नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना कार्यशाळा अधिकाधिक शेतकरी उत्पादक कंपन्या व बचत गटांचा समावेश करावा -जिल्हाधिकारी शैलेश नवाल
अमरावती, दि. २७ : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेची अंमलबजावणी अधिक परिणामकारकपणे होणे आवश्यक आहे. योजनेत अधिकाधिक शेतकरी उत्पादक कंपन्या व महिला बचत गटाचा समावेश करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी काल येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवनात आयोजित पोकरा कार्यशाळेत ते बोलत होते. जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी अनिल इंगळे यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
श्री. नवाल म्हणाले की, पोकराची अंमलबजावणी भरीव पणे होण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला बचत गट यांना अधिक प्रोत्साहन द्यावे. अवजारे, शेड, रेफर वाहन, प्राथमिक प्रक्रिया एकत्रिकरण केंद्र, गोदामे, स्वच्छता प्रतवारी गृह आदींसाठी अनुदान उपलब्ध करून द्यावे. त्यासाठी बचत गट, शेतकरी कंपन्या यांना प्रोत्साहित करावे. महिला आर्थिक विकास महामंडळ, जीवनोन्नती अभियान याद्वारे ग्रामविकासाच्या दृष्टीने कृषी पूरक उद्योग व व्यवसाय वाढविण्याचा प्रयत्न व्हावा.
यावेळी उपस्थित मार्गदर्शक तज्ज्ञांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
यावेळी जीवनोन्नती अभियान, महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्यासह कृषी विभागाचे अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment