Friday, July 18, 2025

DIO NEWS AMRAVATI 18.07.2025














बँकांनी उद्योगाला कर्ज सुविधा देऊन अर्थव्यवस्थेला गती द्यावी

-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

*एक जिल्हा एक उत्पादन मान्यवरांना भेट देणार

अमरावती, दि 18 : केंद्र आणि राज्य शासनाने छोट्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना आखल्या आहेत. सवलतीच्या दरात त्यांना कर्ज पुरवठा करून ग्रामीण भागातही उद्योग उभारणीला चालना देण्यात येत आहे. त्यामुळे बँकांनीही उद्योगांना कर्ज सुविधा देऊन अर्थव्यवस्थेला गती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले.

जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने शासकीय विभाग आणि बँकांच्या अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यावेळी परिविक्षाधीन अधिकारी कौशल्या एन., अग्रणी बँक व्यवस्थापक नरेश हेडाऊ, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम, खादी ग्रामोद्योगचे व्यवस्थापक प्रदीप चेचेरे, कौशल्य विकासच्या सहाय्यक आयुक्त प्रांजली बारस्कर, कृषी विभागाचे उपसंचालक वरूण देशमुख, पर्यटन विभागाचे विजय अवताडे, मावीमचे रंजन वानखेडे यांच्यासह विविध बँकांचे प्रादेशिक अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले, देशाने पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष ठेवले आहे. त्यामुळे खाजगी क्षेत्रात बँकांना गुंतवणूक करावी लागणार आहे. यात बँकांचा सहभाग महत्त्वाचा राहणार आहे. बँकांनाही ही संधी समजून खाजगी क्षेत्रात सकारात्मक दृष्टिकोनातून काम करावे लागणार आहे. खाजगी क्षेत्रात गुंतवणूक करून नव्या नोकऱ्या निर्माण करणे गरजेचे आहे.

उद्योजकांना सुलभता व्हावी, यासाठी प्रत्येक बँकेत बिझनेस फॅसिलेशन सेंटर असणे गरजेचे आहे. या कक्षाच्या माध्यमातून गुंतवणूक प्रशिक्षण आदींबाबत माहिती देण्यात यावी. यासोबतच उद्योजकांकडून शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून दाखल करण्यात येणाऱ्या प्रस्तावात त्रुटी राहू नये, यासाठीही प्रयत्न करावे. बँकांनीही प्रभाव पडू शकतील, अशी क्षेत्रे निवडून त्या उद्योगांचे कर्ज प्रस्ताव मंजूर करावेत.

यावेळी खादी ग्रामोद्योग, कृषी, पर्यटन, आर-सेटी, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटके महामंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ, जिल्हा उद्योग केंद्र यांच्या उद्योग कर्जविषयक योजनांचा आढावा घेण्यात आला.

एक जिल्हा एक उत्पादन ही आता जिल्ह्याची ओळख झाली आहे. सर्व शासकीय कार्यक्रमात मान्यवरांच्या स्वागताला आता या भेटवस्तू देण्यात येतील. यासाठी सर्व विभागाने कार्यवाही करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या. यावेळी शासकीय योजनांचे कर्ज प्रकरण मंजूर करण्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

अग्रणी बँक व्यवस्थापक श्री. हेडाऊ यांनी प्रत्येक बँकेत बिझनेस फॅसिलेशन सेंटर उभारावे, तसेच विविध योजनांमध्ये माध्यमातून देण्यात येणारी कर्ज प्रकरणे निकाली काढावीत असे आवाहन केले. श्री. निकम यांनी प्रास्ताविक केले. श्री कादरी यांनी आभार मानले.

000000




                                                पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आज दौरा

अमरावती, दि. 18 (जिमाका) : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या शनिवार, दि. 19 जुलै रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

दौऱ्यानुसार, पालकमंत्री श्री. बावनकुळे यांचे सकाळी नागपूरहून अमरावतीकडे प्रस्थान. सकाळी 12 वाजता सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड, अमरावती येथे यश असोसिएटस् व आसरा रेस्टॉरेंट तथा कैलास छाया गिरोळकर चैरिटेबल ट्रस्ट, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यस्तरीय तेली समाज गुणवंत विद्यार्थी सोहळा व तेली समाज उद्योजक मेळावा कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1.30 वाजता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल येथे आरोग्य विभाग आढावा बैठकीस उपस्थिती.

दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन येथे शंभर दिवस कृती आराखड्यातंर्गत विभागीय तसेच जिल्हास्तरीय प्रथम, व्दितीय व तृतीय आलेल्या कार्यालयांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3.30 वाजता येथे घरकुल लाभार्थी यांना रेती वाटप कार्यक्रम. जिल्हा नियोजन भवन येथेच दुपारी 4 वाजता महाराष्ट्र राज्य पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत अमरावती जिल्ह्यातील संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान स्पर्धेत पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतींना पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम तसेच दुपारी 4.30 वाजता अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना व्हॉट्स ॲप चॅट बोथ व लोगो ऑफ अमृत अंबानगरी सेवांचे लोकार्पण सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 5 वाजता शासकीय विश्रामगृह येथे जनसंवाद कार्यक्रम.

00000

 

शेतीत उत्पादन वाढीसाठी मधमाशापालनावरअनुदान:

खादी व ग्रामोद्योग विभागाचा पुढाकार

अमरावती, दि. 18 जुलै (जिमाका): शेती पिके आणि फळबागांच्या उत्पादनात परागीभवनामुळे वाढ होते. यासाठी मधमाशापालन हा एक अत्यंत उपयुक्त शेतीपूरक व्यवसाय असून, याला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा खादी व ग्रामोद्योग विभाग 50 टक्के अनुदान देत आहे.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाद्वारे ‘मधकेंद्र योजना’ संपूर्ण राज्यात राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्याच्या स्वरूपात 50 टक्के अनुदान, 50 टक्के स्वगुंतवणूक, शासनाच्या हमीभावाने मध खरेदी तसेच विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे.

या योजनेसाठी वैयक्तिक मधपाळ हा साक्षर असावा, वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे आणि स्वतःची शेती असल्यास प्राधान्य राहील. केंद्रचालक (प्रगतिशील मधपाळ) हा किमान 10 वी पास, वय 21 वर्षांपेक्षा जास्त नसावे. त्याच्या किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर किमान 1 एकर शेती जमीन असावी किंवा भाडेतत्त्वावर घेतलेली शेती चालेल. त्याला मधमाशापालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.

केंद्रचालक संस्था असल्यास ती नोंदणीकृत असावी. संस्थेच्या मालकीची किंवा भाडेतत्त्वावर घेतलेली किमान हजार चौ. फूट सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशापालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असावी.

मध उद्योगाच्या प्रशिक्षणासाठी अर्ज महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत जिल्हा उद्योग केंद्र, कॅम्प, अमरावती येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी निरीक्षक मध पी. के. आसोलकर (मो. नं. 9421111665) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.

00000




भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत भूजल दिन साजरा

अमरावती, दि. 18 (जिमाका): भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, अमरावती येथे नुकताच , ‘54 वा वर्धापन दिन- भूजल दिन’ साजरा करण्यात आला. प्रादेशिक उपसंचालक डॉ. चंद्रकांत भोयर आणि वरिष्ठ भूवैज्ञानिक राजेश सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवताना डॉ. चंद्रकांत भोयर यांनी महाराष्ट्राच्या जलसुरक्षेमध्ये भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेची भूमिका अधोरेखित केली. भूजल पातळीचे सर्वेक्षण करून पाण्याचा शाश्वत वापर सुनिश्चित करणे आणि जलसंधारणाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवणे, ही भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेची प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत. अनेक गावांना आणि शेतकऱ्यांना पाण्याच्या उपलब्धतेबाबत मार्गदर्शन देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी समाजाने एकत्र येऊन काम करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

वरिष्ठ भूवैज्ञानिक राजेश सावळे यांनी भूगर्भातील पाणी पातळी वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणे आवश्यक असल्याचे सांगितले. वर्धापन दिनानिमित्त सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून मिळालेल्या 50 वृक्षांची (कडुनिंब, आवळा, पेरू, बकुळ, बेल, शमी) कर्मशाळेच्या परिसरात लागवड करण्यात आली. प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने एक झाड दत्तक घेऊन त्याच्या संगोपनाची जबाबदारी घेतली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ प्रमोद झगेकर यांनी तर आभार प्रदर्शन वरिष्ठ लिपिक सचिन ठाकरे यांनी केले.

000000

जिल्हा महिला लोकशाही दिन येत्या सोमवारी

अमरावती, दि. 18 (जिमाका) : जिल्हा महिला लोकशाही दिन सोमवार, दिनांक 21 जुलै 2025 रोजी (महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी)  सकाळी  11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी संबंधितांनी अहवालासह व्यक्तिश: उपस्थित राहण्याचे आवाहन अधीक्षक निलेश खटके  यांनी केले आहे.

00000

सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक अधिकारी पॅनेल जाहीर

अमरावती, दि. 18 (जिमाका): विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, अमरावती यांनी 'ई' वर्गातील सहकारी गृहनिर्माण संस्था, म्हणजेच ज्या संस्थांमध्ये 250 पर्यंत किंवा त्यापेक्षा कमी सदस्य आहेत, त्यांच्या आगामी निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे पॅनेल तयार करण्यात येणार आहे. यासाठी पात्र व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहकार संकुल, कांता नगर, अमरावती येथील विभागीय सहनिबंधक कार्यालयामार्फत कळविण्यात आले की, निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलमध्ये समाविष्ट होण्यासाठी शासकीय विभागातील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमधील कार्यरत अधिकारी-कर्मचारी, वरिष्ठ लिपिक किंवा त्याहून अधिक दर्जाचे कर्मचारी, प्रमाणित लेखापरीक्षक, वकील तसेच शासकीय किंवा निमशासकीय संस्थेतून निवृत्त झालेले अधिकारी-कर्मचारी (ज्यांचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त नाही) अर्ज करू शकतात.

या पॅनेलसाठी आवश्यक असलेले विहित नमुन्यातील अर्ज येत्या 21 जुलै 2025 पासून ते 21 ऑगस्ट 2025 या कालावधीत उपलब्ध असतील. हे अर्ज शासकीय सुट्ट्या वगळून, कार्यालयीन वेळेत विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, अमरावती तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अमरावती यांच्या कार्यालयात (सहकार संकुल, कांता नगर) मिळवता येतील. कार्यालयाच्या जाहीर नोटीस बोर्डवरही अर्जाचा नमुना प्रसिद्ध करण्यात आला आहे.

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, शंकर कुंभार यांनी अर्जदारांना आवाहन केले आहे की, आपले अर्ज 21 ऑगस्ट 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत संबंधित कार्यालयात सादर करावेत. यामुळे 'ई' वर्गातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका वेळेत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यास मदत होईल.

00000

पंडित दीनदयाल महारोजगार मेळावा 22 जुलै रोजी

अमरावती, दि. 18 (जिमाका):  जिल्ह्यातील तरुण-तरुणींसाठी महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती, श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय आणि सुशिला सूर्यवंशी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ऍडव्हान्समेंट यांच्या संयुक्त विद्यमाने 22 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावती येथे पंडित दीनदयाल महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात रेमंड लक्झरी कॉटन, दामोदर इंडस्ट्रीज, गुरुलक्ष्मी कोटेक्स, फ्लिपकार्ट, मुरली टोयोटा , बजाज ऑटो यांसारख्या अनेक नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, पात्र उमेदवारांना त्याच दिवशी नियुक्ती पत्रे दिली जातील.

इच्छुक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर निःशुल्क ऑनलाईन नोंदणी करावी, किंवा मेळाव्याच्या ठिकाणीही नोंदणीची सोय उपलब्ध असेल. जिल्हा कौशल्य विकास केंद्राच्या सहायक आयुक्त यांनी जास्तीत-जास्त युवकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

00000

Thursday, July 17, 2025

DIO NEWS AMRAVATI 17.07.2025




मानवी जाणिवा कायम ठेवून प्रशासकीय कामकाज करा

- ॲड. धर्मपाल मेश्राम

पारधी समाज बांधवांची विविध विषयावर निवेदने, मागण्या सादर

             अमरावती, दि. 17 (जिमाका) : .अनुसूचित जाती जमातीमध्ये येणारा पारधी समाज मुख्य समाजाच्या प्रवाहात समाविष्ट करण्यासाठी शासन विविध धोरणे राबवित आहेत. या योजनांची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी मानवी जाणीव जोपासून प्रशासकीय कामकाज करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाची उपाध्यक्ष तथा सदस्य धर्मपाल मेश्राम यांनी आज येथे केले.

             दस्तूर नगर येथील प्रज्ञा प्रबोधिनी अमरावती - उद्योजकता विकास प्रकल्प, विवेकानंद छात्रावास येथे पारधी विकास परिषदेला (विदर्भ प्रांत) मार्गदर्शन करताना आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य श्री. मेश्राम यावेळी बोलत होते.

            प्रज्ञा प्रबोधिनी अमरावती - उद्योजकता विकास प्रकल्पाचे अध्यक्ष अविनाश देशपांडे, प्रदीप वडनेरकर, आशिष कावरे, अमरसिंग भोसले, आदिवासी विभागाच्या उपायुक्त जागृती कुंभरे आदी यावेळी उपस्थित होत्या.

        आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य श्री. मेश्राम म्हणाले की, अन्य समाजाच्या तुलनेत पारधी समाज काहीसा मागे राहिला आहे. या समाजाच्या उन्नतीसाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. सर्व समाज बांधवांपर्यंत विकास गंगा पोहोचल्यावर खऱ्या अर्थाने देशाची प्रगती होईल. अधिकाऱ्यांनी मानवी जाणिवा जोपासून कामकाज करावे. या समाजाची सद्यस्थिती समजून घेण्यासाठी मी

राज्यभर पारधी समाजाच्या बेड्यांवर फिरलो. त्यांच्या गाऱ्हाणी, तक्रारी समजावून घेतल्या.  कायद्याने ज्या तरतुदी आहेत, त्याचा योग्य उपयोग करुन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे ते यावेळी म्हणाले.

            आदिवासी विभागाच्या उपायुक्त श्रीमती कुंभरे यांनी यावेळी पारधी समाज बांधवांसाठी आदिवासी विभागामार्फत राबण्यात येणाऱ्या विविध तरतुदींविषयी माहिती दिली. पारधी समाज बांधवांसाठी न्युक्लिअस बजेटमधून आर्थिक सहाय्य पुरविण्यात येते. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी व्यक्ती अथवा गटांना आर्थिक सहाकार्य करण्यात येते. घरकुलासाठीही सहकार्य करण्यात येते. स्वाभिमान सबळीकरण योजनेतंर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात येतो. आदिवासी बांधवांच्या विकासासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष योजनेअंतर्गत देखील मदत पुरविली जाते. पात्र लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.

             पारधी समाज बांधवांनी विविध विषयावर निवेदने, मागण्या यावेळी सादर केल्या. त्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य श्री. मेश्राम यांनी यावेळी दिले. कार्यक्रमाचे  संचालन प्रशांत पवार यांनी तर रुपेश पवार यांनी आभार मानले.

00000                                       

                              जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत

विशेष गौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित

        अमरावती, दि. 17 (जिमाका): जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक पाल्य, माजी सैनिक, माजी  सैनिक वीर पत्नी यांनी विशेष गौरव पुरस्कारासाठी़ जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अमरावती येथून अर्ज प्राप्त करुन 1 सप्टेंबर 2025 पर्यंत सर्व कागद पत्रासहित प्रस्ताव जमा करावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांना, वीर पत्नी यांना कळविण्यात येत की, ज्या माजी सैनिक, वीर पत्नी यांच्या पाल्यांना इयत्ता दहावीमध्ये 90 टक्के व बारावीमध्ये 85 टक्के व त्यापेक्षा जास्त गुण  प्राप्त झाले आहेत व ज्या पाल्यांचा चालू वर्षात आयआयटीआयआयएम, एम्स अशा नामवंत व ख्यातीप्राप्त संस्थामध्ये प्रवेश मिळाला असल्यास तसेच कोणत्याही क्षेत्रात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त पात्र उमेदवार अर्ज करु शकतात.

00000

सैनिकी मुला, मुलींचे वसतिगृह येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

        अमरावती, दि. 17 (जिमाका): माजी सैनिक, वीर पत्नी यांना सूचित करण्यात येते की, अमरावतीमध्ये माजी सैनिकी मुलांचे वसतिगृह, नवसारी जवाहर नवोदय विद्यालयाच्या मागे असून या वसतिगृहामध्ये एकुण 48 मुलांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था आहे. तसेच सैनिकी मुलींचे वसतीगृह, नंदनवन कॉलनी, कॅम्प, अमरावती येथे असून या वसतिगृहामध्ये एकुण 48 मुलींची राहण्याची व भोजनाची व्यवस्था आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 या शैक्षणिक वर्षात जे माजी सैनिक, वीर पत्नी अमरावती शहराच्या बाहेर राहतात व त्यांचे पाल्य अमरावती येथे उच्च शिक्षण घेत आहेत त्यांच्या पाल्यांना या वसतिगृहामध्ये प्रवेश दिला जातो. माजी सैनिकांच्या पाल्यांना अती अल्प दरात सैन्याच्या रॅन्कप्रमाणे भाडे आकारले जाते व वीर पत्नी यांच्या पाल्यांना या वसतीगृहामध्ये विनामुल्य प्रवेश देण्यात येतो.

प्रवेशासाठी आवश्यक प्रवेश पुस्तिका वसतिगृह अधीक्षक तसेच वसतिगृहात उपलब्ध आहे. वसतीगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी संबंधित अधीक्षक, अधीक्षका यांचेकडून प्रवेश पुस्तिका खरेदी करून अर्ज त्यांच्याकडे सादर करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. माजी सैनिक पाल्यास दरमहा 2 हजार 500 रूपये तर  सिव्हिल पाल्यास दरमहा 3 हजार 500 रूपये मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील नमुद दूरध्वनीवर किंवा प्रत्यक्ष संपर्क साधावा.सैनिकी मुलांचे वसतिगृह, नवसारी, अमरावती (0721-2530366), 8329968301, 8668964662 तर सैनिकी मुलींचे वसतिगृह, नंदनवन कॉलनी, अमरावती (0721-2550429), 8830865337 आणि  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अमरावती (0721-2661126) यावर संपर्क साधावा.

0000

जिल्ह्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव अभियान 1 जुलै पासून सुरू

                 अमरावतीदि. 17 (जिमाका): पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर गौरव अभियान दि. 1 जुलै 2025 ते 31 मे 2026 पर्यंत जिल्‍ह्यात राबविण्यात येत आहे. त्‍यानुषंगाने आरोग्‍य विभागामार्फत दरमहा प्रत्‍येक आरोग्‍य संस्‍थेमध्‍ये महिलांच्‍या आरोग्‍याबाबत उपक्रम राबविण्यात येणार आहे.या उपक्रमाअंतर्गत आरोग्‍य संस्‍थानिहाय दरमहिन्‍यात शिबिराचे आयोजन करण्‍यात येणार आहे. 

पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर गौरव अभियान , महिला सक्षमीकरण यामध्‍ये महिलांसाठी एकूण 488 आरोग्‍य संस्‍था उपक्रम राबविणार आहेत. त्‍यामध्‍ये 5 लाख 86 हजार 238 महिलांना लाभ मिळणार आहे. या अभियान अंतर्गत खालीलप्रकारे शिबिर आयोजित करण्‍यात येत आहेत.

            असंसर्गजन्य आजार तपासणी व समुपदेशन अंतर्गत उच्‍चरक्‍तदाबमधुमेहमुखकर्करोगस्‍तनाचा कर्करोगगर्भाशय मुखाचा कर्करोग, आवश्यक रक्त तपासण्या लिपिड प्रोफाइल CBC, ECG  राष्ट्रीय किशोरवयीन स्वास्थ कार्यक्रम (RKSK), राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रम (RBSK) अंतर्गत किशोरवयीन मुलींना वैयक्तिक स्‍वच्‍छतेविषयी माहिती देणे, मासिक पाळीदरम्‍यानची स्‍वच्‍छता व घ्‍यावयाची काळजी याबाबत माहिती देणे, पोषण आहार, WIFS, जंतनाशक मोहिमयोगा, वात्सल्य कार्यक्रम पात्र लाभार्थ्‍यांची गर्भधारणापूर्व समूपदेशन तपासणीउपचार याप्रमाणे तपासण्‍या करण्‍यात येतील, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.

0000

सहकार क्षेत्रातील योगदानाबाबत पुरस्कारासाठी

प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत 31 जुलैपर्यंत

अमरावती, दि. 17 (जिमाका): सहकार क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या सहकारी संस्थांना त्यांचे सहकार क्षेत्रातील योगदानाबाबत पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या सहकारी संस्थांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी आपल्या संस्थेचे मुख्यालय असलेल्या संबंधित तालुक्यातील उपनिबंधक, सहायक निबंधक, सहकारी संस्था या कार्यालयांशी संपर्क साधून आपल्या संस्थांचे प्रस्ताव दि. 31 जुलै 2025 पर्यंत सादर करावेत. अडचण असल्यास उपनिबंधक, सहायक निबंधक, सहकारी संस्था व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था या कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थाचे सहायक निबंधक ग. म. डावरे यांनी केले आहे.

00000

शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यांचे आयोजन

इच्छुक शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

अमरावती, दि. 17 (जिमाका): राज्यातील शेतक-यांचे केवळ उत्पादन व उत्पादकता वाढविणे हे ध्येय यापुढे न राहता उत्पादित होणा-या शेतीमालाची दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे. शेतीशी निगडित घटकांबाबत जगात वेळोवेळी होत असलेले बदल, विकसित होत असलेले तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या गरजेनुरुप पोहोचविणे आणि त्यासाठी आवश्यक सहाय्य व सोयीसुविधा पुरविणे निकडीचे आहे. यासाठी कृषि विस्तार कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी कृषी विभागाकडून त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत.

विविध देशांनी विकसित केलेले शेतीविषयक तंत्रज्ञान व तेथील शेतकऱ्यांनी त्याचा केलेला अवलंब व त्याद्वारे त्यांच्या उत्पनात झालेली वाढ याबाबत त्या देशातील शास्त्रज्ञ, शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा, क्षेत्रीय भेटी तसेच संस्था भेटी यासाठी राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करणे, हे या योजनेचे उद्दीष्ट आहे. त्यानुसार सन 2025-26 मध्ये राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यांचे आयोजन करण्यात येत आहे. सदर योजनेंतर्गत युरोप, इस्त्राईल, चीन, जपान, मलेशिया, व्हिएतनाम, फिलीपाईन्स व दक्षिण कोरीया देशांची निवड करण्यात आली आहे.

यासाठी लाभार्थी हा स्वतः शेतकरी असावा. स्वतःचे नावे चालु कालावधीचा (मागील सहा महिन्यातील)  7/12 व 8-अ उतारा असावा. उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असावे. शेतकरी कुटुंबामधून फक्त एकाच व्यक्तीला लाभ घेता येईल. शेतकऱ्यांचे अॅग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आय डी असणे आवश्यक आहे.  शेतकऱ्यांचे वय सहलीला निघण्याच्या दिवशी 25 वर्ष पूर्ण असावे. शेतकरी वैध पारपत्रधारक (पासपोर्ट) असावा. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यात सहभागी व्हावे, अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

00000

Wednesday, July 16, 2025

DIO NEWS AMRAVATI 16.07.2025

 


महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य ॲड. धर्मपाल मेश्राम यांचा आज अमरावती जिल्हा दौरा

अमरावती, दि. 16 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य ॲड. धर्मपाल मेश्राम हे उद्या, दि. 17 जुलै रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

             दौऱ्यानुसार, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य ॲड. धर्मपाल मेश्राम हे उद्या, दि. 17 जुलै रोजी सोयीनुसार कारने नागपूर येथून अमरावतीला आगमन. सकाळी 11 वाजता मुख्याधिकारी धारणी नगरपरिषद यांच्यासोबत आढावा व कामाची पाहणी तसेच भेटी व तपासणी. सकाळी 11. 30 वाजता मुख्याधिकारी नांदगाव खंडेश्वर नगरपरिषद यांच्यासोबत आढावा व कामाची पाहणी तसेच भेटी व तपासणी. दुपारी  12 वाजता मुख्याधिकारी भातकुली नगरपरिषद यांच्यासोबत आढावा व कामाची पाहणी तसेच भेटी व तपासणी. दुपारी 12.30 वाजता मुख्याधिकारी तिवसा, नगरपरिषद यांच्यासोबत आढावा व कामाची पाहणी तसेच भेटी व तपासणी.

दुपारी 1.30 वाजता दस्तूर नगर येथील विवेकानंद छात्रावास येथे पारधी विकास परिषद विदर्भ प्रांताच्या बैठकीस उपस्थिती व मार्गदर्शन. दुपारी 2.30 ते 3 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 3 वाजता जिल्ह्यातील आदिवासी विभागाच्या सर्व प्रकल्प अधिकारी यांच्या समवेत आदिवासी विभागाचे विविध योजनेबाबत आढावा बैठक. दुपारी 4 वाजता कृषी अधिकारी यांच्या समवेत आढावा बैठक. सायंकाळी 5 ते 6 या कालावधीत महिला व बालकल्याण तसेच क्रीडा विभाग यांच्या समवेत आढावा बैठक. रात्री मुक्काम. सोयीनुसार शुक्रवार, दि. 18 जुलै रोजी अकोलाकडे प्रमाण.

0000




पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने

जिल्ह्यात युरिया आणि डीएपी खताचा साठा शेतकऱ्यांसाठी खुला

अमरावती, दि. 16 ( जिमाका): पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने आणि आदेशानुसार खरीप - 2025 हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी युरिया आणि डीएपी रासायनिक खतांचा संरक्षित साठा खुला करण्यात आला आहे. पालकमंत्री श्री. बावनकुळे  यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी चिखलदरा आणि धारणी या भागातील युरिया आणि डीएपी खताच्या मागणी संदर्भात नुकतीच बैठक घेतली होती. त्यांच्या पुढाकाराने युरिया आणि डीएपीचा मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

 

 खरीप हंगामासाठी युरियाचा साठा संरक्षित ठेवण्यासाठी 'दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड, नागपूर' आणि 'महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित' यांची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये 1860.605 मेट्रिक टन युरिया आणि 808.45 मेट्रिक टन डीएपीचा साठा या संस्थांमार्फत संरक्षित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या गरजेनुसार, जिल्हाधिकारी आशिष येरेकर 9 जुलै 2025 रोजी युरिया आणि डीएपीचा संरक्षित साठा मुक्त करण्यास मान्यता दिली आहे.

पालकमंत्री श्री. बावनकुळे  यांच्या आदेशानुसार, जिल्ह्यातील तालुकानिहाय युरियाचा साठा खालीलप्रमाणे वितरीत करण्यात येणार आहे: अचलपूर: 70.00 मेट्रिक टन , दर्यापूर: 120.00 मेट्रिक टन, चांदूर बाजार: 50.00 मेट्रिक टन , अमरावती: 40.00 मेट्रिक टन, चिखलदरा: 100.00 मेट्रिक ट, भातकुली: 40.00मेट्रिक टन , नांदगाव खंडेश्वर: 40.00 मेट्रिक टन, अंजनगाव सुजी: 100.00 मेट्रिक टन, धारणी: 140.00 मेट्रिक टन, तिवसा: 40.00 मेट्रिक टन, चांदूर रेल्वे: 30.00 मेट्रिक टन, मोर्शी: 80.00 मेट्रिक टन , वरुड: 80.00 मेट्रिक टन. जिल्ह्यात एकूण 930.00 मेट्रिक टन युरियाचा साठा आता विक्रीसाठी उपलब्ध होईल.

मुक्त करण्यात आलेला हा रासायनिक खतांचा साठा तातडीने शेतकऱ्यांना विक्री करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावा, असे निर्देश कृषी विकास अधिकारी एम. जे. ताडकर आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी दिले आहेत.

0000000









जागतिक युवा कौशल्य दिन उत्साहात साजरा;

खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या हस्ते युवकांना नियुक्ती पत्रे प्रदान

अमरावती, दि. 16 (जिमाका): 'कार्यक्षमतेला दिशा -जागतिक युवा कौशल्य दिन' या दिनाचे औचित्य साधून अमरावती येथे नुकतेच रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सिकची रिसॉर्ट, वलगाव येथे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉवेल करिअर सेंटर, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने ­‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला खासदार डॉ. अनिल बोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते कार्यानुसार निवड झालेल्या ६ उमेदवारांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी श्री. बोंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या.

            यावेळी उपस्थित उद्योजकांचा विभागाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच, 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती कार्यालयातील कर्मचारी वैष्णवी कुयरे, सोनाली भोगे, श्री अनिता नांदुरकर, अंकुश सातपैसे, प्रथमेश सोहळे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

याव्यतिरिक्त, शासनाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय हिरक महोत्सवामधील एकात्म मानव दर्शन हिरक महोत्सवात विविध उपक्रमांसह सहभागी झालेल्या अमरावती जिल्ह्यातील 5 संस्थांना (इमेज कॉम्प्युटर इन्स्टिट्युट,  रोशनी महिला विकास संस्था,  स्पार्क कॉम्प्युटर इन्स्टिट्युट,  करिअर कॉम्प्युटर इन्स्टिट्युट,  डाखरे महाराज फाऊंडेशन) प्रशस्तीपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले.

 उपक्रमाच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षीय भाषणातून उपायुक्त दत्तात्रय वाकरे यांनी उपस्थित उमेदवारांना मार्गदर्शन करताना, नाविन्यपूर्ण उपक्रमांमधून रोजगार मिळविण्यापेक्षा रोजगार देणारे बनण्याचा संदेश दिला.

प्रेमकिशोर सिकची रिसॉर्ट चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्त प्रिती सोमाणी यांनी आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देणे हे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. आयोजक सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी शिक्षणासोबतच रोजगाराच्या संधी मिळाव्यात, या हेतूने या मेळाव्याचे आयोजन केल्याचे स्पष्ट केले.

सिकची रिसॉर्टचे संचालक सचिन मालकर, गजानन कडू, मनीषा निर्मल आणि कौशल्य विकास विभागाचे मार्गदर्शन अधिकारी अभिषेक ठाकरे यावेळी उपस्थित होते. रोजगार मेळाव्यात वैभव एंटरप्रायझेस, पीपल ट्री वेंचर, जाधव गियर, स्पंदन मायक्रो फायनान्स, एलआयसी इंडिया, स्वीगी यासह एकूण 15 कंपन्यांनी सहभाग घेऊन उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वैष्णवी कुवरे यांनी तर आभार क्रपा अरगुल्लेवार यांनी मानले.

00000

 

शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा खरीप हंगाम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 जुलैपर्यंत

अमरावती, दि. 16 (जिमाका): नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत खरीप हंगाम सन 2025 साठी शेतकरी सहभागास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत 18 हजार 503 शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला आहे. या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2025 आहे. कृषी विभागाने सर्व शेतकरी बांधवांना पिकांचा विमा काढून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

 या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी, गावातील सहायक कृषी अधिकारी किंवा तालुका स्तरावरील तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. जर अर्ज करण्यासाठी निर्धारित प्रीमियमपेक्षा जास्त पैसे मागितले जात असतील, तर शेतकऱ्यांनी कृषी विभाग किंवा तहसील कार्यालयात तक्रार करावी.

अंतिम दिवसांमध्ये पीक विमा पोर्टलवर तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, शेवटच्या दिवसाची वाट न पाहता, शक्य तितक्या लवकर जवळच्या सी.एस.सी केंद्राशी संपर्क साधून या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

000000

कौशल्य विकास केंद्राचा आज रोजगार मेळावा

अमरावती, दि. 16 (जिमाका): अमरावती जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत 'पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मोहिमे'अंतर्गत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या, गुरुवार, दि. 18 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजता शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, डेपो रोड, अमरावती येथे हा मेळावा होणार आहे.

जिल्हा कौशल्य विकास केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटरतर्फे आयोजित या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यात प्रामुख्याने गार्डियन सिक्युरिटी सर्विसेस प्रा. लि., हैदराबाद या कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहून उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. जिल्ह्यातील युवकांना त्यांच्या कौशल्य आणि पात्रतेनुसार नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे.

या         मेळाव्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठीही विविध आस्थापना आणि कंपन्यांचे प्रतिनिधी थेट मुलाखती घेतील. मुलाखतीनंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना जागेवरच नोकरीची संधी मिळेल.

इच्छुक उमेदवारांनी mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपली ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीची प्रत काढून उद्या सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी 0721-2566066 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा amravatirojgar@gmail.com या ईमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त यांनी केले आहे.

0000

जिल्हास्तरावरील युवा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याची मुदत 24 जुलैपर्यंत 

अमरावती, दि . 16 (जिमाका) :  राज्यस्तरीय, विभागीय आणि जिल्हास्तरीय पातळीवर विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या युवा पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा युवा पुरस्कार 2024-25­  अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 जिल्हा युवा पुरस्कारासाठी जिल्ह्यातील एक युवक, एक युवती तसेच एक नोंदणीकृत संस्था यांना 10 हजार रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

युवक युवतींसाठी पात्रता निकष व अटी पुढील प्रमाणे आहेत. अर्जदाराचे वय 1 एप्रिल रोजी पंधरा वर्षे पूर्ण व 31 मार्च रोजी 29 वर्ष पर्यंत असावे. जिल्हास्तर पुरस्कारासाठी जिल्ह्यात सलग पाच वर्ष वास्तव्य असणे आवश्यक आहे .केलेल्या  कार्याचे पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. पुरस्कार व्यक्ती अथवा संस्थेत विभागून दिला जाणार नाही .

केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.

संस्थांसाठी पात्रता निकष व अटी पुढील प्रमाणे आहेत. पुरस्कार संस्थेत विभागून दिला जाणार नाही. संस्थांनी केलेल्या कार्याची पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. अर्जदार संस्था पंजीबद्ध असावी. अर्जदार संस्थेच्या सदस्यांचा पोलिस विभागाने प्रामाणिक केलेला चारित्र दाखला देणे आवश्यक राहील. युवा व युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्थांच्या गेल्या तीन वर्षातील कामगिरीचा यावेळी  विचार करण्यात येईल .

   इच्छुक व पात्र युवक-युवती तसेच संस्थांना करावयाचे नमुना अर्ज अर्जदारांनी 24 जुलै 2025 पूर्वी कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती, जिल्हा क्रीडा संकुल, अमरावती मार्डी रोड, तपोवन गेट जवळ, अमरावती येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

0000


अमरावती पोस्ट ऑफिसमध्ये 22 जुलैपासून डिजिटल क्रांती; 21 जुलैला व्यवहार बंद

अमरावती, दि. 16 (जिमाका): भारतीय डाक विभागाने आपल्या सेवांमध्ये मोठे बदल घडवून आणण्यासाठी 'आयटी 2.0 (IT 2.0)' या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत 'ए.पी.टी. ॲप्लिकेशन (APT Application)' ही नवीन डिजिटल प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पोस्ट ऑफिसमधील सर्व व्यवहार अधिक जलद, अचूक आणि ग्राहकाभिमुख होणार आहेत.

या नव्या प्रणालीची अंमलबजावणी अमरावती जिल्ह्यातील प्रमुख पोस्ट ऑफिसमधून सुरू होणार असून, 22 जुलै 2025 पासून अमरावती प्रधान डाकघराच्या अखत्यारितील अमरावती, भातकुली, नांदगाव खंडेश्वर, चांदुर रेल्वे, धामणगाव रेल्वे, तिवसा, मोर्शी आणि वरुड या तालुक्यातील सर्व टपाल शाखा डाकघर कार्यालये व उपडाकघर कार्यालयांमध्ये ही प्रणाली कार्यान्वित होईल.

या महत्त्वपूर्ण बदलासाठी आवश्यक असलेल्या डेटा स्थलांतरणाची प्रक्रिया 21 जुलै 2025 रोजी नियोजित करण्यात आली आहे. या तांत्रिक कामामुळे, सोमवार, 21 जुलै 2025 रोजी वरील सर्व तालुक्यातील पोस्ट ऑफिसमध्ये कोणतेही व्यवहार केले जाणार नाहीत, अशी माहिती अमरावती पोस्ट विभागाचे प्रवर अधिक्षक डाकघर यांनी दिली आहे.

भारतीय डाक विभागाने आपल्या सर्व ग्राहकांना विनंती केली आहे की, त्यांनी त्यांची सर्व महत्त्वाची पोस्टातील कामे 21 जुलै 2025 पूर्वीच पूर्ण करून घ्यावीत. या तात्पुरत्या गैरसोयीबद्दल डाक विभागाने खेद व्यक्त केला आहे. प्रत्येक नागरिकाला अधिक चांगल्या, जलद आणि डिजिटली सक्षम सेवा देण्यासाठीच ही पावले उचलली जात असल्याची ग्वाही डाक विभागाने दिली आहे.

00000


केंद्र पुरस्कृत योजनांच्या लाभार्थ्यांसाठी 'डिजिटल जीवन प्रमाणपत्र' बंधनकारक; 25 जुलै पर्यंत अंतिम मुदत

 अमरावती, दि. 16 (जिमाका): केंद्र सरकारच्या विविध सामाजिक सुरक्षा योजनांचे लाभार्थी, ज्यात इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, विधवा आणि दिव्यांग योजनांचा समावेश आहे, यापुढे या सर्व लाभार्थ्यांना 'डिजिटल जीवन प्रमाणपत्र' (Digital Life Certificate - DLC) सादर करणे अनिवार्य असेल. या नव्या नियमामुळे 'आधार' प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या हयातीची पडताळणी अधिक पारदर्शकपणे आणि सुलभतेने होणार आहे.

दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या परफॉर्मन्स रिव्ह्यू कमिटी (PRC) च्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार, जुलै 2025 महिन्यामध्ये केंद्र पुरस्कृत सर्व लाभार्थ्यांनी 'बेनेफिशरी सत्यपण ॲप' वापरून आपले डिजिटल जीवन प्रमाणपत्र जनरेट करणे आवश्यक आहे. एकदा हे प्रमाणपत्र जनरेट झाले की ते एनएसएपी (NSAP) पोर्टलवर अद्ययावत केले जाईल आणि त्यानंतरच लाभार्थ्यांना त्यांच्या योजनेचा निधी उपलब्ध होईल.

डिजिटल जीवन प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लाभार्थी आपल्या जवळच्या तहसील कार्यालय किंवा संजय गांधी योजना विभागातून मदत घेऊ शकतात. तसेच, ऑनलाइन हयातीचे प्रमाणपत्र जनरेट करणाऱ्यांच्या मदतीनेही हे प्रमाणपत्र तयार करता येईल. सर्वात सोयीस्कर पर्याय म्हणजे, अँड्रॉइड मोबाईलवर सदर ॲप (Beneficiary Satyapan App) वापरून लाभार्थी स्वतःही हे प्रमाणपत्र विनामूल्य जनरेट करू शकतात.

सर्व पात्र लाभार्थ्यांना येत्या 25 जुलै 2025 पर्यंत आपले डिजिटल जीवन प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने काढून घ्यावे. या निर्णयामुळे योजनांमध्ये अधिक पारदर्शकता येईल आणि लाभार्थ्यांना वेळेवर लाभ मिळेल, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी केले आहे.


000000





चिखलदरा येथील वाहतूक नियंत्रण शुक्रवारपासून करण्याचा निर्णय

*वनवे वाहतूक शुक्रवार ते सोमवारपर्यंत राहणार

*पर्यटकांच्या सुविधांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

*एमआरपी पेक्षा अधिक दराने विक्री केल्यास कारवाई

अमरावती, दि. 16 (जिमाका): चिखलदरा येथील विविध पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी शनिवारी आणि रविवारी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत आहेत. यात वाहतुकीची कोंडी होत असल्याने चिखलदराकडे जाणारा आणि चिखलदरावरून परतवाड्याकडे येताना वनवे वाहतूक नियमन आता शुक्रवारी दुपारी दोन वाजल्यापासून ते सोमवारी दुपारी दोन वाजेपर्यंत राहणार आहे, असे आदेश जिल्हाधिकारी अशिष येरेकर यांनी दिले आहे.

चिखलदरा येथे पर्यटकांच्या सोयीसुविधांकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक पार पडली. बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्यासह चिखलदरा आणि धारणीचे तहसीलदार, उपवनसंरक्षक आणि नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीमध्ये प्रामुख्याने पर्यटकांना येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करण्यात आली. पर्यटकांच्या अडचणी सोडविण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात यापूर्वी शनिवार व रविवार या दोन दिवसांत चिखलदराला जाणारी वाहतूक आणि चिखलदऱ्यावरून परतवाड्याकडे येणारी वाहतूक ही वनवे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यात आत बदल करून ही वनवे वाहतूक आदल्या दिवशीपासूनच म्हणजे शुक्रवारी दुपारी दोन वाजल्यापासून ते पुढील दिवस म्हणजे सोमवारी दुपारी दोन वाजेपर्यंत ही लागू राहील. यामुळे वाहतूक नियंत्रणास अधिक प्रभावीपणे पार पाडता येईल. वाहतुकीसाठी बनलेले सहा चोक पॉईंट्स शोधण्यात आले असून यामध्ये ५० पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त पुढील काळात चिखलदरा व परिसरामध्ये राहणार आहे. त्यांच्यामार्फत वाहतूक नियंत्रण करण्यात येईल. सोबतच वनविभागाच्या नाक्यावर अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्यामुळे वनविभागाच्या नाक्यावरील वाहनांच्या लागणाऱ्या रांगा कमी होण्यास मदत होईल. सोबतच नगर परिषदेच्या नाक्यावर कर्मचारी वाढवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. यामुळे नाक्यावरील गर्दी कमी होण्यास मदत होईल. 

पर्यटकांच्या सुविधांसाठी पोलीस अधिकारी व तहसीलदार यांना पार्किंगसाठी अतिरिक्त जागा शोधण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. आवश्यकता भासल्यास खाजगी जागा अधिग्रहित करून या ठिकाणी पार्किंगच्या सुविधा जिल्हा प्रशासन उपलब्ध करून देणार आहे. यासोबतच पर्यटकांना गरजेचे असलेल्या पाण्याची बॉटल व इतर खाद्यपदार्थ नियत दरापेक्षा जास्त दराने विक्री केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत सर्व आस्थापनांना सूचना देण्यात आल्या. नियत दरापेक्षा जास्त विक्री करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

सर्व विभागांशी समन्वय साधून चिखलदरा येथे येणाऱ्या उत्साही पर्यटकांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. पर्यटकांनी चिखलदऱ्याला भेट द्यावी व निसर्गाचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

00000

DIO NEWS AMRAVATI 18.07.2025

बँकांनी उद्योगाला कर्ज सुविधा देऊन अर्थव्यवस्थेला गती द्यावी -जिल्हाधिकारी आशिष येरेकर *एक जिल्हा एक उत्पादन मान्यवरांना भेट देणार अमरावती, ...