Tuesday, May 31, 2022

जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा

 



जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा

अमरावती, दि.31: राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्त जनजागृतीपर कार्यक्रम साजरा करण्यात आला. तसेच तंबाखू मुक्तीबाबत शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत महल्ले होते. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. साळुंके, समिती अध्यक्ष डॉ. सविता पाटणकर, वुमन डॉक्टर विंग अध्यक्ष डॉ. आशा हरवानी, सचिव डॉ. सानिष्ठा बेले, सहसचिव डॉ. नीरज मुरके,डॉ सुजित डांगोरे, डॉ. गिरीश तापडिया, दंतरोग तज्ज्ञ डॉ. आतिश पवार, जिल्हा सल्लागार राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम डॉ. मंगेश गुजर, दंतरोग तज्ज्ञ डॉ. प्रितीश पाडगावकर, अधिसेविका श्रीमती अडळकर, आहार तज्ज्ञॉ श्रीमती देशमुख, निरुत्ती इंदुरकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

या वर्षी जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे घोष वाक्य "तंबाखूमुळे आपल्या पर्यावरणाला धोका हे होते. तंबाखू उत्पादनात होणारा अतिरिक्त रासायनिक खताचा वापर, यामुळे जमिनीचा कस कमी होतो व कालांतराने जमीन नापीक बनते.

राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षण 2019-20 नुसार, अमरावती जिल्हयामध्ये 15 वर्षावरील महिलांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण 9 टक्के  तर 15 वर्षावरील पुरुषांमध्ये 40.8 टक्के एवढे होते. टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या सर्वेक्षणनुसार, 90 टक्के लोकांमध्ये तोंडाच्या कर्करोगाचे कारण तंबाखू सेवन हे आहे . भारतात दरवर्षी 13.50 लाख लोकांचा मृत्यू हा तंबाखू सेवनामुळे होतो.

तीनशे सिगारेट बनविण्यासाठी एका झाडाची तोड करावी लागते. त्यामुळे जंगलतोडीचे प्रमाण वाढले आहे. तंबाखूवर प्रक्रिया करण्यासाठी कोट्यावधी लीटर पाण्याचा उपयोग करावा लागतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, आजतागायत 8.40 कोटी टन  कार्बन डायऑक्साईड वातावरणात उत्सर्जित केला गेला आहे. तसेच इतर कचरा जसे तंबाखू, गुटखा, खर्ऱ्याची पाकिटे, सिगारेट बड्स यांचे वर्षानुवर्षे विघटन होत नाही. त्यामुळे पाणी व जमीन प्रदूषित होते. तसेच तंबाखू, खर्रा, गुटखा खाणाऱ्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे ते वारंवार आजारीही पडतात.

तंबाखू मुक्तीसाठी समुपदेशनाकरिता जिल्हा सामन्य रुग्णालय येथे तंबाखू मुक्ती समुपदेशन केंद्र चालविल्या जाते . तसेच उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय स्तरावरही समुपदेशन केंद्रे चालवली जातात.कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय तंबाखू नियंत्रक कार्यक्रमाचे जिल्हा समुपदेशक  उध्दव जुकरे तर आभार जिल्हा सामजिक कार्यकर्ता पवन दारोकर यांनी मानले.

0000

 

 

प्रधानमंत्री व मुख्यमंत्री यांनी साधला लाभार्थ्यांशी ऑनलाईन संवाद

 













लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले समाधान,

राज्य शासनाप्रती व्यक्त केली कृतज्ञता

 

लाभार्थी परिसंवाद कार्यक्रम संपन्न

 

प्रधानमंत्री व मुख्यमंत्री यांनी साधला लाभार्थ्यांशी ऑनलाईन संवाद

 

जिल्ह्यातील 350 लाभार्थी नियोजन भवनात उपस्थित

 

तळागाळातील नागरिकांपर्यंत शासकीय योजना पोहचविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा यशस्वी

 

विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांचा पुढाकार

 

               अमरावती, दि.31 : केंद्र शासनाच्या अथवा राज्य शासनाच्या योजना गरजूंपर्यंत पोहचविण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपक्रम राबवून या योजनांची प्रसिध्दी करुन लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यात येतो. तळागाळातील नागरिकांपर्यंत शासकीय योजना पोहचविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा यशस्वीपणे कार्य करीत आहे. याचीच परिणती म्हणून लाभार्थी परिसंवाद कार्यक्रमात लाभार्थ्यांनी शासकीय योजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी जिल्ह्यातील 350 लाभार्थी उपस्थित होते.

 

         भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र व राज्य शासनामार्फत देशभरात आजादी का अमृत महोत्सवांतर्गत विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या धर्तीवर केंद्र व राज्य शासनाने लाभार्थ्यांसोबत परिसंवाद कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये प्रथम सत्रात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यभरातील विविध योजनेच्या लाभार्थ्यांशी सह्याद्री अतिथीगृहातून ऑनलाईन संवाद साधला. यावेळी लाभार्थ्यांनी मनोगत व्यक्त करुन शासनाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

 

       अमरावती नियोजन भवन येथील सभा कक्षामध्ये जिल्हा प्रशासनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी विविध योजनेचा लाभ घेतलेले लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यासपीठावर आमदार रवी राणा, प्रभारी जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे सचिव पद्मश्री प्रभाकर वैद्य, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल, उपजिल्हाधिकारी मनिष गायकवाड, मनपा उपायुक्त डॉ. सीमा नेताम, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जितेंद्रकुमार झा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी, महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रिती देशमुख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

    मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लाभार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या. शासनाच्या योजना गरजूंपर्यंत पोहचविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. राज्याची प्रशासकीय यंत्रणा तालुका आणि गावपातळीवर काम करीत आहे. गरजूंना शासकीय योजनांचा लाभ मिळावा, हे शासनाचे ध्येय आहे. लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आम्हाला अधिक जोमाने काम करायला प्रेरणा देते. याशिवाय जेथे जेथे उणिवा राहिल्या असतील त्याही दूर करण्यात येतील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

       तर दुसऱ्या सत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विविध योजनेच्या लाभार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्यप्रणालीव्दारे हिमाचल प्रदेशातील सिमला येथे आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमाव्दारे राज्य, जिल्हास्तरावर स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांसह विविध योजनांच्या निवडक लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रधानमंत्री किसान योजनेतील 21 हजार कोटी रुपयांचा 11 वा हप्ता डिजिटली शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला. त्यानंतर त्यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली व लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे मनोगत जाणून घेतले.

 

               या कार्यक्रमात प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, स्वच्छ भारत अभियान, जलजीवन मिशन, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, एक राष्ट्र एक राशनकार्ड, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, आयुष्मान भारत योजना, आरोग्य योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजनेसोबतच राज्य शासनाच्या कृषी, सिंचन, आरोग्य व वैयक्तिक लाभाचे लाभार्थी यावेळी उपस्थित होते. यावेळी रुख्मिणी पर्वतकर, मेघा गुडधे, सुवर्णा तायडे, अश्विनी वासनिक, कल्याणी गुडधे, सरोज रघुवंशी, ज्ञानेश्वरी सातव, प्रतिक्षा केवतकर, आरती नांदेडकर आदी लाभार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन नगरपालिका प्रशासनाचे प्रकल्प अधिकारी प्रवीण येवतीकर यांनी तर आभार तहसिलदार उमेश खोडके यांनी मानले. जिल्ह्यातील तहसिलदार, गटविकास अधिकारी, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, सरपंच, उपसरपंच यावेळी उपस्थित होते.

00000

 

 

शहरात कलम 37 (1) व (3) लागू

 

शहरात  कलम 37 (1)  व (3) लागू

 

अमरावती, दि. 31 :  शहरात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी, यासाठी पोलीस उपायुक्त (अमरावती शहर) यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

सदर प्रतिबंधात्मक आदेश शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिस आयुक्तयालय परिक्षेत्रात दि. 1 जून ते 15 जून 2022 पर्यंत लागू करण्यात आला आहे. या कलमाचा भंग करणाऱ्या व्‍यक्‍तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल, असे पोलीस उपायुक्त (अमरावती शहर)  यांनी कळविले आहे.

000000

 

Monday, May 30, 2022

शासन पीडितांच्या पाठीशी संवेदनशीलतेने उभे आहे - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

 







शासन  पीडितांच्या पाठीशी संवेदनशीलतेने उभे आहे

- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

 

कोरोना काळात अनाथ झालेल्या बालकांना केंद्र व राज्य शासनामार्फत ‘पीएम केअर फॉर

चिल्ड्रेन’व्दारे मदतीचे वाटप

संपूर्ण देशभर एकाचवेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मदत निधीचे वितरण

अमरावती जिल्ह्यातील 15 बालकांना 2 कोटी 25 लक्ष रुपयांचा लाभ

            अमरावती, दि.30 : कोरोना आपत्तीमुळे अनेकांचे जीवन बदलले. या काळात ज्यांनी आपल्या परिवारातील सदस्य गमावले, त्यांचे दु:ख शब्दातीत आहे. परंतु परोपकाराची जाणीव असलेला आपला भारत देश आणि शासन यंत्रणा कोरोना पीडितांच्या पाठीशी संवेदनशीलतेने उभी आहे. यासाठी कोरोना पीडितांनी आपले मनोबल दृढ ठेवावे. तुम्हाला पुढील आयुष्य खंबीरतेने आणि यशस्वीपणे जगण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करीत आहे, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला.

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘पीएम केअर फॉर चिल्ड्रेन’ योजनेव्दारे कोविड काळात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना मदतनिधी वितरण कार्यक्रम व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात पार पडला, त्यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी ऑनलाईन संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.  हा कार्यक्रम संपूर्ण देशभर एकाचवेळी आयोजित करण्यात आला होता. जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनात महिला व बाल कल्याण विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

प्रभारी जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बीजवल, महिला व बाल विकास उपायुक्त सुनील शिंगणे, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी डॉ. उमेश टेकाडे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले, बाल कल्याण समिती सदस्य अंजली घुलक्षे, महावीर वासनिक, ॲड. उज्ज्वला श्रीराव, विधी अधिकारी ॲड. सीमा भाकरे आदी संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

ऑनलाईन मार्गदर्शन करतांना श्री. मोदी म्हणाले की, पालक गमावलेल्या बालकांच्या दु:खाची भरपाई होऊ शकत नाही. परंतु आलेल्या संकटासमोर हतबल न होता स्वत:च्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा. शासन सदैव आपल्या पाठीशी आहे. अशा बालकांचे शिक्षण, आरोग्य व निवाऱ्याची व्यवस्था शासन करीत आहे. मुलांच्या भविष्याचा विचार करुन शासनाने ही योजना आणली आहे. बालकांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचे निकटवर्तीय नातेवाईक व शिक्षक हे महत्त्वाची भूमिका बजावित आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ करुन घ्या व आपल्या पालकांचे स्वप्न पूर्ण करा, असे भावनिक आवाहन त्यांनी यावेळी केले.

कोरोना महामारीमुळे आपले आई-वडील गमावलेल्या मुलांना ‘पीएम केअर फॉर चिल्ड्रेन’ या निधीतून 10 लक्ष रुपयाची आर्थिक मदत केली जात आहे. एकट्या अमरावती जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 1625 एवढी आहे. मृत्यूमुखी पडलेल्या जिल्ह्यातील 460 बालकांच्या आई किंवा वडील गेलेल्यांचा समावेश आहे. तर 15 बालकांचे आई आणि वडील दोघेही या महामारीत मृत्यूमुखी पडले आहे.  अशा मुलांची काळजी शासन घेत आहे. या मुलांना वयाच्या 23 वर्षापर्यंत मासिक छात्रवृत्ती देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या शिवाय आयुष्यमान भारत योजनेतून मुलांना 5 लक्ष रुपयांचा आरोग्य विमा दिला जाणार आहे. त्याचे हप्ते पीएम केअर फंडातून भरले जाणार आहे. याशिवाय सर्व शैक्षणिक सुविधा शासनामार्फत पुरविल्या जाणार आहे.

या योजनेंतर्गत अमरावती जिल्ह्यातील 15 बालकांना 2 कोटी 25 लक्ष रुपयांचे वितरण यावेळी करण्यात आले. यामध्ये सात मुले तर आठ मुली आहेत. या योजनेव्दारे कोविडमुळे आपल्या आई-वडीलांना, कायदेशीर पालकांना, दत्तक आई-वडीलांना गमावले आहे, अशा मुलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.

या योजनेंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना पासबुक तसेच आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत आरोग्य कार्डचे वाटप करण्यात आले. आरोग्य विमा यांचा लाभ देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या नावे पोस्ट ऑफिसमध्ये 10 लक्ष रुपयांचे  मुदत ठेव जमा करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी वयाच्या 23 व्या वर्षी ही रक्कम मिळेल. विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी स्नेहपत्रही यावेळी देण्यात आले. अशा बालकांना आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत 50 हजार रुपयांचे सानुग्रह निधी परस्पर त्यांच्या बँक खात्यात यापूर्वीच जमा करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनीही मनोगत व्यक्त केले.  राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील मंत्री, संसद सदस्य आणि आमदार यावेळी ऑनलाईन पध्दतीने सहभागी झाले होते.

00000

 

 

 

Sunday, May 29, 2022

गावातील भूजल पातळीचा अभ्यास करण्याकरिता‘पिझोमीटर’ भूजलमापक यंत्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

 



गावातील भूजल पातळीचा अभ्यास करण्याकरिता‘पिझोमीटर’

भूजलमापक यंत्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

 

अमरावती, दि. 28 : अटल भूजल योजनेतंर्गत वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत गावातील भूजल पातळीचा अभ्यास करण्यासाठी पिझोमीटर  (भूजल मापक यंत्र) बसविण्यात आले आहे. महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशाोमती ठाकूर यांच्या हस्ते आज पिझोमीटरचे उद्घाटन करण्यात आले.

            सरपंच ललिता जोमदे, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे प्रादेशिक उपसंचालक संजय कराड, मोर्शीचे तहसिलदार सागर ढवळे, गटविकास अधिकारी आर. पवार, वरिष्ठ भूवैज्ञानिक हिमा जोशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

अत्याधुनिक पध्दतीने गावातील भूजल पातळीच्या अभ्यास करण्याकरिता अमरावती जिल्ह्यामध्ये वरुड, मोर्शी  व चांदुरबाजार या तालुक्यामध्ये एकूण 90 ग्रामपंचायतीमध्ये भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत पिझोमीटरसाठी स्थळ निश्चित करण्यात आले आहे. जमिनीतील भूशास्त्रीय रचनेनुसार जलधारक खडकाचा अभ्यास व तसेच भूजल पातळीचा अभ्यास अत्याधुनिक पध्दतीने करण्याकरिता पिझोमीटरने (भूजल मापक यंत्र) खोदकाम करण्यात येणार आहे व त्यावर (डिजीटल वॉटर लेवल रेकॉर्डर) बसविण्यात येणार आहे. यामुळे गावाला भूजल पातळीची नोंद दर 12 तासाला घेता येईल, अशी सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच या योजनेतंर्गत अमरावती जिल्ह्यातील एकुण 90 ग्रामपंचायत मध्ये 90 पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात येणार आहे. तसेच या यंत्राद्वारे गावामध्ये दरदिवशी किती पाऊस पडतो, हे मोजमाप कशाप्रकारे करतात, याचे प्रात्यक्षिक या कार्यालयमार्फत गावातील जलसुरक्षक यांना देण्यात येईल. पर्जन्यमापक यंत्र व भूजल मापक यंत्राचा उपयोग करुन गावाचा ताळेबंद अधिक अचूकतेने करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

0000000

जिल्ह्याच्या विकासासाठी आरोग्य सेवा बळकट असणे अत्यंत आवश्यक - पालकमंत्री ॲड.यशाोमती ठाकूर

 








जिल्ह्याच्या विकासासाठी आरोग्य सेवा बळकट असणे अत्यंत आवश्यक

                 -    पालकमंत्री ॲड.यशाोमती ठाकूर

डॉ. पंजाबराज देशमुख वैद्यकिय महाविद्यालयात अद्ययावत

श्वसनरोग अतिदक्षता कक्षाचे उद्घाटन

 

अमरावती, दि. 28 : जिल्ह्याच्या विकासासाठी आरोग्य सेवा बळकट असणे अत्यंत आवश्यक आहे. याच धर्तीवर डॉ. पंजाबराज देशमुख वैद्यकिय महाविद्यालयातील अद्ययावत श्वसनरोग अतिदक्षता कक्षामुळे जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना अमरावती शहरातच या आरोग्य सुविधेच्या लाभ घेता येईल. यामुळे रुग्णांना तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना निश्चितच दिलासा मिळेल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड.यशाोमती ठाकूर यांनी आज व्यक्त केला. 

डॉ. पंजाबराज देशमुख वैद्यकिय महाविद्यालयात अद्ययावत श्वसनरोग अतिदक्षता कक्षाचे उद्घाटन श्रीमती ॲड. ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या. संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल देशमुख, संचालक डॉ. पद्माकर सोमवंशी, संस्थेचे उपाध्यक्ष नरेश ठाकरे, रामचंद्र शेळके, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

डॉ. पंजाबराज देशमुख वैद्यकिय महाविद्यालयामार्फत जनसामान्यांच्या आरोग्य सुविधेसाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. असे सांगून श्रीमती ठाकूर म्हणाला की,  अद्ययावत श्वसनरोग अतिदक्षता कक्ष हा येथील सातवा अतिदक्षता कक्ष आहे. यापूर्वी विविध अतिदक्षता कक्ष स्थापन करण्यात आले आहे.  याचा फायदा जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना होतो. शिवाय इतर जिल्ह्यातील रुग्णही येथे मोठया प्रमाणावर उपचारासाठी येतात. कोरोना काळामुळे आरोग्य व्यवस्था बळकट असण्याचे महत्त्व सर्वांना कळले आहे. शासनातर्फे अशा आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

अध्यक्ष श्री. देशमुख यांनी ह्दयाच्या शस्त्रकियेसाठी ऑपरेशन थिएटर बांधण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी सांगितले. सध्याचा धकाधकीच्या काळात ह्दय रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी अशा ऑपरेशन थिएटर्सची गरज आहे. यासाठी प्रशासनामार्फत सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या प्रास्तविकेत प्राचार्य डॉ. देशमुख यांनी महाविद्यालयातील आरोग्यविषयक सुविधांची माहिती दिली. अद्ययावत श्वसनरोग अतिदक्षता कक्षामध्ये आठ खाटांची सुविधा आहे. कोविड काळात संस्थेमध्ये कोविड केअर सेंटर उभारण्यात आले होते. खाजगी संस्थेमार्फत कोविड रुग्णांच्या उपचारासाठी पुढाकार घेणारे हे पहिले रुग्णालय होते. प्रशासनाच्या सहकार्यामुळे येथे ऑक्सीजन प्लांटची निर्मिती करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

000000

प्राथमिक आरोग्य केंद्र हा ग्रामीण जीवनाचा कणा - पालकमंत्री ॲड.यशाोमती ठाकूर

 














   
प्राथमिक आरोग्य केंद्र हा ग्रामीण जीवनाचा  कणा

   - पालकमंत्री ॲड.यशाोमती ठाकूर

पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण   

         अमरावती, दि. 28 : प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम उच्च दर्जाचे करण्यात यावे. प्राथमिक आरोग्य केंद्र हे ग्रामीण जीवनाच्या कणा आहे. यामुळे या इमारतीचे बांधकाम नियोजनबद्ध व सर्व सोयींनी युक्त असावे. तसेच पुढील काळात येथील पाणंद रस्ताचे काम लवकरच पूर्ण करणार,असे आश्वासन महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड.यशाोमती ठाकूर यांनी आज दिले.

जिल्हा परिषद सदस्य दत्ताभाऊ ढोमणे, सरपंच मंगला लोखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, तहसिलदार सागर ढवळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश जयस्वाल, रमेश काळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

विचोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे निर्लेखन करुन नवीन इमारत बांधकामचे भूमीपूजन करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. या कामाची अंदाजे किंमत साडेचार कोटी रुपये एवढी आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व विस्तारीकरणांतर्गत हे विकास काम करण्यात येणार आहे.  अडगाव बु. येथील आयुवेर्दिक दवाखान्याच्या नवीन इमारतीचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले. या कामाची अंदाजे किंमत 62.95 लक्ष एवढी आहे. उपकेंद्राची बांधकामे व विस्तारीकरण या अंतर्गत हे विकास काम करण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विकासासाठी शासन कटीबद्ध असल्याचे श्रीमती ठाकूर यावेळी  म्हणाल्या.

 अडगाव येथील सरगम महिला प्रभाग संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला श्रीमती ठाकूर उपस्थित होत्या .

 

राजमाता महिला स्वाधारगृहाच्या बांधकामचे भूमिपूजन

        शिवरत्न जिवबा महाले चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेमार्फत रेवसा येथे राजमाता महिला स्वाधार गृहाचे बांधकामचे भूमिपूजन श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. स्वाधारगृहाची जागा ही लोकवगर्णीतून तयार झाली आहे. महिलांना घराबाहेर तसेच घरातही कित्तेकदा संकटांना सामोरे जावे लागते. बरेचदा या अडचणीतून बाहेर निघणे प्रसंगी कठीण होते. अशावेळी स्वाधारगृहामुळे महिलांना माहेरपणाच्या आधार गवसेल. राजमाता महिला स्वाधारगृहाचे काम अत्यंत महत्त्वाचे असून यामुळे अनेक माता-बहिणीसाठी निश्चितच मदत होईल, असा विश्वास श्रीमती ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमाला लेडी गव्हर्नर कमलाताई गवई यांची विशेष उपस्थिती होती. विलास इंगोले, प्रभारी तहसिलदार सुनिल रासेकर, संस्थेचे अध्यक्ष विवेक राऊत, रेवसाच्या सरपंच वर्षा चव्हाण, पोलिस पाटील छाया वानखडे, राखी रीठे तसेच ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

000000


--

Saturday, May 28, 2022

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मागास प्रवर्ग आरक्षण समर्पित आयोगाने जाणून घेतली संस्था, व्यक्तींची मते सुमारे चाळीस संस्था, संघटनांशी चर्चा

 














स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मागास प्रवर्ग आरक्षण

समर्पित आयोगाने जाणून घेतली संस्था, व्यक्तींची मते

सुमारे चाळीस संस्था, संघटनांशी चर्चा

 

            अमरावती, दि. 28 : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मागास प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत समर्पित आयोगाने आज विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांची निवेदने स्वीकारली व त्यांचे मत जाणून घेतले. यावेळी 40 संस्था-संघटना, तसेच सुमारे दीडशे नागरिकांनी आयोगाची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले.

आयोगाचे अध्यक्ष जयंतकुमार बांठिया, सदस्य नरेश गीते, डॉ. शैलेशकुमार दारोकार, एच. बी. पटेल व सदस्य सचिव पंकजकुमार आदींनी संस्था व नागरिकांकडून प्रत्यक्ष चर्चा करून निवेदने स्वीकारली.

अप्पर विभागीय आयुक्त नीलेश सागर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, पुरवठा उपायुक्त अजय लहाने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नरेंद्र फुलझेले, आयोगाचे संशोधन अधिकारी डॉ. नितीन धाकतोडे, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांच्यासह विविध जिल्ह्यांचे निवासी उपजिल्हाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

            आयोगाकडून घेण्यात आलेल्या प्रत्यक्ष सुनावणीबाबत संस्था व व्यक्तींच्या नोंदणीसाठी विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ व वाशिम या पाचही जिल्हाधिकारी कार्यालयांत मदत कक्ष उघडण्यात आले होते. त्यानुसार 30 संस्थांकडून नोंदणी करण्यात आली होती. त्याचप्रमाणे, वेळेवर उपस्थित व्यक्ती व संस्थांकडूनही निवेदने स्वीकारण्यात आली. आयोगाने प्रत्येक निवेदनकर्त्याचे स्वागत करत त्यांचे म्हणणे सविस्तर जाणून घेतले, सुनावणीतील प्रत्येक बाबीची नोंद करण्यात आली.  विभागातील पाचही जिल्ह्यातील संस्था व व्यक्तींनी सुनावणीत सहभाग घेतला. यावेळी आयोगाने सर्व अधिका-यांची बैठक घेऊन त्यांच्याकडून विविध बाबींची माहिती घेतली.

 

अप्पर आयुक्त श्री. सागर, उपायुक्त श्री. लहाने यांनी स्वागत केले. सहायक आयुक्त विवेकानंद काळकर, तहसीलदार वैशाली पाथरे, नप प्रशासन अधिकारी गीता वंजारी यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

 

00000

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...