‘कोरोना’मुळे दोन्ही
पालक गमावलेल्या बालकांची माहिती तत्काळ सादर करावी
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचे टास्क फोर्सला निर्देश
अमरावती, दि. १७: कोरोना विषाणूमुळे अनेक बालकांनी दोन्ही पालक गमावले आहेत.
अशा बालकांची काळजी व संरक्षण करीत त्यांचे न्याय हक्क मिळवून देऊन त्यांच्या यशायोग्य
संगोपन होण्यासाठी जिल्ह्यात कृती दल गठीत
करण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची
माहिती आरोग्य यंत्रणेने व कृती दलाने तातडीने जिल्हा प्रशासनास उपलब्ध करून द्यावी,
असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज ‘कोविड-19’
मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या काळजीसाठी गठित जिल्हास्तरीय कृती दलाची
(Task Force) बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. जि.प. मुख्य कार्यकारी
अधिकारी अविश्यांत पंडा, मनपा आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर
निकम, जिल्हा प्रशासन अधिकारी पल्लवी शिरसाट, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रशांत
थोरात आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले, मा.
सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथील न्यायाधीशांच्या बाल समितीच्या निर्देशानुसार
‘कोविड 19’ प्रादुर्भावाच्या काळात बालकांची काळजी व संरक्षणाचे काम करणाऱ्या संस्थांमधील
बालकांना तसेच ‘कोविड 19’ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क
मिळवून देत त्यांच्या संगोपानासाठी उपाययोजना व्हाव्यात म्हणून कृती दल (Task
Force) गठित करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व रुग्णालयात चाइल्ड
हेल्पलाइन 1098 या क्रमांकाचा फलक सर्व रुग्णालयांच्या दर्शनी भागात प्रदर्शित करावा.
महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत बालगृहे, निरीक्षण गृहातील मुलांसाठी तत्काळ स्वतंत्र
वैद्यकीय पथक गठित करावे. या आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना पोलिस दलाने
सर्वतोपरी संरक्षण उपलब्ध करून द्यावे. अशी बालके शोषणास बळी पडणार नाहीत किंवा बालकामगार,
तस्करीसारख्या गुन्हेगारीत सापडणार नाहीत याचीही दक्षता पोलिस दलाने घ्यावयाची आहे,
असेही जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी सांगितले.
‘कोविड 19’ या आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या
बालकांस बाल संगोपन योजनेंतर्गत लाभ देत बालकाचा ताबा नातेवाईकांकडे देण्याच्या शक्यतेबाबत
पडताळणी जिल्हा बालकल्याण समितीने करावी. तसेच कृती दलाची बैठक दर पंधरा दिवसांनी आयोजित
करावी, अशाही सूचना देत जिल्हाधिकाऱ्यांनी बालगृहांचा आढावा घेतला. कोविडमुळे ज्या बालकांचे दोन्ही पालक मृत्यू पावले आहेत, अशा अनाथ
झालेल्या बालकांचे जीवनमान सहज होण्यासाठी स्थानिक प्रशासन आवश्यक ती कार्यवाही त्वरीत
करेल, असेही श्री. नवाल यांनी यावेळी सांगितले.
कोविड संसर्गामुळे दोन्ही पालकांना हॉस्पिटलमध्ये
दाखल करावे लागल्यास अशा पालकांच्या माहितीकरीता एक अतिरिक्त स्तंभाचा रिपोर्टमध्ये
समावेश करण्यात यावा व या स्तंभामध्ये अशा पालकांच्या बालकांचा ताबा ज्या व्यक्तीकडे
दिला आहे त्याची माहिती भरण्यात यावी किंवा अशा बालकांचा ताबा घेण्यास कुणीही इच्छुक
नसल्यास संबंधित हॉस्पीटल व्यवस्थापनाने ‘चाईल्ड हेल्पलाईन 1098’ व कृतीदलाच्या समन्वयकास
संपर्क साधावा, असेही श्री. नवाल यांनी सांगितले.
----------------------------------------
दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी संपर्क यंत्रणा :
जिल्ह्यातील
सर्व कोविड हॉस्पीटल व मदत केंद्रांना आदेशित करण्यात आले आहे की, ज्या बालकांच्या
दोन्ही पालकांना कोविड-19 आजाराचा संसर्ग झाला आहे. अशा बालकांची माहिती किंवा कुठली
समस्या उद्भवल्यास तातडीने चाईल्ड लाईन क्रमांक 1098, जिल्हा कृती दल समन्वयक
(9021358816), बाल कल्याण समिती (9422917914), हेल्प लाईन क्रमांक (8308992222/
7400015518) या संपर्क क्रमांवर द्यावी. दोन्ही पालक मृत पावलेल्या बालकांची व्यवस्था
ही महिला व बालविकास विभाग अंतर्गत येणाऱ्या शासकीय मुलींचे निरीक्षणगृह/ बालगृह, देसाई
लेआऊट अमरावती, शासकीय मुलांचे निरीक्षणगृह/ बालगृह, विजय कालनी, अमरावती व होलीक्रॉस
होम फॉर बेबीज, कॅम्प रोड, अमरावती येथे करण्यात येईल. अशी माहिती संबंधित हॉस्पीटल
प्रशासनाने बालकांच्या पालकांना किंवा नातेवाईकांना द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी
श्री. नवाल यांनी दिले आहे.
----------------------------------------
Comments
Post a Comment