जिल्ह्यातून अधिकाधिक
तरूणांना लाभ मिळवून द्यावा
- पालकमंत्री ॲड. यशोमती
ठाकूर
अमरावती, दि. 20 : राज्यात चालू
वर्षाअखेर 12 हजार 500 पोलीसांची भरती करण्याचे शासनाकडून प्रस्तावित आहे. या
भरतीत अल्पसंख्याक तरूणांची निवड होण्याच्या दृष्टीने त्यांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण
देण्यात येणार आहे. सुरुवातीला या प्रशिक्षणासाठी अमरावतीसह राज्यातील 14
जिल्ह्यांमधून इच्छूक प्रशिक्षणार्थी उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
नंतर राज्यभरातील जिल्ह्यांत ही प्रक्रिया होणार आहे. जिल्ह्यातील अल्पसंख्याक
तरूणांना नोकरीत संधी व कौशल्य विकास होण्यासाठी या प्रशिक्षणाचा लाभ मिळवून
द्यावा, असे निर्देश राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या
पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.
कोरोना संकटकाळात प्रतिबंधात्मक उपाययोजनांबरोबरच विकासकामे, उद्योग-व्यवसायांना
चालना, रोजगारनिर्मिती याद्वारे विकासाला चालना देण्याचा महाविकास आघाडी शासनाचा
प्रयत्न आहे. राज्यात चालू वर्षाअखेर 12 हजार 500 पोलीसांची
भरती करण्याचे गृह विभागामार्फत प्रस्तावित आहे. समाजातील
सर्व घटकांना न्याय मिळावा, यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे. या भरतीमध्ये राज्यातील
मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी, जैन आणि ज्यू या अल्पसंख्याक समाजातील अधिकाधिक उमेदवारांना संधी
मिळण्याच्या अनुषंगाने त्यांची तयारी करुन घेण्यात येणार आहे. यासाठी त्यांना
सामान्य ज्ञान आणि शारीरीक चाचण्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या योजनेचा जिल्ह्यातील
अधिकाधिक तरूणांना लाभ मिळवून द्यावा व त्याची माहिती सर्वदूर पोहोचवावी, असे
निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील
रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने व कौशल्य विकासासाठी विविध प्रयत्न होत आहेत. कोरोना
संकटकाळातही रोजगार व कौशल्य विकास विभागातर्फे ऑनलाईन मेळावे घेऊन
रोजगारनिर्मितीला चालना देण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.
पोलीस
भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी अमरावती जिल्ह्यामध्येही इच्छूक उमेदवारांकडून
अर्ज मागविण्यात येत आहेत. स्वयंसेवी संस्थेच्या
माध्यमातून हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सध्या फक्त निवड
प्रक्रिया सुरु असून कोरोनाची परिस्थिती पाहून राज्य शासनाच्या यासंदर्भातील
नियमानुसार प्रत्यक्ष प्रशिक्षण नंतर सुरु करण्यात येणार
आहे.
याबाबतची कार्यवाही प्रशासकीय स्तरावर होत आहे.
प्रशिक्षणात सहभागी
होणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीच्या अनुषंगाने आवश्यक सामान्य ज्ञान, इतर माहिती, शारीरिक प्रशिक्षण
देण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक विद्यार्थ्यास ट्रॅकसूट आणि बूट खरेदीसाठी 1
हजार रुपये, पुस्तकांच्या खरेदीसाठी 300 रुपये, प्रतिमहिना 1 हजार 500
रुपये याप्रमाणे दोन महिन्यांसाठी 3 हजार रुपये विद्यावेतन आणि प्रशिक्षण कालावधीत
दररोज अल्पोपहार देण्यात येणार आहे. प्रशिक्षण दोन महिन्याचे असेल. प्रत्येक
जिल्ह्यात कमाल 100 विद्यार्थ्यांची निवड करुन त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार
आहे. प्रशिक्षणाकरीता प्रत्येक जिल्ह्यास साधारण 5 लाख 60 हजार रुपये खर्च असून
यासाठी तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यातून किमान 30 विद्यार्थी आले तरी त्यांचे
प्रशिक्षण घेणे प्रशिक्षण देणा-या संबंधित स्वयंसेवी
संस्थेवर बंधनकारक करण्यात आले आहे.
राज्यात 2009 मध्ये ही
योजना सुरु झाली. यातून प्रशिक्षण घेतलेल्या अनेक अल्पसंख्यांक तरुणांची निवड
पोलीस दलात झाली आहे. याशिवाय अनेकांची निवड सीआरपीएफ, एसआरपी, विविध सेना दले, रेल्वे पोलीस, सुरक्षा रक्षक अशा
स्वरुपाच्या विविध पदांवर झाली आहे.
00000
No comments:
Post a Comment