Tuesday, April 8, 2025

DIO NEWS AMRAVATI 08-04-2025

 भूमापन दिनानिमित्त उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात आज विशेष कार्यक्रम

 

         अमरावती, दि. 08 (जिमाका):  भूमि अभिलेख विभागामार्फत 10 एप्रिल हा दिवस भूमापन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने  उद्या बुधवार, दि. 9 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11  वाजता भूमि अभिलेख अमावती विभागाच्या सर्व उप अधिक्षक भूमि अभिलेख कार्यालयामार्फत तालुका स्तरावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यात भूमि अभिलेख विभागाकडून करण्यात येणारी कामे, नवीन योजना, भूमि अभिलेख विभागाच्या सर्व ऑनलाईन सेवा व त्यांचा उपयोग कसा करावा, विभागातील विविध जुने अभिलेख व त्याचे महत्त्व इत्यादी बाबत माहिती देण्यात येणार आहे. तसेच नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यात येणार आहे.

अमरावती विभागातील 56 उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी  भूमि अभिलेख विभागाकडून पुरविण्यात येणा-या सेवा, सुविधांबाबत माहिती घेवून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपसंचालक भूमि अभिलेख डॉ. लालसिंग मिसाळ यांनी केले आहे.

00000

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाला सुरवात

विविध योजनांची माहिती आणि जनजागृतीवर भर

 

         अमरावती, दि. 08 (जिमाका):  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी आणि जनजागृती व्हावी, या उद्देशाने जिल्ह्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहाला आज  8 एप्रिलपासून सुरवात झाली असून हा सप्ताह 14 एप्रिल, 2025 पर्यंत चालणार आहे. सप्ताहादरम्यान विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन, वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा, पथनाट्ये, कार्यशाळा, मेळावे आणि व्याख्यानांचा यात समावेश आहे. शासकीय योजनांची माहिती जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे आणि सामाजिक समता व न्याय या मूल्यांना प्रोत्साहन देणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे.

सप्ताह दरम्यान, जिल्हाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 9 एप्रिल रोजी शाळा, महाविद्यालये आणि शासकीय वसतिगृहांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व, निबंध आणि लघुनाटिका स्पर्धा आयोजित केल्या जातील. याच दिवशी, जिल्हा आणि विभागीय स्तरावर शासकीय योजनांच्या लाभांचे प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना वितरण करण्यात येणार आहे.            

10 एप्रिल रोजी समतादूतांद्वारे ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये पथनाट्ये आणि लघुनाटिकांच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या योजनांविषयी प्रबोधन केले जाईल.  सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्यामार्फत मार्जिन मनी योजनेवर कार्यशाळा आणि लाभार्थी मेळावे आयोजित केले जातील.  11 एप्रिल रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात येणार असून त्यांच्या सामाजिक कार्यावर व्याख्यान आयोजित केले जाईल.   

सप्ताहामध्ये 'संविधान जागर' कार्यक्रमांतर्गत भारतीय संविधानाची निर्मिती, मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये यावर माहिती दिली जाईल.  महिलांसाठी विशेष मेळावे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबिरे व मेळावेही आयोजित करण्यात आले आहेत.  13 एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, शासकीय कार्यालये आणि अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.   

14 एप्रिल रोजी सप्ताहाचा समारोप होईल.  यानिमित्त, शासकीय कार्यालये, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात येईल. तसेच विविध व्याख्याने आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येईल.  जिल्हा स्तरावर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान मेळावा आयोजित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेतीविषयक कार्यांवर माहिती देण्यात येईल.  तसेच जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात ऑनलाईन जात पडताळणी प्रमाणपत्रे वितरित केली जाणार आहेत, अशी माहिती समाज कल्याण सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी दिली आहे.

00000

स्वातंत्र्य सैनिकांना प्रशासनाची सर्वतोपरी मदत

-जिल्हाधिकारी सौरभ कटियार

अमरावती, दि. 8(जिमाका): शासनाच्या शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. प्रशानातर्फे मदत पुरविताना स्वातंत्र्य सैनिकांना कोणताही त्रास होऊ दिला जाणार नाही. त्यांना प्रशासनाचे सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिली.

नियोजन भावनात स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, आणीबाणीतील करावास भोगलेल्यांसाठी मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. यावेळी गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक मुलायमचंद जैन, कुसुमलता जैन, आणीबाणीतील कारावास भोगलेले मधुसूदन उमेकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, तहसीलदार प्रशांत पडघन, निलेश कटके, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले, स्वातंत्र्य संग्रामातील सैनिकांचे वय अधिक झाले आहे. त्यामुळे आजच्या शिबिरातून एकाच ठिकाणी विविध तपासण्या करण्यात येत आहेत. तसेच स्वातंत्र्यसैनिकांना आरोग्यविषयक तपासणी त्यांनी सुचविलेल्या ठिकाणी घेता येईल. यासाठी त्यांनी प्रशासनाकडे मागणी करावी. आजच्या शिबिरामधून स्वातंत्र्य सैनिकांना प्रशासनामध्ये येणाऱ्या अडचणी किंवा समस्या असल्यास त्या जाणून घेण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येकाने प्रशासनाविषयी असलेल्या अपेक्षा या ठिकाणी मांडाव्यात.

स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी मोठे कार्य केले आहे. त्यांना योग्य ती मदत देण्यासाठी प्रशासन तत्पर आहे. आवश्यकता भासल्यास स्वातंत्र्य सैनिकांना घरपोच मदत दिली जाईल. आवश्यकता असल्यास आरोग्यविषयक तपासणीचे शिबिर स्वातंत्र्य सैनिकांच्या सोयीने घेतले जाईल. त्यासोबतच जिल्हास्तरावर असलेले विषय तातडीने मार्गी लावण्यात येईल, असेही सांगितले.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. भटकर यांनी प्रास्ताविकातून आरोग्य तपासणी शिबिर आयोजन करण्यामागील उद्देश सांगितला. या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. श्री. जैन यांनी स्वातंत्र्य चळवळी विषयी असलेल्या कवितेतून भावना व्यक्त केल्या. श्री. उमेकर यांनी प्रशासन चांगला उपक्रम राबवित असून यासाठी नेहमी सहकार्य देण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी श्री. जैन, श्रीमती जैन आणि श्री. उमेकर यांचा सत्कार करण्यात आला. भावना जिचकर यांनी स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास सांगितला. श्रीमती अंबेकर यांनी आभार मानले

00000

जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतले अंनिसचे अनुभव

*रेयट्याखेडा प्रकरणानंतर जनजागृतीवर भर

अमरावती, दि. 8 (जिमाका) : मेळघाटातील रेयट्याखेडा येथे जानेवारी महिन्यात जादूटोण्याच्या संशयावरून वृद्धेला मारहाण झाली होती. या प्रकरणाची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने गावात अंद्धश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून जनजागृती घडवून आणली आहे. याबाबत अंनिसच्या राज्य कार्यकारीणी सदस्य नंदिनी जाधव यांनी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची भेट घेऊन मेळघाटातील अनुभव सांगितले.

जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी अंनिसच्या अनुभवाचा प्रशासनाला निश्चितच फायदा होणार आहे. येत्या काळात अंधश्रद्धेबाबत जनजागृती करताना अंनिसला सोबत घेतले जाईल. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात मेळघाटात आलेल्या अनुभवाच्या अनुषंगाने जनजागृतीवर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले.

श्रीमती जाधव यांनी त्यांच्या चमूसह 22 दिवस 72 मेळघाटातील गावात जादूटोण्याबाबत जनजागृती केली. या भागातील आदिवासींमध्ये अंधश्रद्धा आणि इतर प्रथांचा पगडा आहे. आजारी पडल्यानंतर रूग्णालयात जाण्याऐवजी भूमका, भगत यांच्यावर जास्त विश्वास आहे. गावात कार्यक्रम होताना कोणत्याही नागरिकानी विरोध केला नाही. तसेच अंधश्रद्धेबाबत माहिती जाणून घेण्यासाठी नागरिक उत्सुक आहेत. रात्री उशिराही छोट्या गावात नागरिक माहिती घेण्यासाठी एकत्र येत, असल्याचे सांगितले.

मेळघाटामध्ये खटीयावालेबाबा यांच्या नावाने लोकांच्या मनात भिती आहे. नागरिकांमध्ये असलेल्या अशा प्रकारच्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रामुख्याने ग्रामसेवक, पोलिस पाटील, आशा, अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण घ्यावे. त्यांच्या माध्यमातून नागरिकांच्या मनातील शंका दूर करण्यास निश्चित मदत होणार आहे. तसेच अंनिसने अंधश्रद्धा दूर करण्यासाठी व्हीडीओ तयार केले आहेत. याचाही पुढील काळात प्रभावीपणे उपयोग करून नागरिकांमध्ये असणाऱ्या समजूती दूर करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी अंनिसचे श्रीकृष्ण धोटे, भगवान रणदिवे, सागर बावणे आदी उपस्थित होते.

000000

                                                  शहर वाहतुकीत दि. 14 एप्रिल रोजी तात्पुरता बदल

पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे पोलीसांचे आवाहन

 अमरावती, दि.08(जिमाका) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव दि. 14 एप्रिल रोजी असल्याने यादिवशी मिरवणूका, उत्सव आदी बाबी लक्षात घेता शहर वाहतुकीत बदल करण्यात आला आहे, अशी माहिती अमरावती शहर वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त कल्पना बारवकर यांनी दिली आहे.

 तात्पुरत्या अधिसूचनेनुसार यादिवशी इर्विन चौकाकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली आहे. ही अधिसूचना दि. 14 एप्रिल रोजी सकाळी 5 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत लागू राहील. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करून पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 हे मार्ग बंद असतील

इर्विन चौक ते खापर्डे बगीचा हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील. गर्ल्स हायस्कुल चौक ते इर्विन चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनासाठी बंद राहील. बाबा कॉर्नर ते इर्विन चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील. मर्च्युरी टी पॉईंटकडून इर्विन चौकाकडे येणारा मार्ग  सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील. इर्विन चौक ते मालविय चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील. तसेच मर्च्युरी टी पॉईंट ते इर्विन चौक तसेच ट्रॅफिक ऑफिस,  इर्विन चौक ते होलिक्रॉस शाळेचे प्रवेशद्वारापर्यंत कोणतेही वाहन पार्क करता येणार नाही.

 हे असतील पर्यायी मार्ग

 इर्विन चौक ते खापर्डे बगिचा या मार्गाने वाहतूक करणाऱ्या वाहनांनी एस. टी. बसस्थानक मार्गाचा अवलंब करावा.  गर्ल्स हायस्कूल चौक ते इर्विन चौक या मार्गाने वाहतूक करणारी वाहने पोलीस पेट्रोल पंप चौक किंवा बाबा कॉर्नर ते विलास नगर रोड या मार्गाचा अवलंब करतील. बाबा कॉर्नर ते इर्विन चौक या मार्गाने वाहतुक करणाऱ्या वाहनांनी लेखूमल चौक किंवा पोलीस पेट्रोल पंप या मार्गाचा अवलंब करावा.

रेल्वे स्टेशन चौक ते मर्च्युरी टी पॉईंट या मार्गाने वाहतूक करणारी वाहने रेल्वेस्थानक ते एस. टी. स्थानक व जयस्तंभ चौक, दीपक चौक, चौधरी चौक या मार्गांचा अवलंब करतील. मालविय चौक ते इर्विन चौकाकडे येणाऱ्या वाहनानी मालविय चौक, जयस्तंभ चौक, रेल्वे स्टेशन चौक या मार्गाचा अवलंब करतील.

            वरील वाहतूक नियम  रूग्णवाहिका, अग्निशामक वाहन, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना लागू राहणार नाही.

 0000

'गीव्ह इट अप' उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन

अमरावती, दि. 8 : तहसील कार्यालयाच्या संजय गांधी विभागामार्फत विशेष अर्थसहाय्य योजनेत सहभागी असलेल्या लाभार्थ्यांनी 'गीव्ह इट अप' या विशेष उपक्रमात सहभागी व्हावे. तसेच कालांतराने आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेल्या लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ स्वेच्छेने सोडावा, असे आवाहन करण्यात आले आहे.  

अमरावती तहसील कार्यालयाने 'गीव्ह इट अप' उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाद्वारे लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न 21 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे आणि स्वत: किंवा ज्यांचे पाल्य शासकीय नोकरीत आहेत, त्यांनी स्वेच्छेने आपले लाभ सोडून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  

अमरावती तालुक्यात संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी योजनांचे 13 हजार लाभार्थी आहेत. परंतु, काही लाभार्थी कालांतराने आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य शासकीय नोकरीत रुजू होतात, तरीही ते योजनेचा लाभ घेत असल्यामुळे खऱ्या गरजूंपर्यंत लाभ पोहोचत नाही. यावर तोडगा काढण्यासाठी सदर उपक्रम सुरू केला आहे.

हा उपक्रम पूर्णपणे ऐच्छिक आहे. या उपक्रमाचा उद्देश गरजू नागरिकांना अधिकाधिक लाभ मिळवून देणे आहे. लाभार्थ्यांनी स्वेच्छेने लाभ सोडल्यास त्यांचा तहसील कार्यालयाकडून सन्मान करण्यात येणार आहे, असे तहसिलदार विजय लोखंडे यांनी कळविले आहे.

00000

 

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...