जिल्ह्यात 1 हजार 73 कोटी 94 लाख रू. कर्जवाटपशेतकरी बांधवांच्या विकासासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
खरीप पीक कर्जाचे गत पाच वर्षातील उच्चांकी वाटप
महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा अनेकांना लाभ
जिल्ह्यात 1 हजार 73 कोटी 94 लाख रू. कर्जवाटप
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना व विविध प्रयत्नांमुळे जिल्ह्यात खरीप कर्जवितरणाची टक्केवारी वाढून आता हे प्रमाण 62 टक्क्यांवर पोहोचले आहे. गत पाच वर्षांतील खरीप कर्जवितरणात हे सर्वाधिक प्रमाण आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत 1 लाख 23 हजार 681 शेतकरी बांधवांना 1 हजार 73 कोटी 94 लाख रू. कर्जवाटप खरीप कर्ज वितरीत करण्यात आले आहे. शेतकरी बांधवांच्या विकासासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
कोरोना संकटकाळात विविध क्षेत्रांपुढे नवनवी आव्हाने उभी राहिली. ग्रामीण कृषी अर्थकारणातही अनेक अडचणी उभ्या राहिल्या. या काळात विविध अडचणींवर मात करण्याचे प्रयत्न होत असतानाच शेतकरी बांधवांना खरीपाचे कर्ज वाटप सुरळीत व्हावे या हेतूने महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रभावीपणे राबविण्यात आली. कर्जमुक्ती योजनेत 1 लाख 10 हजार 774 खात्यांना योजनेचा सुमारे 799 कोटी 78 लक्ष रूपये निधीचा लाभ देण्यात आला. खरीप कर्जवाटप प्रक्रियेत अधिकाधिक शेतकरी बांधवांचा समावेश होण्यासाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी विविध बैठकांद्वारे निर्देश दिले व सातत्याने पाठपुरावा केला.
यंदाच्या खरीप हंगामासाठी 1720 कोटी रूपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट होते. त्यानुसार 1 हजार 73 कोटी 94 लक्ष कर्जवाटप करण्यात आले आहे. त्यानुसार हे प्रमाण 62 टक्क्यांवर गेले असून, गत पाच वर्षातील ही सर्वाधिक कर्जवाटपाची रक्कम आहे. रब्बी पीक कर्जवितरणालाही गती द्यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.
यंदाच्या खरीप कर्जवाटपात अलाहाबाद बँकेकडून 10 कोटी 82 लाख, आंध्र बँकेकडून एक कोटी, बँक ऑफ बडोदाकडून 27 कोटी 4 लाख, बँक ऑफ इंडियाकडून 20 कोटी 59 लाख, बँक ऑफ महाराष्ट्रकडून 209 कोटी 35 लाख, कॅनरा बँकेकडून सात कोटी 10 लाख, सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून 148 कोटी 49 लाख, कॉर्पोरेशन बँकेकडून 15 लाख, इंडियन बँकेकडून 9 कोटी 51 लाख, इंडियन ओव्हरसीज बँकेकडून 4 कोटी 22 लाख, पंजाब नॅशनल बँकेकडून 10 कोटी 20 लाख, स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 184 कोटी 46 लाख, युको बँकेकडून 3 कोटी 21 लाख, युनियन बँक ऑफ इंडियाकडून 40 कोटी 56 लाख, ॲक्सिस बँकेकडून 10 कोटी, आयडीबीआय बँकेकडून 3 कोटी 31 लाख, एचडीएफसी बँकेकडून 18 कोटी 22 लाख, आयसीआयसीआयकडून 4 कोटी 25 लाख, रत्नाकर बँकेकडून 20 लाख, इंडसइंड बँकेकडून 25 लाख, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेकडून 16 कोटी 55 लाख, जिल्हा बँकेकडून 344 कोटी 46 लक्ष रूपये असे एकूण एक हजार 73 कोटी 94 लक्ष रूपयांचे कर्जवितरण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी दिली.
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना व जिल्हा प्रशासन व बँकांचा सातत्यपूर्ण समन्वय, तसेच विविध प्रयत्नांमुळे कर्जवितरणाची टक्केवारी वाढली. त्यामुळे 62 टक्क्यांवर हे प्रमाण जाऊन पोहोचले आहे, असे जिल्हा उपनिबंधक श्री. जाधव यांनी सांगितले. रब्बी हंगामासाठीही कर्जवितरण होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
000
Comments
Post a Comment