Wednesday, December 31, 2025

DIO NEWS 31-12-2025

 'नववर्ष प्रण - सुरक्षित अन्न' विशेष तपासणी मोहीम सुरू

अमरावती, दि. 31 (जिमाका) : नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना स्वच्छ आणि भेसळमुक्त अन्न मिळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत जिल्ह्यात 'नववर्ष प्रण - सुरक्षित अन्न' विशेष तपासणी अभियान राबविण्यात येत आहे. हे विशेष अभियान 24 डिसेंबरपासून सुरू झाले असून 10 जानेवारी 2026 पर्यंत सुरू राहणार आहे.

या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील हॉटेल, उपहारगृहे, क्लब हाऊस आणि रिसॉर्ट्स इत्यादी आस्थापनांची कसून तपासणी केली जाणार आहे. तपासणीसोबतच संबंधित आस्थापना चालकांसाठी सुरक्षित अन्नाबाबतच्या सवयी आणि नियमांबाबत सभा व कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि भेसळमुक्त अन्न मिळावे, यासाठी सर्व अन्न व्यावसायिकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने केले आहे. या मोहिमेमुळे खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर प्रशासनाचे विशेष लक्ष राहणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक नजर ठेवली जाणार आहे.

00000

सहकार व्यवस्थापन पदविकासाठी प्रवेश सुरू

अमरावती, दि. 31 (जिमाका) : सहकार व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमासाठी अमरावती येथील भाऊसाहेब भोकरे सहकार प्रशिक्षण केंद्रातर्फे दि. 1 जानेवारी ते 31 जुन 2026 या मुदतीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. दि. 1 ते 30 जानेवारी 2026 या दरम्यान प्रवेश देण्यात येणार आहे.

सहकार विभागाने सहकारी संस्थांमध्ये काम कारणाऱ्या कर्मचाऱ्यास सहकारी व्यवस्थापन पदविका अनिवार्य केले आहे. त्यामुळे राज्यातील सहकारी संस्थामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे कामकाज सांभाळून हा अभ्यासक्रम दुरूस्थ शिक्षण पद्धतीने पुर्ण करता यावा, तसेच राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरूणांना सहकार क्षेत्रातील विविध सहकारी संस्थामध्ये सदर पदविका अभ्यासक्रमामुळे नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाने 13 सहकार प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून हा अभ्यासक्रम पोस्टल पद्धतीने सुरू केला आहे.

प्रवेशासाठी प्राचार्य, भाऊसाहेब भोकरे सहकार प्रशिक्षण केंद्र, अमरावती यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहकार प्रशिक्षण केंद्राचे भाऊसाहेब भोकरे यांनी केले आहे.

00000




मेरा युवा भारततर्फे तालुकास्तरीय खेळ स्पर्धा

अमरावती, दि. 31 (जिमाका) : मेरा युवा भारत आणि नांदगाव खंडेश्वर जनस्वराज्य बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने नांदगाव खंडेश्वर येथे विविध खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या.

यावेळी जनस्वराज्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भूपेंद्र जेवडे, तालुका वकील संघ उपाध्यक्ष मोहन जाधव, शीतल काळे उपस्थित होते.

यात कबड्डी, खो-खो, 100 मीटर मुलांचे धावणे, गोळाफेक, 100 मीटर मुलींची धावणे, खो-खो या स्पर्धेत विजेता संघाला प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक, तसेच वैयक्तिक खेळाडूंना प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पारितोषिक म्हणून मेरा युवा भारत अमरावती, युवा कार्यक्रम विभाग युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय भारत सरकार ही ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले.

या स्पर्धा मेरा युवा भारतच्या जिल्हा युवा अधिकारी स्नेहल बासुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली भूपेंद्र जेवडे यांनी आयोजित केल्या. स्पर्धेसाठी जन स्वराज्य बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्यांनी पुढाकार घेतला.

00000

एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षेचे रविवारी आयोजन

*12 हजारहून अधिक उमेदवार देणार परीक्षा

अमरावती, दि. 31 (जिमाका) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2025 येत्या रविवारी, 4 जानेवारी 2026 रोजी पार पडणार आहे. या परीक्षेसाठी प्रशासनाने तयारी केली आहे.

ही परीक्षा रविवार, दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 12  या एकाच सत्रात पार पडेल. अमरावती शहरामध्ये परीक्षेसाठी एकूण 41 परीक्षा उपकेंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षेसाठी एकूण 12 हजार 864 उमेदवार प्रविष्ट होणार आहेत. परीक्षेचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी एकूण 1 हजार 250 अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासनाकडून परीक्षेचे नियोजन पूर्ण झाले असून उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

00000

Tuesday, December 30, 2025

DIO NEWS 30-12-2025

                            तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्थांसाठी विशेष कार्यशाळा संपन्न

अमरावती, दि. 30 (जिमाका): भावी पिढीला व्यसनाधीनतेपासून वाचवण्यासाठी आणि जिल्हा तंबाखूमुक्त करण्यासाठी शिक्षण विभागातर्फे विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या तालुकास्तरीय पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांसाठी  'तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था' कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.

शिक्षण मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने ‘तंबाखू मुक्त पिढी : शाळांसाठी आव्हान’ या विषयाच्या अनुषंगाने या कार्यशाळेचे आयोजन केले होते. यामध्ये उपशिक्षणाधिकारी, महानगरपालिका शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी शिक्षण, शाळा केंद्र प्रमुख आणि विषय साधन व्यक्ती उपस्थित होते.

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या वापराच्या दुष्परिणामांबाबत समाजात आणि विशेषतः लहान मुलांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी शासन स्तरावर निरंतर प्रयत्न सुरू आहेत. ज्यामध्ये शाळा आणि शैक्षणिक संस्था केंद्र व राज्य शासनाच्या निकषांनुसार तंबाखूमुक्त करण्यासाठी रॅली, पोस्टर, घोषवाक्ये, कविता आणि पथनाट्ये यांसारखे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. शाळेच्या 100 मीटर परिसरात तंबाखू विक्री करणे हा दंडात्मक गुन्हा असून 18 वर्षांखालील मुलांना तंबाखू विकणे किंवा तसे करण्यास भाग पाडणे हा कठोर शिक्षेस पात्र गुन्हा आहे. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती अंतर्गत प्रत्येक तालुक्यातील शाळांकरिता विशेष पोस्टर्स, बॅनर्स आणि बोर्ड्सचे वाटप करण्यात येत आहे.

सदर प्रशिक्षण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य  मिलिंद कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षक डॉ. मंगेश गुजर यांनी केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या  निकषांची माहिती दिली, तर मंगेश गायकवाड यांनी 'तंबाखू नियंत्रण कायदा 2003' बाबत मार्गदर्शन केले. या मोहिमेत शिक्षण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, संभाजी नगर यांनी संयुक्त सहभाग नोंदवला असून, कार्यशाळेतील प्रशिक्षित अधिकारी आता शाळा स्तरावर मुख्याध्यापक व शिक्षकांना मार्गदर्शन व पर्यवेक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य करीत आहेत.

000000

आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन

        अमरावती, दि. 30 (जिमाका): जिल्ह्यातील रिक्त  ठिकाणी आधार नोंदणी केंद्रांचे वाटपाबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती मार्फत करण्यात  येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मान्यता प्राप्त व सुरू असलेल्या आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले  आहे. अर्ज स्वीकृतीची तारीख दि. 31 डिसेंबर 2025 ते 09 जानेवारी 2026 ही आहे.

      वलगांव, तालुका अमरावती-1, आसरा, तालुका भातकुली -1, मंगरूळ चव्हाळा, तालुका नांदगाव खंडेश्वर-1, लोणी, तालुका नांदगाव खंडेश्वर-1, घुईखेड, तालुका चांदुर रेल्वे-1, जुना धामणगांव, तालुका धामणगाव-1, वऱ्हा, तालुका तिवसा-1, हिवरखेड, तालुका मोर्शी-1, लोणी, तालुका वरूड-1, पुसला, ता. वरूड-1, बेलोरा, ता. चांदुर बाजार-1, रासेगांव, ता. अचलपूर-1, वडनेर गंगाई, ता. दर्यापूर-1, भंडारज, ता. अंजनगांव सुर्जी-1, धुलघाट, ता. धारणी-1, हरिसाल, ता. धारणी-1, गौलखेडा, ता. चिखलदरा-1, टेंब्रुसोंडा, ता. चिखलदरा-1, असे एकुण 18 नवीन आधार केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

00000

राज्यस्तरीय आदिवासी आश्रमशाळा क्रीडा स्पर्धांचे  5 ते 7 जानेवारी दरम्यान आयोजन

            अमरावती, दि. 30 (जिमाका): सन 2025-26 या वर्षातील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय, अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन अपर आयुक्त आदिवासी विकास अमरावती विभागामार्फत करण्यात येणार आहे. ही क्रीडा स्पर्धा  दि. 5, 6 व 7 जानेवारी 2026 या  कालावधीत श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती येथे आयोजित करण्यात येणार आहे. या संदर्भात या कार्यालयाच्या स्तरावरून विविध समित्या गठीत करण्यात आल्या असल्याची माहिती आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त जितेंद्र चौधरी यांनी दिली आहे.

000000

नुतन वर्षानिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल

*नागरिकांनी नोंद घेण्याचे आवाहन

अमरावती, दि. 30 (जिमाका) : नवीन वर्षानिमित्त बुधवार, दि. 31 डिसेंबर 2025 रोजी शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.

आदेशानुसार बुधवारी, रात्री 10 ते दि. 1 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत शहरातील रस्ते सर्व प्रकारच्या वाहनासाठी बंद राहतील. यात शहरातील उड्डाणपूल, गाडगेबाबा समाधी मंदिरापासून ते शिवाजी शिक्षण संसथा व जिल्हा स्टेडियमकडे जाणारा उड्डाणपूल, इर्विन चौक ते राजापेठ पोलीस स्टेशन, कुथे हॉस्पीटल ते नंदा मार्केट व कुशल ऑटोकडे जाणाऱ्या उड्डाण पुलावरून सर्व प्रकारच्या वाहनाना प्रवेश बंदी राहणार आहे.

शहरातील सर्व हलक्या व जड वाहनांची वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पोलीस उपायुक्त यांनी मुंबई पोलीस कायदा 1951चे कलम 33 (1) (ब), तसेच मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 नुसार सदर आदेश निर्गमित केला आहे. या आदेशाची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी केले आहे.

00000

Monday, December 29, 2025

DIO NEWS 29-12-2025

 नववर्षानिमित्त चिखलदरा येथील वनवे वाहतूक व्यवस्था दोन दिवस राहणार

*पर्यटकांच्या सुविधेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

अमरावती, दि. 29 ( जिमाका): सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा येथे पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. ही गर्दी आणि घाट रस्त्यावरील संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने वाहतूक नियमात अंशत: बदल केले आहेत. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिलेल्या आदेशानुसार, बुधवार (31 डिसेंबर 2025) ते गुरुवार (1 जानेवारी 2026) या कालावधीत चिखलदरा मार्गावर 'वन-वे' (एकमार्गी) वाहतूक लागू करण्यात आली आहे.

चिखलदऱ्याकडे येणारा परतवाडा ते चिखलदरा हा रस्ता अरुंद आणि तीव्र घाटाचा असल्याने अपघाताची शक्यता असते. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने चिखलदऱ्याला जाण्यासाठी आणि परतण्यासाठी वेगवेगळे मार्ग निश्चित केले आहेत. नवीन नियमानुसार, पर्यटकांना चिखलदऱ्याला जाताना परतवाडा-धामणगाव गढी-चिखलदरा या मार्गाचा वापर करावा लागेल. तर पर्यटनानंतर परत येताना चिखलदरा-घटांग-परतवाडा या एकमार्गी रस्त्यानेच खाली उतरावे लागणार आहे.

जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या मार्गावरील गावांमध्ये राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना या नियमातून सवलत देण्यात आली आहे. मात्र, इतर पर्यटकांनी या नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर मोटार वाहन अधिनियम, 1988 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 नुसार कारवाई करण्यात येईल. चिखलदऱ्यातील कडाक्याची थंडी आणि पर्यटकांचा ओघ पाहता जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन पूर्णपणे सज्ज असून पर्यटकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी केले आहे.

000000

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी

पोलीस अधिनियम कलम 36 अन्वये आदेश जारी

 अमरावती, दि. 29 (जिमाका): जिल्ह्यात 30 डिसेंबर रोजी महानगरपालिका निवडणूक अनुषंगाने तसेच नामांकन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने त्यादिवशी मोठ्या प्रमाणात उमेदवार नामांकन पत्र दाखल करण्याची शक्यता आहे. अशावेळी सभांचे आयोजन व मिरवणूक काढण्यात येतात.  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली आहेत. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 36 अन्वये सर्व पोलीस आयुक्तालयाच्या परिसरातील सर्व पोलिस ठाणेदार, अंमलदार व त्यांच्यावरील अधिकाऱ्यांना दि. 10 जानेवारी 2026 च्या मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 36 अन्वये आदेश जारी करुन प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याचे अधिकार प्रदान करण्याचेआदेश पोलिस आयुक्त राकेश ओला यांनी निर्गमित केला आहे.

 रस्त्यावरून जाणारी मिरवणूक सुरळीत ठेवणे, उपासनास्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळ्याचा संभव असेल तर अडथळा होऊ न देणे, सर्व मिरवणूकाच्या व जमावाच्या प्रसंगी व पूजा-अर्चा या ठिकाणी कोणताही रस्ता किंवा अडथळा संभव असेल अशा सर्व बाबतीत अडथळा न होवू देण्यासाठी याठिकाणी बंदोबस्त ठेवणे, सर्व रस्त्यांवर किंवा रस्त्यात, सर्व धाब्यावर आणि सार्वजनिक ठिकाणच्या कपडे धुण्याचा व उतरविण्याचा जागेच्या ठिकाणी व इतर सर्व सार्वजनिक किंवा लोकांच्या येण्याच्या जागेमध्ये बंदोबस्त राहण्यासाठी, वाद्यांबाबत नियम व नियंत्रण ठेवणे, सार्वजनिक जागेत ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत नियम व नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. सक्षम अधिका-यांनी या अधिनियमाच्या कलम 33, 35, 37 ते 40, 44 व 45 अन्वये कार्यवाही करावी, असे पोलीस आयुक्त यांच्या आदेशात नमूद केले आहे.

 

0000

Friday, December 26, 2025

DIO NEWS 26-12-2025

 टपाल विभागात 'डाक जीवन विमा' प्रतिनिधींची भरती; 20 जानेवारीला मुलाखती

अमरावती, दि. 26 (जिमाका): भारतीय डाक विभागाच्या अमरावती विभागांतर्गत डाक जीवन विमा विना मध्यस्थी नेमणूक करण्यात येणार आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 20 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रवर अधीक्षक डाकघर, अमरावती विभाग यांनी केले आहे.

या भरतीसाठी उमेदवाराचे वय 18 ते 50 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असून, किमान शैक्षणिक पात्रता 10 वी उत्तीर्ण (किंवा समतुल्य) असणे अनिवार्य आहे. उमेदवारांची निवड ही मुलाखतीतील कामगिरी, संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व आणि विमा क्षेत्रातील प्राथमिक ज्ञानावर आधारित केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना ५ हजार रुपयांची सुरक्षा अनामत रक्कम (NSC किंवा KVP स्वरूपात) जमा करावी लागेल. प्रशिक्षणांनंतर उमेदवारांना सुरुवातीला तात्पुरता परवाना दिला जाईल. मात्र, नियुक्तीच्या तीन वर्षांच्या आत   आयआरडीएची परवाना परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे, त्यानंतरच हा परवाना कायमस्वरूपी  केला जाईल.

ही नियुक्ती पूर्णपणे कमिशन तत्त्वावर असेल. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी आपले मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासपोर्ट आकाराचे फोटो घेऊन प्रवर अधीक्षक कार्यालय, कॅम्प, अमरावती - 444620 येथे प्रत्यक्ष उपस्थित राहावे. निवड प्रक्रियेबाबतचे अंतिम अधिकार भारतीय डाक विभागाने स्वतःकडे राखून ठेवले आहेत.

00000

यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारासाठी प्रवेशिकांचे आवाहन; 30 जानेवारीपर्यंत मुदत

अमरावती, दि. 26 ( जिमाका): महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने दिला जाणारा स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2025 साठी लेखक आणि प्रकाशकांकडून प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत प्रकाशित झालेल्या प्रथम आवृत्तीच्या पुस्तकांसाठी ही स्पर्धा असून, पात्र साहित्यिकांनी आपल्या प्रवेशिका विहित मुदतीत सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेअंतर्गत सन 2025 च्या पुरस्कारांसाठी प्रवेशिका सादर करण्याचा कालावधी 1 जानेवारी 2026  ते 30 जानेवारी 2026 असा निश्चित करण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील इच्छुकांनी आपल्या प्रवेशिका आणि पुस्तके या विहित कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे जमा करणे आवश्यक आहे. 30 जानेवारीनंतर प्राप्त होणाऱ्या प्रवेशिकांचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झालेले अर्ज आणि पुस्तके खास दूतामार्फत किंवा टपालाने 10 फेब्रुवारी 2026  पर्यंत सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत, प्रभादेवी, मुंबई यांच्या कार्यालयाकडे पाठविली जाणार आहेत. मराठी साहित्यातील विविध प्रकारांमधील उत्कृष्ट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाकडून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.

000000

शहरात कलम 37 नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू

अमरावती, दि. 26 (जिमाका) : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्त यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

प्रतिबंधात्मक आदेश पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला आहे. सदर आदेश दि. 28 डिसेंबर ते दि. 11 जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी कळविले आहे.

000000


वीर बाल दिवसानिमित्त साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांना अभिवादन

अमरावती, दि. 26 (जिमाका) : वीर बाल दिवसानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज गुरु गोविंदसिंग यांचे पुत्र साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांच्या प्रतिमेस जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी  यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.                      

शिखांचे दहावे व अखेरचे गुरू असलेले गुरु गोविंदसिंग यांचे पुत्र साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांनी दिलेल्या बलिदानाच्या सन्मानार्थ 26 डिसेंबर हा दिवस सन 2022 पासून दरवर्षी वीर बाल दिवस म्हणून साजरा केला जातो.

बाल वयातच या बालकांनी शिख संप्रदायाचा सन्मान व अस्मिता राखून आपले बलिदान दिले. त्यांच्या गौरवार्थ व त्यांनी केलेल्या समर्पणाच्या सन्मानार्थ दरवर्षी 26 डिसेंबर हा दिवस देशभर वीर बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो.

000000

नायलॉन मांजा वापरल्यास पालकांना 50 हजार, तर विक्रेत्यांना अडीच लाखांचा दंड; हायकोर्टाचा इशारा

अमरावती, दि. 26 (जिमाका): मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंग खेळण्यासाठी नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर आणि त्याची विक्री करणाऱ्यांवर आता मोठी कारवाई होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नायलॉन मांजा संदर्भात अत्यंत कठोर पवित्रा घेतला असून, वापरकर्ते आणि विक्रेत्यांवर 50 हजार ते अडीच लाख रुपयांपर्यंतचा दंड प्रस्तावित केला आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाने जाहीर सूचना प्रसिद्ध केली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना मोठा दंड भरावा  लागणार आहे.

न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार, जर एखादा अल्पवयीन मुलगा नायलॉन मांजाने पतंग उडवताना आढळल्यास, त्याच्या पालकांना 50 हजार रुपये दंड का ठोठावू नये, अशी विचारणा केली आहे. तसेच, प्रौढ व्यक्ती नायलॉन मांजा वापरताना सापडल्यास त्यांनाही 50 हजार रुपये दंड भरावा लागेल. ज्या विक्रेत्यांकडे नायलॉन मांजाचा साठा सापडेल, त्यांना प्रत्येक उल्लंघनासाठी 2 लाख 50 हजार  रुपये दंड आकारण्याची सूचना न्यायालयाने दिली आहे. ज्यांना या प्रस्तावित दंडात्मक कारवाईविरुद्ध आपले म्हणणे मांडायचे आहे, त्यांना 5 जानेवारी 2026 रोजी नागपूर खंडपीठासमोर हजर राहून आपले निवेदन सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. जर कोणीही हजर राहिले नाही, तर जनतेचा या दंडाच्या रकमेला आक्षेप नाही असे गृहीत धरून ही कारवाई अंमलात आणली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली आहे.

सन 2021 पासून नायलॉन मांजावर बंदी असूनही त्याचा सर्रास वापर सुरू असल्याने दरवर्षी अनेक निष्पाप नागरिकांचे प्राण जातात किंवा गंभीर दुखापत होते. या गंभीर समस्येची दखल घेत न्यायालयाने आता आर्थिक दंड लावून अंकुश ठेवण्याचे ठरवले आहे.

000000


Tuesday, December 23, 2025

DIO NEWS 23-12-2025











                                                         'एक दिवस सैनिकांसाठी'अभियान राबविणार

                                -जिल्हाधिकारी आशिष येरेकर

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा संपन्न

            अमरावती, दि. 23 (जिमाका) : भारतमातेच्या संरक्षणार्थ आपल्या जीवाची पर्वा न करता अविरत देश सेवा करणारे सैनिक, शहिदांचे कुटुंबीय, वीरमाता, वीरपत्नी, त्यांचे पाल्य यांना जिल्हा प्रशासनाची मदत व्हावी, यासाठी दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी, 'एक दिवस सैनिकांसाठी' हे अभियान राबविण्यात येईल. जिल्हा प्रशासनाच्या वतीने संबंधित विभाग त्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी सहकार्य करतील, असे आश्वासन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आज येथे दिले.

            जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत सशस्त्र सेना ध्वज दिन-2025 निधी संकलन समारोहाचा शुभारंभ जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

            राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक शशिकांत गजरे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. प्रकाश ठाकरे, जिल्हा सैनिक अधिकारी आनंद पाथरकर आदी यावेळी उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले, आपले सैनिक सीमेवर देश संरक्षणार्थ लढत असतात. रात्रंदिवस देशासाठी लढा देणाऱ्या सैनिकांप्रती आपल्याला अभिमान आहे. देशाची अखंडता, प्रगती, देशाचे अस्तित्व यांचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांचे आपण सर्व ऋणी आहोत. देशसेवा करताना ते आपल्या कुटुंबियांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही. महसूल, मोजणी, कृषी, पोलीस विभाग अशा विविध शासकीय कार्यालयांकडे त्यांची प्रलंबित असलेली कामे तातडीने पूर्ण व्हावीत, यासाठी दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी ‘एक दिवस सैनिकांसाठी’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. येथे सैनिक बांधवांचे  तसेच त्यांच्या कुटुंबियांचे प्रश्न सोडविण्यात येतील. सैनिक बांधव तसेच त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या तक्रारी जिल्हा सैनिक अधिकारी आनंद पाथरकर यांच्याकडे नोंदवाव्यात. एक दिवस सैनिकांसाठी या अभियानांतर्गत या तक्रारींवर कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

   भारत देशाला 1947 मध्ये स्वातंत्र्य प्राप्त झाले. तेव्हा इतरही जवळपासचे देश स्वतंत्र झाले. परंतु इतर देशांपेक्षा आपला देश ‘विकसित देश’ म्हणून आज नावारूपाला आलेला आहे. हे केवळ भारतीय सैनिकांचे दृढ मनोबल व इच्छाशक्तीमुळे शक्य झाले आहे. भारतीय सेना बल देशाला कोणत्याही संकटातून बाहेर काढू शकते, हा भारतीयांचा दृढ विश्वास आहे. सैनिक बांधव सीमेवर लढत आहे, त्यामुळेच आपण स्वातंत्र्याची अनुभूती घेत आहोत. आजवरच्या इतिहासात भारतीय सैनिकांच्या शौर्यगाथा आपण ऐकत आले आहोत. त्यांच्या शौर्यगाथेतून आपल्याला आणि येणाऱ्या पिढीला निरंतर प्रेरणा मिळत राहील. सैनिक बांधवांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी  सशस्त्र सेना ध्वजदिन राबविण्यात येतो. यातून सैनिकांच्या मुलांचे शिक्षण, आरोग्य, सामाजिक कार्यासाठी हा निधी खर्च करण्यात येतो. मागील वर्षी अमरावती जिल्ह्याने दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा जास्त ध्वजनिधी संकलित केला. यावर्षी देखील दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा अधिक ध्वजनिधी जमा करण्यासाठी आपण सर्व एकत्रितरित्या प्रयत्न करूया. यावर्षी  कोटी रुपये ध्वजनिधी जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवूया, असा विश्वास जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी यावेळी व्यक्त केला.

            श्री शिवाजी शिक्षण संस्थेमार्फत ध्वजदिन निधी संकलनासाठी 25 लक्ष रुपयांचा धनादेश यावेळी सुपूर्द करण्यात आला.  यावेळी मान्यवरांच्या हस्ते वीर पत्नी श्रीमती वनमाला, श्रीमती कांताबाई, श्रीमती नूतन, श्रीमती सरस्वती, श्रीमती सुनिता, श्रीमती मनुताई, श्रीमती रेणुका तसेच वीर माता श्रीमती रंभाई, श्रीमती बेबीताई ऊईके तसेच श्रीमती पथोड यांना सन्मानित करण्यात आले.

            विशेष गौरव पुरस्काराने माजी सैनिक भावे किशोर उत्तम यांचा मुलगा स्वराज,  श्रीमती वर्षा रमेश खडसे यांची मुलगी सावी, संतोष खंडूजी श्रीनाथ यांचा मुलगा आदित्य, वनकर अनिल खंडुजी यांची मुलगी निहारिका, तायडे वासुदेव व्यंकटराव यांचा मुलगा पियुष, विनोद बाबूलाल वानखडे यांची मुलगी संस्कृती यांना विशेष पुरस्काराने यांना सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमात शहीद जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता, शौर्यपदकधारक, त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद पाथरकर यांनी केले. संचलन वैभव निमकर तर आभार सुरेखा पथोड यांनी मानले.

00000

जागतिक कौशल्य स्पर्धेची विभागीय पात्रता फेरी आज

अमरावती, दि. 23 (जिमाका): व्यावसायिक शिक्षण आणि जागतिक कौशल्य स्पर्धेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून अमरावतीत उद्या, 24 डिसेंबर 2025 रोजी जागतिक कौशल्य स्पर्धा विभागीय पात्रता फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. श्रीकांत जिचकार भवन येथे ही स्पर्धा पार पडणार असून, जिल्हास्तरावर निवड झालेल्या उमेदवारांनी या विभागीय फेरीत आपले कौशल्य सादर करावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास केंद्राने केले आहे.

जागतिक कौशल्य स्पर्धा ही दर दोन वर्षांनी होणारी जगातील सर्वात मोठी कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा आहे. 23 वर्षांखालील तरुणांसाठी ही स्पर्धा एखाद्या ऑलिम्पिक खेळाप्रमाणेच प्रतिष्ठेची मानली जाते. आगामी 2026 ची जागतिक कौशल्य स्पर्धा चीनमधील शांघाय येथे आयोजित करण्यात येणार आहे. या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उमेदवारांची निवड जिल्हा, विभाग, राज्य आणि त्यानंतर देश पातळीवर केली जाणार आहे. यापूर्वी पार पडलेल्या 47 व्या जागतिक कौशल्य स्पर्धेत 63 सेक्टरमधून 50 देशांतील 10 हजारांहून अधिक उमेदवारांनी सहभाग नोंदविला होता.

शांघाय स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय आणि सेक्टर स्किल कौन्सिल यांच्या सहकार्याने एकूण 63 क्षेत्रांशी संबंधित ही कौशल्य स्पर्धा होत आहे. अमरावती विभागात होणाऱ्या या पात्रता फेरीसाठी नोंदणीकृत उमेदवारांनी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. याबाबत अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, उस्मानिया मस्जिदजवळ, अमरावती येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त श्रीमती प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

000000

शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी

31 डिसेंबरपर्यंत मुदत

अमरावती, दि. 23 ( जिमाका): शैक्षणिक वर्ष 2019-20  ते 2023-24 या पाच वर्षांच्या कालावधीतील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे महाडीबीटी पोर्टलवरील शिष्यवृत्ती अर्ज तातडीने निकाली काढण्याची सूचना समाज कल्याण विभागाने दिली आहे. महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेले हे अर्ज मंजूर किंवा नामंजूर करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली असून, त्यानंतर प्रलंबित राहणाऱ्या अर्जांची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांची असेल, असा कळविण्यात आले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी-परीक्षा फी माफी, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती यांसारख्या विविध योजना राबविल्या जातात. मात्र, अनेक महाविद्यालयांनी वारंवार सूचना देऊनही जुन्या वर्षांचे अर्ज अद्याप निकाली काढलेले नाहीत. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार, अंतिम मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत केंद्र हिस्सा अदा करता येणार नाही. त्यामुळे जे विद्यार्थी पात्र असूनही केवळ महाविद्यालयाच्या दिरंगाईमुळे शिष्यवृत्तीपासून वंचित राहतील, त्यांच्याकडून कोणतेही शुल्क वसूल करता येणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी आवाहन केले आहे की, महाविद्यालयांनी आपल्या स्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जांची त्रुटीपूर्तता करून घ्यावी. ज्या अर्जांची त्रुटीपूर्तता होणे शक्य नाही, ते अर्ज नियमानुसार 'रिजेक्ट' करावेत. सन 2024-25 आणि 2025-26 या शैक्षणिक वर्षांचे शंभर टक्के अर्ज नोंदणीकृत करण्यासाठी महाविद्यालयातील सूचना फलक, व्हॉट्सॲप ग्रुप आणि 'समान संधी केंद्रा'चा प्रभावी वापर करावा. मुदतीनंतर महाडीबीटी ॲडमिनकडून अर्ज 'ऑटो रिजेक्ट' झाल्यास त्याची जबाबदारी प्राचार्यांची निश्चित केली जाईल, असेही या कळविण्यात आले आहे.

00000000

निम्न पेढी प्रकल्पातील नागरिकांना घरकुल मंजूर

-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

अमरावती, दि. 23 (जिमाका) : निम्न पेढी प्रकल्पात यावर्षीपासून पाणी साठविण्याची परवानगी देण्यात आली आहे. परिणामी गोपगव्हाण गावापर्यंत पाणी येणार आहे. त्यामुळे या गावातील स्थलांतरला वेग देण्यात आला आहे. त्यासाठी नागरिकांना राहण्यासाठी घरकुल मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज निम्न पेढी प्रकल्पाबाबत आढावा घेण्यात आला. बैठकीमध्ये जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी हातुर्णा, गोपगव्हाण, कुंडखुर्द, अळणगाव, कुंड सर्जापूर या गावातील नागरिकांच्या स्थलांतरणाचा आढावा घेतला. नागरिकांनी पुनर्वसित गावात स्थलांतरण करावे, यासाठी त्यांना प्राधान्याने घरकुल मंजूर करण्यात येत आहे. यासाठी त्यांना घरकुलाचा पहिला हप्ता देण्यात येणार आहे. त्यासोबतच स्थलांतरासाठी दोन लाख रूपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. गावातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत करण्यात येणार असून, विजेची समस्या निकाली काढण्यात येणार आहे. पाण्याचा प्रश्न असलेल्या गावात विंधनविहिरी घेण्यात येणार आहे.

बुडीत क्षेत्रात जाणाऱ्या गावामधील स्थलांतराला वेग देण्यासाठी पुनर्वसित गावात प्रामुख्याने पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच पुनर्वसित गावात पायाभूत सुविधांसाठी 57 कोटी रूपयांच्या कामाचे नियोजन करण्यात आले आहे. ही कामे मंजुरीच्या प्रक्रियेत आहे. कुंड सर्जापूर येथील स्मशानभूमीच्या विकासासाठी निधी देण्यात आला आहे. जागाही ठरविण्यात आली असून येत्या काही दिवसात याठिकाणी कामे करण्यात येतील. स्थलांतरण वेगाने व्हावे, यासाठी घरकुल मंजुरीचे पत्र आणि पहिला हप्ताही तातडीने देण्यात येणार आहे. तसेच स्थलांतरणाच्या भत्त्यासाठी नागरिकांचे अर्ज घेण्यात येणार आहे. यावेळी सरपंच यांनी पुनर्वसित गावात येणाऱ्या समस्यांची माहिती दिली.

000000

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...