आरोग्य यंत्रणांनी मानकांनुसार कार्य करावे
-जिल्हाधिकारी सौरभ कटियार
अमरावती, दि. 02 : जिल्ह्यात आरोग्यविषयक चांगले कार्य होत आहे. यात आता क्षयरोगमुक्त आणि आयुष्मान कार्ड वाटपात गती देण्याची गरज आहे. त्यासोबतच जिल्ह्यासाठी असलेल्या मानकानुसार आरोग्य यंत्रणांनी कार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.
जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अजय साखरे यांच्यासह स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी, राज्य शासनाच्या निर्देशानुसार एचआयव्हीबाधितांना परिवहन महामंडळाच्या बसेसच्या पासेसचे वितरण करण्यात येत आहे. त्या सर्वांना मिळत असल्याची खात्री करावी. त्यासोबतच इतरही योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. रक्तनमुने तपासणी करून एचआयव्हीबाधितांचा शोध घेण्यात येत आहे. यात आढलेल्या सर्वांना जोडून त्यांच्यावर उपचार करण्यात यावेत.
जिल्ह्यात धामणगावसह काही तालुक्यात मुलींचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे लिंग गुणोत्तर कमी असणाऱ्या तालुक्यात गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवड प्रतिबंध) अधिनियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. प्रामुख्याने सोनोग्राफी केंद्रावर लक्ष ठेवण्यात यावे. कायद्याचा वचक राहावा यासाठी कारवाई यशस्वी व्हावी. मुलींच्या जन्माचे स्वागत होण्यासाठी जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी दिले.
00000
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींसाठी आधार पडताळणी अनिवार्य
*30 एप्रिलपूर्वी पडताळणी करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 02 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांची आधार पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी 10 मार्च 2025 पूर्वी प्रशिक्षणाचे सहा महिने पूर्ण केले आहेत, त्यांना आता उर्वरित पाच महिने प्रशिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी 30 एप्रिलपूर्वी कागदपत्रे पडताळणी करावी लागणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या नविन उमेदवारांना देखील आधार पडताळणी करणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थ्यांनी त्यांचे आधार कार्ड, शैक्षणिक पात्रता, वय, अधिवास प्रमाणपत्र आणि योजनेच्या वेबपोर्टलवरील प्रतिज्ञापत्र सादर करणे अनिवार्य आहे. यापुढे आधार संलग्न बँक खात्यांमध्ये विद्यावेतन जमा केले जाणार आहे, त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांनी बँकखात्याला आधार लिंक करणे आवश्यक आहे. आधार पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणासाठी रुजू करून घेतले जाणार आहे.
इच्छुक उमेदवार आणि आस्थापनांनी 30 एप्रिलपर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती येथे संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे जमा करून पडताळणी करावी. अधिक माहितीसाठी किंवा अडचणी असल्यास, जिल्हा समन्वय अधिकारी प्रथमेश सोहळे (८४४६१५८२९७) आणि अतुल गवई (९४०४७९९९७१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.
00000
महाडीबीटी शिष्यवृत्ती अर्जांसाठी मुदतवाढ; 30 मे पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 2(जिमाका): सामाजिक न्याय विभागाने अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. महाडीबीटी प्रणालीवर चालविल्या जाणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता नवीन अर्ज तसेच नूतनीकरणाचे अर्ज भरण्याची अंतिम तारीख आता 30 मे 2025 असणार आहे. यासोबतच, सन 2023-24 या वर्षातील ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटींमुळे परत पाठवण्यात आले होते, त्यांना पुन्हा (Re-Apply) अर्ज करण्यासाठी देखील 30 मे 2025 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी आणि महाविद्यालयांना आवाहन केले आहे की, त्यांनी या मुदतवाढीचा लाभ घ्यावा. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटींमुळे महाविद्यालयांनी परत पाठवले आहेत, त्यांनी त्वरित त्या त्रुटींची पूर्तता करून आपले अर्ज पुन्हा जिल्हा लॉगिनवर पाठवावेत.
महाडीबीटी पोर्टल https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. सर्व संस्था आणि महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी याची नोंद घ्यावी आणि त्यांच्या संस्थेतील पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज वेळेत भरून घेण्याची जबाबदारी त्यांची असेल, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी परीक्षा फी योजना, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना या शिष्यवृत्ती योजना राबविल्या जातात. जिल्ह्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घ्यावा आणि आपली शैक्षणिक प्रगती साधावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
'वकील आपल्या दारी' उपक्रमाचे आयोजन; गरजूंना मिळणार मोफत कायदेशीर सल्ला
अमरावती, दि. 2: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, दर्द से हमदर्द तक ट्रस्ट आणि जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा सदन येथे 'लिगल ऐड ऑन व्हील्स' अर्थात 'वकील आपल्या दारी' या उपक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. संस्थेचे संस्थापक, मुंबई उच्च न्यायालयाचे ॲड. प्रकाश साळसिंगीकर यांच्या मार्गदर्शनाखाली 'दर्द से हमदर्द तक' ट्रस्ट गेल्या ३ वर्षांपासून संपूर्ण राज्यभर गरजूंना मोफत कायदेशीर सल्ला देण्याचे काम करीत आहे. संस्थेचे कार्य मुंबई आणि पुणे शहरांमध्ये विशेष प्रभावी आहे.
राज्यात 'लिगल ऐड ऑन व्हील्स' (वकील आपल्या दारी) या उपक्रमाच्या माध्यमातून गरजूंना कायदेशीर साहाय्य पुरवले जाणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते नुकतेच झाले. या उपक्रमांतर्गत, एक विशेष वाहन विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये फिरून लोकांना मोफत कायदेशीर सल्ला देणार आहे. 'लिगल ऐड ऑन व्हील्स' या उपक्रमाद्वारे वकील आणि स्वयंसेवक विविध ठिकाणी जाऊन लोकांना कायदेशीर साहाय्य आणि मार्गदर्शन करतील.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुधाकर वे. यार्लगड्डा, कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी , जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सचिव मंगला कांबळे, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. विश्वास काळे, ॲड. प्रदयुम्न भिरंगी, न्यायरक्षक कार्यालयाचे प्रमुख अधिवक्ता ॲड. जितेंद्र देशमुख, दर्द से हमदर्द तक संस्थेचे विदर्भ प्रमुख ॲड. विभव दीक्षित, पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे ॲड. संकेत राव आदी यावेळी उपस्थित होते.
दर्द से हमदर्द तक संस्थेचे विदर्भ प्रमुख ॲड. दीक्षित आणि ॲड. संकेत राव यांनी 'लिगल ऐड ऑन व्हील्स' उपक्रमाची आणि संस्थेच्या माहिती दिली. श्रीमती कांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन केले. दिनांक 1 एप्रिल रोजी हे वाहन पुढील कायदेशीर साहाय्य मोहिमेसाठी वर्धा जिल्ह्याकडे रवाना झाले.
00000
शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
अमरावती, दि. 2 (जिमाका) : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्त यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
प्रतिबंधात्मक आदेश पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला आहे. सदर आदेश लागू करण्यात आला असून दि. 16 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment