कोविडकाळात पालक गमावलेल्या बालकांच्या संगोपनासाठी
आर्थिक तरतूद
लवकरच योजना अंमलात येणार
- महिला व बाल विकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर
अमरावती, दि. 28 : कोविडकाळात पालक गमावलेल्या बालकांच्या
संगोपनासाठी आर्थिक तरतूद करण्याबाबत सकारात्मक चर्चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी
करण्यात आली असून, कॅबिनेटपुढे हा विषय ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याच्या
महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिली.
महिला व बालविकास
मंत्री श्रीमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज भेट घेत महिला बाल विकास
विभाग करत असलेल्या कामांची माहिती दिली. कोविड काळात दोन्ही पालक गमावल्याने अनाथ
झालेल्या बालकांच्या नावे ५ लाख रुपये मुदत ठेव ठेवून त्यावर येणारे व्याज त्यांना
मिळत रहावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. त्याचप्रमाणे, एक पालक गमावलेल्या बालकांना
‘बाल संगोपन’ योजनेत समाविष्ट करत दरमहा २५०० /- रुपये मदत मंजूर करावी, अशीही मागणी
महिला व बालविकास मंत्र्यांनी केली. या मागण्यांबाबत मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मकता
दर्शवली असून, लवकरच कॅबिनेट बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.
कोरोनाकाळात अनाथ झालेल्या बालकांच्या संरक्षण व संगोपनासाठी
ही तरतूद महत्वपूर्ण ठरणार आहे.
00000
Comments
Post a Comment