शासन आणि नागरिकांमधील दुवा बनून सकारात्मकता पेरण्याचे कार्य कौतुकास्पद - निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल

 



शासन आणि नागरिकांमधील दुवा बनून सकारात्मकता

पेरण्याचे कार्य कौतुकास्पद

-      निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल

 

राज्यस्तरीय सचित्र माहिती प्रदर्शनात रंगला साहित्यिक, कवी, लेखक तसेच शासकीय अधिकारी यांच्यात अनौपचारिक संवाद

 

अमरावती दि. 04 : माहिती विभागामार्फत शासकीय योजना, उपक्रमांबाबत सामान्य नागरिकांपर्यंत माहिती पोहचविली जाते. शासन आणि नागरिकांमधील दुवा बनून शासकीय योजनांबाबत चित्रमय प्रदर्शनाच्या माध्यमातून सकारात्मकता पेरण्याचा माहिती विभागाचा उपक्रम अत्यंत प्रशंसनीय असल्याचे गौरवोव्द्गार निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांनी आज काढले.

            माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे शासनाने राबविलेल्या विविध विभागाच्या विकासात्मक योजनांवर आधारित ‘दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची राज्यस्तरीय चित्रमय प्रदर्शन शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहातील आर्ट गॅलरी येथे सुरु आहे. या चित्रमय प्रदर्शनाच्या निमित्ताने साहित्यिक, कवी, लेखक, जनसंज्ञापनाचे विद्यार्थी व अभ्यासक तसेच शासकीय अधिकारी यांच्यात वैचारिक मंथन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी श्री. बिजवल बोलत होते. समृध्दी महामार्ग विभागाचे उपजिल्हाधिकारी विवेक घोडके, श्री शिवाजी महाविद्यालयाच्या जनसंज्ञापन विभागाचे प्रमुख डॉ. कुमार बोबडे, कवी व कलावंत सुनील यावलीकर, साधना कम्युनिटी रेडिओ स्टेशनचे संजय घरडे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर-अमरावती विभागाचे संचालक हेमराज बागुल, अमरावती विभागाचे प्र. उपसंचालक हर्षवर्धन पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

             माहिती विभागामार्फत विविध माध्यमांद्वारे शासनस्तरावर घेतलेले सर्व निर्णय, धोरणांची माहिती जनतेला मिळते.  शासकीय योजनांची फलश्रुती चित्रमय प्रदर्शनाच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. शासकीय योजना लाभार्थी तसेच गरजूंपर्यंत पोहचण्यासाठी चित्रमय प्रदर्शनातील माहिती अत्यंत उपयुक्त आहे. सर्व शासकीय योजनांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध झाल्यामुळे लाभार्थ्यांना याचा निश्चितच फायदा होईल, असा विश्वास श्री. बिजवल यांनी यावेळी व्यक्त् केला.

           

शासनाच्या विविध विभागांकडून राबविण्यात येणाऱ्या योजना, उपक्रमांची माहिती नागरिकांसाठी अत्यंत सोप्या व सुंदर शब्दशैलीमध्ये सादर करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या शासन काळातील विकास धोरण, विकास कामांची व संकल्पांची सविस्तर माहिती या चित्रमय प्रदर्शनाच्या माध्यमातून बघायला मिळते. ही माहिती सर्वांसाठीच उपयुक्त असल्याचे उपजिल्हाधिकारी श्री. घोडके यावेळी म्हणाले.

            चित्रमय प्रदर्शनाच्या माहितीसह येथील गड किल्ल्यांच्या सजावटीबाबत प्रशंसा करतांना डॉ. बोबडे म्हणाले की, चित्रमय प्रदर्शनामध्ये शासकीय योजना व उपक्रमांची माहिती अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य हे गड किल्ल्यांचे राज्य आहे. गड किल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शनाची मांडणी अधिक आकर्षक भासते. जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

            श्री. यावलीकर यांनी प्रदर्शनाच्या माध्यमातून अनेक उपक्रम, योजनांची माहिती मिळाल्याचे यावेळी सांगितले. शासकीय योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचा माहिती विभागाचा उपक्रम शासनाची पारदर्शकता दर्शवितो, असे मत श्री. घरडे यांनी यावेळी व्यक्त केले.

संवाद साधून संवेदनशीलता जपणारा माहिती विभाग – हेमराज बागुल

लोकांच्या मनात शासन व्यवस्था व शासकीय कामांविषयी आस्था व सकारात्मकता पेरण्यासाठी संवादाची प्रक्रिया अविरतपणे सुरु राहाणे आवश्यक आहे. हे काम माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विविध कलाविष्कारांच्या माध्यमातून सातत्त्याने होत असते. याच पार्श्वभूमीवर महासंचालयाच्या माध्यमातून चित्रमय प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. नवनिर्मितीचे सृजन करणारा माहिती विभाग हा संवादी असल्याचे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क संचालनालय अमरावती-नागपूर विभागाचे संचालक हेमराज बागुल यांनी केले.

 

 

शासन आणि जनसामान्य यांच्यामध्ये संवाद होणे आवश्यक आहे. यातून शासन आपल्यासाठी आहे, ही भावना नागरिकांमध्ये रुजते. यासाठी माहिती विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येतात. शासन नागरिकांसाठी विविध अंगाने काम करीत असते. जनसंपर्कात संवाद साधून नागरिकांशी जोडले जाणे आवश्यक आहे. त्यातून संवेदनशीलता विकसित होते. यासाठी शासन व्यवस्थेकडून संवेदनशीलता जपणे आवश्यक आहे. डोळ्यात संवेदनशीलतेचा पारा शाबुत ठेवून शासकीय काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

00000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती