खरीप हंगाम सन 2021-22 मध्ये कापूस पिकाचे नियोजन

                              कापूस उत्पादन वाढविण्यासाठी आवश्यक बाबींवर भर द्यावा

 जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचे शेतकऱ्यांना आवाहन

 बियाणे अधिकृत विक्रेत्यांकडूनच पावतीसह खरेदी करा

 

अमरावती, दि. 12 : कापूस हे महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचे नगदी पीक आहे. महाराष्ट्रातील 42 लाख हेक्टर क्षेत्र कापूस पिकाखाली असून ते देशाच्या क्षेत्राच्या 33 टक्के एवढे आहे. भारतातील एकूण उत्पादनापैकी 22 टक्के उत्पादन महाराष्ट्रात आहे. तसेच महाराष्ट्राची उत्पादकता देशाच्या तुलनेत 33 टक्के कमी आहे.

खरीप हंगाम सन 2020-21 मध्ये जिल्ह्यात कापूस पिकाची 2 लाख 44 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. तर कापसाची उत्पादकता 441 कि.ग्रॅ. रुई प्रती हेक्टर इतकी आहे. कापूस पिकाचे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी पुढील बाबींवर भर देणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.

 कापूस बियाणे :  कापूस बियाण्याची खरेदी करताना गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावे. बनावट तसेच भेसळयुक्त बियाण्यांची खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्यांकडूनच पावतीसह बियाणे खरेदी करावे. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाण्याचे पाकीटे सिलबंद किंवा मोहोरबंद असल्याची खात्री करावी. याबाबत कृषी विभागाने व्यापक प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. अधिकृत बीटी बियाण्यांची विक्री होईल व परराज्यातून अनधिकृत वाणाची विक्री होणार नाही याबाबत कृषी विभागाने दक्षता घ्यावी.

रासायनिक खतांचा वापर कमी करणे : शेतजमीनीतील मातीच्या नमुन्याची तपासणी करून जमीन आरोग्यपत्रिका अहवालानुसार अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करण्याबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे. शेतकऱ्यांनी सुध्दा अशा प्रशिक्षणाला उपस्थित राहून आवश्यक पिक नोंदी ठेवाव्यात. नत्राच्या स्थिरीकरणातून रासायनिक नत्र खताची बचत करण्यासाठी ॲझँटोबॅक्टर किंवा अॅझोस्पिरीलम यासारख्या जीवाणू संवर्धकांची बीजप्रक्रिया करावी. यासाठी शेतक-यांना प्रोत्साहीत करावे. कापसामध्ये मूग व उडीद अशा आंतरपिकांचा समावेश करावा. फवारणीद्वारे मैग्नेशिअम सल्फेट, युरिया, डीएपी इ. खतांचा वापर केल्यास रासायनिक खताची बचत होऊन लाल्या विकृती व्यवस्थापन करणेसाठी मदत होईल. रासायनिक खत वापर कमी करणेसाठी विद्राव्य खतांचा फर्टीगेशनद्वारे वापर करण्यास प्रोत्साहन देण्यात यावे. रासायनिक खतांचा कार्यक्षमपणे वापर करणेकरीता सेंद्रिय खते, हिरवळीचे खते, जैविक खतांचा एकात्मिकरित्या अवलंब करावा.  

गुलाबी बोंडअळी व बोंडसडीबाबतचे नियोजन : कापसापासून निर्माण झालेला कचरा नष्ट करून परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल नांगरट करून कापसाची पूर्वहंगामी       (मे मधील) लागवड टाळण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात यावी. शिफारस केलेल्या कमी कालावधीत पक्व होणाऱ्या बीटी कापूस अथवा सरळ वाणांची वेळेतच म्हणजे जून महिन्यात जमिनीत पुरेसा ओलावा आल्यानंतर पेरणी करणे गरजेचे आहे. किडीच्या जीवनक्रमात अडथळा निर्माण करण्यासाठी पिकांची फेरपालट करण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती करावी. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मृद परिक्षण करुन नत्र खताचा वापर करावा. जिल्ह्यातील जिनींग मिल्स, कापूस एकीकरण केंद्र व गोदामात फेरोमन सापळे लावून मास ट्रॅपिंग करावे. बोंडसडीचे व्यवस्थापनासाठी जमिनीचा निचरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री नवाल यांनी केले.

00000

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती