सेवा हक्क अधिनियमाच्या दशकपूर्तीनिमित्त सेवा हक्क दिन
*12 मे पर्यंत सेवा पंधरवड्याचे आयोजन
अमरावती, दि. २७ : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या अंमलबजावणीला दहा वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने दि. 28 एप्रिल हा दिवस सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. तसेच दि. 28 एप्रिल 12 मेपर्यंत सेवा पंधरवडा राबविण्यात येणार आहे.
सेवा हक्क दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकसेवा प्रदान करण्याच्या कामगिरीमध्ये उल्लेखनीय काम केलेल्या जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे जिल्हास्तरावर सेवा प्रदान करण्याच्या कामगिरीत उल्लेखनीय कार्य केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी सर्व पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था व नागरिकांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ग्रामपातळीवर सर्व ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या ठळक वैशिष्ट्यांचे वाचन करण्यात येणार आहे.
सेवा हक्क दिनाच्या निमित्ताने सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना सेवेची शपथ देण्यात येणार आहे.
सेवा पंधरवड्यामध्ये दि. 25 एप्रिल 2025 पर्यंतच्या प्रकरणावर कार्यवाही पूर्ण करण्याची सूचना देण्यात आल्या आहे. यामध्ये विविध सेवांचा समावेश आहे.
सेवा हक्क दिनानिमित्त सेवा हक्काबाबत जनजागृतीसाठी राज्यसेवा हक्क आयुक्त अमरावती, जिल्हाधिकारी यवतमाळ आणि अकोला यांची मुलाखत दि. 28 एप्रिल रोजी अमरावती, यवतमाळ आणि अकोला आकाशवाणी केंद्रावरून सकाळी दहा वाजता प्रसारित होणार आहे. मुलाखतीमध्ये कायद्यातील तरतुदी आणि अंमलबजावणीची माहिती देण्यात येणार आहे.
तसेच सेवा पंधरवड्यामध्ये नागरिकांनी प्रलंबित असलेल्या त्यांच्या सेवा प्राप्त करून घ्याव्यात, असे आवाहन अमरावती राज्यसेवा हक्क आयुक्त कार्यालय यांनी केले आहे.
00000
जिल्ह्यात गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार योजनेला वेग
*शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन
अमरावती, दि. २७ : शासनाची महत्वाकांक्षी गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. ही योजना शेत जमीन सुपीक करणे आणि धरणातील पाणीसाठा वाढवणे यासाठी उपयुक्त असल्याने शासनस्तरावर जाणीवपूर्वक राबविल्या जात आहे. या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
तिवसा तालुक्यातील विरगव्हाण आणि दिवाणखेड येथे सुरु असलेल्या कामांना जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी भेट देऊन पाहणी केली.
या भेटीदरम्यान जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय अधिकारी, अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी, ग्रामपंचायत सरपंच आणि लाभार्थी शेतकरी उपस्थित होते. ही कामे अशासकीय संस्थांमार्फत केली जात आहे. या योजनेचा मुख्य उद्देश तलावातील गाळ काढून पाणी साठा वाढवणे आणि त्याचबरोबर अत्यंत सुपीक गाळ शेतकऱ्यांना शेतीसाठी उपलब्ध करणे हा आहे. यामुळे कृषी उत्पादकता वाढण्यास मदत होणार आहे.
सध्या जिल्ह्यात एकूण २४४ कामे मंजूर असून त्यामधून सुमारे ४५ लक्ष घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेचा शेतकरी लाभ घेत असून, स्वतःच्या खर्चाने गाळ वाहून नेण्यासाठी लघु पाटबंधारे विभागामार्फत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनी देखील या योजनेचा लाभ घेऊन आपली शेती सुपीक करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी केले आहे.
00000
राजपत्रित अधिकारी महासंघातर्फे ग. दि. कुलथे यांना अभिवादन
अमरावती, दि. २७ : राजपत्रित अधिकारी महासंघातर्फे जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक, सल्लागार राहिलेले ग. दि. कुलथे यांना आज अभिवादन करण्यात आले. यावेळी पहलगाम येथे मृत्युमुखी पडलेल्यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बायस अध्यक्षस्थानी होते. यावेळी डॉ. संदीप इंगळे, डॉ. संजय कावरे, डॉ. क्रांती कटोले, श्री. फिसके, श्री. धात्रक, श्री. जवंजाळ यांनी स्व. ग. दि. कुलथे यांच्या कार्यास उजाळा देऊन भावना व्यक्त केल्या.
यावेळी पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. संदीप इंगळे, उपायुक्त डॉ. संजय कावरे, श्री. जवंजाळ, डॉ. क्रांती काटोले, अभियंता श्री. धात्रक, प्रवीण इंगळे, महानगरपालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. फिसके, श्री. देव, जिल्हा उपनिबंधक श्री. कुंभार, गटविकास अधिकारी विनोद खेडकर, अभियंता श्री. बकाले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पुरुषोत्तम सोळंके, पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. पेठे, डॉ. महल्ले, डॉ.खाजोने, डॉ. खेरडे, डॉ. तेलंग आदी उपस्थित होते.
0000
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा
अमरावती, दि. २७ : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सोमवार, दि. २८ एप्रिल रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
दौऱ्यानुसार, श्री. बावनकुळे यांचे सकाळी ९ वाजता अमरावती विमानतळावर आगमन होईल. सकाळी ९.१५ वाजता संत ज्ञानेश्वर महाराज सांस्कृतिक भवनात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर सकाळी १० वाजता अमरावती विमानतळावरून पुढील दौऱ्यासाठी प्रस्थान करतील.
00000
No comments:
Post a Comment