रातिनिधिक स्वरुपात वितरण तसेच आवास योजनेसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.  

                                   

0000

 

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...