सामाजिक न्याय विभागात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध योजनांचे लाभ वाटप
सामाजिक न्याय विभागात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर
जयंतीनिमित्त विविध योजनांचे लाभ वाटप
अमरावती, दि. 20 : सामाजिक न्याय विभागामार्फत सामाजिक न्याय भवन सभागृहात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व विभागांतर्गत लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ वाटप करण्यात आले. तसेच सहायक आयुक्त कार्यालयाच्या यशोगाथेचे विमोचन यावेळी करण्यात आले.
खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, सुभाष गवई, रश्मी नावंदर, विजय साळवे, इतर मागास बहुजन कल्याण विभाग उपसंचालक श्री. मेटकर, सहायक आयुक्त माया केदार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर, संशोधन अधिकारी दिपा हेरोळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भूमिहीन शेतमजूरांना जमीनीचे पट्टे वाटप, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी टॅक्ट्रर व त्याची उपसाधने या योजनेचे लाभ मंजूर केल्याचा आदेशाचे वितरण करण्यात आले. गटई कामगारांना लोखंडी पत्र्याचे स्टॉल वाटपाबाबतचे प्रमाणपत्र देण्यात आले. सामाजिक समता पर्व उपक्रमातंर्गत दिलेल्या योगदानाबद्दल विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
खासदार डॉ. अनिल बोंडे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेमुळे आज भारत देशाची अखंडता कायम आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांने किमान दहा लोकांना संपर्क साधून शासकीय योजनांची माहिती देवून त्यांच्याकडून विविध योजनांचे अर्ज भरुन घ्यावे, असे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना केले. गरजूंपर्यंत योजना पाहेचविण्यासाठी समाज कल्याण कार्यालयाची यशोगाथा निश्चितच मदतनीस ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांनी यश संपादन करून देशाचे नावलौकीक वाढवावे, असे आवाहन खासदार नवनीत राणा यांनी केले. व्याख्याते सुभाष गवई यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचे पैलू व महत्त्व सांगितले. यावेळी विद्यार्थी, पालक तसेच सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती माया केदार यांनी केले. आभार राजेंद्र जाधवर यांनी मानले.
00000
Comments
Post a Comment