- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
अमरावती,
दि. 1 : एसआरपीएफकडून पोलीस कुटुंबातील महिलांचा स्वयंसहायता समूह स्थापन करून
एसआरपीएफ उडान हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महिलांमध्ये आर्थिक स्वावलंबन व
रोजगारनिर्मिती हा उपक्रम उपयुक्त आहे. असे उपक्रम सर्वत्र राबवले जावेत, असे
प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड.
यशोमती ठाकूर यांनी येथे केले.
एसआरपीएफ
ग्रुप 9 चे कमांडंट लोहित मतानी व त्यांच्या सहचारिणी मनजीत मतानी यांनी पुढाकार
घेऊन राज्य राखीव पोलीस दलातील पोलीस कुटुंबातील महिलांचा उडान हा स्वयंसहायता
समूह स्थापन केला व त्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारनिर्मितीला चालना दिली.
या समूहाच्या उत्पादन विक्रीसाठी उडान स्टोअर्स (www.udaanstore.com) हा ऑनलाईन प्लॅटफार्म
उपलब्ध करून देण्यात आला आहे, त्याचा शुभारंभ पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या
हस्ते झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या.
पालकमंत्री
श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, महिलांना कौशल्य विकासातून रोजगारनिर्मिती व आर्थिक
स्वावलंबनाकडे वळवणारा उडान हा उपक्रम केवळ राखीव दलापुरता मर्यादित राहू नये.
प्रत्येक क्षेत्रात यासारखे उपक्रम ठिकठिकाणी राबवले जाणे गरजेचे आहे. महिलांना
आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्यास कुटुंबाचा व पर्यायाने समाजाचा विकास होतो. शासनाकडूनही
जिल्ह्यात बचत गटांचे जाळे विणण्यात आले आहे. सोलर चरख्याद्वारे कापड निर्मिती
करणा-या स्वयंसहायता समूहाची उत्पादने राज्यभर पोहोचत आहेत. कस्तुरबा खादी समिती
संस्थेतर्फे एमआयडीसीत स्वतंत्र युनिटही सुरू कऱण्यात आले आहे.
महिलांना कौशल्य विकासाची व रोजगाराची
संधी प्राप्त करून दिली तर त्या यशस्वीपणे पुढे जातात. त्यामुळे अशा उपक्रमांचा
विस्तार होणे आवश्यक आहे. यापुढेही जिल्ह्यात सर्वत्र असे उपक्रम सुरू करण्यासाठी
पावले उचलली जातील, असेही पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले.
श्री.
मतानी म्हणाले की, या उपक्रमात पोलीस कुटुंबातील महिलांचा स्वयंसहायता समूह स्थापन
करण्यात येऊन त्यांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देण्यात आले. या
समूहाकडून अगरबत्ती, सॅनिटायझर, साबण, हँडवॉश, शॅम्पू, मास्क, कपडे, बेकरी
उत्पादने व इतर अनेक गृहोपयोगी वस्तूंचे उत्पादन करण्यात येते. समूहाची प्रगती
लक्षात घेऊन एसआरपीएफच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी उत्पादननिर्मितीच्या
आवश्यक यंत्रणेसाठी 9 लाख रूपये निधी दिला. त्यातून आवश्यक यंत्रणा खरेदी करण्यात
आली. त्यामुळे महिलांकडून विविध उत्पादनांना सुरुवात झाली. त्याची गुणवत्ता
पाहून त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे.वस्तूंचा पुनर्वापर करून त्यातून
उत्कृष्ट उत्पादन निर्मितीवर भर दिला जात आहे. सुगंधी उत्पादनांच्या निर्मितीसाठी
देवळातील निर्माल्य आदींचा वापरही केला जात आहे. महिलांना आर्थिक स्वावलंबनासह
त्यांच्या सामाजिक हक्कांची जपणूकही या उपक्रमातून होत असल्याचे श्री. मतानी यांनी
सांगितले.
उडान
समूहाच्या महिला सदस्य यावेळी उपस्थित होत्या.
00000
No comments:
Post a Comment