Monday, April 21, 2025

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना प्रशासकीय गतिमानता पुरस्कार प्रदान


जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना प्रशासकीय गतिमानता पुरस्कार प्रदान
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसी यांच्या हस्ते गौरव
*'मिशन-28' उपक्रमाची राज्यस्तरावर दखल

     अमरावती, दि. 21 (जिमाका) : राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान आणि स्पर्धा 2024-25मध्ये राज्यस्तरीय पारितोषिकांमध्ये सर्वोत्कृष्ट कल्पना, उपक्रम गटातून 'मिशन-28' उपक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. या पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना मुंबई येथे करण्यात आले.

     कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या उपस्थितीत मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयाने मेळघाटच्या दुर्गम भागातील माता आणि बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी 'मिशन-28' हा नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबविला. याच उत्कृष्ट कार्याची दखल घेत राज्य सरकारने पुरस्कार दिला आहे. या पुरस्कारासोबत जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना 30 हजार रुपयांचा धनादेशही प्रदान करण्यात आला.

      विभागीय स्तरावरील निवड समित्यांकडून प्राप्त प्रस्तावामधून व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, क्षेत्रीय कार्यालय, अमरावती यांच्या 'उत्कृष्ट आयटीआय, रोजगार मेळावे, संवाद फोरम' या प्रभावी उपक्रमासाठी 10 लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे. व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक प्रदीप घुले यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
स्पर्धेत राज्यभरातून शासकीय विभाग, कार्यालये आणि अधिकारी, कर्मचारी यांनी उत्कृष्ट प्रशासकीय कार्य आणि उपक्रम सादर केले. राज्यस्तरीय निवड समितीने प्रस्तावांचे मूल्यांकन करून पारितोषिकांसाठी विजेत्यांची निवड केली आहे. पारितोषिक विजेत्यांना मिळालेली रकम कार्यालयाची सुधारणा किंवा स्पर्धेत पाठवलेल्या प्रस्तावाच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी करावी लागणार आहे.
000000

म्हाडामध्ये आज जनता दरबार

     अमरावती, दि. 21 (जिमाका): गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत मंगळवार, दि. 22 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता लोकशाही दिनाच्या धर्तीवर नागरीकांचे प्रश्न तत्परतेने सोडविण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. 

     नागरिकांना समस्यांचे निराकरण करावयाचे असल्यास जनता दरबारासाठी गृहनिर्माण भवन, टोपेनगर, अमरावती येथील कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन अमरावती गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या मुख्य अधिकारी यांनी केले आहे. 

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...