रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत
अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. या प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात येते, रब्बी हंगाम पिक स्पर्धा 2025 मध्ये शेतकऱ्यांना सहभागीसाठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करावा लागणार आहे.
पिक स्पर्धेमध्ये रब्बी पिके ज्वारी, गहू, हरभरा, करडई आणि जवस या पाच पिकांचा समावेश आहे. पिकासाठी 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. राज्यस्तरावर पिकस्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे विजेते निवडण्यात येणार आहे. तालुका पातळीसाठी पहिले बक्षिस रु. 5 हजार, दुसरे बक्षिस 3 हजार व तिसरे बक्षिस 2 हजार रूपये आहे. जिल्हा पातळीसाठी पहिले बक्षिस 10 हजार, दुसरे बक्षिस 7 हजार व तिसरे बक्षिस 5 हजार रूपये स्वरुप आहे. राज्य पातळीसाठी पहिले बक्षिस 50 हजार, दुसरे बक्षिस 40 हजार व तिसरे बक्षिस 30 हजार रूपये आहे.
स्पर्धेसाठी सर्वसाधारण आणि आदिवासी गट राहणार आहे. प्रवेश शुल्क हे पिकनिहाय 300 रुपये आणि आदिवासी गटासाठी 150 रूपये राहणार आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी krush.maharashtra.gov.in किंवा नजिकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.
0000000
ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक आदेश लागू
अमरावती, दि. 03 (जिमाका) : जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
सदर प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिस आयुक्तालय परिक्षेत्र वगळून जिल्ह्यातील ग्रामीण भागात लागू करण्यात आला आहे. सदर आदेश दि. 14 डिसेंबर 2025 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी आशिष येरेकर यांनी कळविले आहे.
00000
जिल्ह्यातील 23 गावाचा ‘स्मार्ट व इंटेलिजेंट व्हिलेज’ प्रकल्पात समावेश
अमरावती, दि. 03 (जिमाका) : ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘स्मार्ट व इंटेलिजेंट व्हिलेज' प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यात जिल्ह्यातील 23 गावांचा समावेश करण्यात आला आहे.
यात चांदुर बाजार तालुक्यातील बोराळा, आसेगाव, बेलोरा, टाकरखेडा पूर्णा, चिंचोली काळे, तळणी पूर्णा, वडूरा, धानोरा, खरवाडी, सर्फाबाद, खराळा, फुबगाव, जवळा शहापूर, राजुरा, जैनपूर, बेसखेडा, तळवेल, शिरजगाव बंड, रसुल्लापुर, हैदतपूर, कृष्णापूर, विरूळ पूर्णा आणि अमरावती तालुक्यातील शिराळा गावाचा समावेश आहे.
या प्रकल्पात अंतर्गत ग्रामपंचायमींमध्ये स्मार्ट सेवा यात सीसीटीव्ही सर्व्हेलन्स, वाय-फाय, हॉटस्पॉट, डिजिटल शिक्षण, आरोग्य सेवा, पशुसंवर्धन, महिला व बाल कल्याण आदी विभागाच्या ऑनलाईन सेवा आणि ई-प्रकल्प, स्मार्ट कृषि सेन्सर्स, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी राज्यात महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ हे भारतनेट फेज 2 नेटवर्कच्या देखमालीसह आवश्यक तांत्रिक सहाय्य उपलब्ध करुन देणार आहे.
यासाठी ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. प्रत्येक निवडक गावात प्रकल्पाच्या अंमलबजावणी आणि प्रकल्पाच्या व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायत स्तरावर 'स्मार्ट व इंटेलिजेंट व्हिलेज’ समिती स्थापन करण्यात येणार आहे. समिती प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी नागरिकांचा सहभाग उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. तसेच नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देऊन सर्व सुविधा ग्रामस्थांकडून वापरण्यात येतील. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समिती प्रकल्पाचे पर्यवेक्षण करेल.
0000
No comments:
Post a Comment