शासकीय तंत्रनिकेतनचा 20 वा पदविका प्रदान समारंभ
उपक्रम अधिकाधिक विद्यार्थीभिमुख करण्यावर भर
-
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
अमरावती, दि. २५ : आपली
बांधीलकी विद्यार्थ्यांशी आहे हे लक्षात घेऊन विद्यार्थीभिमुख उपक्रम राबविण्यावर
भर देण्यात येत आहे. कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांनी अनेक अडचणींचा सामना करीत
अभ्यास केला. त्या काळात ऑनलाईन परीक्षा ही गरज होती. परंतु आता ऑफलाईन परीक्षा
पद्धती स्वीकार करणे गरजेचे आहे. यासाठी विद्यार्थ्यांची मानसिकता तयार
होण्यासाठी प्राचार्य व प्राध्यापकांनी पुढाकार घ्यावा,
असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे
केले.
शासकीय
तंत्रनिकेतन येथील २० वा पदविका प्रदान समारंभ उच्च
व तंत्र शिक्षण मंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते अभियंता भवन येथे झाला, त्यावेळी ते बोलत होते. तंत्रनिकेतनच्या
नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय जाधव अध्यक्षस्थानी होते.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. सामंत
म्हणाले की, प्रत्येक संकटावर धैर्य व चिकाटीने मात करण्याचा छत्रपती
शिवाजी महाराज यांचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे. कोविडकाळात ऑनलाईन परीक्षा
घेण्यात आल्या. तथापि, कोविडकाळानंतर ऑफलाईन परीक्षा घेण्यात
येत आहेत. विद्यार्थ्यांची
मागणी लक्षात घेऊन परीक्षेच्या कालावधीत वाढ, प्रश्नसंच उपलब्धता असेही निर्णय
राबविण्यात आले. याबाबत विद्यार्थ्यांची मानसिकता तयार
करण्यासाठी प्राचार्य, प्राध्यापक यांनी पुढाकार घेतला पाहिजे.
विद्यार्थ्यांना आपले हक्क, कर्तव्य, लोकशाही मूल्ये यांची ओळख व्हावी यासाठी
संविधानाचा समावेश अभ्यासक्रमात केला आहे.
पदविका वितरण समारंभाचे स्वरूप हे विद्यार्थी केंद्रित होणे आवश्यक असल्याचे
त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, पदविका प्रदान समारंभ हा
विद्यार्थ्यांसाठी असतो. त्यामुळे असा कार्यक्रम विद्यार्थी केंद्रितच असावा. विद्यार्थ्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी या सोहळ्यातच मार्गदर्शन मिळावे.
त्यादृष्टीने
नियोजन करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी
सोहळ्यात परिधान करावयाच्या वस्त्र किंवा उपरण्याचेही स्वरूप अधिक चांगले करण्यात
येईल. अनेक ठिकाणी पदवी
वितरण समारंभाचे स्वरुप इंग्रजांच्या काळापासून
आजही तसेच कायम आहे. ते स्वरुप बदलवून समारंभ
विद्यार्थी केंद्रित करण्यावर भर देण्यात येईल.
यावेळी
संस्थेच्या प्राचार्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment