पालकमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतील
लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप
शासनाच्या सहाय्य योजनांचा पात्र व्यक्तींना तात्काळ लाभ
मिळण्यासाठी गतिमान कार्यवाही व्हावी
अमरावती दि. 18 : राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतील पात्र लाभार्थ्यांना पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले.
केंद्र व राज्य शासनाच्या सहाय्य योजनांचा पात्र व्यक्तींना तात्काळ लाभ मिळणे आवश्यक असते. त्यामुळे अशा प्रकरणी यानंतरही गतिमान कार्यवाही व्हावी. आपद्ग्रस्त, वंचित, गरजूंना लाभ मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी यावेळी केले.
राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील 18 ते 59 वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियास एक रकमी 20,000 रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते. त्यानुसार अर्थसाह्य धनादेश वितरण झाले.
राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत रेहाना परविन शे. नासिम (वलगाव), रंजना ईश्वरदास आठवले (रामगाव), तुळशी रामदास कोठारे (कामुंजा), विमल अर्जुनराव अंबाडरे (नांदगावपेठ), तर प्रतिभा गोवर्धन कटकतलवारे (वडगाव) यांना यावेळी वीस हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप यावेळी करण्यात आले.
तसेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना अर्थसहाय्य म्हणून एक लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. यामध्ये गौरव गजानन कावरे (पुसला), सुनील बाबुराव भागवत (शिराळा), रवि रामराव वानखेडे (धानोरा कोकाटे) यांच्या वारसांना यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते एक लाख रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.
तहसीलदार संतोष काकडे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते .
No comments:
Post a Comment