जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते जलरथाला हिरवी झेंडी
अमरावती, दि. 25 (जिमाका) : मृद व जलसंधारण विभाग आणि भारतीय जैन संघाच्या वतीने जलरथाला आज जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी हिरवी झेंडी दाखविली.
यावेळी कमलताई गवई, अपर जिल्हाधिकारी गोविंद दाणेज, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, ज्ञानेश्वर घ्यार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुनिल जाधव, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, सोनाली कोकाटे, गोविंद कासट आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना शेतकऱ्यांना फायद्याची ठरणारी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वत:हून पुढे येऊन या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
जलरथ हा गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेची नागरिकांमध्ये जनजागृती करणार आहे. योजनेच्या माहितीसोबतच नागरिकांचे गाळ घेण्याबाबतचे अर्जही यामार्फत भरून घेतले जाणार आहे. तसेच जलरथावर क्यूआर कोड देण्यात आला असून नागरिकांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. शेतकऱ्यांना धरणातील सुपिक गाळ शेतामध्ये टाकण्यासाठी मोफत उपलब्ध होणार आहे. केवळ इंधनाचा खर्च संबंधित शेतकऱ्याला करावा लागणार आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना यशस्वी झाली असून जिल्ह्यातही ही योजना राबविण्यात येत आहे. जलरथाच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत ही योजना पोहोचविण्यात येणार आहे. जिल्ह्यात सध्यास्थितीत 117 धरणातून गाळ काढण्यात येत आहे. यामुळे जलसाठा वाढण्यासोबतच शेतजमीन सुपिक होण्यास मदत होणार आहे. तसेच भुजल पातळी वाढून विहिरीमध्ये पाणी येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
000000
पाणीटंचाई निवारणाची कामे तातडीने पूर्ण करावीत
-जिल्हाधिकारी सौरभ कटियार
अमरावती, दि. 25(जिमाका) : जिल्ह्यात प्रामुख्याने ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाई जाणवत आहे. गावांचे पारंपारिक पाण्याचे स्त्रोत कोरडे पडल्याने नागरिकांसमोर पाणीटंचाईचे संकट आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणांनी पुर्णत्वास आलेल्या योजना तातडीने सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले.
जिल्ह्यातील उन्हाळ्यातील पाणीटंचाई निवारणासंदर्भात पाणी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषद, नगरपालिकांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले, पाणीटंचाई आणि पाणी पुरवठ्यातील अनियमितता याबाबत तक्रारी आणि निवेदने वाढत आहे. पाणी टंचाई जाणवणाऱ्या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र हा तात्पुरता पर्याय आहे. याबाबत ज्या गावांमध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्रणांनी कामे सुरू केली आहे, ती तातडीने एक महिन्याच्या आत पूर्ण करावीत, कामे पूर्ण करून नागरिकांना त्यांच्या घरी पाणी पुरवठा कशा प्रकारे करता येईल, याचे नियोजन करावे. जिल्ह्यात जलजीवन मिशनची कामे करण्यात येत आहे. याबाबत आवश्यक असणारी कार्यवाही करून कामे पूर्णत्वास न्यावीत.
उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांची टँकरवरील निर्भरता कमी करावी. गावातील पाणी पुरवठा करणारी यंत्रणा सक्षम ठेवावी. गळती, पाईपलाईनची फुटणे यावर तातडीने कारवाई करून त्याच दिवशी पाणीपुरवठा सुरळीत करावा. पाणी पुरवठा करण्यासाठी योग्य दाबाचा विजपुरवठा होईल, याकडे लक्ष द्यावे. जिल्ह्यातील पाच तालुक्यात पाणी पातळी खाली गेलेली आहे. त्यामुळे याठिकाणी जलपुनर्भरणाची कामे मोठ्या प्रमाणात घ्यावी. तसेच गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांनी प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी दिले.
000000
मुंबईच्या वेव्हज् परिषदेत नवकल्पनेसोबत तंत्रज्ञानाचा महासागर
मुंबई, दि. 25 : केंद्र सरकारच्यावतीने जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्राकरिता ‘वेव्हज् 2025 परिषद’ मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे होत आहे. या परिषदेचे यजमानपद महाराष्ट्र शासन भूषवत आहेत. दि. 1 ते 4 मे 2025 या कालावधीत होत असलेल्या या परिषदेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. मुंबईत होणाऱ्या या परिषदेस विविध देशांचे मंत्री, धोरणकर्ते, उद्योगपती तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
वेव्हज् परिषदेत जगभरातून 100 पेक्षा जास्त देश सहभागी होणार आहे. या परिषदेच्या माध्यमातून भारतातील क्रिएटिव्ह इकॉनॉमीला मोठ्या प्रमाणात चालना मिळण्यास मदत होणार आहे. भारतामध्ये माध्यम आणि मनोरंजन उद्योग वेगाने वाढत असून रोजगारनिर्मितीसाठी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत आहे. त्याचबरोबर ओटीटी, ॲनिमेशन, गेमिंग, व्हीएफएक्स, चित्रपट, संगीत आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात देश प्रगती करत आहे. या पार्श्वभूमीवर वेव्हज् परिषदेचे आयोजन होत असून या परिषदेत चर्चासत्रे, उद्योगक्षेत्रात गुंतवणूक आणि विविध कार्यक्रम होणार आहे.
या परिषदेच्या पहिल्या दिवशी ‘भारत व महाराष्ट्र पॅव्हिलियन’ आणि वेव्हज प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून काही महत्त्वपूर्ण घोषणा व सामंजस्य करार (MOU) करण्यात येणार आहे. त्याचबरोबर क्रिएटोस्पिअरचे उद्घाटन आणि ‘वेव्हज बझार’, वेव्हज एक्सलेटर इत्यादींचा प्रारंभ होणार आहे. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी जागतिक मीडिया संवाद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमध्ये संवाद तसेच क्रिएट इन इंडिया चॅलेन्जेसची अंतिम फेरी होणार आहे. या परिषदेच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी विविध चर्चासत्रांबरोबरच प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
000
सोमवारी सेवा हक्क दिन कार्यक्रमाचे आयोजन
अमरावती, दि. 25 : जिल्हा प्रशासनातर्फे सोमवार, दि. 28 एप्रिल रोजी सेवा हक्क दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015च्या अंमलबजावणीस दहा वर्षे पूर्ण होत आहे. दशकपूर्तीनिमित्त जिल्हा आणि ग्रामपातळीवर विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. सोमवारी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सेवा हक्क दिन आयोजित करण्यात आला आहे, यावेळी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी केले आहे.
00000
आरोग्य विभागामार्फत हृदयविकारांसाठी सीपीआर जनजागृती मोहीम
अमरावती, दि. 25 : आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये हृदयविकाराच्या धोक्यांविषयी आणि प्रथमोपचार म्हणून सीपीआर (कार्डिओ पल्मोनरी रिसुसिटेशन) बाबत जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
हृदयविकाराच्या घटनांमध्ये तातडीने आणि योग्यवेळी सीपीआर दिल्यास रुग्णाचे प्राण वाचू शकतात. याच उद्देशाने आरोग्य विभागाने विविध माध्यमांद्वारे जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. या जनजागृती कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरावरील प्रशिक्षकांचे प्रशिक्षण रूग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, जिल्हा प्रशिक्षण केंद्र यांच्या वतीने ऑनलाईन स्वरूपात घेण्यात आले. यात वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. यात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप आसोले, वैद्यकीय अधिक्षक डॉ. वर्षा श्रीखंडे, डॉ. संगिता मुखरे, डॉ. तृप्ती जवादे, डॉ. राधा सावदेकर, डॉ. आशिष भोगे, डॉ. प्रणित घोडमाडे, डॉ. ज्योत्स्ना पोटपिटे, संदिप काळे, श्री. ढोले यांनी मार्गदर्शन केले.
येत्या काळात सीपीआर प्रशिक्षणाची जनजागृती मोहिम जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, गाव, शाळा, महाविद्यालयात राबविण्यात येणार आहे.
000000
--
No comments:
Post a Comment