जिल्ह्यात
 आजपासून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम’

कोरोना नियंत्रणासाठी नागरिकांनीही साथ द्यावी

                -जिल्हाधिकारी शैलेश नवाल

 

 * आरोग्य पथके देणार घरोघर भेट

 * ताप व ऑक्सिजन लेव्हलची करणार तपासणी

 * संशयितांचा शोधआरोग्य शिक्षणाचीही तरतूद

 

अमरावती,दि. 14 : कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यात आजपासून (15 सप्टेंबर) ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमे अंतर्गत जिल्ह्यातील सुमारे सात लाख कुटुंबांना आरोग्य पथके प्रत्यक्ष भेट देऊन सर्दी, खोकला, ताप व आक्सिजन लेव्हल आदी तपासणी करणार आहे. नागरिकांनीही कुटुंबांचे व इतरांचे आरोग्य जपण्यासाठी या मोहिमेत स्वयंस्फुर्तीने सहभाग घेऊन आरोग्य पथकांना माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.

            कोरोना प्रतिबंधासाठी शासन व प्रशासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम राज्यात सर्वत्र 15 सप्टेंरपासून राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेअंतर्गत आरोग्य विभागाने नियुक्त केलेले स्वयंसेवक शहरातील, तसेच जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत घरोघरी जाऊन लोकांची ताप आणि ऑक्सिजन लेव्हल तपासणी करणार आहेत. या कामासाठी आशा वर्कर व स्वयंसेवी संस्थेच्या दोन हजार व्यक्तींची नेमणूक केली आहे. एका चमूमध्ये आशा वर्कर व दोन स्वयंसेवक असे तीन व्यक्तींचा समावेश असणार.

मोहिमेची पूर्वतयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. कोरोनाचे नियंत्रणासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांची साथ मिळणेही आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने कोरोनावर मात करू. या मोहिमेत नागरिकांनीही योगदान द्यावे. नागरिकांनीही स्वयंसेवकांना सहकार्य करून परिपूर्ण माहिती द्यावी व कोरोना नियंत्रणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

लोकांना आरोग्य शिक्षण व महत्वाचे आरोग्य संदेश देणे, तसेच संशयित कोरोना रूग्णांचा शोध घेणे व त्यांना उपचारासाठी संदर्भ सेवा पुरविणे, तसेच मधुमेह, हृदयविकार, किडनीविकार, लठ्ठपणा  उपचारासाठी संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे कोरोना रूग्णांच्या संपर्कात  आलेल्या संशयितांचा शोध घेऊन त्यांना वेळीच आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणारआहे. ही मोहिम पहिल्या टप्प्यात 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरदरम्यान आणि दुस-या टप्प्यात 12 ऑक्टोबर ते 24ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. एका महिन्याच्या कालावधीत दोनवेळा हे स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबाला भेटणार आहेत.

 

प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणे या मोहिमेमुळे शक्य होणार आहे. हाय रिस्क रूग्णांचा, तसेच संशयितांचा शोध घेणे व त्यांना योग्य उपचार मिळवून देणे या मोहिमेमुळे शक्य होणार आहे. नागरिकांनी आपल्या घरी तपासणी व माहिती, सूचना आदींसाठी येणा-या स्वयंसेवकांना संपूर्ण सहकार्य करावे. कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांची साथ मिळणे आवश्यक आहे. कोरोनाचे संक्रमण थांबवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे कुठलीही माहिती लपवू नये. आरोग्य पथकाला सहकार्य करावे. सर्वांनी आपापली जबाबदारी ओळखून स्वच्छता, मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स या त्रिसूत्रीचा अवलंब करावा व मोहिमेसाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.

0000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती