Monday, September 21, 2020

पालकमंत्र्यांकडून बडनेरा रेल्वे वॅगन प्रकल्पाला भेट व पाहणी

पालकमंत्र्यांकडून बडनेरा रेल्वे वॅगन प्रकल्पाला भेट व पाहणी

रेल्वे वॅगन निर्मिती प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करावी

                    -पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. 21 : जिल्ह्यातील बडनेरा क्षेत्रात निर्माण होत असलेला रेल्वे वॅगननिर्मिती प्रकल्प हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे स्थानिकांनाही रोजगाराची संधी निर्माण होतील. या प्रकल्प निर्मितीमुळे संपूर्ण देशात जिल्ह्याची नवी ओळख निर्माण होणार आहे. रेल्वे वॅगन निर्मिती प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करावी, राज्य शासनाकडून आवश्यक सहकार्य आपणास पुरविण्यात येईल, अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिली.

येथील बडनेरा स्थित रेल्वे वॅगन प्रकल्पाला पालकमंत्र्यांनी भेट देऊन तेथील कामांची पाहणी केली. त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रकल्पाचे अभियंता एस. सी. मोहोड यांच्यासह अन्य रेल्वे तांत्रिक अधिकारी व कर्मचारी  आदी यावेळी उपस्थित होते

श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, रेल्वे वॅगन निर्मिती प्रकल्पाच्या कामाला 2017 मध्ये सुरुवात झाली आहे. या प्रकल्पाच्या निर्मितीमुळे स्थानिकांना रोजगाराची संधी मिळेल, यासाठीही प्रयत्न व्हावा व प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करावी. प्रकल्पाच्या बाजूने काटआमला या गावाला रस्ता जातो. प्रकल्पामुळे हा रस्ता बंद न करता वळण रस्ता म्हणून कायम सुरु राहावा, यासाठी रेल्वे विभागाने सुरळीत नियोजन करावे. प्रकल्प निर्मितीमुळे जिल्ह्याची नवी ओळख निर्माण होणार आहे. यासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

रेल्वे वॅगन प्रकल्प हा 300 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे. वर्ष 2017 मध्ये प्रकल्पाच्या कामाला शुभारंभ झाला असून येत्या एका वर्षात प्रकल्पातील काही कामांचे टप्पे पूर्ण होणार आहेत. कोविड-19 च्या संकटामुळे कामांना काही प्रमाणात उशीर झाला आहे. परंतू, आता पूर्ण ताकदीने आम्ही प्रकल्पाची कामे पूर्णत्वास नेणार आहोत. देशात हा प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार आहे, मध्य रेल्वेच्या अखत्यारीत असणाऱ्या झाशी वॅगन रिपेरिंग केंद्रातच सर्व मध्य रेल्वेचे काम पूर्ण केले जात होते. परंतू, आता या प्रकल्पामुळे नागपूर, भुसावळ, मुंबईपर्यंतच्या सर्व रेल्वे गाड्यांची दुरुस्ती व इतर महत्वाची कामे पूर्ण होणार आहेत.

या प्रकल्पाच्या माध्यमातून 180 वॅगन प्रत्येक महिन्याला दुरुस्ती होऊ शकणार आहे. संपूर्ण बॉडी रिपेरिंग, बोगी शॉप, व्हील रिपेरींग, पेंन्ट व इन्सपेक्‍शन शेड इत्यादी या प्रकल्पात महत्वाची केंद्र उभारण्यात येणार आहेत. एका रेल्वे गाडीचे दर साडे चार वर्षांनी वॅगन रिपेरींग करावी लागते. त्यानुसार सर्व आधुनिक यंत्र, मशीन आणि तज्ज्ञ अभियंता, तांत्रिक कर्मचारी, कारागीर यांच्या सहाय्याने रेल्वे वॅगनची दुरुस्ती व देखभाल आदी कामे पूर्ण केल्या जाते, अशी माहिती प्रकल्पाचे अभियंता एस. व्ही मोहोड यांनी पालकमंत्र्यांना यावेळी दिली. यावेळी प्रकल्पाच्या परिसरात पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

00000

कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी 60 खाटांची आयसीयू सुविधापालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून भेट व पाहणी

कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी 60 खाटांची आयसीयू सुविधा

पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून भेट व पाहणी

       कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना उपचार सुविधांतही भर पडणे आवश्यक आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर व त्यांचे सर्व सहकारी जीवाची बाजी लावून लढत आहेत. या पार्श्वभूमीवर डॉक्टर मंडळींच्या मदतीने कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी साठ खाटांची आयसीयू सुविधा उपलब्ध होत आहे.

        यापुढेही वैद्यकीय क्षेत्रातील  मंडळींनी शासकीय आरोग्य यंत्रणेला असेच सहकार्य करून अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी काल येथे केले. 

          डॉ. महेंद्र गुढे, डॉ. सत्येश शिरभाते, डॉ. ज्ञानदे यांच्यासह एकूण पाच डॉक्टरांनी उपलब्ध 140 खाटांपैकी साठ खाटा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांवर उपचारासाठी अतिरिक्त आयसीयू सुविधा निर्माण होणार आहे. हार्ट, न्यूरो, ऑर्थोपेडिक व क्रिटिकल केअर आवश्यक असलेल्या रुग्णांचे उपचार तिथे शक्य होणार आहेत. 

          या सुविधांची पाहणी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी काल केली. आमदार बळवंतराव वानखडे, माजी खासदार अनंतराव गुढे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती जयंतराव देशमुख यांच्यासह डॉक्टर व अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

          कोरोनाचे संक्रमण लक्षात घेऊन विविध उपाययोजना होत आहेत. सुपर स्पेशालिटी रुग्णालय व आयटीआय परिसर येथे शंभर खाटांची अतिरिक्त सुविधा निर्माण करण्यात येत आहे. त्याशिवाय खासगी डॉक्टरांच्या मदतीनेही अतिरिक्त उपचार सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. कोरोनाच्या साथीवर मात करण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी.  सर्वांनी एकजूट होऊन दक्षता पाळून कोरोनाचा नायनाट करण्यासाठी एकदिलाने प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

                                       

०००

क्रीडा संकुल व प्रलंबित प्रश्नांबाबत परिपूर्ण माहिती सादर करा - पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर

पालकमंत्र्यांकडून विभागीय क्रीडा संकुलाची पाहणी क्रीडा संकुल व प्रलंबित प्रश्नांबाबत परिपूर्ण माहिती सादर करा - पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर

  क्रीडा संकुलात आवश्यक सुविधा, जिल्हा क्रीडा संकुलाचे काम व इतर प्रलंबित बाबींच्या अनुषंगाने सविस्तर माहिती सादर करावी, असे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

      येथील विभागीय क्रीडा संकुलाला भेट देऊन पाहणी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी केली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांच्यासह क्रीडा अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

       पालकमंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या की, क्रीडा संकुलात आवश्यक सुधारणांच्या अनुषंगाने परिपूर्ण माहिती सादर करावी.  तालुका क्रीडा संकुले, तेथील आवश्यक कामे याचेही सादरीकरण करावे. जिल्हा क्रीडा संकुलाबाबतची कार्यवाही विहित मुदतीत पूर्ण होणे आवश्यक आहे. यासंबंधी स्वतंत्र बैठकीचे आयोजन केले जाईल.

     

पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी विभागीय क्रीडा संकुलातील इनडोअर स्टेडियम, शूटिंग प्रॅक्टिस सेंटर, स्क्वॅश सेंटर,  डान्स अँड फिटनेस अकॅडमी, टेबल टेनिस क्लास, ग्राऊंड स्टेडियम आदींना भेट देऊन पाहणी केली व विविध बाबींची माहिती घेतली.

       यावेळी पालकमंत्र्यांनी आर्चरी रेंजलाही भेट दिली. यावेळी त्यांनी खेळाडूंशीही संवाद साधला व त्यांना उज्ज्वल यशासाठी शुभेच्छा दिल्या.

                                               ०००

वैद्यकीय यंत्रणेसमोरील सर्व प्रश्न प्राधान्याने व तत्काळ सोडवू। - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर



कोरोना उपाययोजनांच्या अनुषंगाने पालकमंत्र्यांची डॉक्टरांशी चर्चा

 वैद्यकीय यंत्रणेसमोरील सर्व प्रश्न प्राधान्याने व तत्काळ सोडवू।   -  पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर


        कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी आरोग्य सुविधांत सातत्याने भर टाकण्यात येत आहे. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांत अखंडित रूग्णसेवेसाठी डॉक्टरांकडून अमूल्य योगदान मिळत आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने यापुढेही वैद्यकीय सुविधांत भर घालण्याच्या दृष्टीने सहकार्य करावे. उपचारांबाबत खासगी वैद्यकीय यंत्रणेपुढील सर्व प्रश्न प्राधान्याने व तत्काळ सोडविण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

       कोरोनाबाधितांवरील उपचार व आवश्यक उपाययोजनांच्या अनुषंगाने रुग्णालयचालक, तसेच डॉक्टरांची बैठक बचतभवनात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्यासह इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अनिल रोहणकर, सचिव डॉ. आशिष साबू, डॉ. सोहेल बारी, डॉ. बख्तार, सौरभ मालाणी यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर या बैठकीला उपस्थित होते.

         पालकमंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या की, या कठीण काळात डॉक्टर मंडळी रुग्णसेवेसाठी अमूल्य योगदान देत आहेत. परिस्थिती गंभीर आहे. मात्र, आपणा सर्वांच्या सहकार्याने एकजुटीने त्यावर मात करू. ऑक्सिजन, रेमडिसिव्हिर इंजेक्शन यांचा पुरेसा पुरवठा, पॅरामेडिकल स्टाफ व इतर मनुष्यबळ उपलब्ध होण्याबाबत सर्वप्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. जिल्हा नियोजनातून पाचशे ऑक्सिजन सिलेंडरबाबत निधीची तरतूद केली आहे. त्याचा बफर स्टॉकही करण्यात येईल. लक्षणे नसलेल्या रूग्णांना होम आयसोलेशनसाठी परवानगी देण्यात येत आहे. त्याशिवाय, शासकीय व खासगी रूग्णालयातील खाटांची संख्या वाढविण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. जोखमीच्या रुग्णांवर उपचारासाठी आयसीयू सुविधा वाढविण्यात येत  असल्याचेही त्यांनी सांगितले.

   खाटा उपलब्धतेबाबत माहिती

         पालकमंत्री श्रीमती ठाकूर पुढे म्हणाल्या की, शासकीय सर्व खासगी रूग्णालयांमध्ये उपलब्ध खाटांच्या उपलब्धतेबाबत नागरिकांना अद्ययावत माहिती मिळावी यासाठी डॉक्टर मंडळींनी संपर्क क्रमांक, उपलब्ध खाटांची माहिती द्यावी जेणेकरून गरजू रूग्णांपर्यंत ती माहिती पोहोचेल व तत्काळ उपचारासाठी दाखल होऊ शकेल. याबाबत प्रशासनाकडून प्रसिद्धीची कार्यवाही केली जाईल.

         कोरोना उपचारांबाबत शासनाने निश्चित केलेले दर, नियम यांचे काटेकोर पालन व्हावे. हा नफा कमविण्याचा काळ नाही. आर्थिक स्थिती सगळीकडे गंभीर आहे. त्यामुळे निश्चित दर, सर्व नियम यांचे पालन व्हावे, असेही त्यांनी सांगितले.

          पॅरामेडिकल स्टाफ व इतर मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबत रोजगार नोंदणी कार्यालयाकडून पात्र उमेदवारांची माहिती मिळवून कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी सांगितले. टेलिमेडिसिन सेवांबाबतही प्रयत्न होत असल्याचेही ते म्हणाले. जिल्हा सामान्य रूग्णालय येथील कोरोना योद्धा दिवंगत डॉ. प्रतीक्षा वालदेकर यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. 

              ०००

Sunday, September 20, 2020

पालकमंत्र्यांकडून सा. प्र. वि. च्या कामकाजाचा आढावा

 




पालकमंत्र्यांकडून सा. प्र. वि. च्या कामकाजाचा आढावा

पायाभूत सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व विहित मुदतीत पूर्ण करावी

- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 20 :  जिल्ह्यातील रस्ते, पूल व इमारतींची जिल्ह्यात सुरू असलेली कामे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार व विहित वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

 

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अमरावती जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी आज घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा व विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोना साथीच्या संकटकाळात प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी होत असताना विकासालाही गती मिळावी या उद्देशाने पायाभूत सुविधांच्या कामांना चालना देण्यात आली आहे. त्यासाठी वेळोवेळी बैठका घेऊन कामांचा प्राधान्यक्रम ठरवून ती पूर्ण करण्याचे नियोजनाबाबत निर्देश देण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यात प्रस्तावित कामे नियोजित वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे.  कामांची गुणवत्ता व दर्जा उत्तम असावा. जिल्ह्याच्या रस्तेविकासात कुठेही अडथळा येता कामा नये.

मेळघाटातील रस्तेविकासाकडे प्राधान्याने लक्ष पुरविणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन मेळघाटातील रस्तेविकासाची प्रलंबित कामे व वनविभागाकडून आवश्यक परवानगी याबाबत मंत्रालय स्तरावर बैठक होऊन परवानगी प्रक्रियेबाबत तत्काळ कार्यवाहीसाठी निर्णय घेण्यात आला आहे. बांधकाम प्रशासनाने याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करून कामे मार्गी लावावीत, असेही निर्देश त्यांनी दिले.   

पायाभूत सुविधांचे भक्कम जाळे उभारून विकासाला चालना देण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे. जिल्ह्यात हायब्रीड ॲन्युईटीअंतर्गत कामेही विहित वेळेत पूर्णत्वास जाणे आवश्यक आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून यापूर्वी हायब्रीड ॲन्युईटीअंतर्गत सुमारे पाचशे कोटी रूपयांचा निधीतून महत्वाच्या रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. उर्वरित कामेही नियोजित वेळेत पूर्ण करावीत. आवश्यक कामांसाठी निधी मिळवून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

 

कोरोना संकटकाळ, लॉकडाऊन आदींमुळे उर्वरित कामांमध्ये काहीसे अडथळे आले. मात्र, त्या कामांना गती देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न होत आहेत.  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्तेविकास उपक्रमाला गती मिळण्यासाठी यापूर्वीही वेळोवेळी आढावा घेतला गेला आहे. त्यामुळे नियोजनानुसार रस्ते, पूल व इमारतीची कामे विहित मुदतीत पूर्ण करावीत, असे निर्देशही त्यांनी दिले.

 प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, रस्ता रूंदीकरणाची कामे  व नियोजित कामांचा आढावा पालकमंत्र्यांनी यावेळी घेतला.

 

 

00000

 

Saturday, September 19, 2020

कोविड रुग्णांच्या उपचारासाठी 100 खाटांची अतिरिक्त सुविधा - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 







कोरोना प्रतिबंधक उपाययोजना

कोविड रुग्णांच्या उपचारासाठी 100 खाटांची अतिरिक्त सुविधा

-  पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा कोविड रूग्णालयासाठी स्वतंत्र पर्यायी रस्ता

 

अमरावती, दि. 19 : कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता येथील आयटीआय परिसरातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रशिक्षण केंद्र व तसेच सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या जागेत 100 खाटांची अतिरिक्त सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, सुरक्षिततेच्या दृष्टीने सुपर स्पेशालिटी रूग्णालयासाठी स्वतंत्र रस्त्याचीही निर्मिती होत आहे. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

कोरोनाबाधितांसाठी उभारण्यात येणा-या अतिरिक्त सुविधांच्या अनुषंगाने औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या परिसरातील ‘डीआरडीए’च्या प्रशिक्षण केंद्राच्या जागेची, तसेच नियोजित रस्त्याची व सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील इमारतीची पाहणी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी केली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, उपविभागीय अधिकारी राजपूत, तहसीलदार संतोष काकडे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

   पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, आयटीआय परिसरातील प्रशिक्षण केंद्राच्या जागेत 60 व सुपर स्पेशालिटी रूग्णालय परिसरातील इमारतीत 40 अशा एकूण 100 खाटांची अतिरिक्त रूग्णालय सुविधा निर्माण होणार आहे. महिला रूग्ण किंवा लो- रिस्क रूग्णांसाठी या स्वतंत्र व्यवस्थेचा वापर होऊ शकेल.  त्याचप्रमाणे, सुपर स्पेशालिटी रूग्णालयात स्थित जिल्हा कोविड रूग्णालयासाठी  सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वतंत्र रस्ता असावा म्हणून लगतच्या आयटीआय परिसरातून रस्ताही निर्माण केला जात आहे. वेळेची तातडी लक्षात घेऊन ही कामे जलदगतीने पूर्ण करावीत, तसेच ही कामे गुणवत्तापूर्ण असावीत. सर्व अद्ययावत सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी प्रशासनाला, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांना दिले.

 

           कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता उपचार सुविधांतही सातत्याने भर टाकण्यात येत आहे. आवश्यक तिथे ऑक्सिजनची सुविधा पुरवली जाईल. जिल्ह्यात उपचार सुविधांची कमी पडू देणार नाही. मात्र, कोरोनाच्या साथीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स व स्वच्छता या त्रिसूत्रीचा अवलंब करावा.  कोरोनावर मात करण्यासाठी हरप्रकारचे प्रयत्न होत आहेत. मात्र, या प्रयत्नांना सगळ्यांची साथ आवश्यक आहे. त्यामुळे गांभीर्याने दक्षता पाळावी. कोरोनाला कुणीही सहजपणे घेऊ नये. या साथीवर मात करण्यासाठी आपली जबाबदारी लक्षात घेऊन ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहिम यशस्वी करावी, असे आवाहनही यावेळी पालकमंत्र्यांनी केले.  

 

            उपचारासाठी रूग्णालयाच्या अतिरिक्त सुविधेसाठी तसेच रस्त्यासाठी सुमारे ६६ लक्ष रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा रस्ता स्त्री रूग्णालयाच्या जवळून जातो. त्यामुळे स्वतंत्र रस्त्याचे निर्माण केल्यामुळे कोविड रूग्णालयाकडे जाण्यासाठी स्त्री रूग्णालयाच्या रस्त्याचा वापर करण्याची गरज पडणार नाही. सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.  त्याचप्रमाणे, अतिरिक्त उपचार सुविधांमुळे गरजेनुसार खाटा उपलब्ध होतील. ही सर्व कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

 

00000

 

कामगार राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या हस्ते कंत्राटी वीज कामगारांना धनादेशाचे वाटप





कामगार राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या हस्ते कंत्राटी वीज कामगारांना धनादेशाचे वाटप

कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटीबध्द

-         कामगार राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू

 

अमरावती, दि. 19 : जिल्ह्यातील 'महावितरण' च्या अधिनस्त कार्यरत बाहास्त्रोत कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्या व वेतन कपाती संदर्भात अनेक तक्रारी राज्यमंत्री कडू यांना प्राप्त झाल्या होत्या, त्याची गंभीर दखल घेत वेतन कपात झालेल्या 350 कंत्राटी कामगारांना 50 लाख रुपयांच्या धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरुपात कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चुभाऊ कडू यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. राज्यातील कामगारांच्या अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटीबध्द असल्याचे प्रतिपादन त्यांनी आज केले.

येथील शासकीय विश्रामगृह येथे कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्ना संदर्भात आढावा बैठकीचे

आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. महावितरणचे अभियंता, कंत्राटी कामगार सह. संस्थेचे कंत्राटदार व कंत्राटी बांधव यावेळी उपस्थित होते.

श्री. कडू म्हणाले की, कंत्राटी वीज कामगारांना कंत्राटदाराने नियमानुसार सुविधा न पुरविता खोटी कारणे देऊन कामाहून काढून टाकणे, पगार कपात करणे असे प्रकार करुन अन्याय केल्याच्या तक्रारी कामगार बांधवांकडून प्राप्त झाल्या होत्या. हा प्रकार गंभीर असून 'महावितरण' ने याबाबत धडक कारवाई तसेच सखोल चौकशी करुन कामगार बांधवांना न्याय मिळवून देण्याचे निर्देश या अगोदर देण्यात आले होते. त्याअनुषंगाने सखोल चौकशी अंती, जिल्ह्यातील सुमारे ३५० कामगारांचे जवळपास ५० लाख रुपये कपात झाल्याचे आढळून आले. आज त्या संबंधित कामगारांना वेतन कपातीच्या रक्कमेचे धनादेश वितरीत करण्यात आले आहे.

ते पुढे म्हणाले की, माहे फेब्रुवारी तर काहींचे माहे जून पासूनचे वेतन कपात करण्यात आले होते. त्या सर्वांच्या नावांचे, कपात रक्कमेचे धनादेश कंत्राटदार कंपनीने काढलेले आहे. प्रफुल पांडे, शुभम कोठे, योगेश उईके, शुभम आष्टीकर यांना प्रातिनिधीक स्वरुपात धनादेशाचे वाटप राज्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व युवकांनी सदर कपंनीकडून वेतन कपातीचे धनादेश प्राप्त करुन घ्यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कामगार राज्यमंत्री यांच्या प्रयत्नाने कंत्राटी वीज कामगारांच्या प्रश्नावर तोडगा निघाला आहे. या कार्यवाहीमुळे कंत्राटी कामगारांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. यापुढेही ज्या कामगारांचे पैसे किंवा हिशोब चुकला असेल त्यांनी राज्यमंत्र्यांना निवेदन द्यावे, त्यांनाही तत्काळ पैसे मिळवून दिले जाईल. राज्यातील कंत्राटी कामगारांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शासन सर्वतोपरी त्यांच्या पाठीशी आहे. गरीब कामगार बांधवावर अन्याय झाल्यास कुणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा कामगार राज्यमंत्री श्री. कडू यांनी यावेळी दिला.

 

00000

  

Friday, September 18, 2020

'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम यशस्वी होईल - ॲड. यशोमती ठाकूर यांचा विश्वास



अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या सक्रिय भूमिकेमुळे
'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम यशस्वी होईल

- ॲड. यशोमती ठाकूर यांचा विश्वास

 

मुंबई, दि 18 : कोरोनामुक्त महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी हाती घेण्यात आलेली 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या सक्रीय सहभागाने यशस्वी होईल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला. 

 

महिला व बालविकास विभागाच्या अखत्यारीतील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीमेतील  सहभागाबाबत आज मंत्री ॲड. ठाकूर यांनी ऑनलाईन बैठक घेतली. यावेळी सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, सर्व जिल्ह्यातील उप मुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास, अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. 

 

यावेळी ॲड. ठाकूर यांनी सांगितले की, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ही यंत्रणा राज्यातील घराघरात पोहोचलेली आहे. प्रत्येक कुटुंबाशी अंगणवाडी ताईचा संपर्क असतो. त्यामुळे तुमच्या सक्रीय सहभागाने, सहकार्याने माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम प्रभावीपणे घराघरात पोहोचेल. याआधी प्रत्येक उपक्रमात आपण भरीव कामगिरी केली आहे, आताही कोरोनामुक्त महाराष्ट्रासाठी तुमचा सहभाग मोलाचा आहे.

00000

 

 


दक्षतेचा अवलंब हेच कोरोनापासून मुक्तीचे शस्त्र - मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे

 



कुटुंब, माझी जबाबदारी
दक्षतेचा अवलंब हेच कोरोनापासून मुक्तीचे शस्त्र

-          मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे

 

अमरावती, दि. 18 : मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स, हातांची नियमित स्वच्छता आदी  दक्षता नियमांचे पालन करणे हेच कोरोनापासून मुक्ती मिळविण्यासाठी शस्त्र आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षतेचे पालन करून कोरोनाचा नायनाट करण्यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना साथ द्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी केले.

ग्रामीण भागातील नागरिकांची घरोघरी जाऊन कोविड रुग्‍णांचा शोध घेणे, त्‍यांना तातडीने उपचार उपलब्‍ध करुन देऊन मृत्‍यूदर कमी करणे यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम जिल्हाभर राबविण्यात येत आहे. प्रतिबंधात्‍मक उपाययोजना, जनजागृती, प्रबोधन हाच परिणामकारक उपाय आहे व याव्‍दारेच आपण ग्रामीण भागातील जनतेला सुरक्षित ठेवू शकतो. यामध्‍ये लोकसहभाग आवश्‍यक आहे. या अनुषंगाने मोहिम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी अचूक माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहनही श्री. येडगे यांनी केले आहे.

 

 जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निकम

 

            कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दक्षता त्रिसूत्रीचा अवलंब करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने आवश्यक तपासणी व जनजागृतीसाठी माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहिम सुरू करण्यात आली आहे. आरोग्‍य पथकाव्‍दारे ग्रामिण भागातील प्रत्‍येक गाव/पाडे-वस्‍त्‍या/तांडे यातील प्रत्‍येक नागरिकाची आरोग्‍य तपासणी, कोमॉर्बीड आजार असल्‍यास उपचार आणि प्रत्‍येक नागरिकास व्‍यक्‍तीशः भेटून आरोग्‍य शिक्षण, जनजागृती व प्रबोधन करण्यात येत आहे. नागरिकांनी या मोहिमेत परिपूर्ण माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निकम यांनी केले आहे.

                                                दरम्यान, मोहिमेत लोकसहभाग वाढविण्याच्या दृष्टीने पदाधिकारी, अधिकारी जिल्‍हा परिषद सदस्‍य, पंचायत समिती सभापती, उपसभापती आदी सन्माननीय लोकप्रतिनिधींची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक जिल्हा परिषदेकडून घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. येडगे यांनी मोहिमेचे उद्दिष्‍ट, स्‍वरुप, नियोजन आदींबाबत माहिती बैठकीत दिली.

मोहिम कालावधीत आरोग्‍यपथकाव्‍दारे प्रत्‍येक कुटुंबातील नागरिकांची भेट घेऊन त्‍यांच्‍या आरोग्‍याबाबतची माहिती, जोखीम गटातील नागरिकांची माहिती, शरीराचे तापमान तपासणी, रुग्‍ण आढळून आल्‍यास जवळच्‍या ताप उपचार केंद्रामध्‍ये संदर्भित करणे, सार्वजनिक ठिकाणी मास्‍कचा वापर करणे, सतत हात धुणे, सोशल डिस्‍टन्‍सिंग पाळणे इत्‍यादी बाबतची जनजागृती आणि प्रबोधन करण्‍यात येत आहे.  या मोहिमेत नागरिकांनी स्‍वयंस्‍फूर्तीने  तपासणी करुन घेणे, आजाराची माहीती आरोग्‍य पथकाला सांगणे, वैयक्तिक स्‍वच्‍छतेचे महत्‍व पटवून देणे आदींसाठी लोकप्रतिनिधींचा सहभाग अत्यंत महत्‍वाचा आहे. या मोहिमेचे  महत्‍व पटवून दिल्‍यास कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्‍यास निश्चितच मदत होऊ शकेल, असे आवाहन श्री. येडगे यांनी यावेळी केले.

             जिल्हा परिषदेचे उपाध्‍यक्ष श्री. विठ्लराव चव्‍हाण, सभापती आरोग्‍य समिती  बाळासाहेब हिंगणीकर, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, अतिरिक्‍त जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. रेवती  साबळे,  उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात व साथरोग अधिकारी डॉ. च-हाटे आदी सभागृहात उपस्थित होते.

आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी विविध निर्णय - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 


आदिवासी क्षेत्रात सेवारत मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानधनात भरीव वाढ
आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी विविध निर्णय

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 18:  दुर्गम भाग, आदिवासी क्षेत्रात सेवा देणा-या मानसेवी वैद्यकीय अधिका-यांचे मानधन चोवीस हजारांहून चाळीस हजार रूपये एवढे वाढविण्यात आले आहे. या निर्णयाचा लाभ मेळघाटसह जिल्ह्यातील दुर्गम, संवेदनशील भागात आरोग्य सेवा देण्याचे काम करणाऱ्या मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांना होणार आहे. भक्कम मनुष्यबळ, विविध अद्ययावत सुविधा याद्वारे आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी महाविकास आघाडी शासनाकडून विविध निर्णय अंमलात आणले जात आहेत, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

दुर्गम-अतिदुर्गम आदिवासी जिल्ह्यातील आदिवासी भागात 'नवसंजीवनी'  योजनेंतर्गत गरोदर माता, स्तनदा माता, तसेच शून्य ते सहा वयोगटातील बालकांना पाड्यांवर जाऊन वैद्यकीय सेवा आणि उपचार देणाऱ्या मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानधन चोवीस हजारांवरुन थेट चाळीस हजार रुपये करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आदिवासी भागात 'नवसंजीवनी' योजनेंतर्गत मानसेवी  वैद्यकीय अधिकारी कार्यक्षेत्रात जाऊन सेवा देतात, तसेच आश्रमशाळेत तपासणीचे काम करतात. हे मानसेवी वैद्यकीय अधिकारी अतिदुर्गम आणि संवेदनशील भागतील साधारण सहा ते दहा गावांना सेवा देतात. या दौऱ्यात ते बाह्य रुग्ण तपासणी, गरोदर माता, स्तनदा माता व कुपोषित बालकांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करतात. त्याचबरोबर त्या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राना इतर राष्ट्रीय कार्यक्रमांची यशस्वी अंमलबजावणीसाठी मदत करत असतात. मानसेवी आरोग्य अधिकारी हे पद कंत्राटी स्वरूपाचे असल्याने त्यांना इतर लाभ मिळत नाहीत. त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे.

      सध्याच्या परिस्थितीत आरोग्यसेवेसाठी डॉक्टर, परिचारिका इतर आरोग्य विभागाचे कर्मचारी अमूल्य योगदान मिळत आहे. मानसेवी वैद्यकीय अधिकारीही दुर्गम आदिवासी भागत आरोग्य सेवेसाठी तत्पर आहेत. राज्यातील आरोग्य विभागासाठी आवश्यक ती सर्व मदत देण्यासाठी सरकार तत्पर आहे, कोरोनामुळे सध्याची परिस्थिती कठीण आहे. या आव्हानांवर मात करण्यासाठी सातत्याने प्रयत्न व्हावेत. रूग्णसेवेत कुठेही कसूर होता कामा नये, असेही निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

       कोरोना प्रतिबंधासाठी घरोघर तपासणी, आवश्यक उपचार व लोकशिक्षण यासाठी माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहिम जिल्ह्यात सर्वदूर राबविण्यात येत आहे. मोहिमेच्या अनुषंगाने कर्मचा-यांनी वस्तुस्थितीदर्शक माहिती गोळा करून नागरिकांमध्ये प्रभावी जनजागृती करावी. नागरिकांनीही मोहिमेला सहकार्य करावे. सर्व प्रकारची माहिती द्यावी. कुठलीही माहिती लपवू नये. कोरोनाचा नायनाट करण्यासाठी मोहिमेला सर्वांनी एकजूटीने साथ द्यावी, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.

 

                                                00000

बचत गटातील शेतकरी महिलांच्या उत्पादनांची माहिती आता ऑनलाईन

 




ग्रामीण महिला सक्षमीकरणासाठी ‘माविम’चे पुढचे पाऊल

बचत गटातील शेतकरी महिलांच्या उत्पादनांची माहिती आता ऑनलाईन

 

‘ई- बिझनेस प्लॅटफॉर्म’चे ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते झाले उद्घाटन

 

मुंबई, दि. 18: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत महिला आर्थिक विकास महामंडळाने (माविम) आता आणखी पुढचे पाऊल टाकत ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता बचत गटाच्या शेतकरी महिलांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला चांगला बाजारभाव मिळण्याच्या हेतूने ही सर्व माहिती इंटरनेटवर उपलब्ध केली आहे. त्यासाठी निर्माण केलेल्या ‘ई-बिझनेस प्लॅटफॉर्म’ या ऑनलाईन सुविधेचे महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज ऑनलाईन उद्घाटन झाले.माविमच्या अध्यक्षा श्रीमती ज्योती ठाकरे, महिला व बालविकास विभागाच्या सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, माविमच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती श्रद्धा जोशी, युनिसेफच्या राज्यातील आहारतज्ज्ञ श्रीमती राजलक्ष्मी नायर आदी या ऑनलाईन बैठकीत सहभागी झाले.

 

               मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी माविम अधिनस्त बचत गटांच्या शेतकरी महिलांनी उत्पादित केलेला शेतमालाला पारंपरिक बाजारापेक्षा अधिक बाजारभाव आणि व्यापक तसेच खात्रीशीर बाजारपेठा मिळवून देण्यासाठी ऑनलाईन व्यवस्था निर्माण करण्याची संकल्पना मांडली होती. त्यानुसार माविमने महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत कृतीदलाच्या सहाय्याने या ई- सुविधेचे निर्माण केले आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात मिळून माविमचे एकूण 1 लाख 37 हजार स्वयंसहायता बचत गट आहेत. त्यापैकी 97 हजार 499 ग्रामीण 39 हजार 591 शहरी गट आहेत. माविमचे 361 लोकसंचलित साधन केंद्र (सीएमआरसी) आहेत. या बचत गटांशी 11 लाख 81 हजार ग्रामीण तर 4 लाख 28 हजार शहरी महिला जोडलेल्या आहेत.

 

               ‘ई- बिझनेस प्लॅटफॉर्म’मध्ये सुमारे दीड लाख शेतकरी महिलांची, त्या उत्पादित करत असलेल्या शेतमाल तसेच कृषीपूरक उत्पादनांची माहिती भरण्यात आली असून यामध्ये अन्नधान्य, विविध भाजीपाला, फळभाज्या, फळपिके, नगदी पिके याचबरोबरीने शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या आदी उत्पादनांबाबतची माहितीदेखील भरण्यात आली आहे. यापुढे ही माहिती वेळोवेळी अद्ययावत केली जाणार असून त्यामुळे राज्यातील माविमच्या बचत गटाच्या महिलांकडे असलेल्या शेतमालाची त्यावेळची (रिअल टाईम) माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे सोपे होणार आहे. पुढील काळात या माहितीची बाजारपेठेशी जोडणी (मार्केट लिंकेज) करण्यात येणार असून त्यामुळे या महिलांना आपली उत्पादने विक्रीसाठी व्यापक व्यासपीठ उपलब्ध होण्यासह पर्यायाने अधिक बाजारभाव मिळणार आहे.

 

               ‘ई बिझनेस’ उपक्रमामध्ये प्रत्येक गावामध्ये एक महिला कार्यकर्ती राहणार असुन या महिलेकडे स्मार्ट फोनवरील ई-बिझनेस ॲप व्दारे ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये गावातील विविध उत्पादनांची माहिती या मध्ये भरण्यात येणार आहे. बाजाराच्या मागणीनुसार कोणते उत्पादन कोणत्या बाजारपेठेत पाठवायचे तसेच कोणते विक्रेते किंवा संस्था हा माल विकत घेण्यास तयार आहेत याची माहिती माविम जिल्हा कार्यालयामार्फत घेण्यात येईल. थोडक्यात  गावातील महिला प्रत्यक्षपणे जगातील बाजारपेठेशी या माध्यमातून जोडण्याचा माविमचा मानस आहे.

 

               या ऑनलाईन बैठकीत मंत्री ॲड. ठाकूर, माविमच्या अध्यक्षा श्रीमती ठाकरे आदींनी अमरावती जिल्ह्यातील बचत गटाच्या महिलांशी संवाद साधून माविमच्या माध्यमातून त्यांच्या जीवनात झालेल्या परिवर्तनाची माहिती जाणून घेतली. सचिव श्रीमती कुंदन यांनी महिला व बालकांच्या कल्याणासाठी विभागाच्या माध्यमातून अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण कार्यक्रम गतीने राबविण्यात येतील असे सांगितले. अमरावती व ठाणे जिल्हयामध्ये माविमने या उपक्रमाची यशस्वी प्रायोगिक चाचणी केली व शेळी तसेच भाजीपाल्याकरिता खरेदीदार मिळवून दिले, अशी माहिती माविमच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती श्रद्धा जोशी शर्मा यांनी दिली. 

 

ई- बिझनेस प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेती उत्पादनाचे बाजारपेठेशी ई- लिंकेज झाल्यामुळे बचत गटाच्या शेतकरी महिला सदस्यांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळणार आहे. त्यांच्या उत्पादनांना अधिक बाजारभाव मिळणार असून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यासह त्यांच्या कुटुंबांचेही जीवनमान उंचावण्यासाठी मदत होईल.

- ॲड. यशोमती ठाकूर, महिला व बालविकास मंत्री

 

माविमने यापूर्वी बचत गटाच्या महिलांकडून उत्पादित होत असलेल्या उत्पादनांची आधाररेखा माहिती (बेसलाईन डेटा) जमा केली जात होती. मात्र, आता वेळोवेळी अद्ययावत माहिती या ई- प्लॅटफॉर्मवर भरण्यात येणार असल्याने उत्पादनांना वेळेत बाजारपेठ आणि योग्य दर मिळू शकणार आहे. यापुढील काळात बचत गटांकडून उत्पादित कृषी व्यतिरिक्त इतर वस्तूंनाही बाजारपेठ मिळवून देण्यासाठी अशा प्रकारचे ई- व्यासपीठ निर्माण करण्यात येईल.

  - श्रीमती ज्योती ठाकरे

 

00000

 

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...